Tag Archive for: श्रद्धा

 

“तुम्ही ईश्वरी शक्तीसमोर खुले व्हा म्हणजे तुम्हाला ईश्वरी शक्ती प्राप्त होईल,” असे तुम्हाला सांगण्यात आले आहे. तुम्हाला असेसुद्धा सांगण्यात आले आहे की, “श्रद्धा आणि सद्भावना बाळगा म्हणजे मग तुम्ही सुरक्षित राहाल.” खरोखरच तुम्ही दिव्य चेतनेमध्ये, दिव्य शक्तीमध्ये, दिव्य संरक्षणामध्ये न्हाऊन निघत आहात आणि जेवढ्या प्रमाणात तुमच्या ठायी श्रद्धा असेल आणि जेवढे तुम्ही स्वतःला खुले करू शकाल तेवढ्या प्रमाणात वरील गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. छोट्याछोट्या आंतरिक क्षोभाच्या गोष्टींना नकार देण्यासाठी आणि या गोष्टी उद्भवल्याच तर पुन्हा एक सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांचे तुम्हाला साहाय्य लाभते. तुमच्याबाबतीत ज्या कोणत्या दुर्घटना घडू शकल्या असत्या किंवा जे बारीकसारीक हल्ले होऊ शकले असते त्या सगळ्यापासून तुमचे संरक्षण करण्यासाठी आणि तुम्हाला आरोग्यसंपन्न ठेवण्यासाठीसुद्धा त्यांचे तुम्हाला साहाय्य लाभते.

पण जर तुमच्या अस्तित्वामध्ये, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये, किंवा तुमच्या प्राणामध्ये किंवा तुमच्या मनामध्ये, अनेक घटकांमध्ये किंवा अगदी एखाद्या भागामध्येदेखील जर अवतरित होणाऱ्या शक्तीस ग्रहण करण्याची क्षमता नसेल तर, यंत्रामध्ये एखादा बारीकसा वाळूचा कण अडकला तर तो चालत्या कामात जशी खीळ घालू शकतो, तसे घडून येते. म्हणजे एखादे चांगले यंत्र अतिशय सुरळीतपणे चालू असते, सारे काही सुरळीत चालू असते आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये एखादा बारीकसा वाळूचा कण टाकलात (फार मोठा नाही, अगदी एखादा छोटासा कण) तर, अचानक त्यामध्ये काहीतरी बिघाड होतो आणि यंत्र एकाएकी बंद पडते. त्याचप्रमाणे तुमच्यामध्ये कोठेतरी ग्रहणशीलतेचा थोडासा जरी अभाव असेल, तुमच्यामधील कोणता तरी एखादा घटक ईश्वरी शक्तीचा स्वीकार करण्यास अक्षम असेल तर, म्हणजे तो पूर्णपणे मिटलेला असेल तर, त्यातून ताबडतोब एक प्रकारचा मोठा असमतोल निर्माण होतो. म्हणजे तो भाग कोठेतरी एखाद्या छोट्याशा काळ्या डागासारखा झालेला असतो. तो अगदी छोटासा असला तरी दगडासारखा कठीण असतो. ईश्वरी शक्ती ग्रहण करण्यास तो नकार देतो; म्हणजे एकतर ती शक्ती त्याला ग्रहण करता येत नाही किंवा ती त्याला ग्रहण करायची इच्छा नसते. कारण काहीही असो पण त्यामुळे ईश्वरी शक्ती त्याच्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. आणि जी गोष्ट ऊर्ध्वदिशेने प्रगत होत होती, जी अतिशय उत्कृष्ट रितीने बहरून येत होती, ती एकाएकी कोमेजून जाते. कधीकधी तर तुम्ही अगदी नेहमीप्रमाणे संतुलित स्थितीत असता, तुमची तब्येत उत्तम असते, सारे काही सुरळीत चालू असते, तक्रार करण्यास कोठे जागाच नसते अशा वेळीसुद्धा कधीकधी असे घडून येऊ शकते.

