Tag Archive for: प्रगती

 

श्रीअरविंद हे भूतकाळाशी किंवा इतिहासाशीदेखील संबंधित नाहीत. श्रीअरविंद म्हणजे प्रत्यक्षात येणारा भविष्यकाळ आहेत. तुम्हाला जर मागे रेंगाळत राहिलेले पांथस्थ होऊन जगायचे नसेल तर, वेगवान प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या शाश्वत तारुण्याचा तुम्ही आश्रय घेतला पाहिजे.
• श्रीमाताजी (CWM 12 : 211-212)

(श्रीमाताजी येथे सामान्य आघात आणि महाकालीचे प्रहार यातील फरक सांगत आहेत…)

साधक : एखाद्या व्यक्तीला किती आघात सहन करावे लागणार त्यांचे प्रमाण हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते का?

श्रीमाताजी : हो, ते त्या व्यक्तीवर अवलंबून असते. म्हणजे मी म्हटले त्याप्रमाणे ते तिच्या प्रगती करण्याच्या क्षमतेवर, तिच्या सामर्थ्यावर आणि ईश्वरी शक्तीला तिच्याकडून होणाऱ्या प्रतिरोधावर अवलंबून असते. ज्यांना या आघातांची आवश्यकता नसते असे फारच थोडे जण असतात.

साधक : महाकालीच्या आघाताचे स्वरूप कसे असते?

श्रीमाताजी : महाकालीने केलेल्या प्रहारामुळे तुम्हाला खूप आनंद होतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या हृदयामध्ये एक गोडशी ऊब जाणवते. तुम्हाला समाधान वाटते.

साधक : व्यक्तीने तशा प्रहाराची इच्छा बाळगली पाहिजे का? की तो प्रहार आपोआपच होतो?

श्रीमाताजी : हो, व्यक्तीला प्रगती करण्याची खरोखरच इच्छा असली पाहिजे, त्या इच्छेमध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे. व्यक्तीने खरोखर अगदी प्रामाणिकपणे असे म्हटले पाहिजे, “हो, मला प्रगती करायची आहे”, “काहीही झाले तरी मला प्रगती करायची आहे.” तेव्हा मग महाकालीकडून प्रहार केला जातो. परंतु मी म्हटले त्याप्रमाणे, ज्यामध्ये उत्कट आनंदाची धारणा असते अशा समृद्धीच्या शक्तीसहित तो आघात होतो.

तुम्ही जर एकदा निर्णय घेतला असेल, उदाहरणार्थ, स्वतःमधील एखादी चुकीची सवय थांबविण्याचा तुम्ही निश्चय केला असेल, किंवा तुम्ही जी चूक एकदा केली होती तीच पुन्हा न करण्याचा निश्चय केला असेल किंवा करायला अवघड वा अशक्यप्राय आहे आणि तरीही ती केली पाहिजे, अशी कोणतीतरी गोष्ट करण्याचा निर्णय तुम्ही घेतला असेल आणि असा निर्णय घेऊन, स्वतःच्या इच्छेबाबत तुमच्यापाशी पूर्ण प्रामाणिकपणा असेल तर, अशा वेळी तुम्ही जे करायचे ठरविले आहे तेच करण्यास भाग पाडण्यासाठी तुमच्यावर जर प्रचंड आघात झाला, तर तो आघातच असतो पण तेव्हा तुम्हाला तुमचा गौरव झाल्यासारखे वाटते, तुम्ही आनंदी होता, तुम्हाला हृदयामध्ये काहीतरी भव्योदात्त असे वाटू लागते. (कारण तो महाकालीचा प्रहार असतो.)

निव्वळ बाह्यवर्ती, यांत्रिक, भौतिक चेतनेमध्ये आणि अज्ञानदशेमध्ये जीवन जगत असताना, ज्या ज्या मूर्खपणाच्या गोष्टी तुम्ही करता, त्याचे स्वाभाविक परिणाम म्हणून अटळपणे व अघटितपणे तुमच्यावर होणारे आघात आणि तुम्ही स्वतःवर प्रभुत्व मिळविण्याचा निश्चय केल्यानंतर, तुम्ही ज्या उच्चतर अवस्थेत उन्नत होता आणि काहीही झाले तरी, सत्याच्या चेतनेमध्येच जीवन व्यतीत करायचा तुम्ही निर्धार करता, प्रगतीसाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल पण प्रगती करायचीच, असे जेव्हा तुम्ही ठरविता तेव्हा अशा तुमच्या उच्चतर अवस्थेमध्ये, तुमच्यावर होणारे आघात यांमध्ये जमीन-अस्मानाचे अंतर असते.

