Posts

श्रीअरविंद बडोद्यामध्ये प्राध्यापक होते तेव्हा श्री. के. एम. तथा कन्हैयालाल मुन्शी हे त्यांचे विद्यार्थी होते. तेव्हा विद्यार्थीदशेत असताना, मुन्शी यांनी श्रीअरविंदांना प्रश्न विचारला होता, “राष्ट्रवादाची भावना कशी विकसित करता येईल?”

 

श्रीअरविंदांनी भिंतीवरील भारताच्या नकाशाकडे निर्देश करत म्हटले, “या नकाशाकडे पाहा. यामध्ये भारतमातेचे रूप पाहण्याचा प्रयत्न करा. शहरं, पवर्तराजी, नद्या, जंगले या साऱ्यांनी मिळून तिचा देह तयार होतो. या देशामध्ये राहणारी माणसं म्हणजे या देहातील जिवंत पेशी आहेत. आपले साहित्य म्हणजे तिची स्मृती व वाणी आहे. तिच्या संस्कृतीचा गाभा हा तिचा आत्मा आहे. मुलांच्या आनंदामध्ये आणि स्वातंत्र्यामध्ये तिची मुक्ती आहे. भारत ही एक ‘सचेतन माता’ आहे असा भाव ठेवून तिच्याकडे पाहा, तिचे ध्यान करा आणि नवविधा भक्तीच्या योगाने तिचे पूजन करा….

 

पुढील काळात याच कन्हैयालाल मुन्शी यांनी राष्ट्रभावनेतून ‘भारतीय विद्या भवन’ची स्थापना केली.

 

‘भारत  – एक दर्शन’ ही मालिका येथे समाप्त होत आहे.

 

(Mother’s Chronicles, Book Five by Sujata Nahar)

हा असा काळ आहे की जेव्हा, अखिल विश्वाप्रमाणेच भारतासाठीसुद्धा, त्याची भावी नियती आणि त्याच्या पावलांचे वळण हे शतकासाठी म्हणून आत्ता दमदारपणाने निर्धारित केले जात आहे, आणि हे निर्धारण म्हणजे काही कोणत्या एखाद्या सामान्य शतकासाठीचे निर्धारण नव्हे तर, हे शतक स्वतःच मुळात असे एक महान निर्णायक वळण आहे की, ज्या शतकामध्ये मानवसृष्टीच्या आंतरिक आणि बाह्य इतिहासाच्या दृष्टीने प्रचंड उलथापालथी व्हायच्या आहेत.

 

आपण आत्ता ज्या कृती करू त्यानुसार, आपल्या त्या कर्माची मधुर फळे आपल्याला प्रदान केली जाणार आहेत आणि आत्ताच्या या निर्णायक क्षणी देण्यात आलेली अशा प्रकारची प्रत्येक हाक ही आपल्या नागरिकांच्या आत्म्याला देण्यात आलेली एक संधी असणार आहे. तसेच ती एक निवड असणार आहे आणि त्याचबरोबर, ती एक कसोटीदेखील असणार आहे.

 

आपण अशी आशा करूया की, ती हाक प्रत्येकाच्या अस्तित्वाच्या सर्वोच्च उंचीपर्यंत जाऊन पोहोचावी आणि त्याच्या पारड्यात ‘नियतीच्या स्वामी’चे अगदी उघडपणाने झुकते माप पडावे.

 

– श्रीअरविंद [CWSA 01 : 413]

 

*

 

भारताचे भविष्य अगदी सुस्पष्ट आहे. भारत हा जगत्गुरू आहे. जगाची भावी संरचना ही भारतावर अवलंबून असणार आहे. भारत हा एक जिवंत आत्मा आहे. भारत हा जगामध्ये आध्यात्मिक ज्ञानाचे मूर्त रूप साकार करत आहे.

 

भारत सरकारने भारताचा हा अर्थ लक्षात घेतला पाहिजे आणि त्यानुसार त्यांच्या कृति-कार्यक्रमाची आखणी केली पाहिजे.

