Tag Archive for: अहंकार

 

जीवनाचे खरे उद्दिष्ट काय हे जर व्यक्तीला जाणून घ्यायचे असेल तर, त्या व्यक्तीने अहंकारी असता कामा नये, तिने आपल्या परम उगमापासून विभक्त होऊन, स्व-मग्न होता कामा नये; तिने अहंभावाचे समूळ उच्चाटन केलेच पाहिजे आणि याचीच खरी आवश्यकता असते. तेव्हाच व्यक्तीला जीवनाचे खरे उद्दिष्ट काय आहे हे ज्ञात होऊ शकते. तिथपर्यंत पोहोचण्याचा हा एकमेव मार्ग आहे. एखाद्या निरूपयोगी वस्त्राप्रमाणे, व्यक्तीचा अहंभाव गळून पडला पाहिजे आणि यासाठी जे प्रयत्न करावे लागतात ते किती सार्थ आहेत हे त्यांच्या परिणामावरून लक्षात येते.

आणि मग व्यक्ती या मार्गावर एकाकी नसते. (मी या मार्गावर एकाकी, एकटी नाही असा) विश्वास जर व्यक्तीमध्ये असेल तर, तिला साहाय्य मिळत राहते. तुम्ही एक क्षणभर जरी ईश्वरी कृपे‌च्या संपर्कात आलात तर ती कृपा, तुम्हाला तिच्यासोबत घेऊन जाते, त्या मार्गावरून तुमची वाटचाल द्रुतगतीने घडवून आणते. त्वरा केली पाहिजे याची तुम्हाला आठवणसुद्धा राहत नाही इतक्या सहजस्वाभाविक रितीने ती ते सारे घडवून आणते. तुमचा क्षणभर जरी त्या ईश्वरी कृपे‌शी संपर्क आला असेल तर, ती गोष्ट विस्मरणात जाऊ नये यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. मग तेव्हा एखाद्या बालकाच्या निर्व्याज साधेपणाने, निष्पापपणाने म्हणजे ज्यामध्ये कोणतीही जटिलता नसते अशा निष्पापपणाने तुम्ही त्या ईश्वरी कृपे‌स आत्मदान करा आणि ईश्वरी कृपे‌नेच सारे काही करावे यासाठी तिच्याप्रत खुले व्हा.

प्रतिकार करणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका, विरोधी गोष्टींवर विश्वास ठेवू नका. तुमच्यामध्ये एक सच्चा, खराखुरा विश्वास असला पाहिजे. ज्यामुळे तुम्ही कोणताही हिशोब न करता, कोणतीही सौदेबाजी (bargaining) न करता, स्वतःचे आत्मदान करण्यास प्रवूत्त होता असा विश्वास तुमच्या ठायी असला पाहिजे. विश्वास ठेवा. मग त्या विश्वासापोटी तुम्ही ईश्वराला असे म्हणता की, “मी ही गोष्ट तुझ्यावर सोपवितो आहे. माझ्यासाठी तेवढे करशील ना?” आणि हाच सर्वोत्तम मार्ग असतो.

– श्रीमाताजी (CWM 09 : 426-427)

 

व्यक्तित्वाची घडण व्हावी यासाठी अहंकाराची आवश्यकता होती. पण म्हणूनच त्याचा विनाश हा तितकाच अवघड असतो. (अहंकाराचे उच्चाटन करण्याचा) एक अवघड पण चांगला मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे अहंकाराचे रूपांतरण करायचे आणि त्याला ईश्वराचे साधन बनवायचे. अहंकार रूपांतरित होऊन, तो जर ईश्वराला समग्रतया समर्पित झाला, तर तो अतिशय सशक्त आणि परिणामकारक साधन बनू शकतो. हा प्रयत्न अतिशय अवघड आहे आणि त्यासाठी निरपवाद आणि दृढ प्रामाणिकपणाची आवश्यकता असते. ज्यांच्यापाशी प्रबळ संकल्पशक्ती आहे, उत्कट अभीप्सा आणि अविचल प्रामाणिकपणा आहे, त्यांनी हा प्रयत्न करण्यास हरकत नाही.

• श्रीमाताजी (CWM 16 : 425)

 

(भाग ०४)

व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं आहे. पण प्रत्येक वेळी या अप्रामाणिकपणाचा उद्भव एक सारख्याच गतीविधीतून होतो — ती गतीविधी कधी इच्छांमधून उद्भवलेली असते तर, कधी व्यक्ती स्वत:च्या वैयक्तिक उद्दिष्टांसाठी जी धडपड करत असते, त्यातून उद्भवलेली असते. म्हणजे अहंभावामधून, अहंकारातून निर्माण झालेल्या मर्यादांच्या सरमिसळीतून आणि वासनांमधून उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रकारच्या विकृतींमधून या अप्रामाणिकपणाचा उद्भव होतो.

