Tag Archive for: सद्भावना

(तुमच्यामध्ये काही बदल घडवावा असे तुम्हाला वाटत असेल तर नेमके काय केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे. ते कालच्या भागात आपण समजावून घेतले.)

तुमच्यामध्ये समजा एखादा दोष आहे आणि तो तुम्ही दूर करू इच्छित आहात पण तरीही तो जर टिकून राहिला आणि तुम्ही म्हणालात की, “मला जेवढे करता येणे शक्य होते तेवढे सगळे मी केले आहे,” तेव्हा तुम्ही निश्चितपणे असे समजा की, जे जे करणे आवश्यक होते ते सारे तुम्ही केलेले नाही. तुम्ही जर खरंच तसा प्रयत्न केला असता तर, तुम्हाला नक्कीच विजय प्राप्त झाला असता. कारण तुमच्या वाट्याला ज्या अडचणी येतात त्या तुमच्या सामर्थ्याच्या प्रमाणातच असतात. तुमच्या चेतनेशी संबंधित नसलेली अशी कोणतीच गोष्ट तुमच्या बाबतीत घडू शकत नाही आणि ज्या गोष्टी तुमच्या चेतनेशी संबंधित असतात त्यावर तुम्ही निश्चितपणे प्रभुत्व मिळवू शकता.

बाहेरून येणाऱ्या गोष्टी किंवा सूचना यासुद्धा तेवढ्या प्रमाणातच तुम्हाला स्पर्श करू शकतात जेवढ्या प्रमाणात तुमच्या चेतनेने त्यांना संमती दिलेली असते. तुम्ही तुमच्या चेतनेचे स्वामी व्हावे यासाठीच तुमची जडणघडण झालेली असते.

तुम्ही जर असे म्हणाल की, “मला जे करणे शक्य होते ते सारे मी केले आहे आणि सगळ्या गोष्टी करूनसुद्धा तो दोष तसाच कायम राहिला, म्हणून मी प्रयत्न करणे सोडून दिले,” तर तुम्ही हे निश्चित समजा की, तुम्हाला जे जे काही करणे शक्य होते ते तुम्ही केलेले नाही. ‘सगळे करून सुद्धा’, जेव्हा कोणतीही त्रुटी शिल्लक राहते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, तुमच्या अस्तित्वात दडी मारून बसलेली एखादी गोष्ट ‘जॅक इन द बॉक्स’ या खेळातल्याप्रमाणे अचानक उसळी मारून वर येते आणि तुमच्या जीवनाचा ताबा घेते.

म्हणून, तुम्ही एकच गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे, तुमच्या आतमध्ये दडी मारून बसलेले सर्व छोटे-छोटे अंधारे कानेकोपरे शोधून काढले पाहिजेत. त्या अंधाऱ्या भागावर सद्भावनेचा एक छोटासा कवडसा जरी तुम्ही टाकलात तर, तो अंधारा कोपरा शरण येईल, तो नाहीसा होऊन जाईल. आणि एके काळी तुम्हाला जी गोष्ट अशक्य वाटली होती ती गोष्ट करणे तुम्हाला शक्य होईल. ती फक्त व्यवहार्यच होईल असे नाही, तर ती पूर्णदेखील झालेली असेल.

तुम्हाला अनेक वर्षे सतावणारी अशी एखादी अडचण तुम्ही अशा रितीने एका क्षणात दूर करू शकता. मी तुम्हाला खात्री देते. ते फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून असते आणि ती गोष्ट म्हणजे, तुम्हाला त्या दोषापासून, त्या त्रुटीपासून अगदी खरोखर, प्रामाणिकपणे सुटका करून घ्यायची इच्छा असली पाहिजे. आणि ही गोष्ट सर्वच बाबतीत लागू पडते. म्हणजे अगदी शारीरिक आजारपणापासून ते सर्वोच्च मानसिक अडचणींपर्यंत ही गोष्ट सर्वत्र सारखीच लागू पडते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 04 : 74)

सद्भावना – ३०

जोवर तुमच्यामध्ये दुसऱ्यांविषयी आपपर भाव शिल्लक असतो तोवर निश्चितपणे तुम्ही ‘सत्या’च्या परिघाबाहेर असता.