 

– श्रीमाताजी [CWM 13 : 353]

भारत – एक दर्शन ३१

भारत हा एकच असा देश आहे की, जेथे आंतरात्मिक कायद्याचे अधिपत्य चालू शकते आणि ते तसे चाललेच पाहिजे. आणि त्यासाठी सुयोग्य काळ आता येथे आला आहे.

…ज्या भारताकडे एकमेवाद्वितीय असा आध्यात्मिक वारसा आहे, त्या भारतासाठी – आंतरात्मिक कायद्याचे अधिपत्य प्रस्थापित होणे – ही एकमेव शक्य अशी मुक्ती असेल.

*

भारत हा आधुनिक मानवजातीच्या सर्व समस्यांचे प्रतिनिधित्व करणारा देश झाला आहे. भारत हाच पुनरुत्थानाची भूमी ठरेल – तो अधिक उन्नत आणि अधिक सत्य अशा जीवनाच्या पुनरुत्थानाची भूमी बनेल.

– श्रीमाताजी [CWM 13 : 370, 368]

भारत – एक दर्शन ३०

(अलीपूरच्या कारागृहामध्ये असताना श्रीअरविंद यांना भगवान श्रीकृष्णाने दिलेला संदेश…)

विज्ञानाने लावलेल्या शोधांची आणि तत्त्वज्ञानाच्या भाकितांचा अगोदरच अंदाज बांधून, आणि त्यांचा स्वत:मध्ये समावेश करून घेत, जडवादावर मात करू शकेल असा (सनातन धर्म, हिंदु धर्म) हा एकच धर्म आहे.

‘ईश्वरा’चे सान्निध्य मानवजातीवर ठसवू पाहणारा आणि ‘ईश्वरा’च्या सन्निध जाण्यासाठी मानवाचे जेवढे म्हणून मार्ग आहेत त्या सर्वांना आपल्या कवेत कवळू पाहणारा हा एकच धर्म आहे.

‘ईश्वर’ हा सर्व मानवजातीत, वस्तुमात्रांत आहे; ‘ईश्वरा’तच आपण आपले सर्व व्यवहार करतो व ‘ईश्वरा’शिवाय आपणास अस्तित्व नाही; हे सत्य सर्व धर्म जाणतात पण हा असा एकच धर्म आहे की जो हरघडी, दरक्षणी केवळ याच सत्यावर भर देतो.

हा असा एकच धर्म आहे की जो आपल्याला केवळ सत्य समजावून देऊन त्याविषयी विश्वास बाळगण्यासाठीच सक्षम करतो असे नाही तर, त्या सत्याची आपल्या अस्तित्वाच्या सर्व अंगांना साक्षात अनुभूती यावी यासाठीदेखील तो आपल्याला सक्षम करतो.

हा असा एकच धर्म आहे की जो जगाला, जग काय आहे हे दाखवून देतो, (म्हणजे) जग ही ‘वासुदेवा’ची लीला आहे हे तो दाखवून देतो. या लीलेचे सूक्ष्मतम कायदे, त्याचे उदात्त नियम काय आहेत हे तो दाखवतो आणि या लीलेमध्ये आपण आपली भूमिका सर्वोत्तमपणे कशी पार पाडू शकतो हेही तो दाखवतो.

हा असा एकमेव धर्म आहे की ज्याने जीवनाच्या अगदी लहानात लहान भागाची देखील धर्माशी फारकत होऊ दिलेली नाही. हा धर्म अमरत्व काय आहे हे जाणतो. या धर्माने आपल्यामधून मृत्युची वास्तविकताच सर्वथा पुसून टाकली आहे.

– श्रीअरविंद [CWSA 08 : 11-12]

भारत – एक दर्शन २९

(अलीपूरच्या कारागृहामध्ये असताना श्रीअरविंद यांना भगवान श्रीकृष्णाने दिलेला संदेश…)

भारताचा उदय व्हावा असे म्हटले जाईल तेव्हा ‘सनातन धर्मा’चा उदय होईल. भारत महान होईल असे जेव्हा म्हटले जाईल तेव्हा तेव्हा हा ‘सनातन धर्म’च महान होईल. भारताचा विस्तार होऊन, त्याची व्याप्ती वाढेल असे जेव्हा म्हटले जाईल तेव्हा त्याचा अर्थ हाच की, या ‘सनातन धर्मा’चा विस्तार होऊन, स्वयमेव त्याची व्याप्ती जगभर वाढेल. धर्माकरताच आणि धर्मामुळेच भारताचे अस्तित्व आहे.

