Tag Archive for: तत्त्वज्ञान

 

असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही?

आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन करायचे आहे, कारण आजवर आपण केवळ द्वेष आणि स्व-संतुष्टताच संपादन केली आहे.

आपल्याला ‘ज्ञान‌’ संपादन करायचे आहे, कारण आजवर आपण फक्त त्रुटी, बोध आणि आकलन या गोष्टीच संपादन केल्या आहेत.

आपल्याला ‘परमानंद‌’ संपादन करायचा आहे, कारण आजवर आपण फक्त सुख व दुःख आणि तटस्थता याच गोष्टी मिळविल्या आहेत.

आपल्याला ‘शक्ती‌’ संपादन करायची आहे, कारण आजवर आपण फक्त दुर्बलता, श्रम आणि पराभूत विजय (विजय मिळालेला असूनसुद्धा पराभूत स्थिती) संपादन केले आहेत.

आपल्याला ‘जीवन‌’ संपादन करायचे आहे, कारण आजवर आपण फक्त जन्म, वाढ आणि मृत्यू एवढेच साध्य केले आहे.

आपल्याला ‘ऐक्य‌’ संपादन करायचे आहे, कारण आजवर आपण फक्त सहयोग आणि युद्ध एवढेच साध्य केले आहे.

एका शब्दात सांगायचे झाले तर, आपल्याला ‘दिव्यत्व‌’ संपादन करायचे आहे, दिव्य प्रतिमेमध्ये आपल्या स्वतःला घडवायचे आहे.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 200-201)

(आज ही मालिका समाप्त होत आहे.)

 

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन साक्षात्कार आणि आजवर स्वप्नातही कधी पाहिले नव्हते असे प्रभुत्व संपादन करणे हे आपले काम आहे. काळ, आत्मा आणि जग हे आपल्याला प्रदान करण्यात आलेले क्षेत्र आहे; दृष्टी, आशा आणि सर्जनशील कल्पनाशक्ती या गोष्टी आपल्याला काय करायचे आहे याची आठवण करून देणाऱ्या आहेत; तर इच्छा, विचार आणि परिश्रम ही आपली सर्वार्थाने कार्यक्षम अशी साधनं आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 200)

 

स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती फिरत राहणे हीदेखील त्याची आणखी एक गती आहे.

*

आधी अंतरंगामध्ये असणाऱ्या आत्म्या‌विषयी सचेत व्हा, मग विचार करा आणि तदनंतर कृती करा. सर्वंकष चैतन्यमय विचार हा ज्याची पूर्वतयारी चालू आहे असे एक जग असते आणि सर्व खऱ्या कृती म्हणजे आविष्कृत झालेला विचार असतो. एक सत्य-कल्पना (Idea) दिव्य आत्म-चेतनेमध्ये क्रीडा करू लागली आणि त्यातून हे जडभौतिक जग अस्तित्वात आले.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 200)

 

मी आज जे करू शकत नाहीये तो, मी भविष्यात जे करणार आहे त्याचा संकेत आहे. अशक्यतेची जाणीव होणे ही सर्व शक्यतांची सुरुवात असते. हे कालबद्ध विश्व म्हणजे एक विरोधाभास होता आणि एक अशक्यता होती; म्हणूनच त्या शाश्वता‌ने स्वतःच्या अस्तित्वामधून हे विश्व निर्माण केले.

*

अशक्यता म्हणजे आजवर प्रत्यक्षात न उतरलेल्या महत्तर शक्यतांची केवळ गोळाबेरीज आहे. प्रगतीचा पुढचा टप्पा आणि अद्यापि पूर्णत्वास न गेलेला प्रवास या गोष्टी अशक्यतेमुळे झाकल्या गेलेल्या असतात.