व्यक्ती जरी प्रामाणिक बनण्याची धडपड करत असली तरीसुद्धा तिच्यामध्ये जोपर्यंत अहंकार शिल्लक असतो तोपर्यंत ‘मी पूर्णपणे प्रामाणिक आहे,’ असे ती व्यक्ती म्हणू शकत नाही. व्यक्तीने अहंकाराच्या पलीकडे जायला पाहिजे, स्वत:ला संपूर्णपणे दिव्य संकल्पा‌च्या (divine Will) हाती सोपविले पाहिजे, समर्पित केले पाहिजे. हातचे काहीही राखून न ठेवता आणि लाभहानीचा कोणताही विचार मनात न ठेवता हे समर्पण केले पाहिजे… तेव्हाच व्यक्ती संपूर्णतया प्रामाणिक असू शकते, तत्पूर्वी मात्र ती प्रामाणिक नसते.

अर्थात, व्यक्तीने आहे त्यापेक्षा अधिक प्रामाणिक होण्याचा प्रयत्न करू नये, असा याचा अर्थ नाही. एखादी व्यक्ती असेही म्हणण्याची शक्यता आहे की, ‘ठीक आहे, मी माझा अहंकार नाहीसा होण्याची वाट पाहीन आणि मग प्रामाणिक होईन,’ (परंतु असे करता कामा नये.) व्यक्तीने ती सध्या जेवढी प्रामाणिक आहे त्यापेक्षा, अधिक प्रामाणिक बनण्याचा प्रयत्न अवश्य केला पाहिजे. किंवा असेही म्हणता येईल की, व्यक्तीने जर प्रामाणिकपणे प्रयत्नच केला नाही, तर तिचा अहंकार कधीच नाहीसा होणार नाही.

प्रामाणिकपणा हा खऱ्या साक्षात्काराचा पाया आहे, तो साक्षात्काराचे साधन आहे, तोच मार्ग आहे आणि प्रामाणिकपणा हेच एक साध्य आहे. तुमच्याकडे प्रामाणिकपणा नसेल तर, तुम्ही हमखास असंख्य घोडचुका करत राहता आणि तुम्ही स्वतःला व इतरांना जी हानी पोहोचविलेली असते, त्याचे तुम्हाला सातत्याने निवारण करत बसावे लागते.

प्रामाणिक असण्यामध्ये एक अद्भुत आनंद असतो. प्रामाणिकपणाच्या प्रत्येक कृतीमध्येच प्रामाणिकपणाचे स्वतःचे असे एक फल अंतर्भूत असते. आपले शुद्धिकरण झाले आहे ही भावना किंवा ऊर्ध्वमुख होत झेपावत जाणे किंवा व्यक्तीने मिथ्यत्वाचा अगदी एखादा छोटासा कण दूर केला तरी त्यामुळे तिला मिळालेला मुक्तीचा अनुभव या गोष्टी हे प्रामाणिकपणाचे फलित असते. प्रामाणिकपणा हे सुरक्षाकवच असते, तेच संरक्षण असते, प्रामाणिकपणा हाच मार्गदर्शक असतो आणि अंतिमतः प्रामाणिकपणा ही एक रूपांतरकारी शक्ती असते.

– श्रीमाताजी (CWM 08 : 399-400)

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

स्वत:चीच फसवणूक करणारा प्राणिक अहंकार, मानसिक उद्धटपणा, अहंगंड, पांडित्य-प्रदर्शन, शारीरिक अस्तित्वामध्ये असणारी तमोमय जडता या गोष्टींपासून सुटका करून घेण्यासाठी अस्तित्वाच्या सर्व अंगांमध्ये संपूर्ण केंद्रवर्ती प्रामाणिकपणा (central sincerity) असणे ही एकच आवश्यक अट असते. ‘संपूर्ण केंद्रवर्ती प्रामाणिकपणा’चा अर्थ दुसऱ्या शब्दांत सांगायचा झाला तर, केवळ परमसत्या‌चा निरपवाद आग्रह धरणे आणि त्याव्यतिरिक्त आता दुसरे काहीही नको असे वाटणे, असा होतो.

अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर, व्यक्तीमध्ये समजा कधी मिथ्यत्वाचा शिरकाव झालाच तर, लगेचच तिला एकप्रकारची अस्वस्थता जाणवेल आणि अशा वेळी त्या मिथ्यत्वाचे कोणतेही समर्थन न करता, स्वतःचे कठोर मूल्यमापन (self-criticism) करण्याची व्यक्तीची तयारी झालेली असेल. तिच्यामध्ये प्रकाशाप्रत सजग खुलेपणा येईल आणि सरतेशेवटी ही तयारी संपूर्ण अस्तित्वाचेच शुद्धिकरण घडवून आणेल.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 379)

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला आवश्यक गुण आहे विनम्रता!

