Tag Archive for: रूपांतरण

(‘श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन’ या श्रीअरविंद आश्रमाच्या शाळेमध्ये मुलांच्या आंतरात्मिक आणि आध्यात्मिक विकासाला पोषक असे वातावरण मिळते. येथेच श्रीमाताजींच्या प्रेरणेतून ‘फ्री प्रोग्रेस एज्युकेशन’ या नवीन शिक्षणपद्धतीचा उदय झाला. प्रचलित शिक्षणपद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने शिक्षण देताना या शाळेतील शिक्षकांना काही अडचणी येत असत, त्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागत असे. अशा वेळी श्रीमाताजी त्यांना विविध उपाययोजना सुचवत असत; त्यांना मार्गदर्शन करत असत. त्यापैकीच हा अंशभाग..)

व्यक्तीमधील परिपूर्णतेची क्षमता सर्वोच्च शक्यतेपर्यंत वाढविणे हे (आपल्या) शिक्षणाचे ध्येय आहे; व्यक्तीला जीवनामध्ये किंवा समाजामध्ये केवळ यशस्वी होण्यासाठी तयार करणे हे शिक्षणाचे ध्येय नाही.

*

केवळ यश मिळविणे हे उद्दिष्ट ठेवू नका; आपले ध्येय परिपूर्णत्व हे आहे. तुम्ही एका नूतन जगाच्या उंबरठ्यावर उभे आहात (आणि एवढेच नव्हे तर,) तुम्ही त्याच्या उदयामध्ये सहभागी होत आहात आणि त्याच्या निर्मितीमध्ये तुम्ही साधनभूत होत आहात हे कधीही विसरू नका. रूपांतरणाइतकी (transformation) दुसरी कोणतीच गोष्ट महत्त्वाची नाही. त्याच्या इतकी उपयुक्त अशी इतर कोणतीच गोष्ट नाही.

– श्रीमाताजी (CWM 12 : 120)

(श्रीमाताजीकृत प्रार्थना…)

हे ईश्वरा, तू परिपूर्ण ज्ञान आहेस, परम चेतना आहेस. जो तुझ्याशी सायुज्य पावतो तो – जोपर्यंत त्याचे तुझ्याशी ऐक्य टिकून असते तोपर्यंत – सर्वज्ञ असतो. परंतु ही अवस्था प्राप्त होण्यापूर्वीदेखील, ज्याने स्वतःच्या अस्तित्वाच्या पूर्ण प्रामाणिकपणाने आणि सचेत संकल्पशक्तीच्या आधारे, तुझ्याप्रति आत्मदान केलेले असते; ज्याने स्वतःमध्ये आणि स्वतःच्या संपूर्ण प्रभावक्षेत्रामध्ये, तुझ्या ‘दिव्य प्रेमाचा दिव्य कायदा’ विजयी व्हावा आणि तो आविष्कृत व्हावा यासाठी ‘तुला साहाय्यभूत होण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन,’ असा निर्धार केलेला असतो, त्याच्या जीवनातील सर्व गोष्टी बदलून गेल्या आहेत असे त्याला आढळते. सर्व परिस्थिती ही आता तुझ्या दिव्य कायद्याची अभिव्यक्ती करू लागली आहे आणि ती तुझ्याप्रति आत्मनिवेदन करण्यास साहाय्य करू लागली आहे असे त्याला आढळते. त्याच्यासाठी, जे सर्वोत्तम आहे तेच नेहमी घडून येते.

पण असे असूनही, जर त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये जर कोठे अजूनही काही तमोमयता शिल्लक असेल, एखादी अज्ञानी इच्छावासना अजूनही रेंगाळलेली असेल, कदाचित अशी एखादी इच्छा त्याच्यामध्ये शिल्लक आहे हे त्याला लगेच कळणारसुद्धा नाही, पण आज ना उद्या त्याच्या हे नक्की लक्षात येईल की, ती परम-उदार अशी शक्ती त्याचे खुद्द त्याच्यापासूनसुद्धा रक्षण करत आहे. त्याच्या विकसनासाठी, त्याच्या समग्र परिवर्तनासाठी व त्याच्या रूपांतरणासाठी आणि त्या ईश्वरी शक्तीला साधन म्हणून त्याचा उपयोग करता यावा यासाठी सर्वाधिक अनुकूल परिस्थिती त्या शक्तीने त्याच्यासाठी राखून ठेवली आहे, असे त्याच्या लक्षात येईल.

