Tag Archive for: शांती

 

शांती किंवा शक्ती शरीरात अवतरित होऊ लागल्यामुळे शरीर ग्रहण-सुलभ होते. तेव्हा काही जणांना शरीर डोलत असल्याचा किंवा शरीरात स्पंदने निर्माण झाल्याची जाणीव होते. शरीराला जेव्हा हे शांतीचे किंवा शक्तीचे अवतरण सवयीचे होऊन जाते तेव्हा त्याचे हे हलणे-डुलणे थांबते. ध्यानाच्या वेळी शांती पूर्णपणे अवतरित होते कारण त्या वेळी श्रीमाताजींप्रति केलेल्या एकाग्रतेमुळे उच्चतर चेतनेची शक्ती खाली अवतरित होते आणि व्यक्ती जर सक्षम असेल तर, ती त्या शक्तीचा स्वीकार करू शकते.

एकदा का त्या शक्तीचे अवतरण सुरू झाले की, सहसा तिचे बळ वाढत जाते आणि त्याबरोबर साधकाची ग्रहणशीलतादेखील वाढत राहते. पुढे ती शक्ती सदा सर्वकाळ आणि सर्व परिस्थितीमध्ये अवतरित होऊ शकते आणि अधिकाधिक काळ टिकून राहू शकते. ती स्थिर होईपर्यंत हे असे चालू राहते.

साधकाने मात्र त्याच्या बाजूने एक प्रयत्न केला पाहिजे आणि तो म्हणजे, ती शक्ती ग्रहण करण्यासाठी म्हणून त्याने स्वतःची चेतना शक्य तितकी अविचल आणि स्थिर ठेवली पाहिजे. उच्चतर आध्यात्मिक चेतनेची शांती, शक्ती, प्रकाश, आनंद या साऱ्या गोष्टी ऊर्ध्वस्थित आहेत, परंतु त्या झाकलेल्या स्वरूपात आहेत. त्यांच्या अवतरणासाठी एक प्रकारची उन्मुखता (opening) असली पाहिजे. मनाची अविचलता आणि अवतरित होऊ पाहणाऱ्या दिव्य प्रभावाला खुली असणारी एकाग्र क्रियाविरहितता (concentrated passivity) या गोष्टी म्हणजे त्या अवतरणासाठी आवश्यक असणारी उत्तम स्थिती होय.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 481-482)

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

तुम्हाला शांती, विशुद्धतेची आणि स्थिरचित्ततेची जी जाणीव होत आहे ती जाणीव, कनिष्ठ चेतनेचा उच्चतर चेतनेशी घनिष्ठ संपर्क आल्यामुळे किंवा तिच्याशी एकत्व पावल्यामुळे निर्माण झाली आहे. सुरुवातीला ती जाणीव चिरस्थायी असू शकत नाही परंतु पुढील दोन गोष्टींमुळे ती चिरस्थायी होऊ शकते.

• स्थिरचित्तता व शांती यांची वारंवारिता (frequency) आणि त्यांची टिकून राहण्याची क्षमता (durability) वाढत गेली तर त्याद्वारे ती जाणीव चिरस्थायी होऊ शकते.
• उच्चतर चेतनेच्या चिरंतन शांतीचे तसेच स्थिरचित्तत्ता व निश्चल-नीरवता यांचे कनिष्ठ प्रकृतीमध्ये पूर्ण अवतरण झाले तर त्याद्वारेदेखील, ती जाणीव चिरस्थायी होऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 66)

(एका साधकाला त्याच्या मस्तकाच्या वर स्थित असणाऱ्या शक्तीचा अनुभव आला आहे. त्याविषयी श्रीअरविंद मार्गदर्शन करत आहेत…)

मस्तकाच्या वर स्थित असणारी शक्ती ही अर्थातच श्रीमाताजींची शक्ती आहे. ती उच्चतर चेतनेची शक्ती आहे आणि ती तिच्या अवतरणासाठीचा मार्ग तयार करत आहे. ही उच्चतर चेतना तिच्यासोबत व्यापकता, अमर्याद अस्तित्व, प्रकाश, शक्ती, शांती, आनंद इत्यादी गोष्टींची जाणीव घेऊन येत असते. ती नेहमीच मस्तकाच्या वरच्या बाजूस असते. जेव्हा आध्यात्मिक शक्तींपैकी कोणती तरी एखादी गोष्ट साधकाच्या प्रकृतीवर कार्य करण्यासाठी खाली अवतरत असते तेव्हा ती शक्ती तेथूनच येत असते. परंतु जोपर्यंत साधकाची तयारी झालेली नसते तोपर्यत शांती, आनंद इत्यादींसारख्या कोणत्याच गोष्टीचे संपूर्ण अवतरण होत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 458)

(एका साधकाने विचारलेल्या प्रश्नावरील उत्तर श्रीअरविंदांनी त्यांच्या सचिवांना सांगितले आहे आणि सचिव श्रीअरविंदांच्या वतीने लिहीत आहेत.)

