Tag Archive for: रूपांतरण

 

आमच्या पूर्णयोगामध्ये आरोहण आणि अवरोहण अशी दुहेरी प्रक्रिया असते. यामध्ये व्यक्ती चेतनेच्या उच्च व उच्चतर स्तरांवर आरोहण करते आणि त्याच वेळी ती व्यक्ती त्या उच्चतर स्तरांवरील शक्ती मन व प्राणामध्ये उतरवते. एवढेच नव्हे तर, सरतेशेवटी त्या व्यक्तीकडून ती शक्ती अगदी शरीरापर्यंत खाली उतरवली जाते. अतिमानस (supermind) हा या स्तरांमधील सर्वोच्च स्तर आहे आणि (अतिमानस अवतरित करणे हे) पूर्णयोगाचे ध्येय आहे. जेव्हा अतिमानस अवतरित करणे शक्य येईल तेव्हाच पृथ्वी-चेतनेचे दिव्य रूपांतरण (transformation) शक्य होईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 376)

 

निम्नतर चेतना ही, उच्चतर चेतनेशी जोडली जाण्यासाठी तिच्या दिशेने आरोहण (ascend) करते आणि उच्चतर चेतना निम्नतर चेतनेचे रूपांतरण करण्यासाठी अवरोहण (descend) करते; हा पूर्णयोगाच्या साधनेतील चेतनेचा एक नियम आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 417)

(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुमच्या अडचणींना हाताळण्यात आणि तुमच्यावर अपप्रवृत्तींचा जो हल्ला होत आहे त्यांना हाताळण्यात तुमची काहीतरी चूक होत आहे. त्या वृत्ती म्हणजे तुम्ही आहात किंवा त्या वृत्ती तुमच्या स्वत:च्या प्रकृतीचा एक (अविभाज्य) भाग आहेत असे समजण्याची चूक कदाचित तुम्ही करत आहात. खरेतर तुम्ही त्यांच्यापासून स्वतःला दूर केले पाहिजे, वेगळे केले पाहिजे आणि त्यांच्याशी असलेले संबंध तोडून टाकले पाहिजेत. (तुमचा ताबा घेऊ पाहणाऱ्या) या गोष्टी म्हणजे वैश्विक कनिष्ठ, अपूर्ण आणि अशुद्ध प्रकृतीच्या, शक्तींच्या गतिविधी आहेत आणि तुमच्यामध्ये प्रवेश करून, त्या त्यांच्या अभिव्यक्तीसाठी तुम्हाला त्यांच्या हातचे बाहुले बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, या दृष्टीने तुम्ही त्यांच्याकडे पाहिले पाहिजे.

अशा रितीने तुम्ही स्वतःला त्यांच्यापासून वेगळे केल्यामुळे, त्यांच्याशी असलेला संबंध तोडून टाकल्यामुळे, तुम्हाला तुमच्यामधील एका घटकाचा, म्हणजे तुमच्या आंतरिक अस्तित्वाचा किंवा चैत्य पुरुषाचा (psychic being) शोध लागू शकेल आणि त्याच्या अधिकाधिक सान्निध्यात राहून जीवन जगणे तुम्हाला शक्य होईल. हा जो तुमच्यामधील घटक असतो त्याच्यावर अपप्रवृत्तींचा पगडा पडू शकत नाही किंवा त्याच्यावर त्यांचा हल्लादेखील होऊ शकत नाही. त्या बाहेरून आल्या आहेत असे त्याच्या लक्षात येते आणि त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना संमती देण्यास तो नकार देतो. हा चैत्य पुरुष नेहमीच ईश्वरी शक्तींच्या आणि उच्चतर चेतनेच्या प्रतलांच्या दिशेने वळलेला असतो किंवा त्यांच्या संपर्कात असतो. तुमच्या अस्तित्वामधील तो घटक शोधून काढा आणि त्यामध्ये राहून जीवन जगण्याचा प्रयत्न करा. तसे करता येणे हा योगाचा खरा पाया आहे.

अशा रितीने अंतरंगात राहिल्यामुळे, पृष्ठवर्ती संघर्षापासून मागे होऊन, तुम्हाला एक अविचल स्थिती लाभणे सोपे जाईल. हल्ला करणाऱ्या त्या वृत्तींपासून तुमची सुटका करावी म्हणून तुम्ही तेथून, आमच्या साहाय्यासाठी अधिक प्रभावी रितीने आवाहन करू शकाल.