*

मानवतेने प्रगत व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर सर्व पूर्वकल्पना बाजूला करा. तसे केल्याने, आजवर दुर्लक्षित राहिलेला विचार जागृत होतो आणि तो सर्जनशील बनतो. अन्यथा तो त्याच त्याच यांत्रिक चक्रात पुनरावृत्त होत राहतो आणि तीच त्याची योग्य कृती आहे असे समजण्याची चूक करतो.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 200)

 

 

बरेचदा असे होते की, व्यक्ती आत्मशोधासाठी, आत्म्याशी ऐक्य पावण्यासाठी आवश्यक असणारे सर्व आंतरिक प्रयत्न करते आणि आत्म्याने आपल्या जीवनाचे संचालन करावे यासाठी त्याला वावदेखील देते. प्रत्यक्षात व्यक्तीला जेव्हा त्या आत्म्याचा शोध लागतो तेव्हा त्यामुळे एक प्रकारची अद्भुत मोहिनी निर्माण होते. त्याचा परिणाम म्हणून, व्यक्ती अगदी सहज-स्वाभाविकपणे पहिली गोष्ट स्वतःला सागंते ती अशी की, “मला जे हवे होते ते आता मला मिळाले आहे, मला अपरिमित आनंद गवसला आहे.” आणि त्यानंतर आपला कशाशीच काही संबंध नाही अशा प्रकारची एक वृत्ती तिच्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता असते.

वास्तविक, आजवर ज्यांना ज्यांना आत्मशोध लागलेला आहे त्या सर्वांच्या बाबतीत बहुतांशी असेच काहीसे झालेले आहे. एवढेच नव्हे तर, काहींनी या अनुभवावर आधारित साक्षात्काराचे जणू एक तत्त्वज्ञानच तयार केले आणि त्यांनी सांगून ठेवले आहे की, “एकदा का तुम्हाला आत्मशोध लागला की मग सारे काही साध्य झाले. मग करण्यासारखे अन्य काही शिल्लक राहत नाही, तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचलेले असता आणि तोच मार्गाचा अंतिम टप्पा असतो.”

खरंतर, आत्म-साक्षात्कारानंतरची, पुढील वाटचाल करण्यासाठी अपार धैर्याची आवश्यकता असते. एकदा का व्यक्तीला आत्मशोध लागला की मग त्याचा आत्मा निर्भय योद्धा झाला पाहिजे. आपल्या स्वतःच्या आंतरिक हर्षाने आत्मतृप्त होऊन, व्यक्तीने विश्राम घेता कामा नये. इतरांचे दुःख पाहिल्यावर – मी जे प्रयत्न केले आहेत तेच प्रयत्न इतरांनीदेखील केले पाहिजेत, त्यांनी तसे प्रयत्न केले तर एक ना एक दिवस ते सुद्धा (मी प्राप्त करून घेतलेल्या) या अवस्थेला जाऊन पोहोचतील, त्यांनासुद्धा माझ्यासारखाच आंतरिक हर्ष लाभेल, अशी समजूत करून घेऊन – त्या व्यक्तीने स्वसंतुष्ट राहता कामा नये. फार फार तर अशी व्यक्ती स्वतःच्या आंतरिक ज्ञानाच्या अवस्थेमध्ये राहून, ‘महान परोपकारी‌’ वृत्तीने आणि ‘प्रगाढ करुणे‌’ने इतरांना तेथपर्यंत पोहोचण्यासाठी साहाय्य करू शकते. आणि मग जेव्हा प्रत्येकालाच आत्मसाक्षात्कार होईल तेव्हा या जगाचा अंत होईल आणि तसे झाले की, ज्यांना दुःखभोग नकोसे वाटतात त्यांचे दुःखभोग संपतील असे म्हणून, ती व्यक्ती स्वतःची समजूत करून घेऊ शकते. मात्र… येथेच खरी मेख आहे. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 09 : 425-426)

 

 

जे जीव ईश्वरप्राप्तीची अभीप्सा बाळगत नाहीत ते जीव हे ईश्वरा‌चे अपयश असते. परंतु त्यामुळे ‘प्रकृती‌’ मात्र समाधानी होते आणि अशा जिवांची संख्या वाढविण्यामध्ये आनंद मानते. कारण, प्रकृती टिकून राहील आणि तिचे साम्राज्य दीर्घकाळ चालत राहील अशी ग्वाही ते जीव देत असतात.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 208)

 

जो मनुष्य सत्याच्या शोधासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि सातत्याने परिपूर्ण सत्याच्या अधिकाधिक निकट जावे या हेतुने, म्हणजेच हे समग्र विश्व अनंतकाळ प्रगत होत आहे, याचे उत्तरोत्तर वाढते ज्ञान प्राप्त व्हावे या हेतुने जो प्रयत्नशील असतो आणि गरज भासल्यास, आजवर त्याला जे ‘सत्य‌’ म्हणून वाटत होते त्या विचारांचा परित्याग करण्यासाठी जो तयार असतो, तो मनुष्य हळूहळू अधिक गहन, अधिक परिपूर्ण आणि अधिक तेजोमय अशा महान विचारांच्या संपर्कात येतो.