आपण ज्याला ‘सनातन’, शाश्वत धर्म असे संबोधतो तो धर्म म्हणजे आहे तरी काय? तो हिंदुधर्मच आहे. तो धर्म हिंदु आहे याचे कारण हिंदु राष्ट्रामध्ये त्याचे जतन करण्यात आले आहे. समुद्र आणि हिमालय यांनी वेढल्यामुळे अलग झालेल्या या द्विपकल्पातच त्याचा उदय झाला आणि या प्राचीन पुण्यभूमीत त्याचे शतकानुशतके जतन करण्याची जबाबदारी आर्यांकडे देण्यात आली. पण कोणत्याही एका देशापुरताच तो सीमित असावा यासाठी तो मर्यादाबद्ध करण्यात आलेला नाही, तो जगाच्या अमुक एखाद्या नेमक्या ठरावीक भागाच्या मालकीचा नाही व सदा सर्वकाळासाठी तो त्यास बांधला गेलेला नाही. ज्याला आपण हिंदुधर्म म्हणतो तो खरोखर सनातन धर्मच आहे. याचे कारण, तो असा एक विश्वात्मक धर्म आहे की ज्याने इतर सर्वांना कवेत घेतले आहे. एखादा धर्म विश्वात्मक नसेल तर तो शाश्वत असूच शकणार नाही. एखादा धर्म संकुचित असेल, एखाद्या विशिष्ट लोकांचा अगर पंथाचा असेल, तो मर्यादित स्वरूपाचा असेल तर, असा धर्म मर्यादित काळापर्यंतच टिकू शकेल; व ठरावीक हेतू अगर कार्य या पुरताच अस्तित्वात राहू शकेल. (उत्तरार्ध उद्याच्या भागात…)

– श्रीअरविंद [CWSA 08 : 10-11]

भारत – एक दर्शन २८

वास्तविक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक एकता हीच एकमेव चिरस्थायी अशी एकता असते आणि टिकाऊ शरीर व बाह्य संघटन यांपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात चिकाटीयुक्त मन व आत्मचैतन्य यांमुळेच लोकसमूहाचा आत्मा टिकून राहत असतो. …प्राचीन राष्ट्रं, भारताच्या समकालीन असणारी काही राष्ट्रं आणि भारताच्या उदयानंतर उदयास आलेली अनेक राष्ट्रं आज मृतप्राय झालेली आहेत आणि आता त्यांचे केवळ अवशेष शिल्लक राहिलेले आहेत. ग्रीस आणि इजिप्त ही राष्ट्रं आता केवळ नकाशापुरती शिल्लक राहिली आहेत, ती फक्त नावाने शिल्लक उरली आहेत….

रोमने मध्यसमुद्राच्या आसमंतांत राहणाऱ्या लोकांवर राजकीय आणि निव्वळ बाह्य सांस्कृतिक एकता लादली, पण त्याला त्या लोकांमध्ये जितीजागती आध्यात्मिक आणि सांस्कृतिक एकता निर्माण करता आली नाही. म्हणून पौर्वात्य राष्ट्रं पाश्चिमात्य राष्ट्रांपासून अलग झाली. रोमन लोकांचे आफ्रिकेवर काही काळ राज्य होते, त्या कालखंडाच्या कोणत्याही खाणाखुणा आफ्रिकेने शिल्लक ठेवल्या नाहीत, इतकेच नव्हे तर, आजही स्वतःला लॅटिन म्हणवणारी जी पाश्चिमात्य राष्ट्रं आहेत ती रानटी आक्रमकांचा जोरकस प्रतिकार करू शकली नाहीत; परकीय प्राणतत्त्वाचा संयोग होऊन त्यांचा पुनर्जन्म व्हावा लागला, आणि तेव्हा त्यातून आधुनिक काळामध्ये इटली, स्पेन आणि फ्रान्सचा उगम झाला.