तुम्ही कायमच तुमच्या हृदयात सद्भाव आणि प्रेमभाव जतन केला पाहिजे. आणि प्रगाढ शांतीने आणि समतेने त्यांचा सर्वांवर वर्षाव केला पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 191)

सद्भावना – २९

साधे असणे खूप चांगले असते, फक्त सदिच्छा बाळगायची, आपल्याला करता येणे शक्य असेल ती उत्तमातील उत्तम गोष्ट आपण करायची आणि ती गोष्ट शक्य तेवढ्या सर्वोत्तम रीतीने करायची. त्यासाठी फार वेगळे असे काही करण्याची गरज नाही; फक्त प्रगतीसाठी, प्रकाशासाठी, सद्भावनापूर्ण शांतीसाठी अभीप्सा बाळगायची. आणि आपण काय केले पाहिजे आणि आपण कोण झाले पाहिजे यासंबंधीचा निर्णय, या विश्वातील सारे काही जो जाणतो त्या ‘ईश्वरा’लाच घेऊ द्यायचा, हे किती छान आहे! मग आपल्याला कोणतीच चिंता उरत नाही, आणि मग आपण अगदी पूर्णपणे आनंदी राहू शकतो.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 248)

सद्भावना – २८

एखादी गोष्ट चुकीची आहे हे माहीत नसताना जर ती गोष्ट तुमच्याकडून घडली असेल तर, तेव्हा तुम्ही ती चूक अज्ञानापोटी केलेली असते आणि म्हणून हे साहजिकच आहे की, नंतर जेव्हा तुम्हाला ती गोष्ट चुकीची होती हे समजते, आणि जेव्हा तुमचे अज्ञान नाहीसे झालेले असते तसेच तुमच्यापाशी सद्भाव असतो तेव्हा, तुम्ही तीच चूक परत करत नाही, आणि एवढेच नाही तर, ज्या परिस्थितीत ती चूक पुन्हा घडण्याची शक्यता असते त्या परिस्थितीतूनच तुम्ही बाहेर पडलेले असता.

पण अमुक एक गोष्ट चुकीची आहे हे तुम्हाला माहीत असूनही, जेव्हा तुम्ही ती चूक करता तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, तुमच्यामध्ये कुठेतरी, काहीतरी अशी विकृती आहे की, जिने गोंधळ किंवा दुरिच्छा यांची निवड केलेली असते. किंबहुना, तिने ईश्वर-विरोधी शक्तींच्या बाजूने राहण्याची जाणूनबुजून निवड केलेली असते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 306)

सद्भावना – २७

एकदोन दिवसांपूर्वी ‘पवित्र’ (श्रीमाताजींचे एक ज्येष्ठ शिष्य) जेव्हा पत्रांची जुळवाजुळव करत होते तेव्हा, मी इंग्रजीत कोणाला तरी लिहिलेले एक पत्र त्यांच्या पाहण्यात आले.

त्यात असे लिहिले होते की, “जी व्यक्ती आपल्या चेतनेमध्ये सद्भावना बाळगते त्या व्यक्तीला, ती सद्भावना स्वतःहून सर्व वस्तुमात्रांमध्ये गुप्त असलेल्या सद्भावनेचे सर्वत्र दर्शन घडविते. भावनेचा भविष्याकडे थेटपणे घेऊन जाणारा हा एक विधायक मार्ग आहे.”

मला हे फार रोचक वाटले. (हे पत्र काही वर्षांपूर्वी, किमान एक वर्षभर तरी आधी लिहिलेले होते, आणि पवित्रने मला सांगितले की, ते इतर फाईलींमध्ये गहाळ झाले होते, त्यांना ते सापडलेच नव्हते.) आणि ते पत्र जणू मला सांगत होते, “बघ, तू हे आधीच सांगून ठेवले आहेस.” कारण ‘सद्भावना’ म्हणजे सुसंवाद (अर्थात मनोवैज्ञानिक स्तरावरील) होय, सारे काही चांगले व्हावे अशी मानसिक स्तरावरील ती इच्छा असते. मला हे मोठे रोचक वाटले.

