Tag Archive for: पूर्णयोग

बालकाची वाढ स्वाभाविकपणे होत राहते; ते स्वतःच्या वाढीची काळजी करत बसत नाही.
*
बालकाच्या साध्यासुध्या विश्वासामध्ये महान शक्ती सामावलेली असते.
*
विश्वास, बालकसदृश विश्वास असणे ही पूर्णयोगामध्ये सर्वात महत्त्वाची अट आहे. बालकाच्या ठिकाणी अशी एक साधीसरळ भावना असते की, जे जे काही आवश्यक आहे, गरजेचे आहे ते त्याला मिळेलच. त्याबाबतीत त्याच्या मनात कोणतीही शंका नसते. एखाद्या बालकाला जेव्हा एखाद्या गोष्टीची गरज असते तेव्हा त्याला ही खात्री असते की, ती गोष्ट त्याला नक्की मिळेल. अशा प्रकारचा, बालकसदृश साधासरळ विश्वास किंवा भरवसा ही पूर्णयोगामधील सर्वात महत्त्वाची अट आहे.
*
एखादे बालक जेव्हा स्वाभाविक (normal) स्थितीमध्ये जीवन जगत असते तेव्हा त्याच्या सर्व गरजा पुरविल्या जातील असा त्याला एक दृढ विश्वास असतो. हा विश्वास आयुष्यभर तसाच अविचल टिकून राहिला पाहिजे. बालकाची त्याच्या स्वतःच्या गरजांविषयीची जी कल्पना असते ती मर्यादित, अजाणतेपणाची आणि अगदी वरवरची असते; ती कल्पना हळूहळू अधिक विशाल, अधिक सखोल आणि अधिक खऱ्या संकल्पनेने युक्त झाली पाहिजे. तसे झाले म्हणजे त्याच्या कल्पनेची परिणती एका परिपूर्ण संकल्पनेमध्ये होते. परमप्रज्ञेची (supreme wisdom) गरजेविषयी असणारी संकल्पना म्हणजे परिपूर्ण संकल्पना. आपल्या खऱ्या गरजा या केवळ ईश्वरालाच माहीत असतात, हे आपल्या लक्षात येईपर्यंत आणि प्रत्येक गोष्टीसाठी ईश्वरावरच विसंबून राहायचे ही अवस्था येईपर्यंत ही परिणती होत राहिली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 124-125)

 

(मला पूर्णयोगाची साधना करायची आहे त्यासाठी मला संन्यास घ्यावा लागेल का, असा प्रश्न एका व्यक्तीने श्रीअरविंद यांना विचारला असावा असे दिसते. त्यावर श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

व्यक्तीने संन्यासी असण्याची आवश्यकता नाही. स्वतःच्या पृष्ठवर्ती चेतनेमध्ये राहण्याऐवजी व्यक्ती जर अंतरंगामध्ये, तिच्या आंतरिक अस्तित्वामध्ये राहायला शिकू शकली आणि पृष्ठवर्ती मनामुळे व प्राणशक्तीमुळे झाकल्या गेलेल्या आत्म्याचा किंवा स्वतःच्या खऱ्या व्यक्तित्वाचा शोध घेऊ शकली आणि स्वत:चे अस्तित्व अतिचेतन वास्तविकतेप्रत (superconscient Reality) जर ती खुले करू शकली तर तेवढे पुरेसे असते. पण व्यक्ती पूर्णपणे प्रामाणिक असल्याखेरीज आणि तिचे प्रयत्न एकाच ध्येयासाठी एकदिश झालेले असल्याखेरीज तिला उपरोक्त गोष्टीमध्ये यश मिळू शकणार नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 380)

 

प्रामाणिकपणा, सचोटी, निःस्वार्थीपणा, कार्याप्रति निरपेक्ष समर्पण, उदात्त चारित्र्य आणि सरळमार्गीपणा हा आपल्या पूर्णयोगाचा अपरिहार्य पाया आहे. हे प्राथमिक गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न जे लोक करत नाहीत ते श्रीअरविंदांचे शिष्य असूच शकत नाही.

– श्रीमाताजी (CWM 13 : 123)

 

तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर समस्या शिल्लक राहात नाही. फक्त प्रश्न असतो तो प्रामाणिक असण्याचा. तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर योगसाधनेची सुरुवातच करू नका. मानवी व्यवहारांमध्ये फसवणूक होऊ शकते, पण ईश्वराबरोबरच्या संबंधांमध्ये फसवणुकीची अजिबातच शक्यता नसते. तुम्ही जर विनम्र असाल, अंतरंगातून खुले असाल आणि तुमचे एकमेव उद्दिष्ट ईश्वराचा साक्षात्कार व त्याची प्राप्ती हेच असेल आणि तोच आपला ‘चालविता धनी’ व्हावा हे तुमचे उद्दिष्ट असेल तर तुम्ही (पूर्णयोगाच्या) या मार्गावरून सुरक्षितपणे वाटचाल करू शकाल.