तुम्ही लिहिलेल्या पत्राच्या उत्तरादाखल श्रीअरविंद तुम्हाला असे सांगत आहेत की, तुम्ही हृदयकेंद्रामध्ये श्रीमाताजींचे ध्यान करू शकता आणि त्यांना साद घालू शकता. त्यांचे स्मरण करा आणि तुमचे सर्व विचार, तुमच्या सर्व कृती आणि तुमचे संपूर्ण जीवन श्रीमाताजींना अर्पण करा, समर्पित करा. तुम्हाला वाटले तर तुम्ही त्यांच्या नामाचा जप करू शकता. तुमचे अस्तित्व विशुद्ध करण्यासाठी आणि तुमच्या प्रकृतीमध्ये बदल घडवण्यासाठी तुम्ही त्यांना साद घालू शकता.

किंवा प्रथमतः श्रीमाताजींची स्थिरता, शांती आणि नंतर त्यांची शक्ती, त्यांचा प्रकाश आणि त्यांचा आनंद वरून खाली अवतरित व्हावेत म्हणून तुम्ही तुमच्या मस्तकाच्या वरदेखील ध्यान करू शकता. या गोष्टी नेहमीच मस्तकाच्या वर (above the head) असतात. त्या मानवी मनाच्या दृष्टीने अतिचेतन अशा असतात. अभीप्सा आणि एकाग्रतेच्या साहाय्याने मन त्याबाबत सचेत बनू शकते आणि आधार (मन, प्राण आणि शरीर) त्यांच्याप्रत खुला होऊ शकतो; परिणामी त्या गोष्टी खाली उतरून मन, प्राण आणि शरीर यांमध्ये प्रवेश करू शकतील.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 154-155)

(”ईश्वराकडून जे काही तुम्हाला प्राप्त झाले होते त्यावर लक्ष केंद्रित न करता, तुम्ही ते व्यर्थ जागी खर्च केलेत आणि त्यामुळे तुम्ही ते गमावून बसलात,” असे श्रीमाताजींनी एका साधकाला सांगितले. ते ऐकल्यावर तो साधक चिंतनमग्न झाला. तेव्हाचा त्याचा तो अनुभव तो साधक पुन्हा श्रीमाताजींना सांगत आहे…)

साधक : तुमचे उत्तर ऐकल्यावर मी गंभीर झालो आणि मला असे वाटले की, मी निदान आजतरी शांत, निश्चल-नीरव (silent) राहिले पाहिजे. पण निश्चल-नीरवतेचे काही क्षण गेल्यानंतर माझ्यामधीलच दुसरा एक भाग मला सांगू लागला की, “ही काही खरी निश्चल-नीरवता नाहीये, त्यामध्ये फारसा आनंद व उत्साह नाहीये. त्यामुळे ती निश्चल-नीरवता नसून, ते प्राणाचे असमाधान आहे.” आणि मग मला असे वाटले की, दुसरा भाग जे सांगत आहे ते बरोबर आहे.

श्रीमाताजी : दोन्ही गोष्टी काही अंशी बरोबर आणि काही अंशी चुकीच्या आहेत. अवतरित होणारी शक्ती निश्चल-नीरवतेमध्ये, एकाग्रतापूर्वक ग्रहण करणे कधीही योग्यच, परंतु प्राणाला त्याच्या लहरीप्रमाणे वागू न दिल्यामुळे त्याचा जो त्रागा होतो त्यातून, ती नीरवता किंवा एकाग्रता आलेली असता कामा नये. तसेच ही एकाग्रता आणि निश्चल-नीरवता फक्त शांतिमयच असणे पुरेसे नाही तर त्यामध्ये एक प्रकारचा अतिशय उत्कट आनंदही असला पाहिजे. असे असेल तर ती एकाग्रता, ती निश्चल-नीरवता ही खरी आणि विशुद्ध आहे, असे तुम्ही गृहीत धरायला हरकत नाही.

– श्रीमाताजी (CWM 17 : 54)

 

(मनुष्याने स्वत:ला उच्चतर चेतनेप्रत समर्पित करायचे हा माणसाच्या चिंताग्रस्ततेवरील एक उपाय आहे, असे श्रीमाताजींनी सांगितले. ते आपण आजवर विचारात घेतले. त्या विवेचनाचा हा संपादित केलेला अंतिम भाग आहे. विषय समजण्यास सोपा जावा या दृष्टीने मराठी भाषांतरामध्ये वाक्यांचा क्रम व मांडणी यामध्ये बदल केला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.)