पण ते पत्र परत सापडले हे बरे झाले; सद्भावना हे प्रत्येकाच्याच आवाक्यात येऊ शकेल असे एक रूप आहे, जे कोणालाही उमजू शकते. तुमच्याकडून कोणत्याही असाधारण गोष्टींची अपेक्षा केली जात नाही, तर फक्त सद्भावना असावी, एवढीच माफक अपेक्षा केली जाते. मला हे पत्र जेव्हा परत सापडले तेव्हा मी हसले आणि मला ते गमतीशीर वाटले आणि मी म्हणाले, “असेच विधान कदाचित मी प्रसन्नतेबद्दल देखील केले असेल.” मी असे म्हटलेले असेल की, ”प्रसन्न राहा आणि बघा, तुम्हाला सर्वत्र प्रसन्नताच दिसून येईल.” बरेच काही सांगता येण्यासारखे आहे. अशा वेळी मला नेहमीच शोभादर्शक यंत्राची (कॅलिडोस्कोप) आठवण येते; ज्यामध्ये काहीतरी निराळेच अभिव्यक्त करण्यासाठी रंगांची अशी एक रचना असते की, ज्या क्षणी ती गोष्ट अभिव्यक्त होते त्याच क्षणी…ती बदलते, नाहीशी होते, साधीसोपी होऊन जाते आणि अंतिमतः ती सर्वांच्या आवाक्यात येते.

पण एक गोष्ट आहे : पृथ्वीवर सध्या एक ‘भयंकर’ संघर्ष चालू आहे, परंतु त्याच बरोबर एक अद्भुत दिव्य कृपाही आहे, जी नेहमीच साहाय्य करत असते, ती नेहमीच अधिक चांगल्यासाठी धडपडत असते आणि दबाव टाकत असते, “या, प्रसन्न राहा, आणि सद्भावना बाळगा, या, समाधानयुक्त आंतरिक सुसंवाद, आशा, श्रद्धा बाळगा. विघटनाची स्पंदने – म्हणजेच ऱ्हासकारक, पतित करणारी, आणि विनाशाच्या दिशेने घेऊन जाणारी स्पंदने स्वीकारू नका.”

– श्रीमाताजी
(Mother’s Agenda, Vol – 08, May 3, 1967)

सद्भावना – २६

(प्राणामध्ये (Vital) दोन प्रवृत्ती आढळतात – एक म्हणजे निराशेची आणि दुसरी अतिउत्साहाची. या दोन प्रवृत्तींना कसे हाताळावे, याविषयी चर्चा सुरू असताना, श्रीमाताजी पुढे सांगत आहेत…)

अगदी काळजीपूर्वक टाळलाच पाहिजे असा हा एक मोठा अडथळा आहे. असमाधानाचे किंवा चिडचिडेपणाचे अगदी बारीकसे लक्षण जरी आढळले तरी, लगेचच आपण आपल्या प्राणाला असे सांगितले पाहिजे की, ”माझ्या मित्रा, तू शांत राहणार आहेस, तुला जे करायला सांगितले आहे तेवढेच तू करणार आहेस, अन्यथा माझ्याशी गाठ आहे.” आणि दुसरीकडे, “आत्ताच्या आत्ता सारे काही झालेच पाहिजे,’’ असे म्हणणारा, जो अतिउत्साही (प्राण) असतो त्याला असे समजावून सांगितले पाहिजे की, “थोडा शांत हो, तुझी उत्साहशक्ती चांगलीच आहे पण ती अशी पाच मिनिटांतच वाया घालविता कामा नये. आपल्याला ती पुढेही दीर्घकाळ लागणार आहे, तिचे काळजीपूर्वक जतन कर, आणि मला जेव्हा तिची आवश्यकता भासेल तेव्हा मी स्वतःहून तुझ्या सद्भावनेला हाक देईन. तेव्हा तू सद्भावनेने परिपूर्ण आहेस हे दाखवून देशील, तू आज्ञा पाळशील, तू कुरकूर करणार नाहीस, तू विरोध करणार नाहीस, तू बंड करणार नाहीस, तू म्हणशील, ‘हो, हो. मी करीन.” तुला जेव्हा विचारण्यात येईल तेव्हा तू किंचितसा त्याग करशील आणि म्हणशील, “हो, मी अगदी मनापासून करीन.” (प्राणाच्या अतिउत्साहाला तुम्ही अशा प्रकारे आवर घातला पाहिजे.)