*

खरी आणि प्रामाणिक विनम्रता हे आपले संरक्षक-कवच असते. अहंकार नाहीसा होणे आवश्यकच असते आणि तो नष्ट करण्याचा सर्वात खात्रीचा मार्ग म्हणजे विनम्रता.

*

विनम्रता आणि प्रामाणिकपणा या गोष्टी सर्वोत्तम संरक्षक-कवचाप्रमाणे असतात. त्यांच्याविना प्रत्येक पावलावर धोका असतो; आणि (साधकामध्ये) या गोष्टी असतील तर विजय निश्चित असतो.

– श्रीमाताजी (CWM 14 : 153)

अहंकाराचा अभाव म्हणजे समता नव्हे, तर इच्छावासना आणि आसक्तीचा अभाव म्हणजे समता. म्हणजे मी असे म्हटले आहे की, ‘समता‌’ या शब्दामधून इच्छावासना आणि आसक्तीचा अभाव यांचा निर्देश होतो; अहंकाराची जाणीव नाहीशी होईल का, ती सूक्ष्म आणि व्यापक रूपामध्ये टिकून राहील, हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 133)

स्वत:चीच फसवणूक करणारा प्राणिक अहंकार, मानसिक उद्धटपणा, अहंगंड, पांडित्य-प्रदर्शन, शारीरिक अस्तित्वामध्ये असणारी तमोमय जडता या गोष्टींपासून सुटका करून घेण्यासाठी अस्तित्वाच्या सर्व अंगांमध्ये संपूर्ण केंद्रवर्ती प्रामाणिकपणा असणे ही एकच अट आहे. आणि त्याचाच अर्थ असा होतो की, ‘परमसत्या‌’चा निरपवाद आग्रह बाळगणे आणि त्याव्यतिरिक्त आता दुसरे काहीही नको असे वाटणे.

तसे झाले तर मग, व्यक्तीमध्ये मिथ्यत्वाचा शिरकाव झालाच तर लगेचच व्यक्तीला एक प्रकारची अस्वस्थता जाणवेल आणि अशा वेळी कोणतेही समर्थन न करता, स्वतःचे कठोर मूल्यमापन (self-criticism) करण्याची व्यक्तीची तयारी झालेली असेल. तिच्यामध्ये प्रकाशाप्रत सतर्क खुलेपणा येईल आणि सरतेशेवटी ही तयारी संपूर्ण अस्तित्वाचेच शुद्धिकरण घडवून आणेल.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 379)

नैराश्यापासून सुटका – २६

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

निराशेला कवटाळून बसू नका, जे जे योग मार्गाचे अनुसरण करतात त्यांना त्यांच्या अहंचे अडथळे जाणवतातच. परंतु जर खरीखुरी अभीप्सा असेल तर, उच्चतर चेतनेचा नेहमीच विजय होतो.

*

सातत्याने ईश-स्मरण ठेवावे आणि शांती व स्थिरतेमध्ये जीवन जगावे; जेणेकरून ‘ईश्वरी शक्ती‌’ तुमच्यामध्ये कार्य करू शकेल आणि ‘ईश्वरी प्रकाश’ तुमच्यामध्ये येऊ शकेल. दैनंदिन जीवनातील किरकोळ गोष्टी फक्त पृष्ठस्तरीय चेतनेमध्येच (surface consciousness) चालू राहिल्या पाहिजेत; पण त्यांनी पृष्ठस्तरीय चेतनेची फार मोठी जागादेखील व्यापता कामा नये. ‘ईश्वरी शक्ती‌’ आणि ‘ईश्वरी प्रकाश’ यांच्या द्वारे जोपर्यंत पृष्ठस्तरीय चेतनेचा ताबा घेतला जात नाही आणि दैनंदिन जीवनातील किरकोळ गोष्टी जोपर्यंत त्यांच्या थेट नियंत्रणाखाली येत नाहीत तोपर्यंत, त्या पृष्ठस्तरीय चेतनेपुरत्याच मर्यादित राहिल्या पाहिजेत.