एखाद्या दिवशी तुम्हाला एखादी अभिनव कल्पना सुचलेली असते, एक नवीन उर्मी आलेली असते, तुमच्यामध्ये काहीतरी करण्याची उत्कट आस असते आणि त्यासाठी तुम्हाला महान शक्ती लाभलेली असते, एखादा उत्कृष्ट अनुभव तुम्हाला आलेला असतो, त्या सुंदर अनुभवाने तुमची आंतरिक द्वारं खुली केलेली असतात, पूर्वी नसलेले असे काही नवीनच ज्ञान तुम्हाला प्राप्त झालेले असते, जेव्हा तुम्हाला अशी खात्री असते की सारे काही व्यवस्थित चालू आहे…

मात्र अगदी पुढच्याच दिवशी, तुम्ही आजारी पडता. आणि मग तुम्ही म्हणता, “हे काय? पुन्हा तेच? अशक्य आहे हे! हे असे घडता कामा नये.” पण हे असे घडलेले असते याचे कारण मी आत्ता तुम्हाला सांगितले तेच असते – वाळूचा एक बारीकसा कण! तुमच्यामध्ये असे काहीतरी होते की जे ग्रहण करण्यास अक्षम ठरले. त्यातूनच ताबडतोब असंतुलन निर्माण झाले. ती गोष्ट अगदी आंशिक असली तरी तेवढीदेखील पुरेशी असते. परिणामतः तुम्ही आजारी पडता.

– श्रीमाताजी (CWM 05 : 176)

 

तुमची श्रद्धा, तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमचे समर्पण हे जेवढे अधिक परिपूर्ण असेल तेवढ्या अधिक प्रमाणात कृपा व संरक्षण तुमच्यासोबत असेल. आणि ‘दिव्य माते’चे संरक्षण आणि ‘तिची कृपा’ तुमच्यासोबत असताना, तुमच्या वाटेला जाण्याची हिंमत कोण करू धजावेल किंवा तुम्हाला कोणाची भीती बाळगण्याची गरजच काय? तिच्या कृपेचा आणि संरक्षणाचा थोडासा अंशदेखील तुम्हाला सर्व अडीअडचणी, अडथळे आणि धोके यांमधून पार करू शकतो; तर मग, तिने जर पूर्णतयाच तुम्हाला कवळून घेतले तर, कोणतीही असत्‌‍-शक्ती, मग ती कितीही बलवान का असेना, ती या जगातील असो किंवा इतर अदृश्य जगतांमधील असो, तिची बाधा न पोहोचता, सर्व संकटांपासून मुक्त होऊन, तुम्ही तुमच्या मार्गावरून पूर्ण सुरक्षितपणे वाटचाल करू शकता; कारण तो मार्ग ‘दिव्य माते’चा असतो.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 08)

 

(एका साधकाने श्रीअरविंद यांना पत्राने काही शंका विचारली होती. तेव्हा त्याला काय उत्तर द्यावे हे श्रीअरविंद यांनी सचिवाला लिहून कळविले होते. ते हे पत्र…)

श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचा प्रभाव ग्रहण करण्यासाठी, त्या प्रभावाप्रत स्वतःला खुले करण्याची क्षमता व इच्छा, श्रद्धा आणि आध्यात्मिक मार्गाचे अनुसरण करण्यामध्ये संपूर्ण प्रामाणिकपणा यांव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही अटी नाहीत. सहसा प्रामाणिकपणा व श्रद्धा यांचा परिणाम म्हणून, श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या प्रभावाप्रत स्वतःला खुले, उन्मुख करण्याची क्षमता निर्माण होते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 106)

 

(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे. त्याने तसे श्रीअरविंदांना कळविले आहे. त्यावर श्रीअरविंदांनी दिलेले हे उत्तर…)

