Tag Archive for: रूपांतरण

(आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे इतिकर्तव्यता झाली असे मानण्याची एक सहज-प्रवृत्ती आढळून येते, ही गोष्ट श्रीमाताजींनी निदर्शनास आणून दिली आहे. तो भाग आपण काल विचारात घेतला. येथे ही प्रवृत्ती कितपत यथार्थ आहे याचा परामर्श त्या घेत आहेत. तो विचार आज समजावून घेऊ…)

परमेश्वर‌ जेव्हा आविष्कृत झाला तेव्हा (आत्मसाक्षात्कार, मुक्ती, निर्वाण आणि लय) हेच त्याचे ध्येय होते आणि हेच त्याचे प्रयोजन होते, असे खरोखरच तुम्हाला वाटते का?

जर का तसे असते तर, ही अखिल सृष्टी, हे आविष्कृत झालेले अखिल विश्व म्हणजे एक अतिशय विचित्र थट्टा ठरली असती. या सृष्टीमधून जर बाहेरच पडायचे असते तर मग या सृष्टीचा आरंभच का झाला असता?

आजवर जो इतका संघर्ष केला, इतक्या हालअपेष्टा सोसल्या, हे जे काही निर्माण केले त्या सगळ्याचा काय उपयोग? कारण वरकरणी पाहता तरी ते अत्यंत शोकात्म आणि नाट्यमय दिसत आहे. हा सगळा खटाटोप काय फक्त लौकिकातून पारलौकिकात कसे जायचे हे शिकविण्यासाठीच केला गेला आहे? आणि मग जर का तसेच असते तर या सगळ्याचा आरंभच झाला नसता तर बरे झाले असते, नाही का?

पण व्यक्तीने जर या साऱ्याचा मुळातून विचार केला आणि तिने केवळ अहंकारच (egoism) नाही तर, अहंभावदेखील (ego) नष्ट केला; तिने जर हातचे काहीही राखून न ठेवता, अगदी पूर्णपणे व निरपेक्षपणे आत्मदान केले, तर ईश्वरी‌ योजनेच्या आकलनाची क्षमता तिच्यामध्ये येते. आणि मग तिला हे ज्ञान होते की, हे सर्व म्हणजे काही निव्वळ थट्टा नाहीये किंवा तुम्ही जिथून आरंभ केला होता, तिथेच काहीसे घायाळ होऊन परत याल, असा हा एखादा त्रासदायक मार्गदेखील नाहीये. उलट, अखिल सृष्टीला अस्तित्वाचा आनंद, अस्तित्वाचे सौंदर्य, अस्तित्वाची महानता, उदात्त जीवनाचे राजवैभव शिकविण्यासाठी आणि त्या आनंदाची, त्या सौंदर्याची, त्या महानतेची सदोदित प्रगमनशील असणारी आणि निरंतर होत जाणारी वृद्धी शिकविण्यासाठी, या सृष्टीची निर्मिती झाली आहे हे त्या व्यक्तीला उमगते.

आणि हे समजल्यावर मग मात्र प्रत्येक गोष्टीला अर्थ प्राप्त होतो. तेव्हा मग आजवर जो संघर्ष केला, दुःखभोग सहन केले त्याचा पश्चात्ताप व्यक्तीला होत नाही. उलट आता, दिव्य ध्येय (आत्म-साक्षात्कारानंतर त्याच्या आधारे प्रकृतीचे रूपांतरण) साध्य करण्यासाठी व्यक्तीच्या अंगी उत्साह संचारतो आणि मग अशी व्यक्ती त्या दिव्य ध्येयप्राप्तीच्या आणि विजयाच्या निश्चितीने त्या साक्षात्काराकडे झेपावते.

– श्रीमाताजी (CWM 09 : 426-427)

 

 

हे विश्व म्हणजे केवळ एक जडभौतिक वस्तू नाही तर, ते आध्यात्मिक तथ्य आहे. जीवन म्हणजे काही केवळ शक्तींची क्रीडा नाही किंवा जीवन म्हणजे काही केवळ एक मानसिक अनुभवदेखील नाही; तर गुप्त असणाऱ्या आत्म्याच्या उत्क्रांतीसाठी असलेले ते क्षेत्र आहे.

