अभीप्सा २०१८ अंकामधील आशय

जानेवारी २०१८ – नवउषेचा अग्रदूत – नववर्ष दिनाच्या निमित्ताने श्रीमाताजी आश्रमवासीयांना संदेश देत असत. हे संदेश या अंकामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या संदेशांचा अधिक खोलवर अर्थ देखील श्रीमाताजींनी नंतर उलगडून दाखवला आहे, त्यांचाही समावेश या अंकामध्ये आहे.
फेब्रुवारी २०१८ – ऑरोविल ही एक अशी वैश्विक नगरी आहे कि जेथे पंथातीत होऊन, सर्व राष्ट्रीयता व सर्व प्रकारच्या राजकारणाच्या अतीत होऊन, सर्व देशांमधील स्त्रीपुरुष, शांती व सुसंवादाने जीवन व्यतीत करू शकतील. अशी मानवी एकता प्रत्यक्षात उतरविणे हा ऑरोविलचा हेतू आहे. १९६८ साली स्थापना झालेल्या या नगरीमध्ये १०० हून अधिक देशांमधील नागरिक राहत आहेत. या नगरीला आता ५० वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने हा विशेषांक प्रकाशित केला आहे.


मार्च २०१८ – तपस्या – तपस्या ह्या विषयाबद्दल अनेक गैरसमजुती प्रचलित आहेत, त्याचे निराकरण करून खरी तपस्या म्हणजे काय ह्याचे विवरण या अंकामध्ये वाचकांना वाचायला मिळत आहे. आत्मशुद्धीसाठी केलेल्या प्रयत्नाच्या आधारे अभीप्सेचा अग्नी प्रज्ज्वलित करणे हा तपस्या ह्या शब्दाचा खरा अर्थ आहे. सौंदर्य, शक्ती, ज्ञान व प्रेम तपस्या या चतुर्विध तपस्यांचे स्पष्टीकरण येथे देण्यात आले आहे.
एप्रिल २०१८ – भविष्याचे बीजारोपण – भविष्यकालीन मानवतेची जडणघडण ज्या शिक्षणाच्या आधारे व्हावयाची आहे त्या शिक्षणाला हा अंक वाहिलेला आहे. SriAurobindo International Centre of Education ह्या शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने प्रकाशित करण्यात आलेला हा अंक श्रीअरविंद आणि श्रीमाताजी ह्यांच्या शिक्षणविषयक प्रयोगावर, शिक्षणविषयक विचारांवर आधारित आहे.


मे २०१८ – बुद्धाचा मार्ग – २५०० वर्षांपूर्वी भगवान बुद्ध यांचा अवतार होऊन गेला पण आजही त्यांनी प्रतिपादन केलेल्या सत्याचा प्रभाव टिकून आहे. श्रीमाताजींनी धम्मपदामधील काही निवडक उतारे विवेचनासाठी निवडले होते, त्याचे स्पष्टीकरण केले होते, त्या बुद्ध-वचनांचा आणि त्यावरील श्रीमाताजीकृत भाष्याचा समावेश या अंकामध्ये केला आहे.
जून २०१८ – सर्व जीवन म्हणजे योगच आहे – भाग १ – श्रीअरविंद लिखित महत्त्वाच्या ग्रंथांपैकी एक ग्रंथ म्हणजे Synthesis of Yoga. मराठीत तो ‘योगसमन्वय’ या नावाने प्रकाशित करण्यात आलेला आहे. या ग्रंथामधून आपल्याला योगाची सर्वसाधारण रूपरेषा, त्याचे समन्वयात्मक रूप आणि त्यातील महत्त्वाच्या प्रक्रिया आणि त्यांचे फळ यांचे ज्ञान होते. यातून साधकाला योगाच्या मूलतत्त्वांची सर्वसमावेशक कल्पना मिळते, साधकाला त्याचा योगप्रवास सुरु करण्यासाठी व त्या प्रवासात दूरवर घेऊन जाण्यासाठी लागणारी रूपरेषा मिळते. या ग्रंथातील काही निवडक उताऱ्यांचा समावेश या अंकामध्ये करण्यात आला आहे.


जुलै २०१८ – सर्व जीवन म्हणजे योगच आहे – भाग २ – Synthesis of Yoga या ग्रंथाच्या पहिल्या 3 विभागांमध्ये कर्म-ज्ञान-भक्ती या पारंपरिक योगांचे उन्नयन पूर्णयोगामध्ये आणि दिव्य जीवनामध्ये कसे होते हे स्पष्ट केले आहे तर शेवटच्या आत्मपूर्णत्व योग या विभागामध्ये श्रीअरविंद प्रणीत योगाची म्हणजे पूर्णयोगाची व अतिमानसाची संकल्पना स्पष्ट केली आहे.
ऑगस्ट २०१८ – प्रकाशाचे पुनरागमन – श्रीअरविंद यांच्या भारतातील पुनरागमनाचे १२५ वे वर्ष – भारतीय विचारांचा कोणताही प्रभाव आपल्या मुलावर असता कामा नये या विचारांनी श्रीअरविंद यांच्या वडिलांनी त्यांना लहानपणीच शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविले. तेथील १४ वर्षांचे वास्तव्य संपवून, श्रीअरविंद दि.०६ फेब्रुवारी १८९३ रोजी भारतात परत आले. परतल्यावर त्यांचे बडोदा येथे वास्तव्य होते. त्या काळातील त्यांचे विचार, भावना, त्याकाळात त्यांना आलेले आध्यात्मिक अनुभव ह्यावर ह्या अंकामध्ये लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.


सप्टेंबर २०१८ – प्रसवपूर्व काळाबद्दलचे शिक्षण – अपत्यजन्म ही केवळ शारीरिक प्रक्रिया नाही. ती प्रार्थनेचा आणि आकांक्षेचा परिणाम असली पाहिजे. आईवडील बनू इच्छिणाऱ्या दाम्पत्याने येऊ पाहणाऱ्या मुलाच्या घडणीमध्ये कसे सहभागी व्हायला पाहिजे ह्याचे मार्गदर्शन ह्या अंकात लाभेल.
ऑक्टोबर २०१८ – भारताचा शाश्वत धर्म – भारताच्या शाश्वत धर्माचे आकलन झाल्याखेरीज भारताच्या महानतेचे आकलन होणे अशक्य आहे. शाश्वत धर्म म्हणजे काय? तो इतर अनेक धर्मांसारखा एक धर्म आहे, का तो मानवजातीची अंधकारमय रात्र उजळवून टाकणारा एक आध्यात्मिक अग्नी आहे? श्रीअरविंद यांनी भारतीय शाश्वत धर्म यासंबंधी जे विवेचन केले आहे त्याचा समावेश या अंकामध्ये केला आहे.


नोव्हेंबर २०१८ – धर्म आणि अध्यात्म – ह्या अंकामध्ये धर्म आणि अध्यात्म म्हणजे काय, त्यातील फरक कोणता, त्यांच्या मर्यादा कोणत्या ह्यावर भर देण्यात आलेला आहे. त्या दोहोंमध्ये समान असणारा जो अभीप्सेचा धागा आहे, त्यावर ह्यामध्ये भर देण्यात आला आहे.
डिसेंबर २०१८ – पुनर्जन्म – हा विषय शास्त्रज्ञ व आध्यात्मिक साधक या साऱ्यांच्याच कुतूहलाचा विषय ठरलेला आहे. आत्म्याचा जो विविध देहांमधून प्रवास होत असतो तो येथे उलगडवून दाखविण्यात आला आहे. या अंकामध्ये श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या प्रकाशामध्ये ह्या चिरकालीन समस्यांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.