मग दीर्घकाळ केलेल्या ध्यानाभ्यासानंतर, मननानंतर, तो विशुद्ध बौद्धिक शक्तीच्या महान वैश्विक प्रवाहाच्या थेट संपर्कात येतो आणि त्यानंतर त्या मनुष्यापासून कोणतेही ज्ञान लपून राहू शकत नाही. त्या क्षणापासून धीरगंभीरपणा – मानसिक शांती – ही गोष्ट त्याच्या व्यक्तित्वाचा जणू एक भागच होऊन जाते. सर्व प्रकारच्या समजुती, सर्व मानवी ज्ञान, सर्व धार्मिक शिकवणुकी, जे सारे एके काळी त्याला खूपच विरोधाभासी वाटत असे, त्या साऱ्या पाठीमागे असलेले गहन सत्य आता त्याला जाणवते; त्याच्या दृष्टीपासून काहीच लपून राहू शकत नाही.

– श्रीमाताजी (CWM 02 : 28)

 

 

मनुष्यप्राणी, सामान्यतः जसे जीवन जगतो त्या त्याच्या जीवनाची घडण अर्ध-स्थिर, अर्ध-तरल अशा अतिशय अपरिपूर्णतेने शासित झालेल्या विचारांच्या, बोधाच्या, संवेदनांच्या, भावनांच्या, इच्छावासनांच्या, उपभोगांच्या, कृतींच्या गोळाबेरजेतून झालेली असते. या सर्व गोष्टी बहुतांशी रूढ झालेल्या आणि स्वतःहून पुनरावृत्त होणाऱ्या असतात. त्यातील काही गोष्टीच फक्त गतिशील आणि स्व-विकसित होणाऱ्या असतात, पण (कशाही असल्या तरी) त्या सर्वच्या सर्व गोष्टी पृष्ठवर्ती अहंभोवती केंद्रित झालेल्या असतात. या सर्व कृतींच्या गतिविधींची गोळाबेरीज होऊन, सरतेशेवटी त्यातून आंतरिक वृद्धी होते. या जीवनामध्ये ही वृद्धी अंशतःच दृष्टोत्पत्तीस येते आणि कार्यकारी होते. काही प्रमाणात तिच्यामध्ये येथील जीवनानंतरच्या अनेक जीवनांमधील प्रगतीचे बीज सामावलेले असते.

सचेत जिवाची (conscious being) ही वृद्धी, हा विस्तार, चढतेवाढते आत्म-आविष्करण, जिवाच्या घटकांचा अधिकाधिक सुसंवादी विकास, हा मानवी अस्तित्वाचा संपूर्ण अर्थ आहे आणि संपूर्ण गाभा आहे.

विचार, संकल्प, भावभावना, इच्छावासना, कृती आणि अनुभव यांद्वारे होणाऱ्या चेतनेच्या या अर्थपूर्ण विकसनासाठी आणि सरतेशेवेटी परमोच्च दिव्य आत्मशोधाकडे घेऊन जाण्यासाठी, मनुष्य – मनोमय पुरुष हा या जडभौतिक देहामध्ये प्रविष्ट झाला आहे. बाकी सर्व गोष्टी या एकतर त्यास साहाय्यकारी असतात किंवा त्या गौण असतात; अन्यथा एकतर त्या आनुषंगिक असतात किंवा मग निरुपयोगी असतात. ज्या गोष्टी टिकून राहतात आणि मनुष्याच्या प्रकृतीच्या विकासासाठी आणि त्याच्या वृद्धीसाठी, त्याच्या प्रगमनशील प्रकटीकरणासाठी आणि त्याच्या आत्म्याच्या व चैतन्याच्या शोधासाठी साहाय्यकारी ठरतात फक्त तेवढ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात.