मानवी जीवन जेव्हा हे सत्य अवगत करून घेईल आणि जेव्हा त्याने त्या सत्याला स्वतःच्या जीवनाची प्रेरक-शक्ती बनवलेली असेल आणि त्या सत्याच्या प्रभावी साक्षात्काराची साधने जेव्हा त्याने शोधून काढलेली असतील तेव्हाच मानवी जीवनाला त्याची सार्थकता गवसेल आणि ते स्वतःच्या अतीत असणाऱ्या कशामध्ये तरी स्वतःचे रूपांतरण करून घेईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 374)

 

प्रगती करण्याची व विकसित होण्याची क्षमता नसणे ही गोष्ट नुसत्या वाढत जाणाऱ्या वयापेक्षादेखील जास्त भयानक असते आणि त्यालाच खऱ्या अर्थाने ‘वृद्धत्व’ म्हणता येईल. ज्या क्षणी तुम्ही ही वाटचाल करणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही प्रगती करणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही (आलेल्या अनुभवातून) बोध घेणे अथवा प्रगल्भ होणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही तुमच्यामध्ये रूपांतर घडविणे थांबविता, तेव्हा तुम्ही खरोखरच वृद्ध होता; म्हणजे असे म्हणता येईल, की विघटनाच्या दिशेने तुमचा उतरणीचा प्रवास सुरू झालेला असतो. असे काही तरुण असतात, की जे (वर उल्लेख केलेल्या दृष्टिकोनातून पाहता) वृद्ध असतात आणि असे काही वृद्ध असतात की, जे (खरे तर) तरुण असतात.

तुम्ही तुमच्यामध्ये प्रगतीची आणि रूपांतरणाची ज्योत बाळगलीत; तुम्ही जागरूकपणे पुढे वाटचाल करण्यासाठी म्हणून, सर्व गोष्टी मागे टाकण्याची तयारी ठेवलीत; तुम्ही नवीन प्रगतीसाठी, नवीन सुधारणेसाठी, नवीन रूपांतरणासाठी नेहमीच खुले राहिलात, तर तुम्ही चिरंतन तरुण राहाल. मात्र तुम्ही आजवर जे काही मिळविलेले आहे, त्यामध्ये संतुष्ट होऊन आरामशीर बसलात; आपण ध्येयाप्रत जाऊन पोहोचलो आहोत आणि आता करण्यासारखे काहीही उरले नाही, आता फक्त केलेल्या प्रयत्नांची, कष्टांची फळे चाखायची अशी जर तुमची भावना झाली असेल तर… तर तुमच्या निम्म्याहून अधिक गोवऱ्या स्मशानात जाऊन पोहोचल्या आहेत असे समजावे. खरेतर, हीच असते जर्जरता आणि खरेतर, हाच असतो मृत्यू. जे करायचे शिल्लक राहिले आहे त्याच्या तुलनेत आजवर जे केले आहे, ते नेहमीच अपुरे असते. गतायुष्याकडे पाहू नका. नेहमी पुढे पाहा आणि नेहमी पुढेच चालत राहा.

– श्रीमाताजी (CWM 03 : 238)

(‘श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन’ या श्रीअरविंद आश्रमाच्या शाळेमध्ये मुलांच्या आंतरात्मिक आणि आध्यात्मिक विकासाला पोषक असे वातावरण मिळते. येथेच श्रीमाताजींच्या प्रेरणेतून ‘फ्री प्रोग्रेस एज्युकेशन’ या नवीन शिक्षणपद्धतीचा उदय झाला. प्रचलित शिक्षणपद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने शिक्षण देताना या शाळेतील शिक्षकांना काही अडचणी येत असत, त्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागत असे. अशा वेळी श्रीमाताजी त्यांना विविध उपाययोजना सुचवत असत; त्यांना मार्गदर्शन करत असत. त्यापैकीच हा अंशभाग..)

व्यक्तीमधील परिपूर्णतेची क्षमता सर्वोच्च शक्यतेपर्यंत वाढविणे हे (आपल्या) शिक्षणाचे ध्येय आहे; व्यक्तीला जीवनामध्ये किंवा समाजामध्ये केवळ यशस्वी होण्यासाठी तयार करणे हे शिक्षणाचे ध्येय नाही.