अपूर्णता असल्या आणि अगदी कितीही अपूर्णता असल्या किंवा त्या कितीही गंभीर स्वरूपाच्या असल्या तरीही, योगमार्गातील प्रगतीसाठी अपूर्णता या कधीही कायमचा अडथळा ठरू शकत नाहीत. एकच अडथळा हा कायमस्वरूपी अडथळा ठरू शकतो आणि तो म्हणजे अप्रामाणिकपणा. अर्थात हा अडथळासुद्धा कायम राहण्याची गरज नाही कारण त्यामध्येसुद्धा परिवर्तन करता येते. अपूर्णता हा जर योगमार्गातील अडथळा असता तर कोणताही मनुष्य योगमार्गामध्ये यशस्वी होऊ शकला नसता; कारण प्रत्येक जणच अपूर्ण असतो…

योगसाधनेमध्ये एकच गोष्ट अंतिमतः महत्त्वाची असते आणि ती म्हणजे प्रामाणिकपणा. आणि त्याबरोबर आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे मार्गावर टिकून राहण्यासाठी आवश्यक असणारा धीर. अर्थात बरेच जण धीर नसतानासुद्धा ध्येयापर्यंत पोहोचू शकतात. कारण, साधकामध्ये बंडखोरीची भावना असली किंवा अधीरता, नैराश्य, विषाद, थकवा या गोष्टी असल्या किंवा काही काळासाठी त्याची श्रद्धा गमावल्यासारखी झाली तरी किंवा, साधकाच्या मनावर त्या गोष्टींचे मळभ आणि धुके आलेले असतानादेखील, साधकाच्या बाह्यवर्ती ‘स्व‌’पेक्षा अधिक सामर्थ्यशाली असणारी शक्ती, आत्मशक्ती किंवा जिवाला ईश्वरप्राप्तीची जी निकड वाटते ती प्रेरणा या गोष्टी ते मळभ बाजूला सारून, त्याला त्याच्या ध्येयाच्या दिशेने घेऊन जातात.

• श्रीअरविंद (CWSA 31 : 661)

 

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल आणि कुरूप स्पंदनामुळे पूर्णयोगाच्या या मार्गाकडे कधीही पाठ फिरविता कामा नये. तुमच्यापाशी दुर्दम्य धैर्य, परिपूर्ण प्रामाणिकपणा असला पाहिजे. तुम्ही कोणताही विकल्प उपयोगात न आणता किंवा सौदेबाजी न करता संपूर्ण आत्मदान केले पाहिजे. अर्पण करताना त्याच्या मोबदल्यात काहीतरी मिळावे अशी अपेक्षा तुम्ही बाळगता कामा नये. मी स्वतःला ईश्वरार्पित केले तर त्यामुळे माझे संरक्षण होईल या हेतुने तुम्ही ते अर्पण करता कामा नये. तुमच्या श्रद्धेला पुराव्याची आवश्यकता भासता कामा नये. (पूर्णयोगाच्या) मार्गावर प्रगत व्हायचे असेल तर या सर्व गोष्टी अनिवार्य असतात; (कारण) या गोष्टीच तुम्हाला सर्व संकटांमध्ये आश्रय देतात.

* श्रीमाताजी (CWM 15 : 190)

 

ईश्वरी कृपा आणि संरक्षण नेहमीच तुमच्यासोबत असते. तुम्ही आंतरिक किंवा बाह्य अशा कोणत्याही अडचणीत किंवा संकटात सापडलेला असलात तरी त्यांना शिरजोर होऊ देऊ नका आणि अशी वेळ येईल तेव्हा, संरक्षण करणाऱ्या दिव्य शक्ती‌चा आश्रय घ्या. तुम्ही नेहमीच असे श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे करत राहाल तर, पृष्ठभागावर दिसणाऱ्या सर्व प्रकारच्या खळबळीमध्ये, गोंधळामध्येसुद्धा जे नेहमीच स्थिर आणि शांतिपूर्ण असते, असे तुमच्या अंतरंगातील काहीतरी खुले होत आहे, असे तुम्हाला आढळून येईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 724-725)

(श्रीअरविंद यांनी एका श्रीकृष्ण-भक्ताला केलेले मार्गदर्शन…)