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 89-90)

 

मनुष्य‌ आणि ईश्वर‌ यांच्या भेटीचा अर्थ नेहमीच, मनुष्यामध्ये ईश्वरत्वा‌चा प्रवेश आणि अंतर्भाव तसेच मनुष्याचे दिव्यत्वा‌मध्ये आत्म-विलीनीकरण (self-immergence) असा होतो. परंतु ते विलीनीकरण म्हणजे लोप पावणे नव्हे. निर्वाण ही या या शोधाची आणि धडपडीची आणि दुःखभोगाची तसेच ब्रह्मानंदाची परिपूर्ती असूच शकत नाही. निर्वाण हाच जर या लीलेचा अंत असता, तर या लीलेचा कधी आरंभच झाला नसता.

‘परमानंद‌’ हे रहस्य आहे. विशुद्ध आनंद अनुभवण्यास शिका म्हणजे मग तुम्हाला ‘ईश्वर’ काय आहे याचे ज्ञान होईल.

मग या सर्वाच्या आरंभी (विश्वाच्या आरंभी) काय घडले होते? तर, अस्तित्वाच्या निखळ आनंदासाठी ‘सत्‌‍‌’ने (Existence) स्वतःला बहुगुणित केले आणि स्वतःला अगणित प्रकारे स्वतःचाच शोध लागावा यासाठी त्याने स्वत: अगणित रूपाकारांमध्ये बुडी घेतली.

आणि या गोष्टीचा मध्य काय आहे? विभाजन हे बहुविध एकतेच्या दिशेने प्रयत्नशील असते; अज्ञान हे वैविध्यपूर्ण प्रकाशांचा महापूर अनुभवण्यासाठी परिश्रम करत असते आणि अकल्पनीय अशा आनंदाचा स्पर्श लाभावा म्हणून वेदना प्रयत्न करत असते. कारण (विभाजन, अज्ञान आणि वेदना) या सर्व गोष्टी म्हणजे काळोख्या आकृत्या आणि विकृत स्पंदने असतात. (या सर्व गोष्टी म्हणजे विश्वाच्या वाटचालीतील एक मधलाच टप्पा आहेत.)

आणि मग या सर्व गोष्टींची (विश्वाची) परिसमाप्ती काय असणार आहे? मधाला जर स्वतःची आणि त्याच्या सर्व मधुकणांची चव एकत्रितपणे चाखता आली आणि सारे मधुकण जर एकमेकांची चव चाखू शकले आणि त्यातील प्रत्येक मधुकण जर समग्र मधाच्या पोळ्याची चव चाखू शकला तर काय होईल? अगदी तशीच, ईश्वरा‌ची आणि मनुष्यातील आत्म्याची आणि या विश्वाची परिसमाप्ती (मधुर) होईल.

‘प्रेम‌’ हा मुख्य स्वर आहे, ‘हर्ष‌’ हे संगीत आहे, ‘शक्ती‌’ ही जणूकाही तंतुवाद्याची तार आहे, ‘ज्ञान‌’ हा वादक आहे, अनंत ‘सर्वात्मक ईश्वर‌’ हा संगीतकार आहे आणि तोच श्रोता आहे. पण आत्ता आपल्याला फक्त काही प्रारंभिक विसंवादी सूरच तेवढे कानी पडत आहेत. (मात्र हे लक्षात घेतले पाहिजे की,) ते जेवढे तीव्र असतील तेवढाच पुढील सुमेळसुद्धा (harmony) अधिक महान असणार आहे. आपण (एक दिवस) दिव्य आनंदा‌च्या गाभ्यापाशी जाऊन पोहोचणार आहोत हे निश्चित!

– श्रीअरविंद (CWSA 13 : 203-204)

 

जग ही जिवाची आत्मवंचना (self-delusion) आहे किंवा जग ही सैतानाची निर्मिती आहे असे आम्ही मानत नाही; तर आमच्या दृष्टीने, जग हे ‘ईश्वराचे आविष्करण‌’ (manifestation) आहे. अद्यापि जरी ते अंशतःच आविष्कृत झालेले असले तरी ते प्रगमनशील आणि उत्क्रांतिमय आविष्करण आहे. आणि म्हणून जीवनाचा परित्याग करणे, संन्यास घेणे (renunciation) हे आमच्या दृष्टीने जीवनाचे ध्येय असू शकत नाही किंवा ज्यासाठी या जगाची निर्मिती झाली आहे, त्या जगालाच नकार देणे हे देखील जीवनाचे उद्दिष्ट असू शकत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 328)