परंतु भारत मात्र आजही जीवित आहे आणि प्राचीन भारताच्या आंतरिक मनाचे, आत्म्याचे आणि चैतन्याचे सातत्य त्याने आजही कायम ठेवले आहे.

भारतावर अनेक आक्रमणं झाली, परकीय सत्ता आल्या. ग्रीक, पार्थियन, हूण यांच्या स्वाऱ्या झाल्या; प्रबळ इस्लामांनी आक्रमण करून आपली सत्ता प्रस्थापित केली, भुईसपाट करणाऱ्या एखाद्या गाडीच्या अवजडपणासारख्या असलेल्या ब्रिटिश ताबेदारीने आणि ब्रिटिश यंत्रणेने भारताला व्यापून टाकले. पाश्चिमात्य राष्ट्रांचेही प्रचंड दडपण भारतावर आले, असे असूनसुद्धा भारताच्या शरीरामधून – वैदिक ऋषींनी भारताचा जो आत्मा घडविला होता – त्या प्राचीन आत्म्याला, कोणीही बाहेर हाकून देऊ शकले नाही किंवा चिरडून टाकू शकले नाही.

भारतावर आलेल्या प्रत्येक आपत्तीच्या वेळी, प्रत्येक हल्ल्यामध्ये, परकीय वर्चस्वाच्या वेळी, प्रत्येक पावलागणिक, भारत प्रतिकार करून टिकून राहण्यात सक्षम ठरला; मग तो प्रतिकार सक्रिय असो अथवा अक्रिय असो. भारताचे जेव्हा चांगले वैभवाचे दिवस होते तेव्हा त्याच्या आध्यात्मिक एकतेमुळे आणि आत्मसात करण्याच्या आणि प्रतिसाद देण्याच्या शक्तीमुळे त्याला टिकून राहता आले, त्यावेळी जे काही सामावून घेण्यासारखे नव्हते ते सारे त्याने हद्दपार केले आणि जे हद्दपार करण्यासारखे नव्हते ते सारे त्याने आत्मसात केले. आणि अगदी त्याच्या अवनतीला आरंभ झाल्यानंतरही, भारत त्याच शक्तीमुळे टिकून राहिला, त्याचे हे सामर्थ्य अवनतीच्या काळात काहीसे कमी झाले परंतु ते नाहीसे करण्यासारखे नव्हते. भारताने तेव्हा माघार घेतली परंतु काही काळासाठी का होईना, पण दक्षिणेमध्ये स्वतःची प्राचीन राजकीय प्रणाली त्याने टिकवून ठेवली. इस्लामचे दडपण आले तेव्हा ते झुगारून देण्यासाठी आणि भारताचा प्राचीन आत्मा आणि त्याची संकल्पना यांचे रक्षण करण्यासाठी राजपूत, शीख आणि मराठा पुढे आले. जिथे सक्रिय प्रतिकार करणे शक्य नव्हते तेथे भारत, अक्रिय विरोध करत राहिला; भारताचे कोडे ज्याला उकलता आले नाही, किंवा भारताशी ज्याला मिळतेजुळते घेता आले नाही अशा प्रत्येक साम्राज्याच्या ह्रासाचा निषेध करत, भारत, नेहमीच आपल्या पुनरुज्जीवनाच्या दिवसाची वाट पाहत राहिला, (पण या सगळ्यामधूनही) तो टिकून राहू शकला. आजही आमच्या डोळ्यांसमोर हीच प्रक्रिया, अशीच घटना घडताना दिसत आहे.

