Tag Archive for: चैत्य पुरुष

अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा एक भाग की, जो दिव्य केंद्राभोवती सुरचित झालेला असतो; मानवी अस्तित्वाच्या अंतरंगात खोलवर असणारी ती एक छोटीशी दिव्यज्योती असते. ही दिव्य ज्योत प्रत्येक माणसामध्ये असते आणि तिच्याभोवती सर्व जन्मांमधून, कर्मांमधून, हळूहळू एक अस्तित्व आकाराला येऊ लागते, त्या अस्तित्वालाच मिस्टर तेआँ (श्रीमाताजींचे गूढविद्येच्या अभ्यासाचे पहिले प्रशिक्षक) ‘psychic being’ असे संबोधत असत. आणि जेव्हा हा चैत्य पुरुष विकसित अवस्थेला येऊन पोहोचतो तेव्हा चैत्य पुरुष म्हणजे जणू एक प्रकारे, आत्म्याचे शारीरिक किंवा व्यक्तिगत वस्त्र बनते.

आत्मा हा परमेश्वराचा अंश असतो; तर व्यक्तिगत रूपामध्ये जीव हा सर्वोच्च, परम असतो. आणि परमेश्वर एकच असल्याने, जीव सुद्धा एकच आहे पण त्याची व्यक्तिगणिक रूपं मात्र अगणित असतात.

अपरिवर्तनीय, शाश्वत आणि अनंत (शक्यतांच्या बाबतीत अनंत) अशा दिव्य ज्योतीच्या रूपात या जिवाची सुरुवात झालेली असते. अनेक जन्मांमधून, जे काही प्राप्त झालेले असते आणि दिव्य प्रभावाला जो काही प्रतिसाद दिला गेलेला असतो असे सर्वकाही जिवाभोवती क्रमाक्रमाने घनीभूत होत जाते, त्यातून ते अधिकाधिक सचेत आणि अधिकाधिक सुरचित, सुघटित होऊ लागते. अंतिमत: स्वत:चा स्वामी असणारे आणि फक्त ईश्वरी संकल्पानुसारच वागणारे पूर्णपणे सचेत असे व्यक्तिगत अस्तित्व तयार होते. म्हणजे असे म्हणता येईल की, परमेश्वराचे ते एक व्यक्तिभूत झालेले रूप असते. त्यालाच आपण ‘चैत्य पुरुष’ असे म्हणतो.

– श्रीमाताजी (Conversation with a disciple July 25, 1962)

जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद केले आणि पूर्ण प्रामाणिकपणे आत्मदान करण्याविषयीची एक स्थिर अभीप्सा व्यक्तीमध्ये उदित झाली तर, कालांतराने चैत्य पुरुष (psychic being) सहसा आपणहूनच खुला होतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 349)

 

स्वत:च्या आत्म्याचा शोध घेण्यात आणि आत्मसत्तेनुसार जीवन जगण्यामध्ये आलेले अपयश ही खरोखरच मनुष्याची एकमेव शोकांतिका आहे आणि तरीही त्याची त्याला खंत वाटत नाही. वास्तविक, स्वत:च्या आत्म्याविषयी, स्वत:च्या चैत्य पुरुषाविषयी (Psychic Being) जागृत न होणे आणि जीवनामध्ये त्याचे मार्गदर्शन पूर्णतया न लाभणे हीच खरेतर एकमेव शोकांतिका आहे. स्वत:च्या आत्म्याचा शोध घेतल्याशिवाय आणि त्याच्या कायद्यानुसार जीवन न जगताच मरण पावणे, हे खरेखुरे अपयश आहे.

स्वत:मधील ईश्वराचा शोध घेणे आणि त्याच्या कायद्यानुसार जीवन व्यतीत करणे, हेच खरे महाकाव्य, हेच खरे वैभव!