या उच्चतर अवस्थेमध्ये तुमच्या बाबतीत ज्या घटना घडतात त्या इतक्या अर्थपूर्ण असतात की, तुम्हाला त्या घटनांमध्ये दीप्तिमान असणारे सत्य स्पष्टपणे दिसून येते; जणू काही तुम्हाला दीपस्तंभ दिसावा त्याप्रमाणे तुमचा मार्ग उजळवून टाकणारा प्रकाश तुम्हाला दिसतो, तो प्रकाश तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि हे सारे तुम्हाला स्पष्टपणे दिसून येते. तुमच्या पाठीवर एखादा धोंडा येऊन कोसळावा त्याप्रमाणे तो आघात तुमचा विनाश करणारा नसतो तर, त्यामध्ये उत्कट दीप्तिमानता असते. आणि म्हणूनच असे म्हटले जाते की, फक्त पहिल्या पायरीवरच प्रयत्नांची खरी आवश्यकता असते. येथे पहिली पायरी म्हणजे त्या अज्ञानदशेच्या पातळीवरून बाहेर पडून तिच्या वर असणाऱ्या पातळीवर चढून जाणे आणि असे झाल्यानंतर मग सारे, सारे काही बदलून जाते. परंतु व्यक्तीने त्या पातळीवरून पूर्णतः बाहेर पडले पाहिजे, तिने तिथेच थांबून राहता कामा नये, व्यक्तीने दोन दगडांवर पाय ठेवता कामा नये, कारण तसे चालत नाही.

– श्रीमाताजी (CWM 06 : 324-326)

(महाकालीचे प्रहार कधीकधी व्यक्तीच्या प्रगतीसाठी आवश्यक का असतात त्याचे कारण कालच्या भागात आपण विचारात घेतले. त्यावर एका साधकाने शंका विचारली आहे.)

साधक : मग व्यक्तीवर सर्व आघात एकदमच का होत नाहीत?

श्रीमाताजी : तसे झाले तर ते तुम्हाला मारक ठरेल. कारण तो प्रहार जर तुम्हाला वठणीवर आणण्याइतपत पुरेसा जोरदार असेल तर तो तुम्हाला चिरडूनदेखील टाकू शकेल. तुमचं अगदी चिपाड होऊन जाईल. परंतु तुम्ही जर थोडी थोडी प्रगती करत राहिलात, आज थोडी, उद्या थोडी अशी क्रमाक्रमाने प्रगती करत राहाल, ते आघात पचवत राहाल तर मग तुम्ही टिकून राहू शकाल.

अर्थातच ही गोष्ट आंतरिक सामर्थ्यावर, आंतरिक प्रामाणिकपणावर आणि प्रगती करण्याच्या तुमच्या क्षमतेवर, अनुभवातून शहाणपण शिकण्यावर आणि मुख्य म्हणजे, मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे ते शहाणपण विसरून न जाण्यावर अवलंबून असते. ते न विसरण्याइतपत जर व्यक्ती भाग्यवान असेल तर मग ती वेगाने प्रगती करू शकते. अशी व्यक्ती वेगाने पुढे जाऊ शकते.

आणि त्याच वेळी जर समजा व्यक्तीकडे आंतरिक नैतिक सामर्थ्य असेल तर, तिची प्रगती अधिक वेगाने सुद्धा होऊ शकते. म्हणजे समजा, व्यक्ती त्या दुःखाग्नीमुळे पोळून निघाली आणि त्याची धग कमी होऊ न देता जर ती व्यक्ती त्या दुःखाच्या मुळापर्यंत जाऊन पोहोचली तर, तिची प्रगती अधिक वेगाने होऊ शकते. परंतु बहुसंख्य लोक एवढे सामर्थ्यशाली नसतात. उलट ते चटकन ती गोष्ट लपवून ठेवण्याचा, अगदी स्वतःपासूनसुद्धा ती गोष्ट लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. व्यक्ती स्वतःच स्वतःला अगदी क्षुद्र किरकोळ स्पष्टीकरणं देत असते. व्यक्तीने जो मूर्खपणा केलेला असतो त्यासाठी ती अनेकानेक कारणं सांगत असते. (क्रमशः)

• श्रीमाताजी (CWM 06 : 324)

(एखाद्या व्यक्तीमध्ये प्रगती करण्याची प्रामाणिक आस असेल तर तिच्या प्रगतीसाठी, वेळप्रसंगी महाकालीकडून तिच्यावर प्रहारदेखील केले जातात, या बाबतीतले तथ्य श्रीमाताजी येथे उलगडवून दाखवीत आहेत. हा भाग विस्तृत असल्यामुळे क्रमशः देत आहोत.)