व्यक्ती जेव्हा याविषयी सचेत होते आणि तिला ही गोष्ट पूर्णपणे पटते तेव्हा ती भावी परिस्थितीविषयी किंवा भविष्यात काय घटना घडतील याची चिंता करत बसत नाही. त्या क्षणाला जे करणे सर्वोत्तम आहे, असे तिला वाटते ते परिपूर्ण प्रशांततेमध्ये ती करत असते. त्या कृतीमधून आमच्या मर्यादित बुद्धीला जे परिणाम अपेक्षित असतात ते तसे परिणाम दिसून आले नाही तरी आमच्या मनात एक ठाम विश्वास असतो की, त्याचा परिणाम म्हणून सर्वोत्तम तेच घडेल.

आणि म्हणूनच हे ईश्वरा, आमचे अंतःकरण भाररहित, हलके झाले आहे; आमचे विचार शांत झाले आहेत. आणि म्हणूनच हे ईश्वरा, आम्ही तुझ्याकडे पूर्ण विश्वासाने येतो आणि शांतिपूर्णतेने म्हणतो, हे ईश्वरा, तुझाच संकल्प सिद्धीस जाऊ दे कारण त्यातूनच खरा सुसंवाद प्रत्यक्षात येणार आहे.

• श्रीमाताजी (CWM 01 : 102)

 

मी तुम्हाला हे खात्रीपूर्वक सांगू शकते की, रूपांतरण इत्यादी गोष्टी प्राणावर सोपविल्या तर तो रूपांतरणाचा निर्णय कदापिही घेणार नाही. कारण तो स्वतःवरच खूष असतो. आणि एवढेच नाही तर तो, मनाचा साथीदार असल्यामुळे, तो जे काही करतो तेच कसे बरोबर आहे, याचे समर्थन करणारी स्पष्टीकरणं मनाद्वारे पुरविली जातात. जी माणसं प्राणिक चेतनेमध्ये जीवन जगत असतात ती, – भलेही त्यांनी तसे बोलून दाखविले नाही तरी – नेहमी स्वतःवरच अतिशय संतुष्ट असतात. त्यांच्याबाबतीत जे काही घडत असते त्यावर ती अतिशय संतुष्ट असतात आणि त्यांच्यातील आवेगांबाबत (impulses) ते म्हणत असतात, “अमुक गोष्ट किती स्वारस्यपूर्ण आहे, किती रोचक आहे.” आणि म्हणून, प्राणाने रूपांतरणाचा निर्णय घेईपर्यंत जर तुम्ही वाट पाहायचे ठरविलेत तर, कदाचित अनंत काळपर्यंत तुम्हाला वाट पाहात राहावी लागेल. ‘आज्ञापालन केले पाहिजे,’ हा धडा तुम्ही प्राणाला दिलाच पाहिजे. तो संतुष्ट होण्याआधीच, त्याला ही समज दिली गेली पाहिजे की, त्याने अन्य काही करायचे नाही, तर फक्त आज्ञापालन करायचे आहे. आणि म्हणूनच, “योगसाधनेला आरंभ करणे सोपे नाही; तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर योगसाधनेला आरंभच करू नका,” असे मी सांगत असते.

• श्रीमाताजी (CWM 04 : 78-79)

योगमार्गावर प्रगत होत राहण्यामध्येच खरा प्रामाणिकपणा सामावलेला असतो कारण तुम्ही प्रगती केल्याशिवाय राहू शकत नाही. तुम्ही दिव्य जीवनासाठी स्वत:ला समर्पित करता कारण त्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही. तुम्ही स्वत:चे रूपांतर करण्यासाठी आणि दिव्य प्रकाशामध्ये उदय पावण्यासाठी धडपडता, कारण त्याविना तुम्ही राहूच शकत नाही, कारण तेच तुमच्या जीवनाचे मूळ प्रयोजन असते. जेव्हा हे असे असते तेव्हा खात्री बाळगा की, तुम्ही योग्य मार्गावर आहात.

– श्रीमाताजी (CWM 15 : 378)

(पूर्वार्ध)

(व्यक्तीच्या मनात जे पूर्वग्रह, पूर्वकल्पना असतात त्यामुळे तिच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये कसा अडथळा येतो, हे श्रीमाताजींनी सांगितले आणि आता त्या पुढे सांगत आहेत…)

