Tag Archive for: प्रगती

 

प्रामाणिकपणा ही ईश्वराप्रत जाणाऱ्या दरवाजाची किल्ली आहे.
*
प्रामाणिक व्हा. प्रामाणिकपणा हे दिव्यत्वाचे‌ महाद्वार आहे.
*
तुम्ही प्रामाणिक राहा आणि मग जर आवश्यकता पडलीच तर हजार वेळासुद्धा तुमच्या चुका सुधारण्याची माझी तयारी आहे.
*
घाबरू नका, तुमचा प्रामाणिकपणा हेच तुमचे संरक्षक-कवच आहे.
*
साधासरळ प्रामाणिकपणा हा सर्व प्रकारच्या प्रगतीचा प्रारंभ असतो.
*
तुमचे आध्यात्मिक ध्येय साध्य करण्याकरता, प्रामाणिक व्हा, म्हणजे असे की, प्रामाणिकपणाला तुमच्या जीवनाचे एकमेव उद्दिष्ट बनवा.
*
पूर्णपणे प्रामाणिक व्हा; म्हणजे कोणत्याही विजयापासून तुम्हाला वंचित केले जाणार नाही.
*
प्रामाणिकपणा व निष्ठा हे योगमार्गाचे दोन रक्षक आहेत.
*
जे लोक प्रामाणिक असतात त्यांना मी साहाय्य करू शकते व ईश्वराकडे अगदी सहजपणे वळवू शकते, पण जेथे अप्रामाणिकपणा असतो तेथे मात्र मी फारसे काही करू शकत नाही.
*
जेथे प्रामाणिकपणा आणि सदिच्छा असते तेथे ईश्वरी साहाय्यसुद्धा असते.
*
प्रत्येकालाच संधी देण्यात आलेली असते आणि सर्वांसाठी ईश्वरी साहाय्यदेखील उपलब्ध असते. पण प्रत्येकाला त्याचा किती लाभ होणार हे त्याच्या प्रामाणिकपणाच्या प्रमाणावर अवलंबून असते.

– श्रीमाताजी (CWM 14 : 65, 66, 68, 86)

 

साधक : ईश्वरी कृपेच्या स्पर्शामुळे अडचणींचे प्रगतीच्या संधीमध्ये रूपांतर कसे होते?

श्रीमाताजी : सोपे आहे हे समजायला. कल्पना करा की, तुम्ही एखादी मोठी चूक केली आहे आणि आता तुम्ही मोठ्या अडचणीमध्ये सापडला आहात. तुमच्यामध्ये जर श्रद्धा असेल, ईश्वरी कृपेवर तुमचा विश्वास असेल आणि तुम्ही जर खरोखरच तिच्यावर विसंबून राहिलात तर, तुम्हाला अचानक असे जाणवेल की, हा एक धडा आहे. म्हणजे, ही अडचण किंवा तुम्ही केलेली चूक म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, तो एक धडा आहे आणि तुमच्यामधील कोणत्या गोष्टीमध्ये बदल करायला हवा हे तुम्ही शोधावे, ते शिकविण्यासाठी ती चूक घडली होती. आणि अशा रितीने, ईश्वरी कृपेच्या साहाय्याने तुमच्यामधील कोणत्या गोष्टीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे, त्याचा तुम्हाला शोध लागतो. आणि मग तुम्ही त्या गोष्टीमध्ये बदल करता. अशा रितीने, आलेल्या त्या अडचणीमधून तुम्ही एक मोठी झेप घेतलेली असते, तुम्ही खूप प्रगती केलेली असते. हे असे सदासर्वकाळ चालू असते.

फक्त त्यासाठी तुम्ही खरोखरच पूर्ण प्रामाणिक असले पाहिजे. म्हणजे तुम्ही ईश्वरी कृपेवर भरवसा ठेवला पाहिजे आणि तिला तुमच्यामध्ये कार्य करू दिले पाहिजे. तुमच्यामधील एखादा घटक साहाय्यासाठी याचना करत आहे आणि त्याचवेळी दुसरा घटक मात्र त्याला प्रतिकार करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे, असे असता कामा नये. त्या दुसऱ्या घटकाला स्वतःमध्ये बदल करण्याची मुळीच इच्छा नसते, आणि त्यामुळे तो प्रतिकार करत राहतो, हीच खरी अडचण असते. म्हणून, तुम्ही हातचे काहीही राखून न ठेवता अगदी पूर्णपणे, समग्रपणे प्रामाणिक राहिले पाहिजे, असे श्रीअरविंद सांगतात. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 242)

 

(तुम्हाला सत्याची आस असेल तर तुम्हाला सत्य गवसतेच, असे श्रीमाताजी सांगत आहेत. पण त्यासाठी तुम्ही, तुमच्या इच्छाआकांक्षामुळे स्वत:च्या त्रुटींकडे डोळेझाक करता कामा नये किंवा त्यांचे समर्थन करता कामा नये, हेदेखील त्या सांगत आहेत.)

तुमच्यामध्ये जेव्हा प्रामाणिकपणा असतो तेव्हा, तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी ईश्वरी कृपा सज्ज असते; तेव्हा तुम्हाला ईश्वरी साहाय्य, मार्गदर्शन लाभतेच हे तुमच्या लक्षात येईल. मग पुढे फार काळ तुमच्याकडून चुका घडत नाहीत.

प्रगतीसाठीच्या तळमळीमध्ये असणारा प्रामाणिकपणा व सत्यशोधनाबाबतच्या संकल्पामध्ये असणारा प्रामाणिकपणा आणि (ज्याला आध्यात्मिकदृष्ट्या विशुद्ध मानले जाते अशा) विशुद्ध असण्याच्या आवश्यकतेमध्ये असणारा प्रामाणिकपणा – हा प्रामाणिकपणा हीच सर्व प्रकारच्या प्रगतीची गुरुकिल्ली असते.

