Tag Archive for: अभीप्सा

 

अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही आजवर नेहमीच आध्यात्मिक जीवनासाठी अतिशय सुयोग्य मानण्यात आली आहे. तसेच सात्त्विकतेमुळे आध्यात्मिक जीवनाची पूर्वतयारी होते, असेही मानले जाते. तर राजसिक प्रकृती इच्छाआकांक्षाच्या आणि आवेगांच्या भाराखाली दबून गेलेली असते.

त्याच बरोबर हेही खरे आहे की, आध्यात्मिकता ही द्वंद्वातीत असते आणि त्यासाठी ऊर्ध्वमुख असणाऱ्या अभीप्सेची सर्वाधिक आवश्यकता असते. आणि ही अभीप्सा सात्त्विक प्रवृत्तीच्या व्यक्तीइतकीच राजसिक प्रवृत्तीच्या व्यक्तीमध्येही निर्माण होऊ शकते. एखादी सात्त्विक प्रवृत्तीची व्यक्ती जशी तिच्या सद्गुणांच्या अतीत जाऊ शकते तशीच, राजसिक प्रवृत्तीची व्यक्तीही तिच्या अवगुणांच्या, इच्छाआकांक्षांच्या अतीत होऊन, दिव्य शुद्धता, दिव्य प्रकाश आणि दिव्य प्रेमाकडे वळू शकते.

अर्थात, अशी राजसिक प्रवृत्तीची व्यक्ती जेव्हा स्वतःच्या कनिष्ठ प्रकृतीवर विजय मिळवेल आणि स्वतःमधून ती कनिष्ठ वृत्ती काढून टाकेल तेव्हाच ही गोष्ट घडून येईल. कारण अशी व्यक्ती जर पुन्हा एकदा त्याच कनिष्ठ प्रकृतीमध्ये जाऊन पडली, तर ती मार्गभ्रष्ट होण्याची शक्यता असते किंवा अगदीच काही नाही तर, जोपर्यंत ती व्यक्ती त्या कनिष्ठ प्रकृतीमध्ये रमलेली असते तोपर्यंत तरी तिची आंतरिक प्रगती खुंटते.

परंतु धार्मिक आणि आध्यात्मिक इतिहास पाहिला तर त्यामध्ये, मोठमोठ्या गुन्हेगारांचे महान संतांमध्ये किंवा अवगुणी किंवा कमी गुणवान व्यक्तींचे आध्यात्मिक साधकांमध्ये आणि भक्तांमध्ये रूपांतर झाल्याची उदाहरणे वारंवार आढळून आली आहेत. उदाहरणार्थ युरोपमध्ये सेंट ऑगस्टिन, भारतामध्ये (चैतन्य महाप्रभुंचे अनुयायी झालेले) जगाई आणि मधाई, बिल्वमंगल यासारखी अनेक उदाहरणे आहेत.

भलेही एखाद्या माणसाच्या हातून गतकाळात अनेक चुका झालेल्या असतील किंवा त्याला अनेक ठोकरा बसल्या असतील, पण त्यानेसुद्धा जर ईश्वराच्या निवासाचे दरवाजे अगदी प्रामाणिकपणे ठोठावले तर, ते त्याच्यासाठी कधीच बंद नसतात. (किंबहुना) जो जो कोणी ईश्वराच्या निवासाचे दरवाजे अगदी प्रामाणिकपणे ठोठावतो, त्याच्यासाठी ते कधीच बंद नसतात.