– श्रीमाताजी (CWM 10 : 277)

(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुमच्या अडचणींना हाताळण्यात आणि तुमच्यावर अपप्रवृत्तींचा जो हल्ला होत आहे त्यांना हाताळण्यात तुमची काहीतरी चूक होत आहे. त्या वृत्ती म्हणजे तुम्ही आहात किंवा त्या वृत्ती तुमच्या स्वत:च्या प्रकृतीचा एक (अविभाज्य) भाग आहेत असे समजण्याची चूक कदाचित तुम्ही करत आहात. खरेतर तुम्ही त्यांच्यापासून स्वतःला दूर केले पाहिजे, वेगळे केले पाहिजे आणि त्यांच्याशी असलेले संबंध तोडून टाकले पाहिजेत. (तुमचा ताबा घेऊ पाहणाऱ्या) या गोष्टी म्हणजे वैश्विक कनिष्ठ, अपूर्ण आणि अशुद्ध प्रकृतीच्या, शक्तींच्या गतिविधी आहेत आणि तुमच्यामध्ये प्रवेश करून, त्या त्यांच्या अभिव्यक्तीसाठी तुम्हाला त्यांच्या हातचे बाहुले बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, या दृष्टीने तुम्ही त्यांच्याकडे पाहिले पाहिजे.

अशा रितीने तुम्ही स्वतःला त्यांच्यापासून वेगळे केल्यामुळे, त्यांच्याशी असलेला संबंध तोडून टाकल्यामुळे, तुम्हाला तुमच्यामधील एका घटकाचा, म्हणजे तुमच्या आंतरिक अस्तित्वाचा किंवा चैत्य पुरुषाचा (psychic being) शोध लागू शकेल आणि त्याच्या अधिकाधिक सान्निध्यात राहून जीवन जगणे तुम्हाला शक्य होईल. हा जो तुमच्यामधील घटक असतो त्याच्यावर अपप्रवृत्तींचा पगडा पडू शकत नाही किंवा त्याच्यावर त्यांचा हल्लादेखील होऊ शकत नाही. त्या बाहेरून आल्या आहेत असे त्याच्या लक्षात येते आणि त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना संमती देण्यास तो नकार देतो. हा चैत्य पुरुष नेहमीच ईश्वरी शक्तींच्या आणि उच्चतर चेतनेच्या प्रतलांच्या दिशेने वळलेला असतो किंवा त्यांच्या संपर्कात असतो. तुमच्या अस्तित्वामधील तो घटक शोधून काढा आणि त्यामध्ये राहून जीवन जगण्याचा प्रयत्न करा. तसे करता येणे हा योगाचा खरा पाया आहे.

अशा रितीने अंतरंगात राहिल्यामुळे, पृष्ठवर्ती संघर्षापासून मागे होऊन, तुम्हाला एक अविचल स्थिती लाभणे सोपे जाईल. हल्ला करणाऱ्या त्या वृत्तींपासून तुमची सुटका करावी म्हणून तुम्ही तेथून, आमच्या साहाय्यासाठी अधिक प्रभावी रितीने आवाहन करू शकाल.

ईश्वरी उपस्थिती, स्थिरता, शांती, विशुद्धता, शक्ती, प्रकाश, हर्ष, व्यापकता या सर्व गोष्टी ऊर्ध्वस्थित आहेत आणि त्या तुमच्यामध्ये अवतरित होण्यासाठी प्रतीक्षा करत आहेत. अंतरंगात असणारी ही अविचलता शोधून काढा. तसे केल्यास तुमचे मनदेखील अधिक अविचल, शांत होईल आणि अशा अविचल मनाच्या माध्यमातून तुम्ही प्रथम विशुद्धता व शांती आणि त्यानंतर ईश्वरी शक्तीला अवतरणासाठी आवाहन करू शकाल.