जी सभ्यता (civilisation) हा चमत्कार सिद्धीस नेत आहे त्या सभ्यतेच्या, सर्वोत्तम प्राणशक्तीचे वर्णन कोणत्या शब्दांत करावे? आणि कोणत्याही बाह्य गोष्टींवर नव्हे तर, आत्मचैतन्यावर आणि आंतरिक मनाच्या आधारावर या सभ्यतेचा पाया रचण्याचे आणि आध्यात्मिक व सांस्कृतिक एकतेला, भारतीय जीवनवृक्षाचे केवळ क्षणभंगुर फूल न बनविता, त्याचे मूळ आणि खोड बनविणाऱ्या, नश्वर डोलाऱ्याचे रूप नव्हे तर, शाश्वत आधार बनविणाऱ्या प्रज्ञेचे कौतुक कसे वर्णावे?

– श्रीअरविंद [CWSA 20 : 430-431]

भारत – एक दर्शन २७

‘धर्माची भारतीय संकल्पना’ ही महाभारताची मुख्य प्रेरणा आहे. अंधकार, भेद व मिथ्यत्व यांच्या शक्ती आणि सत्य, प्रकाश, ऐक्य यांच्या देवदेवता यांच्यामधील संघर्षाची जी ‘वैदिक’ संकल्पना आहे ती संकल्पना येथे आध्यात्मिक, धार्मिक आणि आंतरिक स्तरावरून, बाह्यवर्ती पातळीवर – बौद्धिक, नैतिक आणि प्राणिक पातळीवर आणण्यात आलेली आहे.

येथे कथानकाने एकाच वेळी वैयक्तिक आणि राजकीय संघर्षाचे दुहेरी रूप धारण केलेले आहे. वैयक्तिक पातळीवरील संघर्षाचा विचार करता, येथे एकीकडे भारतीय धर्माचे महत्तर नैतिक आदर्श ज्यांच्यामध्ये मूर्त झालेले आहेत अशी प्रातिनिधिक आणि नमुनेदार व्यक्तिमत्त्वं आहेत आणि दुसऱ्या बाजूला आसुरी अहंकार, स्वार्थमूलक इच्छा आणि धर्माचा दुरूपयोग यांची जणू प्रकट रूपंच असावीत अशी व्यक्तिमत्त्वं आहेत. या वैयक्तिक संघर्षाची परिणती राजकीय युद्धामध्ये होते. धर्माच्या आणि न्यायाच्या नव्या राजवटीच्या प्रस्थापनेने या आंतरराष्ट्रीय महा-संघर्षाची परिसमाप्ती होते, झगडा करणाऱ्या दोन वंशांना संघटित करणाऱ्या धर्मराज्यामध्ये, किंबहुना धर्मसाम्राज्यामध्ये त्याची परिसमाप्ती होते. राजेरजवाडे आणि अमीरउमरावांच्या महत्त्वाकांक्षी उद्दामपणाच्या जागी, न्यायी आणि मानवतावादी साम्राज्याचे प्रभुत्व, स्थिरता आणि शांती यांची प्रस्थापना होते. ‘देव’ आणि ‘असुर’ यांचा जुनाच संघर्ष येथे चित्रित करण्यात आलेला आलेला आहे पण येथे तो मानवी जीवनाच्या परिभाषेमध्ये मांडण्यात आलेला आहे.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 347-348]

भारत – एक दर्शन २६

महाभारत ही काही केवळ भरतवंशाची कहाणी नाही, किंवा केवळ एका पुरातन घटनेवर आधारलेले आणि पुढे जाऊन राष्ट्रीय परंपरा बनलेले असे महाकाव्य नाही. तर ते विशाल पट असलेले, भारतीय आत्म्याचे, धार्मिक व नैतिक मनाचे आणि सामाजिक व राजकीय आदर्शांचे आणि भारतीय जीवनाचे व संस्कृतीचे महाकाव्य आहे. ‘भारतामध्ये जे जे काही आहे ते ते महाभारतामध्ये आहे’, अशी एक म्हण आहे, आणि त्यामध्ये काही प्रमाणात तथ्यही आहे. महाभारत ही काही कोणा एका व्यक्तीच्या मनाची अभिव्यक्ती किंवा निर्मिती नाही तर, ती राष्ट्राच्या मनाची निर्मिती आहे; महाभारत ही भारताचे स्वतःचे असे एक काव्य आहे की जे सर्व (भारतीय) लोकांनी मिळून लिहिलेले आहे. वास्तविक एखाद्या कमी विस्तृत आणि अधिक मर्यादित हेतुनेच ज्याची निर्मिती करण्यात आलेली असते अशा महाकाव्याला लागू पडणारे काव्यात्मक कलेचे सिद्धान्त महाभारताला लागू करणे सर्वथा व्यर्थ होईल, पण तरीदेखील त्यामध्ये एकूणच रचनेबाबत आणि तपशीलांबाबत मोठ्या प्रमाणात आणि बऱ्यापैकी जाणिवपूर्वकतेने कलेचा वापर केलेला आढळतो.