*

केवळ यश मिळविणे हे उद्दिष्ट ठेवू नका; आपले ध्येय परिपूर्णत्व हे आहे. तुम्ही एका नूतन जगाच्या उंबरठ्यावर उभे आहात (आणि एवढेच नव्हे तर,) तुम्ही त्याच्या उदयामध्ये सहभागी होत आहात आणि त्याच्या निर्मितीमध्ये तुम्ही साधनभूत होत आहात हे कधीही विसरू नका. रूपांतरणाइतकी (transformation) दुसरी कोणतीच गोष्ट महत्त्वाची नाही. त्याच्या इतकी उपयुक्त अशी इतर कोणतीच गोष्ट नाही.

– श्रीमाताजी (CWM 12 : 120)

(श्रीमाताजीकृत प्रार्थना…)

हे ईश्वरा, तू परिपूर्ण ज्ञान आहेस, परम चेतना आहेस. जो तुझ्याशी सायुज्य पावतो तो – जोपर्यंत त्याचे तुझ्याशी ऐक्य टिकून असते तोपर्यंत – सर्वज्ञ असतो. परंतु ही अवस्था प्राप्त होण्यापूर्वीदेखील, ज्याने स्वतःच्या अस्तित्वाच्या पूर्ण प्रामाणिकपणाने आणि सचेत संकल्पशक्तीच्या आधारे, तुझ्याप्रति आत्मदान केलेले असते; ज्याने स्वतःमध्ये आणि स्वतःच्या संपूर्ण प्रभावक्षेत्रामध्ये, तुझ्या ‘दिव्य प्रेमाचा दिव्य कायदा’ विजयी व्हावा आणि तो आविष्कृत व्हावा यासाठी ‘तुला साहाय्यभूत होण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन,’ असा निर्धार केलेला असतो, त्याच्या जीवनातील सर्व गोष्टी बदलून गेल्या आहेत असे त्याला आढळते. सर्व परिस्थिती ही आता तुझ्या दिव्य कायद्याची अभिव्यक्ती करू लागली आहे आणि ती तुझ्याप्रति आत्मनिवेदन करण्यास साहाय्य करू लागली आहे असे त्याला आढळते. त्याच्यासाठी, जे सर्वोत्तम आहे तेच नेहमी घडून येते.

पण असे असूनही, जर त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये जर कोठे अजूनही काही तमोमयता शिल्लक असेल, एखादी अज्ञानी इच्छावासना अजूनही रेंगाळलेली असेल, कदाचित अशी एखादी इच्छा त्याच्यामध्ये शिल्लक आहे हे त्याला लगेच कळणारसुद्धा नाही, पण आज ना उद्या त्याच्या हे नक्की लक्षात येईल की, ती परम-उदार अशी शक्ती त्याचे खुद्द त्याच्यापासूनसुद्धा रक्षण करत आहे. त्याच्या विकसनासाठी, त्याच्या समग्र परिवर्तनासाठी व त्याच्या रूपांतरणासाठी आणि त्या ईश्वरी शक्तीला साधन म्हणून त्याचा उपयोग करता यावा यासाठी सर्वाधिक अनुकूल परिस्थिती त्या शक्तीने त्याच्यासाठी राखून ठेवली आहे, असे त्याच्या लक्षात येईल.

व्यक्ती जेव्हा याविषयी सचेत होते आणि तिला ही गोष्ट पूर्णपणे पटते तेव्हा ती भावी परिस्थितीविषयी किंवा भविष्यात काय घटना घडतील याची चिंता करत बसत नाही. त्या क्षणाला जे करणे सर्वोत्तम आहे, असे तिला वाटते ते परिपूर्ण प्रशांततेमध्ये ती करत असते. त्या कृतीमधून आमच्या मर्यादित बुद्धीला जे परिणाम अपेक्षित असतात ते तसे परिणाम दिसून आले नाही तरी आमच्या मनात एक ठाम विश्वास असतो की, त्याचा परिणाम म्हणून सर्वोत्तम तेच घडेल.