श्रीमाताजी : प्रामाणिक असणे खरोखरच खूप कठीण असते… आणि म्हणूनच तुमच्यावर वारंवार आघात होत राहतात. कधीकधी तर ते आघात अधिकच भयानक होतात कारण तुमच्यामधील मूर्खपणा नाहीसा करण्याचा तोच एकमेव मार्ग असतो; संकटे का कोसळतात त्याचे हे कारण आहे. जेव्हा तुम्ही अतीव वेदनादायी अशा परिस्थितीमध्ये सापडलेले असता आणि तुमच्यावर खोलवर परिणाम करेल अशा परिस्थितीला तुम्हाला सामोरे जावे लागते, तेव्हाच तुमच्यातील मूर्खपणा थोड्याफार प्रमाणात तरी नाहीसा होतो. पण तो थोडा नाहीसा झाला तरी, अजूनही आतमध्ये थोडातरी शिल्लक असतोच आणि म्हणूनच दुःखसंकटादी साऱ्या गोष्टी इतक्या दीर्घकाळ चालू राहतात…

आपण म्हणजे कोणीच नाही, आपण काहीच करू शकत नाही, आपले अस्तित्वच नाही, आपण खरोखर अगदी कोणीच नाही, त्या दिव्य चेतनेखेरीज आणि ईश्वरी कृपेखेरीज खरोखर कोणते अस्तित्वच नाही, याची व्यक्तीच्या अंतःकरणात खोलवर जाण येण्यासाठी जीवनामध्ये कितीतरी आघात आवश्यक असतात.

ज्या क्षणी व्यक्तीला या गोष्टीची जाण येते त्या क्षणीच सारे दुःखभोग संपून जातात; सारी संकटे, अडचणी दूर होतात. व्यक्तीला जेव्हा हे पूर्णपणे कळते तेव्हा दिव्य चेतनेला विरोध करणारे तिच्यामध्ये काहीच शिल्लक राहत नाही… अर्थात या गोष्टीला खूप काळ लागतो. (क्रमशः)

• श्रीमाताजी (CWM 06 : 323-324)

 

प्रामाणिकपणा ही ईश्वराप्रत जाणाऱ्या दरवाजाची किल्ली आहे.
*
प्रामाणिक व्हा. प्रामाणिकपणा हे दिव्यत्वाचे‌ महाद्वार आहे.
*
तुम्ही प्रामाणिक राहा आणि मग जर आवश्यकता पडलीच तर हजार वेळासुद्धा तुमच्या चुका सुधारण्याची माझी तयारी आहे.
*
घाबरू नका, तुमचा प्रामाणिकपणा हेच तुमचे संरक्षक-कवच आहे.
*
साधासरळ प्रामाणिकपणा हा सर्व प्रकारच्या प्रगतीचा प्रारंभ असतो.
*
तुमचे आध्यात्मिक ध्येय साध्य करण्याकरता, प्रामाणिक व्हा, म्हणजे असे की, प्रामाणिकपणाला तुमच्या जीवनाचे एकमेव उद्दिष्ट बनवा.
*
पूर्णपणे प्रामाणिक व्हा; म्हणजे कोणत्याही विजयापासून तुम्हाला वंचित केले जाणार नाही.
*
प्रामाणिकपणा व निष्ठा हे योगमार्गाचे दोन रक्षक आहेत.
*
जे लोक प्रामाणिक असतात त्यांना मी साहाय्य करू शकते व ईश्वराकडे अगदी सहजपणे वळवू शकते, पण जेथे अप्रामाणिकपणा असतो तेथे मात्र मी फारसे काही करू शकत नाही.
*
जेथे प्रामाणिकपणा आणि सदिच्छा असते तेथे ईश्वरी साहाय्यसुद्धा असते.
*
प्रत्येकालाच संधी देण्यात आलेली असते आणि सर्वांसाठी ईश्वरी साहाय्यदेखील उपलब्ध असते. पण प्रत्येकाला त्याचा किती लाभ होणार हे त्याच्या प्रामाणिकपणाच्या प्रमाणावर अवलंबून असते.