तुम्ही श्रीकृष्णासमीप साधेसरळपणाने का जात नाही? त्यासाठीचा साधासरळ मार्ग म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवायचा. तुम्ही प्रार्थना केलीत तर ती प्रार्थना श्रीकृष्ण ऐकतो यावर विश्वास ठेवा. तुम्हाला त्याच्याकडून प्रतिसाद मिळण्यास वेळ लागत असला तरी, तो सारे काही जाणतो आणि तो तुमच्यावर प्रेम करतो यावर विश्वास ठेवा. आणि (तुम्हाला कधी प्रतिसाद द्यायचा त्या) वेळेची निवड करण्याबाबत तो सर्वाधिक सूज्ञ आहे, याची खात्री बाळगा.

परंतु त्या दरम्यान, तुम्ही शांतपणे तुमची भूमी (आधार) स्वच्छ करा. म्हणजे जेव्हा तो येईल तेव्हा त्याला काट्याकुट्यामधून, दगडधोंड्यांमधून वाट काढावी लागणार नाही. हे माझे सांगणे आहे आणि मी काय सांगत आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. कारण तुम्ही ज्या अडचणी सांगत आहात त्या सर्व मानवी अडीअडचणींची, संघर्षांची मला पूर्णपणे जाणीव आहे आणि त्यावरील उपायही मला माहीत आहेत. त्यामुळे, संघर्ष व अडीअडचणी ज्यामुळे कमी होतील, त्यांचा कालावधी ज्यामुळे कमी होईल अशा गोष्टींवर म्हणजे आंतरात्मिक वळण, श्रद्धा, साधासरळ आणि परिपूर्ण विश्वास व भरवसा या गोष्टींवर मी नेहमी भर देत असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 487-488)

अधिक गहन व आध्यात्मिक अर्थाने सांगायचे झाले तर, ज्या गोष्टीचा साक्षात्कार झाला आहे ती गोष्ट, जेव्हा इतर कोणत्याही भौतिक गोष्टीपेक्षाही अधिक वास्तव व गतिशील आणि चेतनेच्या दृष्टीने अधिक निकट असल्याचे जाणवते, तेव्हा अशा साक्षात्काराला ‘सघन साक्षात्कार’ (concrete realisation) म्हणतात.

अशा प्रकारे सगुण ईश्वराचा (personal Divine) किंवा निर्गुण ब्रह्माचा (impersonal Brahman) किंवा आत्म्याचा (Self) साक्षात्कार हा सहसा, साधनेच्या प्रारंभीच किंवा साधनेच्या पहिल्या काही वर्षांत होत नाही किंवा साधनेला खूप वर्ष झाली तरीही होत नाही. साधनेच्या प्रारंभीच असा साक्षात्कार होणे ही गोष्ट फारच थोड्या जणांच्या बाबतीत घडते. कोणतीही योगसाधना न करतासुद्धा, लंडनमध्ये मला आलेल्या अनुभवानंतर, पंधरा वर्षांनी म्हणजे, मी योगसाधनेला सुरुवात केल्यानंतर, पाचव्या वर्षी मला तो अनुभव आला. आणि तो सुद्धा माझ्या दृष्टीने खूप असाधारणरित्या लवकरच आलेला आहे, जणू जलदगती आगगाडीचा वेगच. अर्थात, यापेक्षाही अधिक लवकर काही उपलब्धी घडून आल्या आहेत, यात शंका नाही.

पण इतक्या लवकर त्याची अपेक्षा बाळगणे आणि त्याची मागणी करणे आणि अनुभव आला नाही म्हणून हताश होणे, तसेच युगा-युगामध्ये दोन तीन व्यक्तींचा अपवाद वगळता, इतरांना हा योग करता येणे अशक्य आहे असे म्हणणे, ही गोष्ट एखाद्या अनुभवी योग्याच्या किंवा साधकाच्या दृष्टीने पाहता, उतावळ्या आणि विकृत अधीरतेमध्ये गणली जाईल. बहुतेक जण हेच सांगतील की, पहिल्या काही वर्षांमध्ये धीम्या गतीने प्रगतीची आशा बाळगणे हे चांगले. आणि जेव्हा प्रकृती तयार होते आणि जेव्हा ती पूर्णपणे ईश्वराभिमुख होते, तेव्हाच असे परिपक्व अनुभव येऊ शकतात.

