Tag Archive for: पूर्णयोग

 

आमच्या पूर्णयोगामध्ये आरोहण आणि अवरोहण अशी दुहेरी प्रक्रिया असते. यामध्ये व्यक्ती चेतनेच्या उच्च व उच्चतर स्तरांवर आरोहण करते आणि त्याच वेळी ती व्यक्ती त्या उच्चतर स्तरांवरील शक्ती मन व प्राणामध्ये उतरवते. एवढेच नव्हे तर, सरतेशेवटी त्या व्यक्तीकडून ती शक्ती अगदी शरीरापर्यंत खाली उतरवली जाते. अतिमानस (supermind) हा या स्तरांमधील सर्वोच्च स्तर आहे आणि (अतिमानस अवतरित करणे हे) पूर्णयोगाचे ध्येय आहे. जेव्हा अतिमानस अवतरित करणे शक्य येईल तेव्हाच पृथ्वी-चेतनेचे दिव्य रूपांतरण (transformation) शक्य होईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 376)

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

तुमच्या अंतरंगामधून ज्या कल्पना आणि जाणिवांचा उदय होत असल्याचे तुम्ही लिहिले आहे, ती अतिशय चांगली गोष्ट आहे. त्या कल्पना आणि जाणिवा नवजात आंतरात्मिक स्वरूपाच्या आहेत. विचार नाहीसे होत असल्याची आणि तुमच्या आतमध्ये काहीतरी ऊर्ध्वमुख होत, डोक्यामधून बाहेर पडून, वर जात असल्याची तुम्हाला जी जाणीव होत होती, ती जाणीव आपल्या साधन-प्रक्रियेचा एक भाग आहे.

तुमच्या वर म्हणजे तुमच्या शरीरात नव्हे, तर तुमच्या मस्तकाच्या वर उच्चतर चेतना असते, तिला आम्ही ‘उच्चतर, आध्यात्मिक किंवा दिव्य चेतना’ असे संबोधतो किंवा तिला ‘श्रीमाताजींची चेतना’ असे आम्ही संबोधतो. जेव्हा तुमचे अस्तित्व खुले होते तेव्हा, तुमच्यामधील सर्व घटक म्हणजे तुमचे मन (मस्तक), तुमचे भावनिक अस्तित्व (हृदय), प्राण, एवढेच नव्हे तर, तुमच्या शारीर-चेतनेमधील काही गोष्टी त्या महत्तर, उच्चतर चेतनेशी जोडल्या जाण्यासाठी म्हणून आरोहण (ascend) करू लागतात. आणि तुम्ही लिहिले आहे त्याप्रमाणे, व्यक्ती डोळे मिटून ध्यानस्थ बसली की मग तिला या आरोहणाचे संवेदन होते. याला ‘कनिष्ठ चेतनेचे आरोहण’ असे म्हटले जाते.

कालांतराने मग वरून शांती, हर्ष, प्रकाश, सामर्थ्य, ज्ञान इत्यादी गोष्टींचे अवतरण (descend) व्हायला लागते आणि मग व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये मोठे परिवर्तन घडायला लागते. यालाच आम्ही ‘उच्चतर चेतनेचे अवतरण किंवा ‘श्रीमाताजींच्या चेतनेचे अवतरण ’ असे संबोधतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 384-385)

 

निम्नतर चेतना ही, उच्चतर चेतनेशी जोडली जाण्यासाठी तिच्या दिशेने आरोहण (ascend) करते आणि उच्चतर चेतना निम्नतर चेतनेचे रूपांतरण करण्यासाठी अवरोहण (descend) करते; हा पूर्णयोगाच्या साधनेतील चेतनेचा एक नियम आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 417)

 

