Tag Archive for: साधना

तुम्ही जर सचेत अभीप्सेच्या स्थितीमध्ये असाल आणि अगदी प्रामाणिक असाल तर, तुमच्या सभोवताली असणाऱ्या सर्व गोष्टी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तुमच्या अभीप्सेला साहाय्यक ठरतील अशा रितीनेच रचल्या जातील. त्या तुमच्या प्रगतीसाठी साहाय्यक ठरतील म्हणजे, एकतर एखाद्या नवीन गोष्टीशी त्या तुमचा संपर्क साधून देतील किंवा तुमच्या प्रकृतीमधील जी गोष्ट नाहीशी होणे गरजेचे होते अशी एखादी गोष्ट त्या काढून टाकतील. ही बाब काहीशी लक्षणीय असते.

तुम्ही खरोखरच जर अभीप्सेच्या उत्कट स्थितीमध्ये असाल तर, ही अभीप्सा प्रत्यक्षात येण्यासाठी अगदी प्रत्येक परिस्थिती साहाय्यभूत ठरते. सभोवतालची प्रत्येक गोष्ट, अगदी प्रत्येक गोष्ट जणू काही एका अतिशय परिपूर्ण व असीम चेतनेने तुमच्याभोवती गुंफली जाते. तुम्ही तुमच्या बाह्यवर्ती अज्ञानामुळे कदाचित ती ओळखू शकणार नाही आणि परिस्थिती जे रूप धारण करून तुमच्या समोर उभी ठाकते ती पाहून, तुम्ही कदाचित तिला विरोधही कराल, तक्रार कराल, ती परिस्थिती बदलविण्याचा प्रयत्न कराल; परंतु काही काळाने, जेव्हा तुम्ही काहीसे अधिक प्रगल्भ होता आणि जेव्हा तुम्ही व ती घटना यांमध्ये काही कालावधी गेलेला असतो, तेव्हा तुम्हाला जाणीव होते की, तुम्हाला आवश्यक असणारी प्रगती घडविण्यासाठी तेव्हाची ती परिस्थिती अगदी तशीच असणे भाग होते. तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की, एक संकल्प, परम सद्भाव हाच तुमच्या सभोवार सर्व गोष्टींची रचना करत असतो आणि ती परिस्थिती स्वीकारण्याऐवजी तुम्ही तिला प्रतिकार करत राहिलात, कितीही तक्रार करत राहिलात तरीही, अगदी त्याच घडीला तो सद्भाव सर्वांत प्रभावीपणे कार्य करत असतो.

• श्रीमाताजी (CWM 06 : 176)

आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये सामर्थ्याला निश्चितच एक महत्त्व असते; पण आध्यात्मिक साक्षात्कार हा केवळ सामर्थ्यामुळेच होऊ शकतो आणि तो अन्य कोणत्याच मार्गामुळे होऊ शकत नाही, असे म्हणणे ही खूपच अतिशयोक्ती ठरेल.

‘ईश्वरी कृपा’ ही काही एखादी काल्पनिक गोष्ट नाही, तर ती अनुभवास येणारी आध्यात्मिक वस्तुस्थिती आहे. विद्वान आणि सामर्थ्यवान माणसं ज्यांना अगदीच नगण्य समजतात अशा अनेक व्यक्तींना ईश्वरी कृपे‌मुळे आध्यात्मिक साक्षात्कार झालेला आहे. अशिक्षित असताना किंवा फारशी मानसिक शक्ती नसताना किंवा कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नसताना किंवा त्यांच्या व्यक्तित्वामध्ये (तुम्ही म्हणता तसे) कोणतेही ‘सामर्थ्य’ नसताना किंवा संकल्पशक्ती नसताना देखील, त्यांना एकाएकी किंवा अगदी अल्पावधीतच आध्यात्मिक साक्षात्कार झाला होता; कारण त्यांच्यापाशी श्रद्धा होती किंवा ते प्रामाणिक होते आणि त्यांनी अभीप्सा बाळगली होती.

ही आध्यात्मिक इतिहासातील तथ्यं आहेत आणि ती तथ्यं अगदी सार्वत्रिक आध्यात्मिक अनुभवाचा भाग आहेत. असे असूनही या गोष्टी काल्पनिक आहेत असे समजून, त्यांचा एवढा ऊहापोह का केला जातो, किंवा इतके युक्तिवाद का केले जातात, किंवा या गोष्टी नाकारल्या का जातात हेच मला कळत नाही.