ही शांती व विशुद्धता तुमच्यामध्ये अवतरित होत आहे असे जर तुम्हाला जाणवले तर, या गोष्टी सुस्थिर होईपर्यंत तुम्ही त्यांना पुन्हा पुन्हा आवाहन करू शकता. त्यानंतर, तुमच्या वृत्तींमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी आणि तुमच्या चेतनेचे रूपांतरण घडविण्यासाठी, ईश्वरी शक्ती तुमच्यामध्ये कार्यरत आहे याची जाणीव तुम्हाला होईल. या कार्यामध्ये तुम्हाला श्रीमाताजींच्या उपस्थितीची आणि त्यांच्या शक्तीची जाणीव होईल. एकदा का हे असे घडून आले की, उर्वरित सगळ्या गोष्टी या काळावर आणि तुमच्या खऱ्या व दिव्य प्रकृतीच्या तुमच्यामधील प्रगतिशील उत्क्रांतीवर अवलंबून असतात.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 741)

 

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो अशा मुलाच्या स्वप्नांमध्ये नेहमीच एक प्रकारची अभीप्सा असते. ती त्या मुलाच्या चेतनेच्या दृष्टीने एक प्रकारची आकांक्षा असते. म्हणजे सौंदर्याला कुरुपतेचा कलंक नसावा, अन्यायविरहित न्याय असावा, अमर्याद चांगुलपणा असावा आणि एक सचेत, सातत्यपूर्ण यश मिळावे, एक निरंतर चमत्कार घडावा असे त्याला वाटत असते. काहीतरी चमत्कार घडावेत अशी स्वप्नं ते पाहत असते. जगातील सर्व दुष्टपणा नाहीसा होऊन जावा आणि प्रत्येक गोष्ट नेहमी तेजोमय, सुंदर, आनंदी असावी असे त्याला वाटत असते. आणि म्हणूनच ज्या गोष्टींचा शेवट गोड होतो अशा गोष्टी मुलांना आवडतात. व्यक्तीने त्यावर विश्वास ठेवला पाहिजे.

जेव्हा शरीराला वेदनांची किंवा स्वतःच्या मर्यादांची जाणीव होते तेव्हा व्यक्तीने शरीरामध्ये अमर्याद सामर्थ्य, कुरुपताविरहित सौंदर्य आणि अद्भुत क्षमतांचे स्वप्न रुजविले पाहिजे. हवेमध्ये उंच भरारी घेण्याची, जिथे आवश्यकता आहे तिथे उपस्थित राहण्याची किंवा चुकीच्या गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची, आजारी व्यक्तीस बरे करण्याची अशी अनेकानेक स्वप्नं मूल लहानपणी पाहत असते. परंतु बरेचदा त्यांचे पालक किंवा शिक्षक त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरवतात आणि म्हणतात, “असं स्वप्नातच घडतं, असं काही खरं नसतं.” वास्तविक त्यांनी याच्या बरोबर उलट केले पाहिजे.

मुलांना असे सांगितले पाहिजे की, “तुला जे वाटतं आहे ते प्रत्यक्षात उतरवण्याचा तू प्रयत्न केला पाहिजेस. तू जे म्हणतो आहेस ते शक्य आहे आणि ती गोष्ट शक्य करून दाखविणारा जो अंश तुझ्यामध्ये आहे, त्याच्या संपर्कात तू आलास तर, ती गोष्ट तू निश्चितपणे करू शकशील. सामान्य जग त्याला काल्पनिक मानते. पण तू त्या खऱ्या वास्तविकतेच्या दिशेने स्वतःला विकसित केले पाहिजेस, त्या दिशेने तू तुझ्या जीवनाची आखणी केली पाहिजेस, जीवनाला दिशा दिली पाहिजेस.” मुलांना असे घडविले पाहिजे. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 09 : 162)

चैत्य पुरुष (अंतरात्मा, psychic being) जेव्हा प्रबल आणि अग्रस्थानी आलेला असतो तेव्हा तो उघडपणे मदत करतो. इतकेच नव्हे तर तो मन, प्राण आणि शारीरिक प्रकृती यांचे देखील सुशासन करू शकतो. सत्य काय आणि मिथ्या काय, ईश्वरी काय किंवा असुरी काय, योग्य काय आणि अयोग्य काय, याविषयीचे स्पष्ट संकेत तो देतो. एवढेच नाही तर, विरोधी शक्तींचे सर्व हल्लेसुद्धा तो परतवून लावतो.