ईश्वरी उपस्थिती, स्थिरता, शांती, विशुद्धता, शक्ती, प्रकाश, हर्ष, व्यापकता या सर्व गोष्टी ऊर्ध्वस्थित आहेत आणि त्या तुमच्यामध्ये अवतरित होण्यासाठी प्रतीक्षा करत आहेत. अंतरंगात असणारी ही अविचलता शोधून काढा. तसे केल्यास तुमचे मनदेखील अधिक अविचल, शांत होईल आणि अशा अविचल मनाच्या माध्यमातून तुम्ही प्रथम विशुद्धता व शांती आणि त्यानंतर ईश्वरी शक्तीला अवतरणासाठी आवाहन करू शकाल.

ही शांती व विशुद्धता तुमच्यामध्ये अवतरित होत आहे असे जर तुम्हाला जाणवले तर, या गोष्टी सुस्थिर होईपर्यंत तुम्ही त्यांना पुन्हा पुन्हा आवाहन करू शकता. त्यानंतर, तुमच्या वृत्तींमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी आणि तुमच्या चेतनेचे रूपांतरण घडविण्यासाठी, ईश्वरी शक्ती तुमच्यामध्ये कार्यरत आहे याची जाणीव तुम्हाला होईल. या कार्यामध्ये तुम्हाला श्रीमाताजींच्या उपस्थितीची आणि त्यांच्या शक्तीची जाणीव होईल. एकदा का हे असे घडून आले की, उर्वरित सगळ्या गोष्टी या काळावर आणि तुमच्या खऱ्या व दिव्य प्रकृतीच्या तुमच्यामधील प्रगतिशील उत्क्रांतीवर अवलंबून असतात.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 741)

 

 

आपल्यामधील अहंपुरुष (ego person) हा स्वतःच्या ताकदीने किंवा इच्छाशक्तीने किंवा ज्ञानाने स्वतःचे रूपांतरण करू शकत नाही किंवा स्वतःच्या एखाद्या गुणाद्वारेसुद्धा तो स्वतःच्या प्रकृतीचे दिव्य प्रकृतीमध्ये रूपांतरण करू शकत नाही. तो एकच गोष्ट करू शकतो आणि ती म्हणजे तो स्वतःला रूपांतरणासाठी सुपात्र बनवू शकतो आणि तो जे बनण्याचा प्रयत्न करत असतो, त्याच्याप्रत तो स्वतःचे अधिकाधिक समर्पण करू शकतो.

जोपर्यंत आपल्यामध्ये अहं सक्रिय असतो, तोपर्यंत आपली वैयक्तिक कृती ही नेहमीच प्रकृतीच्या दृष्टीने, अस्तित्वाच्या कनिष्ठ पातळीवरील श्रेणीचा एक भाग म्हणूनच राहणार आणि ती कृती नेहमी अंधकारयुक्त किंवा अर्ध-प्रकाशित, तिच्या क्षेत्रापुरतीच सीमित आणि ऊर्जेच्या दृष्टीने फक्त आंशिकरित्याच परिणामकारक ठरणार.

आपल्या प्रकृतीमध्ये फक्त प्रकाशमान सुधारणा नव्हे तर, खरेखुरे आध्यात्मिक रूपांतरण करून घ्यायचे असेल तर, हे अद्भुत कार्य घडून यावे यासाठी आपण दिव्य शक्तीस आवाहन केलेच पाहिजे. कारण रूपांतरणासाठी आवश्यक असणारे निर्णायक, सर्व-प्रज्ञावान आणि असीम असे बल फक्त त्या ‘दिव्य शक्ती’कडेच असते.

– श्रीअरविंद (CWSA 23 : 86)

(आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे इतिकर्तव्यता झाली असे मानण्याची एक सहज-प्रवृत्ती आढळून येते, ही गोष्ट श्रीमाताजींनी निदर्शनास आणून दिली आहे. तो भाग आपण काल विचारात घेतला. येथे ही प्रवृत्ती कितपत यथार्थ आहे याचा परामर्श त्या घेत आहेत. तो विचार आज समजावून घेऊ…)

परमेश्वर‌ जेव्हा आविष्कृत झाला तेव्हा (आत्मसाक्षात्कार, मुक्ती, निर्वाण आणि लय) हेच त्याचे ध्येय होते आणि हेच त्याचे प्रयोजन होते, असे खरोखरच तुम्हाला वाटते का?

जर का तसे असते तर, ही अखिल सृष्टी, हे आविष्कृत झालेले अखिल विश्व म्हणजे एक अतिशय विचित्र थट्टा ठरली असती. या सृष्टीमधून जर बाहेरच पडायचे असते तर मग या सृष्टीचा आरंभच का झाला असता?