व्यक्ती जर अगदी सहजस्वाभाविक रितीने खुली होऊ शकली… (श्रीमाताजी हातांची ओंजळ खुली करून दाखवितात.) अशा साधेपणाने खुली होऊ शकली आणि अशा रितीने, येणारी प्रत्येक गोष्ट स्वीकारण्यासाठी व्यक्ती तयार झाली तर, कदाचित काहीतरी (प्रगती) घडून येईल. अर्थातच, तुमच्यापाशी प्रगतीची तृष्णा असली पाहिजे. काही जाणून घेण्याची, स्वतःचे रूपांतरण करण्याची तळमळ तुमच्यामध्ये असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिव्य प्रेम व सत्या‌विषयीची आस तुमच्यामध्ये असेल आणि ती आस जर तुम्ही तशीच कायम ठेवू शकलात तर तुम्ही वेगाने प्रगती करता. खरोखर, ही आस, ही गरजच महत्त्वाची असते. इतर गोष्टी तितक्याशा महत्त्वाच्या नसतात. जर कशाची जरुरी असेल तर ती असते आस बाळगण्याची! (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (Conversation with a Disciple, October 7, 1964)

चेतना जेव्हा संकुचित असते, ती व्यक्तिगत असते किंवा शरीरामध्येच बंदिस्त झालेली असते तेव्हा ईश्वराकडून काही ग्रहण करणे अवघड जाते. ही चेतना जेवढी जास्त व्यापक होते, तेवढी ती अधिक ग्रहण करू शकते. एक वेळ अशी येते की, जेव्हा ती विश्वाएवढी व्यापक झाल्याचा अनुभव येतो. तेव्हा समग्र ईश्वरच स्वतःमध्ये सामावून घेता येऊ शकेल असे तिला जाणवते.

*

व्यापकता (wideness) आणि स्थिरता (calmness) या गोष्टी योग-चेतनेचे अधिष्ठान असतात. आणि अनुभूती येण्यासाठी व आंतरिक विकास होण्यासाठी ती सर्वोत्तम परिस्थिती असते. शारीरिक चेतनेमध्ये जर व्यापक स्थिरता प्रस्थापित करता आली आणि त्या स्थिरतेने जर संपूर्ण शरीर आणि त्याच्या सर्व पेशी भरून गेल्या, तर तो शरीराच्या रूपांतरणाचा (transformation) पाया बनू शकतो. खरे सांगायचे तर, ही व्यापकता किंवा स्थिरता असल्याशिवाय रूपांतरण शक्यच नाही.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 274) & (CWSA 29 : 125)

माणसं नेहमीच जटिल असतात आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये गुण व दोष परस्परांमध्ये इतके मिसळलेले असतात की, ते वेगळे करता येणे जवळजवळ अशक्य असते. एखादी व्यक्ती जे बनू इच्छिते किंवा इतरांच्या मनात आपल्याविषयी जी प्रतिमा असावी असे तिला वाटते त्यापेक्षा, ती व्यक्ती वास्तवात पूर्णपणे वेगळी असू शकते. किंवा कधीकधी तिच्या स्वभावाची एक (उजळ) बाजू दिसते, तर कधी तिच्या स्वभावाची दुसरीच (अंधारी) बाजू व्यक्त होते किंवा व्यक्ती काही जणांशी जशी वागते त्यापेक्षा अगदी भिन्नपणे ती इतरांशी वागू शकते.

मानवी प्रकृतीच्या दृष्टीने पाहता, पूर्णपणे प्रामाणिक असणे, सरळमार्गी असणे, खुले असणे ही काही साधीसोपी उपलब्धी नाही. केवळ आध्यात्मिक प्रयत्नांनीच ही गोष्ट साध्य होऊ शकते. त्यासाठी व्यक्तीमध्ये स्वतःकडे कठोरपणे पाहण्याची एक आत्मपरीक्षणात्मक दृष्टी असणे आवश्यक असते. तिच्यामध्ये आत्मनिरीक्षणाची स्वसमर्थन न करणारी चिकित्सा आवश्यक असते. आणि बरेचदा भल्या भल्या साधकांकडे किंवा योग्यांकडेदेखील ही क्षमता नसते. केवळ प्रकाशमान अशा ईश्वरी कृपेमुळेच साधकाला स्वतःचा शोध लागतो आणि त्याच्यामध्ये ज्या कमतरता असतात, त्या भरून काढून, त्यांचे रूपांतरण घडविण्याची क्षमता केवळ त्या ईश्वरी कृपेमध्येच असते. (आणि हे सुद्धा केव्हा शक्य होते?) तर, साधक जेव्हा ईश्वरी कार्यासाठी स्वतःला समर्पित करतो आणि तसे करण्यास तो सहमती दर्शवितो तेव्हाच हे घडून येते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 51)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०९