सर्व आध्यात्मिक साधनापद्धतींचा प्रारंभ सर्व जबाबदाऱ्या उच्चतर तत्त्वावर सोपवून, त्याला समर्पित होण्याच्या आवश्यकतेपासून होते. अन्यथा शांती लाभणे अशक्य असते. ‘शांततावादी’ (quietist) पद्धत असे त्या साधनापद्धतींचे वर्णन करता येईल.

सर्व प्रकारच्या कृतींना नकार देत, अचल आंतरिक निश्चल-नीरवतेमध्ये बुडी घेण्यावर या शांततावादी पद्धती आधारलेल्या असतात. त्याचे अनुसरण करणाऱ्या व्यक्तींना अचानकपणे अशी जाणीव होते की, शांतीशिवाय कोणताच आंतरिक साक्षात्कार होणे शक्य नाही. आणि म्हणून अगदी स्वाभाविकपणे, त्यांच्या मनात असा विचार येतो की, कधीच न सुटणारे प्रश्न जोपर्यंत त्यांना भेडसावत आहेत आणि जोपर्यंत बाह्य अस्वस्थतेच्या परिस्थितीमध्ये त्यांना जीवन कंठावे लागत आहे, तोपर्यंत त्याना कधीच शांती लाभणे शक्य नाही.’ कारण ते प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञानच त्यांच्यापाशी नाहीये. आणि म्हणून, शांती लाभावी यासाठी त्या शांततावादी साधनापद्धती सर्व प्रकारच्या जीवनाचा परित्याग करतात. (‘शांततावादी’ पद्धतीचे अनुसरण करणाऱ्या माणसांची विचारसरणी ही अशा प्रकारची असते.)

परंतु या अचल (immobile) व स्थिर शांतीपेक्षा (static peace) अधिक उच्च असणारी अशी आणखी एक स्थिती असते. मनुष्याला अशी एक चेतना प्रदान करण्यात आलेली आहे की, ज्यामुळे तो प्रगती करू शकतो, त्याला जे ज्ञात नाही ते तो शोधून काढू शकतो; तो जे अजूनपर्यंत होऊ शकलेला नाही त्यामध्ये तो विकसित होऊ शकतो. आणि हा जो विश्वास असतो तो, व्यक्तीने प्रगती करण्याची इच्छा कायम ठेवावी, सर्व प्रकारच्या चिंता व काळज्यांपासून मुक्त होऊन, फलिताची व परिणामांची कोणतीही काळजी न करता, प्रगतीसाठीचे प्रयत्न चालू ठेवावेत यासाठी पुरेसा असतो. शांततावादी पद्धतींपेक्षा एक पाऊल पुढे टाकणारी ही पद्धत आहे.

हे पुढचे पाऊल म्हणजे (जीवनाचा त्याग न करता, जीवनात राहून) प्रश्नांना सामोरे जाणे. ज्या परमशक्तीला सर्व काही ज्ञात आहे आणि जी तुम्हाला कार्यप्रवृत्त करू शकते, तिच्यावर संपूर्ण विश्वास ठेवून, त्या खात्रीनिशी आणि स्थिरचित्ताने प्रश्नांना सामोरे जायचे. आणि अशा वेळी व्यक्ती (शांततावादी पद्धतीप्रमाणे) कृती करण्याचे सोडून देत नाही तर ती आता, बलशाली आणि गतिशील असणाऱ्या उच्चतर शांतीमध्ये राहून कार्य करू शकते. ईश्वर आपल्याला जीवनामध्ये जो मदतीचा हात देतो त्याचा हा एक नवीन पैलू आहे; व्यक्तीमध्ये ईश्वरी शक्ती कार्यरत असल्याचे हे एक नवीन रूप आहे; किंबहुना आध्यात्मिक साक्षात्काराचा हा एक नवीनच आयाम आहे, असे म्हणता येईल.

– श्रीमाताजी (CWM 09 : 304-305)

 

जो मनुष्य सत्याच्या शोधासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि सातत्याने परिपूर्ण सत्याच्या अधिकाधिक निकट जावे या हेतुने, म्हणजेच हे समग्र विश्व अनंतकाळ प्रगत होत आहे, याचे उत्तरोत्तर वाढते ज्ञान प्राप्त व्हावे या हेतुने जो प्रयत्नशील असतो आणि गरज भासल्यास, आजवर त्याला जे ‘सत्य‌’ म्हणून वाटत होते त्या विचारांचा परित्याग करण्यासाठी जो तयार असतो, तो मनुष्य हळूहळू अधिक गहन, अधिक परिपूर्ण आणि अधिक तेजोमय अशा महान विचारांच्या संपर्कात येतो.