– श्रीमाताजी
(CWM 04 : 249)

सद्भावना – २५

व्यक्ती ज्यावेळी अतिशय सतर्क आणि अतिशय प्रामाणिक असते तेव्हा, तिने हाती घेतलेल्या कामाचे किंवा ती करत असलेल्या कृतीचे मूल्य किती आहे किंवा काय आहे यासंबंधी, तिला एखादी आंतरिक पण सुस्पष्ट सूचना मिळू शकते. खरोखर, जिच्यापाशी पुरेपूर सद्भावना आहे अशी एखादी व्यक्ती असेल म्हणजे जी व्यक्ती अत्यंत प्रामाणिकपणाने, तिच्या अस्तित्वाच्या समग्र जाणिवयुक्त भागानिशी, योग्य कृती, योग्य प्रकारे करण्याची इच्छा बाळगत असेल तर नेहमीच अशा प्रकारची अंतःसूचना मिळते. कोणत्याही कारणाने का असेना पण जर का तिने कमीअधिक घातक अशी एखादी कृती करायला सुरुवात केली तर, तिला अशा प्रत्येक वेळी आज्ञा-चक्रापाशी (solar plexus) एक प्रकारच्या अस्वस्थतेची जाणीव होते. ही अस्वस्थता आक्रमक नसते, नाट्यमयरित्या काहीतरी करून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी ती बळाचा वापर करत नाही, परंतु तरीही सतर्क व्यक्तीसाठी ती अस्वस्थता अगदी सुस्पष्ट असते; ती काहीशी पश्चात्तापासारखी किंवा असहमतीसारखी असते. कधीकधी असहकार पुकारण्या इतपतदेखील या अस्वस्थतेची मजल जाऊ शकते. पण मला येथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की, त्या अस्वस्थतेमध्ये कोणतीही आक्रमकता नसते, तिच्यामध्ये कोणताही क्रूर असा स्वाग्रह (self-assertion) नसतो. म्हणजे असे की, ती अस्वस्थता कोणताही गोंगाट करत नाही, इजा पोहोचवीत नाही, काहीशी बेचैनी असते इतकेच.

परंतु जर का तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष केलेत, तिच्याकडे लक्ष दिले नाहीत, तिला काही महत्त्व दिले नाहीत तर, कालांतराने ती पूर्णपणे निघून जाते आणि मग पुढे पुढे तर, अशी अस्वस्थता जाणवणेच बंद होते.

असे दुर्लक्ष झाले तर वाढत्या चुकांच्या प्रमाणात अस्वस्थता वाढण्याऐवजी, उलट, ती अस्वस्थता जाणवेनाशी होते आणि चेतना झाकोळून जाते.

पण म्हणून, हेच याचे निश्चित लक्षण आहे असे व्यक्ती म्हणू शकत नाही; कारण जर का तुम्ही ही अशा प्रकारशी लहानशी अंतःसूचना अनेक वेळा डावलली असेल, तर, कालांतराने ती सूचना येईनाशी होते. परंतु मी तुम्हाला सांगते की, अगदी प्रामाणिकपणे तुम्ही तिच्याकडे लक्ष दिलेत तर, ती अंतःसूचना एक अत्यंत खात्रीलायक आणि मोलाची मार्गदर्शक ठरते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 31-32)

सद्भावना – २४

प्रश्न : आजारपण येणे म्हणजे योगमार्गातील परीक्षा असते का?