‘सामर्थ्य’, जर ते आध्यात्मिक असेल तर, त्यामध्ये आध्यात्मिक साक्षात्काराची शक्ती असते; (पण) त्याहूनही अधिक शक्ती ‘प्रामाणिकपणा’मध्ये असते; आणि सर्वाधिक शक्ती ‘ईश्वरी कृपे‌’मध्ये असते. कितीही वेळ लागला आणि कितीही अडचणी आल्या तरी, एखादी व्यक्ती जर प्रामाणिक असेल तर ती त्या सगळ्यातून पार होतेच, हे मी आजवर अनेकदा सांगितले आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 172)

व्यक्तीला आलेल्या सर्व आध्यात्मिक अनुभवांचे मोल हे फक्त तिच्या प्रामाणिकपणाच्या प्रमाणावरच अवलंबून असते. काही जण प्रामाणिक नसतात. ते (मनाने) अद्भुत अनुभव रचतात आणि त्यांना तसे अनुभव खरोखरच आले आहेत, अशी कल्पना ते करू लागतात. परंतु जी माणसं प्रामाणिक असतात, ज्यांना खरेखुरे अनुभव आलेले असतात (त्यांच्या बाबतीत काय परिस्थिती असते?) तर जेव्हा त्यांना ईश्वरी अस्तित्वाची प्रत्यक्षानुभूती येते, तेव्हा ‘तो अनुभव खरा नाही,’ असे सर्व जगाने जरी त्यांना सांगितले तरी, त्यामुळे ते यत्किंचितही विचलित होत नाहीत.

– श्रीमाताजी (CWM 04 : 135)

व्यक्ती जे जे काही करते त्या सर्व गोष्टी ईश्वरार्पण करणे आणि असे करत असताना त्या मोबदल्यात कोणत्याही वैयक्तिक फलाची अपेक्षा न बाळगणे; हे असे जीवन जगणे म्हणजे ईश्वरासाठी जीवन जगणे. प्रारंभी, म्हणजे जेव्हा ईश्वर हा व्यक्तीच्या दृष्टीने केवळ एक शब्द असतो किंवा ईश्वर म्हणजे नुसती एक कल्पना असते, ईश्वराचा तिला प्रत्यक्ष अनुभव आलेला नसतो तेव्हा ईश्वरासाठी जीवन जगणे वगैरे गोष्टी या फक्त मानसिक असतात. पण व्यक्ती जर पुन्हापुन्हा प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिली तर एके दिवशी तिला अनुभव येतो आणि तिला असे जाणवते की, ती जे अर्पण करत आहे ते कोणत्यातरी एखाद्या खऱ्याखुऱ्या, स्पर्शनीय, सघन आणि सर्वोपकारी अशा गोष्टीला अर्पण होत आहे.

व्यक्ती याबाबतीत जितकी जास्त प्रामाणिक आणि परिश्रमी असेल तितके अनुभव लवकर येतील आणि ते अधिक काळ टिकून राहतील. प्रत्येक व्यक्तिगणिक मार्गाच्या तपशिलांमध्ये फरक असतो पण प्रामाणिकपणा आणि प्रयत्नसातत्य, चिकाटी या गोष्टी सर्व मार्गांसाठी सारख्याच अपरिहार्य असतात.

• श्रीमाताजी (CWM 16 : 294)

 

(मला पूर्णयोगाची साधना करायची आहे त्यासाठी मला संन्यास घ्यावा लागेल का, असा प्रश्न एका व्यक्तीने श्रीअरविंद यांना विचारला असावा असे दिसते. त्यावर श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

व्यक्तीने संन्यासी असण्याची आवश्यकता नाही. स्वतःच्या पृष्ठवर्ती चेतनेमध्ये राहण्याऐवजी व्यक्ती जर अंतरंगामध्ये, तिच्या आंतरिक अस्तित्वामध्ये राहायला शिकू शकली आणि पृष्ठवर्ती मनामुळे व प्राणशक्तीमुळे झाकल्या गेलेल्या आत्म्याचा किंवा स्वतःच्या खऱ्या व्यक्तित्वाचा शोध घेऊ शकली आणि स्वत:चे अस्तित्व अतिचेतन वास्तविकतेप्रत (superconscient Reality) जर ती खुले करू शकली तर तेवढे पुरेसे असते. पण व्यक्ती पूर्णपणे प्रामाणिक असल्याखेरीज आणि तिचे प्रयत्न एकाच ध्येयासाठी एकदिश झालेले असल्याखेरीज तिला उपरोक्त गोष्टीमध्ये यश मिळू शकणार नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 380)

 

अर्थातच, श्रीमाताजींनी जे काम नेमून दिलेले असते ते त्यांचे स्वतःचे कार्य असते, तो त्यांच्या स्वतःच्या कार्याचा भाग असतो. तसेच जे काम प्रामाणिकपणे केलेले असते आणि जे श्रीमाताजींना अर्पण केले जाते ते कामसुद्धा त्यांचेच कार्य असते, हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. परंतु ‘कर्मा’मध्ये फक्त कामाचाच समावेश होतो असे नाही तर, सर्व प्रकारच्या कृतींचा समावेश होतो.

*

ईश्वराच्या कार्यासाठी तुम्ही जे आत्मनिवेदन (consecration) करत आहात, त्यामध्ये पूर्ण प्रामाणिकपणा ठेवा. तो प्रामाणिकपणाच तुम्हाला निश्चितपणे शक्ती व यश देईल.