मग दीर्घकाळ केलेल्या ध्यानाभ्यासानंतर, मननानंतर, तो विशुद्ध बौद्धिक शक्तीच्या महान वैश्विक प्रवाहाच्या थेट संपर्कात येतो आणि त्यानंतर त्या मनुष्यापासून कोणतेही ज्ञान लपून राहू शकत नाही. त्या क्षणापासून धीरगंभीरपणा – मानसिक शांती – ही गोष्ट त्याच्या व्यक्तित्वाचा जणू एक भागच होऊन जाते. सर्व प्रकारच्या समजुती, सर्व मानवी ज्ञान, सर्व धार्मिक शिकवणुकी, जे सारे एके काळी त्याला खूपच विरोधाभासी वाटत असे, त्या साऱ्या पाठीमागे असलेले गहन सत्य आता त्याला जाणवते; त्याच्या दृष्टीपासून काहीच लपून राहू शकत नाही.

– श्रीमाताजी (CWM 02 : 28)

 

 

तुमचा भावी काळ जेव्हा तुम्हाला जणू अनंत शक्यतांनी उजळलेल्या आकर्षक सूर्यासारखा वाटत असतो; आणि त्या शक्यता जेव्हा तुम्हाला खुणावत असतात तेव्हा तुम्ही तरुण असता. मग या पृथ्वीतलावर तुम्ही किती वर्षे व्यतीत केली आहेत याला महत्त्व नसते, तुम्ही तरुण असता आणि भावी काळात प्रत्यक्षात येऊ शकतील अशा शक्यतांची संपदा तुमच्यापाशी असल्यामुळे तुम्ही समृद्ध असता.

परंतु (त्या शक्यता प्रत्यक्षात उतरविण्याच्या प्रयत्नांत) तुमच्या शरीराने तुम्हाला साथ देत राहावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर, तुम्ही तुमच्या ऊर्जा निरर्थक क्षोभामध्ये, अस्वस्थतेमध्ये व्यर्थ खर्च करू नका. तुम्ही जे काही करता ते अगदी शांतपणाने आणि स्थिरचित्ताने करा. शांती आणि निश्चल-नीरवतेमध्ये महत्तर सामर्थ्य सामावलेले असते.

*

चिरविश्रांतीसाठी असो किंवा अगदी निर्वाणाच्या परमानंदासाठी असो, व्यक्तीने इहलोकाचा निरोप घेण्याची कोणतीही घाई करू नये किंवा त्वराही करू नये. जोपर्यंत आपण देहामध्ये आहोत तोपर्यंत आपल्याला करण्यासारखे किंवा शिकण्यासारखे निःसंशयपणे काहीतरी असते.

– श्रीमाताजी (CWM 12 : 123), (CWM 15 : 119)

सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये अंतरंगामध्ये अविचल राहणे म्हणजे समत्व (equality).

*

समत्वाशिवाय साधनेचा भरभक्कम पाया रचला जाऊ शकत नाही. परिस्थिती कितीही त्रासदायक असू दे, इतरांची वागणूक भलेही तुम्हाला न पटणारी असू दे, तुम्ही त्या साऱ्या गोष्टी एका सुयोग्य स्थिरतेने आणि कोणत्याही अस्वस्थ प्रतिक्रियांविना स्वीकारण्यास शिकले पाहिजे. या गोष्टी हीच समत्वाची कसोटी असते. सर्व गोष्टी सुरळीत असताना, माणसं आणि परिस्थिती सुखकारक असताना समत्व बाळगणे आणि स्थिरता राखणे सहजसोपे असते; पण जेव्हा परिस्थिती विपरित असते तेव्हाच स्थिरता, शांती, समत्व यांच्या परिपूर्णत्वाचा कस लागतो आणि अशा परिस्थितीमध्येच त्या अधिक दृढ, अधिक परिपूर्ण केल्या जाऊ शकतात.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 130, 129)

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…)

तुम्ही आत्ता जशी व्यापकता आणि स्थिरता बाळगली आहे तशी ती नेहमी टिकवून ठेवलीत आणि हृदयामध्ये देखील जर श्रीमाताजींबद्दल सदोदित प्रेम असेल तर मग सारे काही निर्धोक असते. कारण येथे योगाचा दुहेरी पाया रचण्यात आलेला आहे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे येथे उच्चतर चेतना ही तिची ऊर्ध्वस्थित शांती, स्वातंत्र्य आणि सुरक्षितता यांसहित अवतरित होते आणि ज्या चैत्य अस्तित्वामुळे सर्व प्रयत्न आणि सर्व उत्स्फूर्त गतिविधी खऱ्या ध्येयाप्रत वळलेल्या राहतात, ते चैत्य अस्तित्व खुले होते. (हा असतो तो दुहेरी पाया.)

श्रीअरविंद (CWSA 30 : 466)