ईश्वरी प्रभावासमोर स्वत:ला खुले, उन्मुख करणे हा पूर्णयोगाचा समग्र सिद्धान्त आहे. ईश्वरी प्रभाव तुमच्या ऊर्ध्वस्थित असतो आणि एकदा का तुम्ही त्याबाबत सचेत (conscious) होऊ शकलात तर मग, त्याने तुमच्यामध्ये प्रवेश करावा म्हणून तुम्ही केवळ त्याला आवाहन करायचे असते. तो प्रभाव तुमच्या मनामध्ये व शरीरामध्ये शांतीच्या, प्रकाशाच्या आणि कार्य करणाऱ्या शक्तीच्या रूपाने अवतरतो; तो आनंदरूपाने अवतरतो; ईश्वरी उपस्थिती म्हणून, साकार किंवा निराकार रूपात तो अवतरतो. त्याविषयी सचेत होईपर्यंत व्यक्तीने त्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे; तसेच तिने खुलेपणासाठी, उन्मुखतेसाठी (opening) आस बाळगणे देखील आवश्यक आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 106)

बालकाची वाढ स्वाभाविकपणे होत राहते; ते स्वतःच्या वाढीची काळजी करत बसत नाही.
*
बालकाच्या साध्यासुध्या विश्वासामध्ये महान शक्ती सामावलेली असते.
*
विश्वास, बालकसदृश विश्वास असणे ही पूर्णयोगामध्ये सर्वात महत्त्वाची अट आहे. बालकाच्या ठिकाणी अशी एक साधीसरळ भावना असते की, जे जे काही आवश्यक आहे, गरजेचे आहे ते त्याला मिळेलच. त्याबाबतीत त्याच्या मनात कोणतीही शंका नसते. एखाद्या बालकाला जेव्हा एखाद्या गोष्टीची गरज असते तेव्हा त्याला ही खात्री असते की, ती गोष्ट त्याला नक्की मिळेल. अशा प्रकारचा, बालकसदृश साधासरळ विश्वास किंवा भरवसा ही पूर्णयोगामधील सर्वात महत्त्वाची अट आहे.
*
एखादे बालक जेव्हा स्वाभाविक (normal) स्थितीमध्ये जीवन जगत असते तेव्हा त्याच्या सर्व गरजा पुरविल्या जातील असा त्याला एक दृढ विश्वास असतो. हा विश्वास आयुष्यभर तसाच अविचल टिकून राहिला पाहिजे. बालकाची त्याच्या स्वतःच्या गरजांविषयीची जी कल्पना असते ती मर्यादित, अजाणतेपणाची आणि अगदी वरवरची असते; ती कल्पना हळूहळू अधिक विशाल, अधिक सखोल आणि अधिक खऱ्या संकल्पनेने युक्त झाली पाहिजे. तसे झाले म्हणजे त्याच्या कल्पनेची परिणती एका परिपूर्ण संकल्पनेमध्ये होते. परमप्रज्ञेची (supreme wisdom) गरजेविषयी असणारी संकल्पना म्हणजे परिपूर्ण संकल्पना. आपल्या खऱ्या गरजा या केवळ ईश्वरालाच माहीत असतात, हे आपल्या लक्षात येईपर्यंत आणि प्रत्येक गोष्टीसाठी ईश्वरावरच विसंबून राहायचे ही अवस्था येईपर्यंत ही परिणती होत राहिली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 124-125)

 

(मला पूर्णयोगाची साधना करायची आहे त्यासाठी मला संन्यास घ्यावा लागेल का, असा प्रश्न एका व्यक्तीने श्रीअरविंद यांना विचारला असावा असे दिसते. त्यावर श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

व्यक्तीने संन्यासी असण्याची आवश्यकता नाही. स्वतःच्या पृष्ठवर्ती चेतनेमध्ये राहण्याऐवजी व्यक्ती जर अंतरंगामध्ये, तिच्या आंतरिक अस्तित्वामध्ये राहायला शिकू शकली आणि पृष्ठवर्ती मनामुळे व प्राणशक्तीमुळे झाकल्या गेलेल्या आत्म्याचा किंवा स्वतःच्या खऱ्या व्यक्तित्वाचा शोध घेऊ शकली आणि स्वत:चे अस्तित्व अतिचेतन वास्तविकतेप्रत (superconscient Reality) जर ती खुले करू शकली तर तेवढे पुरेसे असते. पण व्यक्ती पूर्णपणे प्रामाणिक असल्याखेरीज आणि तिचे प्रयत्न एकाच ध्येयासाठी एकदिश झालेले असल्याखेरीज तिला उपरोक्त गोष्टीमध्ये यश मिळू शकणार नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 380)

 

प्रामाणिकपणा, सचोटी, निःस्वार्थीपणा, कार्याप्रति निरपेक्ष समर्पण, उदात्त चारित्र्य आणि सरळमार्गीपणा हा आपल्या पूर्णयोगाचा अपरिहार्य पाया आहे. हे प्राथमिक गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न जे लोक करत नाहीत ते श्रीअरविंदांचे शिष्य असूच शकत नाही.