श्रीमाताजी : परीक्षा? अजिबातच नाही. प्रगती करावी म्हणून व्यक्तीला हेतुपुरस्सर आजारपण देण्यात येते का? नाही, नक्कीच ते तसे नाही. वास्तविक, तुम्ही हीच गोष्ट दुसऱ्या बाजूने विचारात घेतली पाहिजे आणि मग तुम्ही असे म्हणू शकता की, काही माणसं अशीही असतात की, ज्यांची अभीप्सा इतकी सातत्यपूर्ण असते आणि त्यांची सद्भावना इतकी समग्र असते की त्यांच्याबाबतीत जे जे काही घडते त्या साऱ्या गोष्टींकडे ते प्रगती करण्यास उद्युक्त करणारी अशी मार्गावरील कसोटी म्हणून पाहतात. मला अशी काही माणसं माहीत आहेत की जी आजारी पडतात तेव्हा, आजारपण म्हणजे प्रगती करण्यासाठी साहाय्य करणाऱ्या ‘ईश्वरी कृपे’चा पुरावा आहे, असे मानत असत. ती स्वतःला असे सांगत असत की, ही चांगली खूण आहे, आता मी माझ्या आजारपणाचे कारण शोधीन आणि मग आवश्यक ती प्रगती मी करून घेईन. मला अशा प्रकारची जी काही मोजकी माणसं माहीत आहेत, ती अगदी वेगाने प्रगती करतात. आणि काही जण याउलट असतात. ते या गोष्टीचा प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याऐवजी, कोलमडून पडतात. हे त्यांच्यासाठी अतिशय वाईट असते. पण व्यक्ती आजारी पडली तर, तिने योग्य दृष्टिकोन बाळगला पाहिजे तो असा की, ”असे काहीतरी आहे की जे बरोबर चाललेले नाही, ते काय आहे त्याचा मी शोध घेईन.” ‘ईश्वरा’ने तुमच्यावर मुद्दामहून आजारपण धाडले आहे, असा विचार तुम्ही कधीच करता कामा नये….

– श्रीमाताजी
(CWM 05 : 168-169)

सद्भावना – २३

केवळ चैत्य अस्तित्वातून आलेली प्रेरणाच खरी असते. प्राण आणि मन यांच्याकडून येणाऱ्या प्रेरणा या निश्चितपणे अहंकारमिश्रित असतात आणि अनियंत्रित असतात. बाहेरील संपर्काला प्रतिक्रिया म्हणून व्यक्तीने कृती करता कामा नये तर, प्रेमाच्या आणि सद्भावनेच्या अपरिवर्तनीय (Immutable) दृष्टिकोनातून कृती केली पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 334)

सद्भावना – २२

सर्वांत बाह्यवर्ती शारीरिक चेतना आणि चैत्य चेतना (Psychic Consciousness) या दोहोंमध्ये नित्य संपर्क प्रस्थापित करणे हे स्वाभाविकपणेच अतिशय कठीण असते. आणि या शारीरिक चेतनेपाशी भरपूर सद्भावना असते; ती अतिशय नियमित असते, ती खूप धडपड करते, पण ती मंद आणि जड असते, तिला खूप वेळ लागतो, ती प्रगत होणे कठीण असते. ती थकत नाही, पण ती आपणहून प्रयत्नही करत नाही, ती तिच्या मार्गाने, शांतपणे वाटचाल करत असते. बाह्य चेतनेला चैत्य पुरुषाच्या संपर्कात येण्यासाठी (कदाचित) कित्येक शतकेदेखील लागू शकतात. परंतु या ना त्या कारणास्तव प्राण (vital) त्यामध्ये हातभार लावतो. एक आवेग त्याचा ताबा घेतो. ते कारण नेहमी आध्यात्मिकच असते असे नाही, पण या ना त्या कारणासाठी, प्राणाला तो संपर्क हवाहवासा असतो. तो संपर्क प्रस्थापित व्हावा अशी त्याची मनीषा असते. आपल्या साऱ्या ऊर्जेनिशी, आपल्या साऱ्या सामर्थ्यानिशी, साऱ्या आवेगांनिशी, जोमानिशी त्याला तो संपर्क हवा असतो : तीन महिन्यांमध्ये ती गोष्ट साध्य होऊ शकते.

त्यामुळे प्राणाला हाताळताना फार काळजी घेतली पाहिजे. त्याला मोठ्या काळजीपूर्वकतेने वागणूक द्या पण त्याच्यासमोर नमते घेऊ नका. अन्यथा तो तुम्हाला सर्व प्रकारच्या त्रासदायक आणि अप्रिय प्रयोगांकडे खेचून नेईल. परंतु या ना त्या प्रकारे तुम्ही जर का त्याला पटवून देण्यात यशस्वी झालात तर, तुम्ही मार्गावर प्रचंड प्रगती करू शकाल.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 257-258)