अहंकार या किरकोळ गोष्टींना अति महत्त्व देतो. त्या अहंकारालाच नाउमेद केले पाहिजे. “माझ्यासाठी नाही तर ईश्वरा‌साठी,” हाच तुमच्या समग्र चेतनेचा, विचारांचा आणि कृतींचा मूलमंत्र म्हणून विकसित झाला पाहिजे. अर्थात या सर्व गोष्टी एकाच वेळी पूर्ण करता येतील असे नाही, पण शक्य तितक्या लवकर मनामध्ये (“माझ्यासाठी नाही तर ईश्वरा‌साठी,”) हा मूलमंत्र सातत्याने निनादत राहिला पाहिजे.

• श्रीअरविंद (CWSA 31 : 187, 219)

नैराश्यापासून सुटका – १५

 

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

अभिमाना‌पासून तुम्ही स्वतःची जेवढी लवकरात लवकर सुटका करून घ्याल तेवढे अधिक बरे. जो कोणी अभिमानाला खतपाणी घालतो तो विरोधी शक्तींच्या अंमलाखाली जातो. खऱ्या प्रेमाचा आणि अभिमानाचा काहीही संबंध नसतो; मत्सराप्रमाणेच (jealousy) अभिमान हा देखील प्राणिक अहंकाराचाच एक भाग असतो.

*

त्वरित परिणाम दिसून आले नाहीत तरी, नाउमेद न होणे हे अतिशय महत्त्वाचे असते, कारण अशावेळी आंतरिक शक्ती क्षीण होते. जेव्हा ती आंतरिक शक्ती क्षीण होते तेव्हा, ’तपोभंग‌’ होतो. पूर्वीचे ऋषीमुनी याविषयी नेहमी तक्रार करत असत. कारण ज्या ज्या वेळी असा तपोभंग होत असे तेव्हा तेव्हा पूर्वपदावर येण्यासाठी त्यांना प्रत्येक वेळी अगदी पहिल्यापासून पुन्हा नव्याने सुरूवात करावी लागत असे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 245, 182)

जीवन जगण्याचे शास्त्र – ३२

माझे प्रेम सततच तुमच्या सोबत आहे. पण तुम्हाला जर ते जाणवत नसेल तर त्याचे कारण हेच आहे की, तुम्ही ते स्वीकारण्यास सक्षम नाही. तुमची ग्रहणशीलता (receptivity) कमी पडत आहे, ती तुम्ही वाढविली पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही स्वत:ला खुले (open) केले पाहिजे. व्यक्ती जेव्हा आत्मदान करते तेव्हाच ती स्वत:ला खुली करू शकते. तुम्ही नक्कीच कळत वा नकळतपणे, ईश्वरी प्रेम आणि शक्ती तुमच्याकडे खेचू पाहत आहात. ही पद्धत चुकीची आहे. कोणतेही हिशोब न मांडता, कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न बाळगता, स्वत:स अर्पण करा म्हणजे मग तुम्ही ग्रहणक्षम होऊ शकाल.
*
अगदी या आध्यात्मिक क्षेत्रातसुद्धा अशी पुष्कळ माणसं आहेत की जी, वैयक्तिक कारणांसाठी, अगदी सर्व तऱ्हेच्या वैयक्तिक कारणांसाठी (योगसाधनादी) सर्व गोष्टी करत असतात. काही जण जीवनामुळे उद्विग्न झालेले असतात, काही जण दुःखी असतात, काही जणांना अधिक काही जाणून घेण्याची इच्छा असते, काही जणांना आध्यात्मिक दृष्ट्या कोणीतरी महान व्यक्ती बनायचे असते, इतरांना शिकविता यावे म्हणून काही जणांना काही गोष्टी शिकायच्या असतात, योगमार्ग स्वीकारण्याची खरोखरच हजारो वैयक्तिक कारणं असतात. पण एक साधीशी गोष्ट अशी की, ईश्वराप्रति आत्मदान करावे, जेणेकरून ईश्वरच तुम्हाला हाती घेईल आणि ‘त्याची’ जशी इच्छा असेल त्याप्रमाणे तो तुम्हाला घडवेल आणि ते सारे त्याच्या शुद्धतेनिशी व सातत्यानिशी घडवेल. आणि हे खरोखरच सत्य असते, पण असे करणारे फार जण आढळत नाहीत. खरेतर या आत्मदानामुळेच व्यक्ती ध्येयाप्रत थेट जाऊन पोहोचते आणि मग तिच्याकडून कोणत्या चुका होण्याचे धोकेही नसतात. पण इतर प्रेरणा मात्र नेहमीच संमिश्र असतात; अहंकाराने कलंकित झालेल्या असतात आणि स्वाभाविकपणेच त्या तुम्हाला कधी इकडे तर कधी तिकडे भरकटवत राहतात. कधीकधी तर त्या तुम्हाला ध्येयापासून खूप दूरही नेतात.

– श्रीमाताजी (CWM 14 : 148), (CWM 07 : 190)