प्रकाश, शांती, आनंद इ. गोष्टी सोबत घेऊन येणाऱ्या ‘दिव्य शक्ती’ला व्यक्तीने स्वत:मध्ये प्रवाहित होऊ देणे आणि तिला रूपांतरणाचे कार्य करू देणे, हे आत्म-उन्मुखतेचे (self-opening) उद्दिष्ट असते. अशा रितीने, व्यक्ती जेव्हा दिव्य शक्तीचे ग्रहण करते आणि ती शक्ती त्या व्यक्तीमध्ये कार्य करते आणि जेव्हा त्या कार्याचे परिणाम दिसू लागतात (भलेही मग, त्या व्यक्तीला त्या प्रक्रियेची जाणीव असो किंवा नसो) तेव्हा ती व्यक्ती खुली (open) आहे, असे म्हटले जाते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 106)

नैराश्यापासून सुटका – ३८

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

आपल्याला काही किंमतच नाही अशी आत्म-अवमूल्यनाची (self-depreciation) अतिरंजित भावना, हताशपणा, असहाय्यता या भावना म्हणजे विरोधी शक्तींच्या सूचना असतात आणि त्या सूचनांचा व्यक्तीने कधीही स्वतःमध्ये शिरकाव होऊ देता कामा नये. तुम्ही ज्या दोषांबद्दल सांगत आहात ते दोष सर्व मानवी प्रकृतीमध्ये असतातच आणि प्रत्येकच साधकाचे बाह्यवर्ती अस्तित्व हे असे दोषयुक्त असते. त्या दोषांची जाणीव होणे ही गोष्ट रूपांतरणासाठी (transformation) आवश्यक असते, परंतु ते रूपांतरणाचे कार्य चैत्य पुरुषाला (psychic being) स्वाभाविक असे म्हणजे अविचल मनाने, ईश्वरा‌विषयीच्या श्रद्धेने व समर्पणाने आणि उच्चतर चेतनेबद्दलच्या प्रगाढ अभीप्सेने केले गेले पाहिजे.

बाह्यवर्ती अस्तित्वाचे (external being) रूपांतरण ही पूर्णयोगा‌मधील सर्वात कठीण गोष्ट आहे आणि त्यासाठी श्रद्धा, धीर, अविचलता आणि दृढ निश्चयाची आवश्यकता असते. नैराश्य वगैरे सर्व गोष्टी तुम्ही भिरकावून दिल्या पाहिजेत आणि योगमार्गावर स्थिरपणाने वाटचाल केली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 207)

आत्मसाक्षात्कार – २८

(मागील भागावरून पुढे…)

(आत्मसाक्षात्कार २४ ते २८ हे भाग एकत्रित वाचल्यास श्रीअरविंद प्रणीत ‘दिव्य अतिमानव’ ही संकल्पना अधिक चांगल्या रितीने समजेल, असा विश्वास वाटतो.)

अतिमानस (Supermind) म्हणजे अतिमानव; त्यासाठी मनाच्या अतीत होणे ही अनिवार्य अट आहे.

अतिमानव होणे म्हणजे दिव्य जीवन जगणे, देव बनणे. कारण देव-देवता या ईश्वराच्या शक्ती असतात. तुम्ही मानववंशामधील ईश्वराची शक्ती बनून राहा.

दिव्य अस्तित्वामध्ये वसती करून जीवन जगणे आणि आत्म्याच्या चेतनेला व परमानंदाला, आत्म्याच्या संकल्पशक्तीला व ज्ञानाला तुमचा ताबा घेऊ देणे आणि त्यांना तुमच्या समवेत व तुमच्या माध्यमातून लीला करू देणे, हा त्याचा अर्थ आहे.

हे तुमच्या अस्तित्वाचे सर्वोच्च रूपांतरण असते. स्वत:मध्ये ईश्वराचा शोध घेणे आणि स्वत:च्या सर्व गोष्टींमध्ये त्याला प्रकट करणे हे सर्वोच्च रूपांतरण असते. त्याच्या अस्तित्वामध्ये जीवन जगा, त्याच्या प्रकाशाने उजळून निघा, त्याच्या शक्तीसहित कृती करा, त्याच्या परमानंदामध्ये न्हाऊन निघा. तुम्ही तो अग्नी व्हा, तो सूर्य व्हा, आणि तो महासागर व्हा. तुम्ही तो आनंद, ती महत्ता आणि ते सौंदर्य बना.

यांपैकी अंशभाग जरी तुम्ही प्रत्यक्षात जीवनामध्ये उतरवू शकलात तर, तुम्ही अतिमानवतेच्या (supermanhood) पहिल्या काही पायऱ्या गाठल्याप्रमाणे होईल.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 152)

‘आत्मसाक्षात्कार’ ही मालिका येथे समाप्त होत आहे. धन्यवाद!!