मानवी गुण आणि मानवी दोष म्हणजे अंतरंगात असणाऱ्या ईश्वरी तत्त्वावरील अनुक्रमे तेजस्वी व अंधकारमय आवरणे असतात. पण आत्म्याच्या उंचीप्रत जाताना, जेव्हा ती दोन्ही आवरणे भेदली जातात तेव्हा, ती जळून जाऊ शकतात. (म्हणजेच द्वंद्वातीत असणाऱ्या आत्मतत्त्वाच्या दिशेने चाललेल्या प्रवासात साधकाचे गुण व दोष दोन्ही गळून पडतात.)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 42)

फक्त दिव्य सत्याचीच इच्छा बाळगणे; दिव्य मातेप्रत स्वतःला अधिकाधिक समर्पित करणे; या एका अभीप्सेव्यतिरिक्त असणाऱ्या सर्व वैयक्तिक मागण्या व वासना यांना नकार देणे; जीवनातील प्रत्येक कृती म्हणजे ईश्वराने दिलेले कार्य आहे हे जाणून, त्याच्या आड कोणताही अहंकार येऊ न देता, ते कार्य करणे आणि ते ईश्वराला समर्पित करणे म्हणजे पूर्णपणे प्रामाणिक असणे. हाच ‘दिव्य जीवना‌’चा पाया आहे.

व्यक्ती एकाएकी पूर्णपणे तशी होऊ शकत नाही. पण जर तिने सातत्याने तशी अभीप्सा बाळगली आणि ईश्वरी शक्तीने साहाय्य करावे म्हणून साध्यासरळ इच्छेने नेहमी आणि अगदी अंतःकरणपूर्वक तिचा धावा केला तर, या (दिव्य) चेतनेमध्ये व्यक्ती अधिकाधिक उन्नत होत राहते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 51)

 

प्रामाणिकपणामध्ये (sincerity) नुसत्या सचोटीपेक्षा (honesty) बराच अधिक अर्थ सामावलेला आहे. म्हणजे असे की, तुम्ही जे बोलता तेच तुम्हाला अभिप्रेत असते, तुम्ही जे प्रतिपादित करत असता त्याची तुम्हाला जाणीव असते, तसेच तुमच्या संकल्पामध्ये खरेपणा असतो. साधक जेव्हा ईश्वराशी एकरूप होण्याची आणि ईश्वराचे साधन बनण्याची अभीप्सा बाळगत असतो, तेव्हा त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रामाणिकपणाचा अर्थ असा असतो की, त्याला त्याच्या अभीप्सेबाबत खरोखरच गांभीर्य असते व ईश्वराव्यतिरिक्तच्या इतर सर्व इच्छांना किंवा आवेगांना तो नकार देत असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 50)

साधक : आपल्या पूर्णयोगाच्या दृष्टीने प्रामाणिकपणा याचा अर्थ कृपया सांगाल का?

श्रीअरविंद : ईश्वराप्रत असलेल्या अत्युच्च अभीप्सेशी विसंगत होण्यास, अस्तित्वाच्या कोणत्याही घटकाला अनुमती न देणे म्हणजे प्रामाणिकपणा.

(Guidance from Sri Aurobindo to Nagin Doshi, Vol 01 : 110)

*

प्रामाणिक असण्यासाठी, व्यक्तीच्या अस्तित्वाच्या सर्व घटकांनी ईश्वराप्रत असलेल्या त्यांच्या अभीप्सेमध्ये संघटित असणेच आवश्यक असते. म्हणजे असे की, एखाद्या घटकाला ईश्वर हवासा वाटतो आणि दुसरे घटक मात्र त्याला नकार देतात किंवा बंड करतात, असे असता कामा नये.

प्रसिद्धी किंवा नावलौकिक किंवा प्रतिष्ठा किंवा शक्ती मिळविण्यासाठी नव्हे अथवा फुशारकी मारण्याच्या समाधानासाठीदेखील नव्हे, तर ईश्वरासाठीच ईश्वर हवा असणे, म्हणजे अभीप्सेमध्ये प्रामाणिकपणा असणे.

– श्रीमाताजी (CWM 14 : 65)

 

प्रश्न : माताजी, प्रामाणिकपणाचा खरा अर्थ काय?