– श्रीमाताजी (CWM 03 : 05)

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

स्वत:चीच फसवणूक करणारा प्राणिक अहंकार, मानसिक उद्धटपणा, अहंगंड, पांडित्य-प्रदर्शन, शारीरिक अस्तित्वामध्ये असणारी तमोमय जडता या गोष्टींपासून सुटका करून घेण्यासाठी अस्तित्वाच्या सर्व अंगांमध्ये संपूर्ण केंद्रवर्ती प्रामाणिकपणा (central sincerity) असणे ही एकच आवश्यक अट असते. ‘संपूर्ण केंद्रवर्ती प्रामाणिकपणा’चा अर्थ दुसऱ्या शब्दांत सांगायचा झाला तर, केवळ परमसत्या‌चा निरपवाद आग्रह धरणे आणि त्याव्यतिरिक्त आता दुसरे काहीही नको असे वाटणे, असा होतो.

अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर, व्यक्तीमध्ये समजा कधी मिथ्यत्वाचा शिरकाव झालाच तर, लगेचच तिला एकप्रकारची अस्वस्थता जाणवेल आणि अशा वेळी त्या मिथ्यत्वाचे कोणतेही समर्थन न करता, स्वतःचे कठोर मूल्यमापन (self-criticism) करण्याची व्यक्तीची तयारी झालेली असेल. तिच्यामध्ये प्रकाशाप्रत सजग खुलेपणा येईल आणि सरतेशेवटी ही तयारी संपूर्ण अस्तित्वाचेच शुद्धिकरण घडवून आणेल.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 379)

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

आध्यात्मिक अनुभव यावेत म्हणून तुम्ही प्रयत्न करू नका. त्यासाठी तुमची अजून तयारी झालेली नाही. आणि त्यामुळे योग्य अनुभव येण्याऐवजी अन्य काहीतरी भलतेच अनुभवास येईल. तुम्ही तुमचा प्राण शुद्ध आणि शांत केला पाहिजे म्हणजे मग या अशा प्रकारच्या गतिप्रवृत्ती तुमच्यामध्ये निर्माण होणार नाहीत. झोपायचे नाही, जेवायचेच नाही असले काहीतरी जगावेगळे करण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा प्राण काहीतरी असामान्य गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे. असे केल्यामुळे साधना वेगाने घडेल अशी त्याची कल्पना आहे. आणि तो काहीतरी उच्च दर्जाचे करत आहे असेही तुमच्या प्राणाला वाटत आहे. (तुम्ही असे वागता कामा नये कारण) पूर्णयोगासाठी विशुद्ध, साधासरळ, शांत आणि समतोल प्राण आवश्यक असतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 34)

आंतरिक आध्यात्मिक प्रगती ही बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते, तर बाह्य परिस्थितीला आपण अंतरंगातून कशी प्रतिक्रिया देतो यावर ती अवलंबून असते. आध्यात्मिक अनुभवाचा तो नेहमीच अंतिम निष्कर्ष राहिलेला आहे. आणि म्हणूनच योग्य दृष्टिकोन बाळगण्यावर आणि त्यात सातत्य राखण्यावर आम्ही इतका भर देत असतो; बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसणाऱ्या आंतरिक स्थितीवर म्हणजे समतेच्या आणि स्थिरतेच्या स्थितीवर आम्ही भर देत असतो. आंतरिक आनंदाची स्थिती एकाएकी येऊ शकणार नाही पण, जीवनातील धक्के व आघात यांच्या नेहमीच अधीन असणाऱ्या पृष्ठवर्ती मनामध्ये राहण्यापेक्षा, अंतरंगात अधिकाधिक प्रवेश करून, तेथून जीवनाकडे पाहण्यावर आमचा भर असतो. या आंतरिक स्थितीमुळेच व्यक्ती जीवन आणि त्याच्या अस्वस्थकारी शक्तींपेक्षा अधिक शक्तिशाली बनू शकते आणि विजय प्राप्त करण्याची थोडीफार तरी आशा बाळगू शकते.

अंतरंगामध्ये अविचल (quiet) राहणे, अडीअडचणी किंवा चढउतार यांमुळे अस्वस्थ किंवा नाउमेद होण्यास नकार देऊन, त्यामधून सहीसलामत पार होण्याचा दृढ संकल्प बाळगणे, या योगमार्गावरील शिकण्यायोग्य गोष्टींपैकी काही प्रारंभिक गोष्टी आहेत.