एखाद्या विशाल अशा राष्ट्रीय मंदिराप्रमाणे महाभारत या महाकाव्याची रचना करण्यात आलेली आहे. या मंदिराच्या एका दालनामधून दुसऱ्या दालनामध्ये जाताना क्रमाक्रमाने त्याची भव्य आणि संकीर्ण कल्पना उलगडत जाते. या मंदिरामध्ये अर्थपूर्ण समूह, मूर्ती आणि शिलालेख यांनी जागोजागी गर्दी केलेली आढळते, या मंदिरातील समूहामधील मूर्ती कोठे दिव्य तर कोठे अर्ध-दिव्य प्रमाणात कोरण्यात आलेल्या आहेत. विकसित झालेली आणि अतिमानवतेप्रत अर्ध-उन्नत झालेली आणि असे असूनसुद्धा जिच्या प्रेरणा, जिच्या कल्पना, जिच्या भावना या अजूनही मानवाशी निष्ठा राखणाऱ्या आहेत, अशी मानवता येथे चितारण्यात आलेली आहे. येथे वास्तवाच्या सुराला आदर्शाच्या स्वरांद्वारे सातत्याने उंचविण्यात आले आहे. येथे इहलोकातील जीवनाचे भरपूर चित्रण करण्यात आलेले आहे तरीही येथील जग, त्याच्या पाठीमागे असणाऱ्या जगतांच्या शक्तींच्या उपस्थितीच्या आणि त्यांच्या सचेत प्रभावाच्या अधीन आहे. आणि काव्यात्मक कथेच्या रुंद पायऱ्यांवरून एक सलग अशी कल्पनेची भलीमोठी लांबलंचक मिरवणूकच जणू येथे समग्रपणे एकीकृत झालेली आहे.

महाकाव्यामध्ये आवश्यक असतो त्याप्रमाणे कथानकाचा प्रवाह हा या महाकाव्याच्या मुख्य स्वारस्याचा विषय आहे आणि ते कथानक संपूर्ण महाकाव्यामध्ये अशा रीतीने पुढे जाते की त्याची गतिमानता एकाच वेळी व्यापक आहे आणि सूक्ष्मही आहे; हे कथानक स्थूलमानाने पाहता व्यापक आणि धाडसी, निडर आहे. तपशीलांच्या बाबतीत ते लक्षवेधी आणि परिणामकारक आहे; ते नेहमीच साधे, जोरकस आणि शैली व गतीचा विचार करता महाकाव्याला साजेसे आहे. तसेच, महाभारत हे विषयद्रव्याबाबत अतिशय स्वारस्यपूर्ण असले, काव्यात्मक कथा सांगण्याची त्याची रीत अतिशय परिणामकारक असली तरीसुद्धा त्यामध्ये आणखीही अधिक असे काही आहे – त्यामध्ये एक अर्थपूर्ण अशी गोष्ट आहे, इतिहास आहे, भारतीय जीवन आणि संस्कृती यासंबंधीच्या मध्यवर्ती कल्पना आणि आदर्श हे संपूर्ण महाभारतात जागोजागी प्रातिनिधिक स्वरूपात आलेले आहेत. (उत्तरार्ध उद्याच्या भागात…)

– श्रीअरविंद [CWSA 20 : 347]