आजवर जो इतका संघर्ष केला, इतक्या हालअपेष्टा सोसल्या, हे जे काही निर्माण केले त्या सगळ्याचा काय उपयोग? कारण वरकरणी पाहता तरी ते अत्यंत शोकात्म आणि नाट्यमय दिसत आहे. हा सगळा खटाटोप काय फक्त लौकिकातून पारलौकिकात कसे जायचे हे शिकविण्यासाठीच केला गेला आहे? आणि मग जर का तसेच असते तर या सगळ्याचा आरंभच झाला नसता तर बरे झाले असते, नाही का?

पण व्यक्तीने जर या साऱ्याचा मुळातून विचार केला आणि तिने केवळ अहंकारच (egoism) नाही तर, अहंभावदेखील (ego) नष्ट केला; तिने जर हातचे काहीही राखून न ठेवता, अगदी पूर्णपणे व निरपेक्षपणे आत्मदान केले, तर ईश्वरी‌ योजनेच्या आकलनाची क्षमता तिच्यामध्ये येते. आणि मग तिला हे ज्ञान होते की, हे सर्व म्हणजे काही निव्वळ थट्टा नाहीये किंवा तुम्ही जिथून आरंभ केला होता, तिथेच काहीसे घायाळ होऊन परत याल, असा हा एखादा त्रासदायक मार्गदेखील नाहीये. उलट, अखिल सृष्टीला अस्तित्वाचा आनंद, अस्तित्वाचे सौंदर्य, अस्तित्वाची महानता, उदात्त जीवनाचे राजवैभव शिकविण्यासाठी आणि त्या आनंदाची, त्या सौंदर्याची, त्या महानतेची सदोदित प्रगमनशील असणारी आणि निरंतर होत जाणारी वृद्धी शिकविण्यासाठी, या सृष्टीची निर्मिती झाली आहे हे त्या व्यक्तीला उमगते.

आणि हे समजल्यावर मग मात्र प्रत्येक गोष्टीला अर्थ प्राप्त होतो. तेव्हा मग आजवर जो संघर्ष केला, दुःखभोग सहन केले त्याचा पश्चात्ताप व्यक्तीला होत नाही. उलट आता, दिव्य ध्येय (आत्म-साक्षात्कारानंतर त्याच्या आधारे प्रकृतीचे रूपांतरण) साध्य करण्यासाठी व्यक्तीच्या अंगी उत्साह संचारतो आणि मग अशी व्यक्ती त्या दिव्य ध्येयप्राप्तीच्या आणि विजयाच्या निश्चितीने त्या साक्षात्काराकडे झेपावते.

– श्रीमाताजी (CWM 09 : 426-427)

 

 

हे विश्व म्हणजे केवळ एक जडभौतिक वस्तू नाही तर, ते आध्यात्मिक तथ्य आहे. जीवन म्हणजे काही केवळ शक्तींची क्रीडा नाही किंवा जीवन म्हणजे काही केवळ एक मानसिक अनुभवदेखील नाही; तर गुप्त असणाऱ्या आत्म्याच्या उत्क्रांतीसाठी असलेले ते क्षेत्र आहे.

मानवी जीवन जेव्हा हे सत्य अवगत करून घेईल आणि जेव्हा त्याने त्या सत्याला स्वतःच्या जीवनाची प्रेरक-शक्ती बनवलेली असेल आणि त्या सत्याच्या प्रभावी साक्षात्काराची साधने जेव्हा त्याने शोधून काढलेली असतील तेव्हाच मानवी जीवनाला त्याची सार्थकता गवसेल आणि ते स्वतःच्या अतीत असणाऱ्या कशामध्ये तरी स्वतःचे रूपांतरण करून घेईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 374)

 

प्रगती करण्याची व विकसित होण्याची क्षमता नसणे ही गोष्ट नुसत्या वाढत जाणाऱ्या वयापेक्षादेखील जास्त भयानक असते आणि त्यालाच खऱ्या अर्थाने ‘वृद्धत्व’ म्हणता येईल. ज्या क्षणी तुम्ही ही वाटचाल करणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही प्रगती करणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही (आलेल्या अनुभवातून) बोध घेणे अथवा प्रगल्भ होणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही तुमच्यामध्ये रूपांतर घडविणे थांबविता, तेव्हा तुम्ही खरोखरच वृद्ध होता; म्हणजे असे म्हणता येईल, की विघटनाच्या दिशेने तुमचा उतरणीचा प्रवास सुरू झालेला असतो. असे काही तरुण असतात, की जे (वर उल्लेख केलेल्या दृष्टिकोनातून पाहता) वृद्ध असतात आणि असे काही वृद्ध असतात की, जे (खरे तर) तरुण असतात.