श्रीमाताजी : प्रामाणिकपणाच्या असंख्य श्रेणी आहेत. विचार करायचा एक आणि बोलायचे वेगळेच, मागायची एक गोष्ट पण हवी असते निराळीच गोष्ट, हे असे नसणे म्हणजे प्रामाणिकपणा; ही झाली प्रामाणिकपणाची अगदी पहिली श्रेणी. म्हणजे असे पाहा की, एखादी व्यक्ती स्वतःमध्ये उत्कट अभीप्सा आहे, आणि तिला आध्यात्मिक जीवन हवे आहे, असे म्हणत असते आणि अगदी त्याच वेळी… अगदी निर्लज्जपणे, आध्यात्मिक जीवनाच्या पूर्णपणे विरोधी वर्तन करत असते.

(प्रामाणिकपणाची आता दुसरी श्रेणी पाहूया.) बरेचदा असे घडते एखादी व्यक्ती असे म्हणते की, “मला प्रगती करायची आहे आणि मला माझ्यातील दोष काढून टाकायचे आहेत,” आणि अगदी त्याच वेळी, ती व्यक्ती स्वत:च्या चेतनेमध्ये असणाऱ्या त्याच दोषांना खतपाणी घालत असते आणि त्यामध्ये कोणी हस्तक्षेप करून, ते काढून टाकू नयेत म्हणून, ते दोष दडवून ठेवण्यासाठी धडपडत असते.

म्हणजे व्यक्तीमधील एखाद्या भागाला असे वाटत असते की, त्याच्यातील सर्व दोष, सर्व अपूर्णता इत्यादी गोष्टी निघून गेल्या पाहिजेत. ती व्यक्ती तसा विचार करत असते, तसे म्हणतही असते आणि तशी अभीप्सादेखील ती बाळगून असते; आणि अगदी त्याच वेळी, त्या व्यक्तीमधील इतर भाग मात्र ते दोष आणि त्या अपूर्णता दडवून ठेवू इच्छित असतात. ते दोष आणि त्या अपूर्णता उघड होऊ नयेत, त्यांच्यावर मात करायला कोणी भाग पाडू नये, अशा रितीने ते अशा गोष्टी अगदी काळजीपूर्वक दडवून ठेवतात. हे अगदी सार्वत्रिक आहे.

आणि हाच मुद्दा आपण अजून विस्ताराने विचारात घेतला तर असे लक्षात येते की, ईश्वराबद्दल असणाऱ्या मध्यवर्ती अभीप्सेला विरोधी असा एखादा भाग जरी आपल्यामध्ये शिल्लक असेल तर तोपर्यंत आपण पूर्णपणे प्रामाणिक आहोत, असे म्हणता येणार नाही. म्हणजेच सांगायचे झाले तर, परिपूर्ण प्रामाणिकपणा ही एक अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. आणि बहुधा, अगदी नेहमी, स्वत:च्या प्रकृतीमधील, स्वभावातील ज्या गोष्टी व्यक्तीला आवडत नाहीत त्या गोष्टी, स्वतःपासून सुद्धा लपवून ठेवण्याची धडपड व्यक्ती करत असते; व्यक्ती त्या गोष्टींचे समर्थन करणारी स्पष्टीकरणे देत राहते.

…या सर्व गोष्टींची गणना अप्रामाणिकपणामध्ये होते. जेव्हा अस्तित्वाच्या केंद्रस्थानी दिव्य उपस्थितीची चेतना असते, दिव्य संकल्पाची चेतना असते आणि व्यक्तीचे संपूर्ण व्यक्तित्वच जेव्हा दीप्तीमान, स्वच्छ, शुद्ध व संपूर्ण पारदर्शी असते आणि ते त्या दिव्य अस्तित्वाचा सर्व तपशिलांसह आविष्कार करत असते, तेव्हा तेथे संपूर्ण प्रामाणिकपणा अस्तित्वात येतो. आणि तेव्हा तो खराखुरा प्रामाणिकपणा असतो.