भारत – एक दर्शन २५

आपल्या जीवनाच्या पाठीमागे असणाऱ्या प्रचंड शक्तींविषयीचे भान रामायणाचा कवी आपल्या मनात जागे करतो आणि एका भव्य महाकाव्यात्मक पार्श्वभूमीवर तो त्याची काव्यकृती घडवितो, त्यामध्ये एक विशाल साम्राज्यनगरी आहे, पर्वतराजी आहेत, समुद्र आहेत, जंगले आहेत आणि माळरानं आहेत. या साऱ्या गोष्टी रामायणामध्ये इतक्या विशालरूपात चित्रित करण्यात आल्या आहेत की, त्यामुळे आख्खे जगच या काव्याची पार्श्वभूमी झाले आहे आणि काही महान व राक्षसी देहाकृतीमध्ये मूर्त झालेल्या, मानवाच्या दैवी आणि आसुरी अशा क्षमता याच जणू काही या काव्याचा विषय आहेत, असे आपल्याला वाटू लागते.

भारतीय नीतिप्रवण मन आणि सौंदर्यप्रिय मन यांनी एकमेकांना सुसंवादी एकात्मतेमध्ये मिसळून टाकले आहे आणि ते एका अनुपम अशा विशुद्ध व्यापकतेपर्यंत आणि आत्माभिव्यक्तीच्या सौंदर्यापर्यंत पोहोचलेले आहे. रामायणाने भारतीय कल्पनाशक्तीपुढे मानवी चारित्र्याचे उच्चतम व सुकुमार असे आदर्श मूर्तिमंत केले आहेत; रामायणाने सामर्थ्य आणि धैर्य, सौम्यता आणि शुद्धता, निष्ठा आणि आत्मत्याग यांना मनोरम आणि सर्वाधिक सुसंवादी रूप देऊन सुपरिचित केले, भावना आणि सौंदर्यवादी दृष्टी आकर्षित व्हावी असा रंग त्यांना दिला.

रामायणाने एकीकडे नीतिनियमांचे तिरस्करणीय कठोर तपस्याचरण काढून टाकले आहे तर दुसरीकडे त्यातील निव्वळ सर्वसामान्यपणाही काढून टाकला आहे आणि जीवनातील अगदी सर्वसामान्य गोष्टींना, वैवाहिक भावनांना, मातृप्रेमाला किंवा पिता-पुत्राच्या प्रेमभावनेला, बंधुप्रेमाला, राजपुत्राच्या आणि नेत्याच्या कर्तव्यभावनेला, अनुयायांच्या आणि प्रजाजनांच्या निष्ठेला, थोरांच्या थोरवीला, सामान्यांच्या सत्यप्रेमाला आणि त्यांच्या पात्रतेला, एक विशिष्ट प्रकारचे उच्च दिव्यत्व प्रदान केले आहे; आदर्श रंगांच्या तजेल्याने, नैतिक गोष्टींना अधिकच्या आंतरात्मिक अर्थाच्या छटेद्वारे सौंदर्य प्रदान केले आहे.

वाल्मिकींचे रामायण हे भारताच्या सांस्कृतिक मनाची जडणघडण करण्याच्या कामात एक अगदी अतुलनीय शक्तीचे साधन बनले आहे. रामायणाने या (भारतीय) मनाला राम आणि सीतेच्या रूपाने प्रिय आणि अनुकरणीय अशा व्यक्ती दिल्या आहेत; इतक्या दिव्यत्वाने आणि सत्यत्वाच्या प्रकटीकरणाद्वारे त्यांचे चित्रण अशा प्रकारे करण्यात आले आहे, की राम-सीता हे कायमस्वरुपीच भक्तीचा आणि पूजेचा विषय बनले आहेत. किंवा हनुमान, लक्ष्मण, भरत यांच्या नैतिक आदर्शांनाच जणू जिवंत मानवी रूप देण्यात आले आहे.