तुम्ही तुमच्यामध्ये प्रगतीची आणि रूपांतरणाची ज्योत बाळगलीत; तुम्ही जागरूकपणे पुढे वाटचाल करण्यासाठी म्हणून, सर्व गोष्टी मागे टाकण्याची तयारी ठेवलीत; तुम्ही नवीन प्रगतीसाठी, नवीन सुधारणेसाठी, नवीन रूपांतरणासाठी नेहमीच खुले राहिलात, तर तुम्ही चिरंतन तरुण राहाल. मात्र तुम्ही आजवर जे काही मिळविलेले आहे, त्यामध्ये संतुष्ट होऊन आरामशीर बसलात; आपण ध्येयाप्रत जाऊन पोहोचलो आहोत आणि आता करण्यासारखे काहीही उरले नाही, आता फक्त केलेल्या प्रयत्नांची, कष्टांची फळे चाखायची अशी जर तुमची भावना झाली असेल तर… तर तुमच्या निम्म्याहून अधिक गोवऱ्या स्मशानात जाऊन पोहोचल्या आहेत असे समजावे. खरेतर, हीच असते जर्जरता आणि खरेतर, हाच असतो मृत्यू. जे करायचे शिल्लक राहिले आहे त्याच्या तुलनेत आजवर जे केले आहे, ते नेहमीच अपुरे असते. गतायुष्याकडे पाहू नका. नेहमी पुढे पाहा आणि नेहमी पुढेच चालत राहा.

– श्रीमाताजी (CWM 03 : 238)

(‘श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन’ या श्रीअरविंद आश्रमाच्या शाळेमध्ये मुलांच्या आंतरात्मिक आणि आध्यात्मिक विकासाला पोषक असे वातावरण मिळते. येथेच श्रीमाताजींच्या प्रेरणेतून ‘फ्री प्रोग्रेस एज्युकेशन’ या नवीन शिक्षणपद्धतीचा उदय झाला. प्रचलित शिक्षणपद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने शिक्षण देताना या शाळेतील शिक्षकांना काही अडचणी येत असत, त्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागत असे. अशा वेळी श्रीमाताजी त्यांना विविध उपाययोजना सुचवत असत; त्यांना मार्गदर्शन करत असत. त्यापैकीच हा अंशभाग..)

व्यक्तीमधील परिपूर्णतेची क्षमता सर्वोच्च शक्यतेपर्यंत वाढविणे हे (आपल्या) शिक्षणाचे ध्येय आहे; व्यक्तीला जीवनामध्ये किंवा समाजामध्ये केवळ यशस्वी होण्यासाठी तयार करणे हे शिक्षणाचे ध्येय नाही.

*

केवळ यश मिळविणे हे उद्दिष्ट ठेवू नका; आपले ध्येय परिपूर्णत्व हे आहे. तुम्ही एका नूतन जगाच्या उंबरठ्यावर उभे आहात (आणि एवढेच नव्हे तर,) तुम्ही त्याच्या उदयामध्ये सहभागी होत आहात आणि त्याच्या निर्मितीमध्ये तुम्ही साधनभूत होत आहात हे कधीही विसरू नका. रूपांतरणाइतकी (transformation) दुसरी कोणतीच गोष्ट महत्त्वाची नाही. त्याच्या इतकी उपयुक्त अशी इतर कोणतीच गोष्ट नाही.

– श्रीमाताजी (CWM 12 : 120)

(श्रीमाताजीकृत प्रार्थना…)

हे ईश्वरा, तू परिपूर्ण ज्ञान आहेस, परम चेतना आहेस. जो तुझ्याशी सायुज्य पावतो तो – जोपर्यंत त्याचे तुझ्याशी ऐक्य टिकून असते तोपर्यंत – सर्वज्ञ असतो. परंतु ही अवस्था प्राप्त होण्यापूर्वीदेखील, ज्याने स्वतःच्या अस्तित्वाच्या पूर्ण प्रामाणिकपणाने आणि सचेत संकल्पशक्तीच्या आधारे, तुझ्याप्रति आत्मदान केलेले असते; ज्याने स्वतःमध्ये आणि स्वतःच्या संपूर्ण प्रभावक्षेत्रामध्ये, तुझ्या ‘दिव्य प्रेमाचा दिव्य कायदा’ विजयी व्हावा आणि तो आविष्कृत व्हावा यासाठी ‘तुला साहाय्यभूत होण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन,’ असा निर्धार केलेला असतो, त्याच्या जीवनातील सर्व गोष्टी बदलून गेल्या आहेत असे त्याला आढळते. सर्व परिस्थिती ही आता तुझ्या दिव्य कायद्याची अभिव्यक्ती करू लागली आहे आणि ती तुझ्याप्रति आत्मनिवेदन करण्यास साहाय्य करू लागली आहे असे त्याला आढळते. त्याच्यासाठी, जे सर्वोत्तम आहे तेच नेहमी घडून येते.