– श्रीमाताजी (CWM 13 : 123)

 

तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर समस्या शिल्लक राहात नाही. फक्त प्रश्न असतो तो प्रामाणिक असण्याचा. तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर योगसाधनेची सुरुवातच करू नका. मानवी व्यवहारांमध्ये फसवणूक होऊ शकते, पण ईश्वराबरोबरच्या संबंधांमध्ये फसवणुकीची अजिबातच शक्यता नसते. तुम्ही जर विनम्र असाल, अंतरंगातून खुले असाल आणि तुमचे एकमेव उद्दिष्ट ईश्वराचा साक्षात्कार व त्याची प्राप्ती हेच असेल आणि तोच आपला ‘चालविता धनी’ व्हावा हे तुमचे उद्दिष्ट असेल तर तुम्ही (पूर्णयोगाच्या) या मार्गावरून सुरक्षितपणे वाटचाल करू शकाल.

– श्रीमाताजी (CWM 03 : 05)

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

स्वत:चीच फसवणूक करणारा प्राणिक अहंकार, मानसिक उद्धटपणा, अहंगंड, पांडित्य-प्रदर्शन, शारीरिक अस्तित्वामध्ये असणारी तमोमय जडता या गोष्टींपासून सुटका करून घेण्यासाठी अस्तित्वाच्या सर्व अंगांमध्ये संपूर्ण केंद्रवर्ती प्रामाणिकपणा (central sincerity) असणे ही एकच आवश्यक अट असते. ‘संपूर्ण केंद्रवर्ती प्रामाणिकपणा’चा अर्थ दुसऱ्या शब्दांत सांगायचा झाला तर, केवळ परमसत्या‌चा निरपवाद आग्रह धरणे आणि त्याव्यतिरिक्त आता दुसरे काहीही नको असे वाटणे, असा होतो.

अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर, व्यक्तीमध्ये समजा कधी मिथ्यत्वाचा शिरकाव झालाच तर, लगेचच तिला एकप्रकारची अस्वस्थता जाणवेल आणि अशा वेळी त्या मिथ्यत्वाचे कोणतेही समर्थन न करता, स्वतःचे कठोर मूल्यमापन (self-criticism) करण्याची व्यक्तीची तयारी झालेली असेल. तिच्यामध्ये प्रकाशाप्रत सजग खुलेपणा येईल आणि सरतेशेवटी ही तयारी संपूर्ण अस्तित्वाचेच शुद्धिकरण घडवून आणेल.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 379)

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

आध्यात्मिक अनुभव यावेत म्हणून तुम्ही प्रयत्न करू नका. त्यासाठी तुमची अजून तयारी झालेली नाही. आणि त्यामुळे योग्य अनुभव येण्याऐवजी अन्य काहीतरी भलतेच अनुभवास येईल. तुम्ही तुमचा प्राण शुद्ध आणि शांत केला पाहिजे म्हणजे मग या अशा प्रकारच्या गतिप्रवृत्ती तुमच्यामध्ये निर्माण होणार नाहीत. झोपायचे नाही, जेवायचेच नाही असले काहीतरी जगावेगळे करण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा प्राण काहीतरी असामान्य गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे. असे केल्यामुळे साधना वेगाने घडेल अशी त्याची कल्पना आहे. आणि तो काहीतरी उच्च दर्जाचे करत आहे असेही तुमच्या प्राणाला वाटत आहे. (तुम्ही असे वागता कामा नये कारण) पूर्णयोगासाठी विशुद्ध, साधासरळ, शांत आणि समतोल प्राण आवश्यक असतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 34)