– श्रीमाताजी (CWM 14 : 65, 66, 68, 86)

 

साधक : ईश्वरी कृपेच्या स्पर्शामुळे अडचणींचे प्रगतीच्या संधीमध्ये रूपांतर कसे होते?

श्रीमाताजी : सोपे आहे हे समजायला. कल्पना करा की, तुम्ही एखादी मोठी चूक केली आहे आणि आता तुम्ही मोठ्या अडचणीमध्ये सापडला आहात. तुमच्यामध्ये जर श्रद्धा असेल, ईश्वरी कृपेवर तुमचा विश्वास असेल आणि तुम्ही जर खरोखरच तिच्यावर विसंबून राहिलात तर, तुम्हाला अचानक असे जाणवेल की, हा एक धडा आहे. म्हणजे, ही अडचण किंवा तुम्ही केलेली चूक म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, तो एक धडा आहे आणि तुमच्यामधील कोणत्या गोष्टीमध्ये बदल करायला हवा हे तुम्ही शोधावे, ते शिकविण्यासाठी ती चूक घडली होती. आणि अशा रितीने, ईश्वरी कृपेच्या साहाय्याने तुमच्यामधील कोणत्या गोष्टीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे, त्याचा तुम्हाला शोध लागतो. आणि मग तुम्ही त्या गोष्टीमध्ये बदल करता. अशा रितीने, आलेल्या त्या अडचणीमधून तुम्ही एक मोठी झेप घेतलेली असते, तुम्ही खूप प्रगती केलेली असते. हे असे सदासर्वकाळ चालू असते.

फक्त त्यासाठी तुम्ही खरोखरच पूर्ण प्रामाणिक असले पाहिजे. म्हणजे तुम्ही ईश्वरी कृपेवर भरवसा ठेवला पाहिजे आणि तिला तुमच्यामध्ये कार्य करू दिले पाहिजे. तुमच्यामधील एखादा घटक साहाय्यासाठी याचना करत आहे आणि त्याचवेळी दुसरा घटक मात्र त्याला प्रतिकार करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे, असे असता कामा नये. त्या दुसऱ्या घटकाला स्वतःमध्ये बदल करण्याची मुळीच इच्छा नसते, आणि त्यामुळे तो प्रतिकार करत राहतो, हीच खरी अडचण असते. म्हणून, तुम्ही हातचे काहीही राखून न ठेवता अगदी पूर्णपणे, समग्रपणे प्रामाणिक राहिले पाहिजे, असे श्रीअरविंद सांगतात. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 242)

 

(तुम्हाला सत्याची आस असेल तर तुम्हाला सत्य गवसतेच, असे श्रीमाताजी सांगत आहेत. पण त्यासाठी तुम्ही, तुमच्या इच्छाआकांक्षामुळे स्वत:च्या त्रुटींकडे डोळेझाक करता कामा नये किंवा त्यांचे समर्थन करता कामा नये, हेदेखील त्या सांगत आहेत.)

तुमच्यामध्ये जेव्हा प्रामाणिकपणा असतो तेव्हा, तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी ईश्वरी कृपा सज्ज असते; तेव्हा तुम्हाला ईश्वरी साहाय्य, मार्गदर्शन लाभतेच हे तुमच्या लक्षात येईल. मग पुढे फार काळ तुमच्याकडून चुका घडत नाहीत.

प्रगतीसाठीच्या तळमळीमध्ये असणारा प्रामाणिकपणा व सत्यशोधनाबाबतच्या संकल्पामध्ये असणारा प्रामाणिकपणा आणि (ज्याला आध्यात्मिकदृष्ट्या विशुद्ध मानले जाते अशा) विशुद्ध असण्याच्या आवश्यकतेमध्ये असणारा प्रामाणिकपणा – हा प्रामाणिकपणा हीच सर्व प्रकारच्या प्रगतीची गुरुकिल्ली असते.