भारताच्या राष्ट्रीय चारित्र्यामध्ये जे जे काही सर्वोत्तम आणि मधुरतम आहे त्यातील बहुतांशी गोष्टींची घडण रामायणाने केली आहे, आणि रामायणाने सूक्ष्मतर आणि उत्कृष्ट पण दृढ अशा आत्मिक स्वरांना आणि अधिक सुकुमार मानवी स्वभावाला जागे करून, त्यांना राष्ट्रीय चारित्र्यामध्ये दृढमूल केले आहे, आणि या गोष्टी सद्गुण व आचरणाच्या कोणत्याही बाह्य औपचारिक गोष्टींपेक्षा अधिक मौल्यवान आहेत.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 350-351]

भारत – एक दर्शन २४

महाभारताप्रमाणेच रामायणाच्या कवीनेसुद्धा त्याचा काव्यविषय म्हणून एक इतिहास, प्राचीन भारतीय वंशाशी संबंधित अशी एक प्राचीन कथा किंवा आख्यान हाती घेतले होते आणि त्याने त्यामध्ये आख्यायिकांमधील आणि लोकसाहित्यामधील तपशिलांची भर घातली. एवढेच नव्हे तर, त्यांचे जे उदात्त प्रयोजन होते, जो उदात्त अर्थ होता तो अर्थ त्या काव्याला स्वतःमध्ये अधिक सुयोग्यरीतीने धारण करता यावा यासाठी त्या कवीने त्यांना महाकाव्याच्या एका भव्योदात्त स्तरावर नेले. पार्थिव जीवनामध्ये आसुरी शक्तींबरोबर ईश्वरी शक्तीचा जो लढा चालू असतो तो लढा हाच महाभारताप्रमाणेच रामायणाचाही विषय आहे, परंतु रामायणामध्ये तो महाभारतापेक्षा अधिक शुद्ध आदर्शवादी रूपामध्ये मांडला आहे, तसेच त्याला अलौकिक परिणाम देण्यात आले आहेत आणि येथे मानवी व्यक्तिमत्त्वांमधील चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी काल्पनिकरित्या अधिक फुलवून सांगण्यात आलेल्या आहेत. एका बाजूला त्यामध्ये आदर्श मानवतेचे चित्रण आहे, सद्गुणांचे, नीतिमान व्यवस्थेचे दिव्य सौंदर्य दर्शविले आहे, धर्मावर आधारित सभ्यतेचे (civilization) दर्शन येथे घडविले आहे आणि या सभ्यतेमध्ये उदात्त नैतिक आदर्श दाखविले आहेत. त्यातील सौंदर्यपूर्ण सुडौलता, सुसंवाद आणि माधुर्य यांचे अनन्य आकर्षण वाटावे इतक्या प्रभावीपणे त्यांचे सादरीकरण करण्यात आले आहे; तर दुसऱ्या बाजूला अमानुष अहंकार, स्वार्थमूलक इच्छा आणि उन्मादपूर्ण हिंसा यांच्या रानटी, अराजकतापूर्ण आणि जवळजवळ आकारहीन शक्तींचे सादरीकरण करण्यात आले आहे. मानसिक प्रकृतीच्या या दोन संकल्पना आणि शक्ती येथे जिवंत आणि मूर्तरूप धारण करतात आणि त्यांच्यात संघर्ष होतो, आणि राक्षस आणि दिव्य मानव यांच्या निर्णायक संघर्षामध्ये, राक्षसावर दिव्य मानवाचा विजय होण्यामध्ये त्याची परिणती होते.

संकल्पनेची एकेरी विशुद्धता ज्यामुळे कमी होईल, पात्रांच्या रूपरेषांमधील प्रातिनिधिक शक्ती, आणि पात्रांच्या स्वभाववैशिष्ट्यांची अर्थवत्ता ज्यामुळे क्षीण होईल अशा सर्व छटा आणि अशी सर्व जटिलता रामायणामधून वगळण्यात आलेली आहे, आणि त्याचे आवाहन आणि त्यांचे महत्त्व मानवी हृदयापर्यंत जाऊन पोहोचेल इतपतच त्या गोष्टींना येथे स्थान देण्यात आले आहे. (क्रमश: …)

– श्रीअरविंद [CWSA 20 : 349-350]