व्यक्तीने जेव्हा स्वत:ला ईश्वराप्रत समर्पित केलेले असते, जेव्हा ती फक्त ईश्वराच्याच इच्छेने चालण्याची आस बाळगत असते, तेव्हा तिच्याबाबतीत काहीही घडत असले तरी, ती नेहमीच म्हणजे अगदी कोणत्याही क्षणी, स्वत:च्या समग्र अस्तित्वानिशी ईश्वराला म्हणत असते की, “सारेकाही तुझ्याच इच्छेने घडू दे,” आणि खरोखर तशीच तिची भावना असते. आणि हे असे जेव्हा अगदी उत्स्फूर्तपणे, संपूर्णपणे, समग्रपणे घडते, तेव्हा ती व्यक्ती प्रामाणिक असते.

– श्रीमाताजी (CWM 06 : 397-398)

(जीवनाच्या रूपांतरणासाठी खुलेपणा कसा आवश्यक आहे ते कालच्या भागात आपण पाहिले. आणि या रूपांतरणासाठी खुलेपणाबरोबरच अभीप्सा आणि नकार या दोन गोष्टी किती मोलाच्या आहेत, हे येथे श्रीमाताजी सांगत आहेत…)

तुम्ही जे जाणता असे तुम्हाला वाटते त्या गोष्टींवर अडून राहणे; तुम्हाला जे संवेदित होते, तुम्हाला जे आवडते त्यालाच चिकटून राहणे; तुमच्या सवयींना आणि तथाकथित गरजांना धरून राहणे; हे जग आत्ता जसे आहे तशा त्या जगाशीच संबंधित राहणे; हे चिकटून राहणेच (to cling) तुमचे हातपाय जखडून टाकते. या सर्व गोष्टींचे बंध तुम्ही एकेक करून सोडून दिले पाहिजेत. सर्व बंधने तुम्ही मोकळी केली पाहिजेत. हे आत्तापर्यंत अनेकदा सांगितले गेले आहे पण लोकं त्याच त्याच गोष्टी कुरवाळत राहतात.

…अगदी अशी माणसे असतात की जी अतिशय वाक्चतुर असतात, जी इतरांना शिकवण देतात, अशी माणसेदेखील कशाला ना कशाला तरी चिकटून असतात. ती त्यांच्या दृष्टिकोनाला, त्यांच्या भावनापद्धतींना चिकटून असतात. त्यांना ज्या पद्धतीने प्रगती करण्याची सवय लागलेली असते त्या पद्धतीला ती माणसे चिकटून राहतात. त्यांच्या दृष्टीने प्रगती करण्याची त्यांची सवय हीच जणू काही एकमेव पद्धत असते.

तुमच्यावर कोणतेही बंध असता कामा नयेत. तुम्ही अगदी मुक्त असले पाहिजे…अगदी मुक्त! अभीप्सेव्यतिरिक्त अन्य सर्व गोष्टीत परिवर्तन करण्यासाठी तुम्ही नेहमीच सज्ज असले पाहिजे.

आपल्याला परिपूर्णते‌ची, दिव्य प्रकाशा‌ची, दिव्य प्रेमा‌ची, सत्याची आवश्यकता असली पाहिजे. आपल्याला परम परिपूर्णत्व‌ मिळवायचे आहे. तुम्हाला त्याची गरज वाटली पाहिजे, आस लागली पाहिजे…

फक्त परमेश्वरच तुमची ही आस पूर्ण करू शकतो.

पुढे चालत राहा, वाटचाल करत राहा.

– श्रीमाताजी (Conversation with a Disciple, October 7, 1964)

 

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट असते आणि ती कोणत्याही क्षमतेपेक्षा अधिक मूलभूत महत्त्वाची व अधिक परिणामकारक असते.