– श्रीमाताजी (CWM 03 : 192)

(पूर्वार्ध)

(व्यक्तीच्या मनात जे पूर्वग्रह, पूर्वकल्पना असतात त्यामुळे तिच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये कसा अडथळा येतो, हे श्रीमाताजींनी सांगितले आणि आता त्या पुढे सांगत आहेत…)

व्यक्ती जर अगदी सहजस्वाभाविक रितीने खुली होऊ शकली… (श्रीमाताजी हातांची ओंजळ खुली करून दाखवितात.) अशा साधेपणाने खुली होऊ शकली आणि अशा रितीने, येणारी प्रत्येक गोष्ट स्वीकारण्यासाठी व्यक्ती तयार झाली तर, कदाचित काहीतरी (प्रगती) घडून येईल. अर्थातच, तुमच्यापाशी प्रगतीची तृष्णा असली पाहिजे. काही जाणून घेण्याची, स्वतःचे रूपांतरण करण्याची तळमळ तुमच्यामध्ये असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिव्य प्रेम व सत्या‌विषयीची आस तुमच्यामध्ये असेल आणि ती आस जर तुम्ही तशीच कायम ठेवू शकलात तर तुम्ही वेगाने प्रगती करता. खरोखर, ही आस, ही गरजच महत्त्वाची असते. इतर गोष्टी तितक्याशा महत्त्वाच्या नसतात. जर कशाची जरुरी असेल तर ती असते आस बाळगण्याची! (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (Conversation with a Disciple, October 7, 1964)

चैत्य पुरुष (अंतरात्मा, psychic being) जेव्हा प्रबल आणि अग्रस्थानी आलेला असतो तेव्हा तो उघडपणे मदत करतो. इतकेच नव्हे तर तो मन, प्राण आणि शारीरिक प्रकृती यांचे देखील सुशासन करू शकतो. सत्य काय आणि मिथ्या काय, ईश्वरी काय किंवा असुरी काय, योग्य काय आणि अयोग्य काय, याविषयीचे स्पष्ट संकेत तो देतो. एवढेच नाही तर, विरोधी शक्तींचे सर्व हल्लेसुद्धा तो परतवून लावतो.

*

‘आंतरात्मिक दृष्टिकोन (psychic attitude) बाळगण्याची खरी आवश्यकता आहे,’ हा तुमचा विचार योग्यच आहे. आंतरात्मिक दृष्टिकोन बाळगल्यामुळे प्रगती साधीसरळ, सहजस्वाभाविक, आनंदमय आणि सुलभ होऊ शकते. चिकाटी बाळगा, साधना सोडून देण्याचे काहीच कारण नाही. उद्भवणाऱ्या अडीअडचणींमुळे नाउमेद होऊ नका. सरतेशेवटी विजय आणि चिरस्थायी शांती निश्चित आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 339 & 340)

तुम्ही प्रत्येकाने एक गोष्ट करण्याचा प्रयत्न करावा, असे मी तुम्हाला सुचवेन. ती अशी की, ‘दिवसातून फक्त एक तास, अगदी अनिवार्य आवश्यक शब्दांव्यतिरिक्त काहीही बोलायचे नाही. एक शब्द अधिक नाही की उणा नाही. तुमच्या दैनंदिन जीवनातील, तुमच्या सोयीची अशी एक तासाभराची वेळ निवडा आणि त्या तासाभरात स्वतःचे अगदी जवळून निरीक्षण करा आणि अगदी आवश्यक तेवढेच शब्द उच्चारा.’

(असे म्हटल्याबरोबर) पहिली अडचण निर्माण होते ती अशी की, अगदी अनिवार्य, आवश्यक असे शब्द कोणते आहेत आणि कोणते नाहीत हे ओळखायचे कसे? खरंतर, हाच एक स्वयमेव अभ्यासाचा विषय आहे आणि (तुम्ही सातत्याने त्याचा अभ्यास करत राहिलात तर) दर दिवशी तुमच्यामध्ये अधिकाधिक प्रगती होत राहील. नंतर, तुमच्या असे लक्षात येईल की, जोपर्यंत तुम्ही काहीच बोलत नसता तोपर्यंत पूर्णपणे शांत राहणे तितकेसे अवघड नसते. परंतु एकदा का तुम्ही बोलायला सुरुवात केलीत की मग मात्र तुम्ही नेहमीच दोन, तीन, दहा, बारा, वीस निरुपयोगी शब्द बोलत राहता, की जे शब्द उच्चारण्याची (वास्तविक) अजिबात आवश्यकता नसते.

– श्रीमाताजी (CWM 03 : 259)