या व्यतिरिक्त अन्य काही करणे म्हणजे चेतनेच्या अस्थिरतेस प्रोत्साहन देण्यासारखे आहे, परंतु तुम्ही अंतरंगामध्ये स्थिर आणि अविचल राहू शकलात तर मग, अनुभवांचा प्रवाह काहीशा स्थिरपणाने वाहू लागेल. अर्थात या वाटचालीमध्ये व्यत्यय आणि चढउतार येणारच नाहीत, असे नाही. परंतु या गोष्टी योग्य रितीने हाताळल्या गेल्या तर, या कालावधीमध्ये साधनाच झाली नाही, असे होत नाही. तर हाच कालावधी अडचणी संपुष्टात येऊन, आधी आलेले अनुभव पचवण्यासाठीचा कालावधी ठरू शकतो.

बाह्य परिस्थितीपेक्षा आध्यात्मिक वातावरण हे नेहमीच अधिक महत्त्वाचे असते. साधकाला जर ते प्राप्त होऊ शकले आणि तो स्वतः ज्यामध्ये श्वास घेऊ शकेल व ज्यामध्ये जीवन जगू शकेल असे स्वतःचे आध्यात्मिक वातावरण साधक स्वत: तयार करू शकेल तर, ती परिस्थिती प्रगतीसाठी खरी सुयोग्य परिस्थिती असेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 140)

(आज ही मालिका समाप्त होत आहे.)

सर्व प्रकारच्या पसंती-नापसंतीपासून मुक्त असणे आणि ईश्वरी संकल्पाकडून जे काही प्राप्त होईल त्याचा आनंदाने स्वीकार करणे ही गोष्ट कोणत्याही मनुष्याला अगदी सुरुवातीलाच शक्य होत नाही.

त्यासाठी व्यक्तीकडे प्रारंभी कोणती गोष्ट असली पाहिजे? तर, ईश्वर जो संकल्प करेल तो भल्यासाठीच असतो, अशी नित्य धारणा व्यक्तीकडे असली पाहिजे. हे असे कसे काय, हे जरी मनाला उमगले नाही तरीही, व्यक्तीने तशी धारणा बाळगली पाहिजे. तसेच, जी गोष्ट तिला अजूनपर्यंत आनंदाने स्वीकारता येत नाहीये ती गोष्ट तिने सहिष्णू वृत्तीने स्वीकारली पाहिजे. पृष्ठभागावर, बाह्य घटनांबद्दलच्या तात्कालिक प्रतिक्रियांच्या काही तात्पुरत्या गतीविधी कदाचित असू शकतील परंतु तेव्हासुद्धा व्यक्तीने स्थिर समत्वापर्यंत जाऊन पोहोचले पाहिजे. एकदा हे समत्व दृढपणे प्रस्थापित झाले की मग बाकी सर्व गोष्टी येऊ शकतील.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 134)

अहंकाराचा अभाव म्हणजे समता नव्हे, तर इच्छावासना आणि आसक्तीचा अभाव म्हणजे समता. म्हणजे मी असे म्हटले आहे की, ‘समता‌’ या शब्दामधून इच्छावासना आणि आसक्तीचा अभाव यांचा निर्देश होतो; अहंकाराची जाणीव नाहीशी होईल का, ती सूक्ष्म आणि व्यापक रूपामध्ये टिकून राहील, हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 133)

सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये अंतरंगामध्ये अविचल राहणे म्हणजे समत्व (equality).

*

समत्वाशिवाय साधनेचा भरभक्कम पाया रचला जाऊ शकत नाही. परिस्थिती कितीही त्रासदायक असू दे, इतरांची वागणूक भलेही तुम्हाला न पटणारी असू दे, तुम्ही त्या साऱ्या गोष्टी एका सुयोग्य स्थिरतेने आणि कोणत्याही अस्वस्थ प्रतिक्रियांविना स्वीकारण्यास शिकले पाहिजे. या गोष्टी हीच समत्वाची कसोटी असते. सर्व गोष्टी सुरळीत असताना, माणसं आणि परिस्थिती सुखकारक असताना समत्व बाळगणे आणि स्थिरता राखणे सहजसोपे असते; पण जेव्हा परिस्थिती विपरित असते तेव्हाच स्थिरता, शांती, समत्व यांच्या परिपूर्णत्वाचा कस लागतो आणि अशा परिस्थितीमध्येच त्या अधिक दृढ, अधिक परिपूर्ण केल्या जाऊ शकतात.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 130, 129)