आंतरिक हाक, आंतरिक अनुभूती येण्यासाठी आणि आंतरिक उपस्थितीची जाणीव होण्यासाठी बहिर्मुख न राहता, चेतना अंतरंगामध्ये वळविणे हीदेखील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 55)

(पूर्वार्ध)

‘सुजाण व्हा’ असे सांगण्यासाठी सर्वसाधारणपणे जी कारणे सुचविली जातात ती नेहमीच अगदी किरकोळ असतात, असे मला नेहमी वाटत आले आहे. उदाहरणार्थ, “असे करू नका, नाहीतर तुम्हाला दुःख सहन करावे लागेल. तसे करू नका, नाहीतर त्यातून तुमच्या मनात भीती निर्माण होईल.” …परंतु यामुळे चेतना अधिकाधिक शुष्क बनत जाते, कठीण बनत जाते कारण ती दुःख-वेदनेला घाबरत असते.

(म्हणून तसे सांगण्याऐवजी) असे सांगितले गेले पाहिजे की, चेतनेची एक अशी स्थिती असते की, ज्या स्थितीमध्ये निर्भेळ आनंद असतो, छायाविरहित प्रकाश असतो, जेथे भीतीच्या सर्व शक्यताच नाहीशा होतात. अशी स्थिती अभीप्सेद्वारे आणि आंतरिक सातत्यपूर्ण प्रयत्नांनी साध्य करून घेता येते. ही अशी अवस्था असते की, ज्या अवस्थेमध्ये व्यक्ती स्वत:साठी जगत नाही, तर व्यक्ती जे काही करते, जे काही तिला वाटते, तिच्या सर्व कृती या परमेश्वराला अर्पण या भावातून, परिपूर्ण विश्वासातून, स्वत:विषयीच्या चिंता, काळजी यांपासून विनिर्मुक्त होऊन केल्या जातात. या अवस्थेमध्ये स्वत:वरील सर्व प्रकारचे ओझे की, जे आता ओझे वाटतच नाही, ते सारे त्या परमेश्वरावर सोपविलेले असते. (परमेश्वरावर सारे काही सोपविले असल्यामुळे) स्वत:विषयी कोणतीही काळजी नसणे, (परमेश्वराखेरीज अन्य कशाचाही विशेषत:) स्वत:विषयीचा कोणताही विचार मनात नसणे, हा एक अवर्णनीय आनंद असतो.
(उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 03 : 256)

प्रामाणिक (असणे) हे फक्त एक विशेषण आहे. त्याचा अर्थ असा की, तुमची इच्छा ही खरीखुरी इच्छा असली पाहिजे. “मी अभीप्सा बाळगतो” असा जर तुम्ही नुसताच विचार करत बसाल आणि त्या अभीप्सेशी विसंगत अशा गोष्टी करत राहाल किंवा तुमच्या स्वतःच्या इच्छावासनांचीच पूर्ती करत राहाल किंवा विरोधी प्रभावाप्रत स्वतःला खुले कराल, तर ती इच्छा प्रामाणिक नाही, (असे समजावे).

– श्रीअरविंद (CWSA 29 : 50)

प्रामाणिकपणामध्ये (Sincerity) नुसत्या सचोटीपेक्षा (honesty) बराच अधिक अर्थ सामावलेला आहे. म्हणजे असे की, तुम्ही जे बोलता तेच तुम्हाला अभिप्रेत असते, तुम्ही जे प्रतिपादित करत असता त्याची तुम्हाला जाणीव असते, तसेच तुमच्या इच्छेमध्ये खरेपणा असतो. साधक जेव्हा ईश्वराचे साधन बनण्याची आणि ईश्वराशी एकरूप होण्याची अभीप्सा बाळगत असतो, तेव्हा त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रामाणिकपणाचा अर्थ असा असतो की, तो खरोखरच कळकळीने अभीप्सा बाळगत असतो व ईश्वराव्यतिरिक्तच्या इतर सर्व इच्छांना किंवा आवेगांना तो नकार देत असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 50)