आणि म्हणूनच हे ईश्वरा, आमचे अंतःकरण भाररहित, हलके झाले आहे; आमचे विचार शांत झाले आहेत. आणि म्हणूनच हे ईश्वरा, आम्ही तुझ्याकडे पूर्ण विश्वासाने येतो आणि शांतिपूर्णतेने म्हणतो, हे ईश्वरा, तुझाच संकल्प सिद्धीस जाऊ दे कारण त्यातूनच खरा सुसंवाद प्रत्यक्षात येणार आहे.

• श्रीमाताजी (CWM 01 : 102)

 

मी तुम्हाला हे खात्रीपूर्वक सांगू शकते की, रूपांतरण इत्यादी गोष्टी प्राणावर सोपविल्या तर तो रूपांतरणाचा निर्णय कदापिही घेणार नाही. कारण तो स्वतःवरच खूष असतो. आणि एवढेच नाही तर तो, मनाचा साथीदार असल्यामुळे, तो जे काही करतो तेच कसे बरोबर आहे, याचे समर्थन करणारी स्पष्टीकरणं मनाद्वारे पुरविली जातात. जी माणसं प्राणिक चेतनेमध्ये जीवन जगत असतात ती, – भलेही त्यांनी तसे बोलून दाखविले नाही तरी – नेहमी स्वतःवरच अतिशय संतुष्ट असतात. त्यांच्याबाबतीत जे काही घडत असते त्यावर ती अतिशय संतुष्ट असतात आणि त्यांच्यातील आवेगांबाबत (impulses) ते म्हणत असतात, “अमुक गोष्ट किती स्वारस्यपूर्ण आहे, किती रोचक आहे.” आणि म्हणून, प्राणाने रूपांतरणाचा निर्णय घेईपर्यंत जर तुम्ही वाट पाहायचे ठरविलेत तर, कदाचित अनंत काळपर्यंत तुम्हाला वाट पाहात राहावी लागेल. ‘आज्ञापालन केले पाहिजे,’ हा धडा तुम्ही प्राणाला दिलाच पाहिजे. तो संतुष्ट होण्याआधीच, त्याला ही समज दिली गेली पाहिजे की, त्याने अन्य काही करायचे नाही, तर फक्त आज्ञापालन करायचे आहे. आणि म्हणूनच, “योगसाधनेला आरंभ करणे सोपे नाही; तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर योगसाधनेला आरंभच करू नका,” असे मी सांगत असते.

• श्रीमाताजी (CWM 04 : 78-79)

योगमार्गावर प्रगत होत राहण्यामध्येच खरा प्रामाणिकपणा सामावलेला असतो कारण तुम्ही प्रगती केल्याशिवाय राहू शकत नाही. तुम्ही दिव्य जीवनासाठी स्वत:ला समर्पित करता कारण त्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही. तुम्ही स्वत:चे रूपांतर करण्यासाठी आणि दिव्य प्रकाशामध्ये उदय पावण्यासाठी धडपडता, कारण त्याविना तुम्ही राहूच शकत नाही, कारण तेच तुमच्या जीवनाचे मूळ प्रयोजन असते. जेव्हा हे असे असते तेव्हा खात्री बाळगा की, तुम्ही योग्य मार्गावर आहात.

– श्रीमाताजी (CWM 15 : 378)

(पूर्वार्ध)

(व्यक्तीच्या मनात जे पूर्वग्रह, पूर्वकल्पना असतात त्यामुळे तिच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये कसा अडथळा येतो, हे श्रीमाताजींनी सांगितले आणि आता त्या पुढे सांगत आहेत…)

व्यक्ती जर अगदी सहजस्वाभाविक रितीने खुली होऊ शकली… (श्रीमाताजी हातांची ओंजळ खुली करून दाखवितात.) अशा साधेपणाने खुली होऊ शकली आणि अशा रितीने, येणारी प्रत्येक गोष्ट स्वीकारण्यासाठी व्यक्ती तयार झाली तर, कदाचित काहीतरी (प्रगती) घडून येईल. अर्थातच, तुमच्यापाशी प्रगतीची तृष्णा असली पाहिजे. काही जाणून घेण्याची, स्वतःचे रूपांतरण करण्याची तळमळ तुमच्यामध्ये असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिव्य प्रेम व सत्या‌विषयीची आस तुमच्यामध्ये असेल आणि ती आस जर तुम्ही तशीच कायम ठेवू शकलात तर तुम्ही वेगाने प्रगती करता. खरोखर, ही आस, ही गरजच महत्त्वाची असते. इतर गोष्टी तितक्याशा महत्त्वाच्या नसतात. जर कशाची जरुरी असेल तर ती असते आस बाळगण्याची! (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (Conversation with a Disciple, October 7, 1964)