– श्रीअरविंद आणि श्रीमाताजी (CWSA 32 : 417), (CWM 14 : 65)

 

(एका साधकाने श्रीअरविंद यांना पत्राने काही शंका विचारली होती. तेव्हा त्याला काय उत्तर द्यावे हे श्रीअरविंद यांनी सचिवाला लिहून कळविले होते. ते हे पत्र…)

श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचा प्रभाव ग्रहण करण्यासाठी, त्या प्रभावाप्रत स्वतःला खुले करण्याची क्षमता व इच्छा, श्रद्धा आणि आध्यात्मिक मार्गाचे अनुसरण करण्यामध्ये संपूर्ण प्रामाणिकपणा यांव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही अटी नाहीत. सहसा प्रामाणिकपणा व श्रद्धा यांचा परिणाम म्हणून, श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या प्रभावाप्रत स्वतःला खुले, उन्मुख करण्याची क्षमता निर्माण होते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 106)

 

साधना करत असताना सुरुवातीला एक गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे, शक्य तितके श्रीमाताजींचे स्मरण ठेवावे. दररोज काही वेळ हृदयामध्ये श्रीमाताजींवर लक्ष एकाग्र करावे. शक्य तितका, त्या ‘दिव्य माता’ आहेत या भूमिकेतून त्यांचा विचार करावा. त्या तुमच्या अंतरंगामध्येच आहेत ही जाणीव तुम्हाला व्हावी अशी अभीप्सा बाळगावी, तुमचे सारे कर्म त्यांना अर्पण करावे आणि त्यांनी तुम्हाला अंतरंगातून मार्गदर्शन करावे व तुमचा सांभाळ करावा, अशी त्यांच्यापाशी प्रार्थना करावी. हा प्राथमिक टप्पा आहे पण बहुतेक वेळा हा टप्पा ओलांडण्यासाठीच बराच वेळ लागतो.

परंतु एखाद्या व्यक्तीने जर प्रामाणिकपणे आणि चिकाटीने हा टप्पा ओलांडला तर मग हळू हळू मानसिकता बदलू लागते आणि साधकामध्ये अशी एक नवीन चेतना उमलू लागते की, ज्यामुळे साधकाला अंतरंगामधून श्रीमाताजींच्या उपस्थितीची अधिकाधिक जाणीव होऊ लागते. प्रकृतीमधील आणि जीवनातील त्यांच्या कार्याची जाणीव होऊ लागते किंवा मग अशा व्यक्तीला अन्य काही आध्यात्मिक अनुभव येऊ लागतात आणि त्यामधून साक्षात्काराच्या दिशेने द्वारं खुली होऊ लागतात.

*

तुम्ही तुमचे कर्म ईश्वराच्या चरणी पूर्ण प्रामाणिकपणे अर्पण केलेत तर ध्यानामधून जेवढे तुमचे कल्याण होईल तेवढेच कर्मामधूनही होऊ शकेल.

– श्रीअरविंद आणि श्रीमाताजी (CWSA 32 : 186), (CWM 16 : 178)

 

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

आम्हाला (मला व श्रीमाताजींना) तुमच्यामध्ये नेहमीच एक प्रकारची गहन अभीप्सा असल्याचे आणि त्या अभीप्सेमध्ये प्रामाणिकपणा असल्याचे आढळून आले आहे. आणि तीच सतत तुम्हाला आमच्या निकट संपर्कात ठेवते. जिथे अशा प्रकारची अभीप्सेची गहनता असते, प्रामाणिकपणा असतो आणि अशी निकटता आढळते तिथे व्यक्ती (ईश्वरी शक्तीप्रत) हळूहळू खुली होत जाणार हे निश्चित असते. आणि तुमच्यामध्ये तर हा खुलेपणा आधीपासूनच अस्तित्वात आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या साधनेबाबत चिंता किंवा काळजी करण्याचे काहीच कारण नाही, असे मला वाटते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 52)

 

वाचन आणि अभ्यास या गोष्टी मनाची पूर्वतयारी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, पण त्या गोष्टी म्हणजेच काही योगमार्गामध्ये प्रवेश करण्याची स्वयमेव सर्वोत्तम साधने नाहीत. तर अंतरंगातून होणारे आत्मसमर्पण हे त्यासाठी उत्तम साधन असते. तुम्ही श्रीमाताजींच्या चेतनेशी एकरूप झाले पाहिजे आणि प्रामाणिकपणे आत्म्याच्या अधिपत्याखाली आलेले मन, हृदय आणि संकल्प या गोष्टी (self-consecration) त्यासाठीची साधनं असतात.

श्रीमाताजींनी नेमून दिलेले काम हे त्यासाठी नेहमीच आत्म-निवेदनाचे क्षेत्र मानले जाते. ते काम श्रीमाताजींना अर्पण करण्याच्या भावनेतूनच केले गेले पाहिजे, म्हणजे मग त्या आत्मार्पणाच्या (self-offering) माध्यमातून व्यक्तीला, श्रीमाताजींच्या उपस्थितीची जाणीव होऊ शकेल आणि श्रीमाताजींची शक्ती त्या व्यक्तीमध्ये कार्य करत आहे हे तिला जाणवू शकेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 246)