पण असे असूनही, जर त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये जर कोठे अजूनही काही तमोमयता शिल्लक असेल, एखादी अज्ञानी इच्छावासना अजूनही रेंगाळलेली असेल, कदाचित अशी एखादी इच्छा त्याच्यामध्ये शिल्लक आहे हे त्याला लगेच कळणारसुद्धा नाही, पण आज ना उद्या त्याच्या हे नक्की लक्षात येईल की, ती परम-उदार अशी शक्ती त्याचे खुद्द त्याच्यापासूनसुद्धा रक्षण करत आहे. त्याच्या विकसनासाठी, त्याच्या समग्र परिवर्तनासाठी व त्याच्या रूपांतरणासाठी आणि त्या ईश्वरी शक्तीला साधन म्हणून त्याचा उपयोग करता यावा यासाठी सर्वाधिक अनुकूल परिस्थिती त्या शक्तीने त्याच्यासाठी राखून ठेवली आहे, असे त्याच्या लक्षात येईल.

व्यक्ती जेव्हा याविषयी सचेत होते आणि तिला ही गोष्ट पूर्णपणे पटते तेव्हा ती भावी परिस्थितीविषयी किंवा भविष्यात काय घटना घडतील याची चिंता करत बसत नाही. त्या क्षणाला जे करणे सर्वोत्तम आहे, असे तिला वाटते ते परिपूर्ण प्रशांततेमध्ये ती करत असते. त्या कृतीमधून आमच्या मर्यादित बुद्धीला जे परिणाम अपेक्षित असतात ते तसे परिणाम दिसून आले नाही तरी आमच्या मनात एक ठाम विश्वास असतो की, त्याचा परिणाम म्हणून सर्वोत्तम तेच घडेल.

आणि म्हणूनच हे ईश्वरा, आमचे अंतःकरण भाररहित, हलके झाले आहे; आमचे विचार शांत झाले आहेत. आणि म्हणूनच हे ईश्वरा, आम्ही तुझ्याकडे पूर्ण विश्वासाने येतो आणि शांतिपूर्णतेने म्हणतो, हे ईश्वरा, तुझाच संकल्प सिद्धीस जाऊ दे कारण त्यातूनच खरा सुसंवाद प्रत्यक्षात येणार आहे.

• श्रीमाताजी (CWM 01 : 102)

 

मी तुम्हाला हे खात्रीपूर्वक सांगू शकते की, रूपांतरण इत्यादी गोष्टी प्राणावर सोपविल्या तर तो रूपांतरणाचा निर्णय कदापिही घेणार नाही. कारण तो स्वतःवरच खूष असतो. आणि एवढेच नाही तर तो, मनाचा साथीदार असल्यामुळे, तो जे काही करतो तेच कसे बरोबर आहे, याचे समर्थन करणारी स्पष्टीकरणं मनाद्वारे पुरविली जातात. जी माणसं प्राणिक चेतनेमध्ये जीवन जगत असतात ती, – भलेही त्यांनी तसे बोलून दाखविले नाही तरी – नेहमी स्वतःवरच अतिशय संतुष्ट असतात. त्यांच्याबाबतीत जे काही घडत असते त्यावर ती अतिशय संतुष्ट असतात आणि त्यांच्यातील आवेगांबाबत (impulses) ते म्हणत असतात, “अमुक गोष्ट किती स्वारस्यपूर्ण आहे, किती रोचक आहे.” आणि म्हणून, प्राणाने रूपांतरणाचा निर्णय घेईपर्यंत जर तुम्ही वाट पाहायचे ठरविलेत तर, कदाचित अनंत काळपर्यंत तुम्हाला वाट पाहात राहावी लागेल. ‘आज्ञापालन केले पाहिजे,’ हा धडा तुम्ही प्राणाला दिलाच पाहिजे. तो संतुष्ट होण्याआधीच, त्याला ही समज दिली गेली पाहिजे की, त्याने अन्य काही करायचे नाही, तर फक्त आज्ञापालन करायचे आहे. आणि म्हणूनच, “योगसाधनेला आरंभ करणे सोपे नाही; तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर योगसाधनेला आरंभच करू नका,” असे मी सांगत असते.

• श्रीमाताजी (CWM 04 : 78-79)