चेतना जेव्हा संकुचित असते, ती व्यक्तिगत असते किंवा शरीरामध्येच बंदिस्त झालेली असते तेव्हा ईश्वराकडून काही ग्रहण करणे अवघड जाते. ही चेतना जेवढी जास्त व्यापक होते, तेवढी ती अधिक ग्रहण करू शकते. एक वेळ अशी येते की, जेव्हा ती विश्वाएवढी व्यापक झाल्याचा अनुभव येतो. तेव्हा समग्र ईश्वरच स्वतःमध्ये सामावून घेता येऊ शकेल असे तिला जाणवते.

*

व्यापकता (wideness) आणि स्थिरता (calmness) या गोष्टी योग-चेतनेचे अधिष्ठान असतात. आणि अनुभूती येण्यासाठी व आंतरिक विकास होण्यासाठी ती सर्वोत्तम परिस्थिती असते. शारीरिक चेतनेमध्ये जर व्यापक स्थिरता प्रस्थापित करता आली आणि त्या स्थिरतेने जर संपूर्ण शरीर आणि त्याच्या सर्व पेशी भरून गेल्या, तर तो शरीराच्या रूपांतरणाचा (transformation) पाया बनू शकतो. खरे सांगायचे तर, ही व्यापकता किंवा स्थिरता असल्याशिवाय रूपांतरण शक्यच नाही.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 274) & (CWSA 29 : 125)

माणसं नेहमीच जटिल असतात आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये गुण व दोष परस्परांमध्ये इतके मिसळलेले असतात की, ते वेगळे करता येणे जवळजवळ अशक्य असते. एखादी व्यक्ती जे बनू इच्छिते किंवा इतरांच्या मनात आपल्याविषयी जी प्रतिमा असावी असे तिला वाटते त्यापेक्षा, ती व्यक्ती वास्तवात पूर्णपणे वेगळी असू शकते. किंवा कधीकधी तिच्या स्वभावाची एक (उजळ) बाजू दिसते, तर कधी तिच्या स्वभावाची दुसरीच (अंधारी) बाजू व्यक्त होते किंवा व्यक्ती काही जणांशी जशी वागते त्यापेक्षा अगदी भिन्नपणे ती इतरांशी वागू शकते.

मानवी प्रकृतीच्या दृष्टीने पाहता, पूर्णपणे प्रामाणिक असणे, सरळमार्गी असणे, खुले असणे ही काही साधीसोपी उपलब्धी नाही. केवळ आध्यात्मिक प्रयत्नांनीच ही गोष्ट साध्य होऊ शकते. त्यासाठी व्यक्तीमध्ये स्वतःकडे कठोरपणे पाहण्याची एक आत्मपरीक्षणात्मक दृष्टी असणे आवश्यक असते. तिच्यामध्ये आत्मनिरीक्षणाची स्वसमर्थन न करणारी चिकित्सा आवश्यक असते. आणि बरेचदा भल्या भल्या साधकांकडे किंवा योग्यांकडेदेखील ही क्षमता नसते. केवळ प्रकाशमान अशा ईश्वरी कृपेमुळेच साधकाला स्वतःचा शोध लागतो आणि त्याच्यामध्ये ज्या कमतरता असतात, त्या भरून काढून, त्यांचे रूपांतरण घडविण्याची क्षमता केवळ त्या ईश्वरी कृपेमध्येच असते. (आणि हे सुद्धा केव्हा शक्य होते?) तर, साधक जेव्हा ईश्वरी कार्यासाठी स्वतःला समर्पित करतो आणि तसे करण्यास तो सहमती दर्शवितो तेव्हाच हे घडून येते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 51)