*

‘आंतरात्मिक दृष्टिकोन (psychic attitude) बाळगण्याची खरी आवश्यकता आहे,’ हा तुमचा विचार योग्यच आहे. आंतरात्मिक दृष्टिकोन बाळगल्यामुळे प्रगती साधीसरळ, सहजस्वाभाविक, आनंदमय आणि सुलभ होऊ शकते. चिकाटी बाळगा, साधना सोडून देण्याचे काहीच कारण नाही. उद्भवणाऱ्या अडीअडचणींमुळे नाउमेद होऊ नका. सरतेशेवटी विजय आणि चिरस्थायी शांती निश्चित आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 339 & 340)

साधनेमध्ये होणाऱ्या प्राणिक आवेगांच्या भेसळीतून जेव्हा साधक मुक्त होईल आणि तो जेव्हा श्रीमाताजींप्रत साधेसुधे व प्रामाणिक आत्मार्पण करू शकेल तेव्हाच त्या साधकातील चैत्य पुरुष, अंतरात्मा (Psychic Being) पूर्णत: खुला होईल. जर त्यामध्ये कोणतेही अहंकारी वळण असेल किंवा प्रेरणेमध्ये अप्रामाणिकता असेल, प्राणिक मागण्यांच्या दबावाखाली येऊन साधना केली जात असेल किंवा पूर्णपणे वा अंशत: कोणत्यातरी आध्यात्मिक वा इतर आकांक्षा पूर्ण करण्यासाठी साधना केली जात असेल; अभिमान, प्रौढी किंवा सत्तापिपासा, पद मिळविण्यासाठी किंवा इतरांवर प्रभाव पडावा म्हणून किंवा योगिक शक्तीच्या साहाय्याने कोणतीतरी प्राणिक इच्छा भागवण्याची ऊर्मी म्हणून साधना केली जात असेल तर, चैत्य पुरुष मुक्त होणार नाही किंवा तो जर मुक्त झालाच तर तो अंशत:च किंवा काही काळासाठीच मुक्त होईल आणि परत बंदिस्त होऊन जाईल कारण तो प्राणिक कृतींनी झाकला गेलेला असेल. आंतरात्मिक अग्नी प्राणिक धुरामुळे घुसमटून, विझून जातो.

तसेच, साधनेमध्ये फक्त मनच पुढाकार घेत असेल आणि अंतरात्म्याला मागे ठेवत असेल किंवा भक्ती वा साधनेतील इतर क्रिया अंतरात्मिक रूप धारण करण्याऐवजी अधिक प्राणिक बनत असतील, तरीदेखील तशीच अ-क्षमता निर्माण होते. शुद्धता, साधासरळ प्रामाणिकपणा आणि कोणत्याही ढोंगाची किंवा मागणीची ज्यामध्ये भेसळ झालेली नाही अशी निरहंकारी आत्मार्पण-क्षमता या चैत्य पुरुषाच्या पूर्ण प्रकटीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या अटी आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 349)

जीवन जगण्याचे शास्त्र – १३

माधुर्य आणि आनंदी भावना वाढीस लागू दिली पाहिजे; कारण या गोष्टी म्हणजे तुम्ही आत्म्याप्रत, चैत्य पुरुषाप्रत जागृत झाला आहात आणि तो तुमच्या संपर्कात आहे, याची सर्वात ठळक खूण असते. विचार किंवा उच्चार किंवा आचारामधील चुकांमुळे तुम्ही अस्वस्थ होऊ नका; त्या बाह्य गोष्टी असल्याप्रमाणे त्यांना तुमच्यापासून दूर लोटा. ईश्वरी शक्ती आणि ईश्वरी प्रकाश यांचे कार्य त्यांच्यावर होईल आणि त्या चुका दूर करण्यात येतील. केंद्रवर्ती सद्वस्तु म्हणजे, तुमचा आत्मा आणि त्याच्यासोबत येणाऱ्या सर्व उच्चतर वास्तविकता यांच्यावर लक्ष केंद्रित करा.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 344)

*

आनंदी राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे मग तुम्ही त्वरेने ईश्वरी प्रकाशाच्या जवळ जाऊन पोहोचाल.