काही जणांच्या बाबतीत तुलनेने अगदी सुरुवातीच्या काळात देखील, काही पूर्वतयारी करून घेणारे अनुभव अपेक्षेपेक्षा लवकर येऊ शकतात, पण तेथेही चेतनायुक्त परिश्रम करावेच लागतात, त्यापासून त्यांची सुटका नसते; या प्रयत्नांमुळे पुढे अशा अनुभवांची, चिरस्थायी आणि परिपूर्ण अशा साक्षात्कारामध्ये परिणती होते…

वास्तविक, जी माणसं कृतज्ञ असतात, आनंदी असतात; आवश्यकता पडली तर, अगदी छोटी छोटी पावले का असेनात, पण एकेक पाऊल टाकण्याची ज्यांची तयारी असते, अशी माणसंच खरंतर अधिक वेगाने वाटचाल करतात आणि आणि जे प्रत्येक पावलागणिक निराश होतात, कुरकूर करत राहतात अशा अधीर, उतावळ्या लोकांपेक्षा ही माणसं अधिक खात्रीने वाटचाल करतात. मला तरी नेहमी असेच आढळून आले आहे; याला विरोधी अशीही काही उदाहरणे असतील देखील, पण मला एवढेच सांगायचे आहे की, जर तुम्ही ‘आशा, उत्साह आणि श्रद्धा’ कायम बाळगू शकलात तर, अधिक मोठ्या शक्यतेला वाव असेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 112)

अधीरता नेहमीच चुकीची असते. ती साधनेला साहाय्य करत नाही तर, ती अडथळे निर्माण करते. अविचल, प्रसन्न श्रद्धा आणि विश्वास हा साधनेसाठी सर्वोत्तम पाया असतो. उर्वरित गोष्टींसाठी साधकामध्ये अभीप्सेबरोबरच, ग्रहणशीलतेसाठी सातत्यपूर्ण असे संपूर्ण खुलेपण असणे आवश्यक असते. ही अभीप्सा उत्कट असू शकेल पण ती नेहमीच स्थिरशांत आणि अविचल असली पाहिजे. योगाचा संपूर्ण साक्षात्कार अचानक होत नाही. आधाराची (मन, प्राण व शरीर यांची) बरीच तयारी झाली की मग, साक्षात्कार होतो आणि ती तयारी होण्यासाठी कधीकधी खूप दीर्घ कालावधी लागू शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 111-112)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

साधनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर नेहमीच अडचणी येतात आणि त्यामुळे प्रगतीमध्ये अडथळा येतो. जोपर्यंत व्यक्तीची पुरेशी तयारी झालेली नसते तोपर्यंत त्याची आंतरिक दालनं उघडण्यास विलंब लागतो.

जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा, तुम्हाला जर निश्चलता जाणवत असेल आणि आंतरिक प्रकाश चमकून जात असेल तसेच, आंतरिक ऊर्मी इतकी अधिक वृद्धिंगत होऊ लागली असेल की त्यामुळे तुमची बाह्य गोष्टींबद्दलची आसक्ती कमी होऊ लागली असेल आणि प्राणिक अडचणींमधील जोर कमी होऊ लागला असेल तर, तीच स्वयमेव एक महान प्रगती असते.

योगमार्गाचा प्रवास हा खूप दीर्घ असतो आणि प्रचंड प्रतिकाराच्या विरोधात लढा देऊन, त्या मार्गावरील इंचइंच भूमी जिंकावी लागते. आणि त्यासाठी साधकाकडे धीर आणि एक-लक्ष्यी चिकाटी असणे आवश्यक असते. तसेच, कितीही अडचणी आल्या, विलंब झाला किंवा वरकरणी अपयश येताना दिसले तरीही, त्या सगळ्यामधूनही दृढ राहू शकेल अशी श्रद्धा साधकामध्ये असणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 110)