*

ईश्वराप्रति एक प्रगाढ, उत्कट आणि सातत्यपूर्ण संपूर्ण कृतज्ञता जाणवणे हा आनंदी आणि शांत राहण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

– श्रीमाताजी (CWM 14 : 193), (CWM 16 : 314)

चैत्य पुरुष (psychic being) जेव्हा वृद्धिंगत होऊ लागतो आणि अग्रभागी येऊन मन, प्राण, शरीर यांचे शासन करू लागतो आणि त्यांच्यात बदल घडवितो तेव्हा आणि फक्त तेव्हाच वैयक्तिक कल्पना, इच्छा, सवयी गळून पडतात. तेव्हा मग, व्यक्तीचे ईश्वराशी थेट नाते निर्माण होऊ लागते आणि ईश्वराशी असलेले निकटत्व वाढीस लागते. समग्र चेतना ईश्वराशी एकत्व पावेपर्यंत हे निकटत्व वृद्धिंगत होत राहते. जेव्हा तुम्ही चैत्याच्या, अंतरात्म्याच्या (psychic) गहनतेमध्ये प्रवेश करता, तसतशा श्रीमाताजी तुमच्या समीप आहेत अशी जाणीव तुम्हाला होऊ लागते. जेव्हा मन वा प्राण हे चैत्याच्या प्रभावाखाली येऊ लागतात तसतशी त्यांच्यामध्येसुद्धा ही जाणीव वाढीस लागते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 360)

श्रीमाताजी आणि समीपता – १६

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

तुम्हाला श्रीमाताजींबद्दल जे एवढे प्रगाढ प्रेम वाटते ते प्रेम आणि तुम्ही ज्यांच्या समवेत राहता किंवा काम करता त्यांच्याविषयी वाटणारी आत्मीयता व सौहार्दाची भावना या दोन्ही गोष्टी चैत्य पुरुषाकडून (psychic being) येतात. जेव्हा चैत्य पुरुषाचा प्रभाव वाढू लागतो तेव्हा ‘श्रीमाताजीं’बद्दलचे हे प्रेम अधिक उत्कट होते आणि ते प्रेमच तुमच्या प्रकृतीचे मुख्य सारथी बनते. आणि त्याचबरोबर इतरांविषयी एक प्रकारची सद्भावना, सुसंवाद, दयाळूपणा किंवा आत्मीयता या भावनासुद्धा उदयाला येतात.

श्रीमाताजींची बालके असणाऱ्या सर्वच जिवांशी आपल्या आत्म्याचे जे आंतरिक नाते असते त्याचा हा परिणाम असतो आणि त्यामुळे त्यामध्ये (व्यक्तीचे) वैयक्तिक असे काही नसते. या आंतरात्मिक भावनेमध्ये काही अपाय नाही, उलट ती भावना संतोष आणि सुसंवाद निर्माण करते. आंतरात्मिक भावनेमुळे अंतरात्म्याचे श्रीमाताजींच्या चेतनेमध्ये विकसन होण्यास साहाय्य लाभते आणि त्यामुळे कार्यालाही हातभार लागतो तसेच आंतरिक जीवन वृद्धिंगत होण्यासदेखील मदत होते.

व्यक्ती-व्यक्तींमध्ये असणारे प्राणिक प्रेम (vital love) तेवढे नाकारले पाहिजे कारण ते प्रेम ‘ईश्वरा’प्रति करायच्या पूर्ण आत्म-निवेदनापासून (consecration) व्यक्तीला दूर नेते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 463)