– श्रीमाताजी (CWM 03 : 192)

(पूर्वार्ध)

(व्यक्तीच्या मनात जे पूर्वग्रह, पूर्वकल्पना असतात त्यामुळे तिच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये कसा अडथळा येतो, हे श्रीमाताजींनी सांगितले आणि आता त्या पुढे सांगत आहेत…)

व्यक्ती जर अगदी सहजस्वाभाविक रितीने खुली होऊ शकली… (श्रीमाताजी हातांची ओंजळ खुली करून दाखवितात.) अशा साधेपणाने खुली होऊ शकली आणि अशा रितीने, येणारी प्रत्येक गोष्ट स्वीकारण्यासाठी व्यक्ती तयार झाली तर, कदाचित काहीतरी (प्रगती) घडून येईल. अर्थातच, तुमच्यापाशी प्रगतीची तृष्णा असली पाहिजे. काही जाणून घेण्याची, स्वतःचे रूपांतरण करण्याची तळमळ तुमच्यामध्ये असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिव्य प्रेम व सत्या‌विषयीची आस तुमच्यामध्ये असेल आणि ती आस जर तुम्ही तशीच कायम ठेवू शकलात तर तुम्ही वेगाने प्रगती करता. खरोखर, ही आस, ही गरजच महत्त्वाची असते. इतर गोष्टी तितक्याशा महत्त्वाच्या नसतात. जर कशाची जरुरी असेल तर ती असते आस बाळगण्याची! (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (Conversation with a Disciple, October 7, 1964)

चैत्य पुरुष (अंतरात्मा, psychic being) जेव्हा प्रबल आणि अग्रस्थानी आलेला असतो तेव्हा तो उघडपणे मदत करतो. इतकेच नव्हे तर तो मन, प्राण आणि शारीरिक प्रकृती यांचे देखील सुशासन करू शकतो. सत्य काय आणि मिथ्या काय, ईश्वरी काय किंवा असुरी काय, योग्य काय आणि अयोग्य काय, याविषयीचे स्पष्ट संकेत तो देतो. एवढेच नाही तर, विरोधी शक्तींचे सर्व हल्लेसुद्धा तो परतवून लावतो.

*

‘आंतरात्मिक दृष्टिकोन (psychic attitude) बाळगण्याची खरी आवश्यकता आहे,’ हा तुमचा विचार योग्यच आहे. आंतरात्मिक दृष्टिकोन बाळगल्यामुळे प्रगती साधीसरळ, सहजस्वाभाविक, आनंदमय आणि सुलभ होऊ शकते. चिकाटी बाळगा, साधना सोडून देण्याचे काहीच कारण नाही. उद्भवणाऱ्या अडीअडचणींमुळे नाउमेद होऊ नका. सरतेशेवटी विजय आणि चिरस्थायी शांती निश्चित आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 339 & 340)

तुम्ही प्रत्येकाने एक गोष्ट करण्याचा प्रयत्न करावा, असे मी तुम्हाला सुचवेन. ती अशी की, ‘दिवसातून फक्त एक तास, अगदी अनिवार्य आवश्यक शब्दांव्यतिरिक्त काहीही बोलायचे नाही. एक शब्द अधिक नाही की उणा नाही. तुमच्या दैनंदिन जीवनातील, तुमच्या सोयीची अशी एक तासाभराची वेळ निवडा आणि त्या तासाभरात स्वतःचे अगदी जवळून निरीक्षण करा आणि अगदी आवश्यक तेवढेच शब्द उच्चारा.’

(असे म्हटल्याबरोबर) पहिली अडचण निर्माण होते ती अशी की, अगदी अनिवार्य, आवश्यक असे शब्द कोणते आहेत आणि कोणते नाहीत हे ओळखायचे कसे? खरंतर, हाच एक स्वयमेव अभ्यासाचा विषय आहे आणि (तुम्ही सातत्याने त्याचा अभ्यास करत राहिलात तर) दर दिवशी तुमच्यामध्ये अधिकाधिक प्रगती होत राहील. नंतर, तुमच्या असे लक्षात येईल की, जोपर्यंत तुम्ही काहीच बोलत नसता तोपर्यंत पूर्णपणे शांत राहणे तितकेसे अवघड नसते. परंतु एकदा का तुम्ही बोलायला सुरुवात केलीत की मग मात्र तुम्ही नेहमीच दोन, तीन, दहा, बारा, वीस निरुपयोगी शब्द बोलत राहता, की जे शब्द उच्चारण्याची (वास्तविक) अजिबात आवश्यकता नसते.

– श्रीमाताजी (CWM 03 : 259)

तुम्ही जर सरळ मार्गाचा अवलंब करू पाहात असाल, तुम्ही विनम्र असाल, तुम्ही विशुद्धतेसाठी प्रयत्नशील असाल, तुम्ही जर निरपेक्ष असाल, तुम्हाला एकांतवासाचे जीवन जगायचे असेल, तुम्हाला विवेकपूर्ण जीवन जगायचे असेल तर त्यामुळे तुमचा मार्ग सुकर होईल, गोष्टी सोप्या होतील या भ्रमात तुम्ही राहता कामा नये…

खरेतर परिस्थिती याच्या अगदी उलट असते. जेव्हा तुम्ही आंतरिक व बाह्य पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करू लागता, त्यावेळी एकदम सर्व अडचणी यायला सुरुवात होते. मी अनेकदा लोकांना असे बोलताना ऐकले आहे की, “काय हे? मी आत्ता जरा कुठे चांगले वागायचा प्रयत्न करतो आहे तर, प्रत्येकजण माझ्याशी वाईटच वागतोय.” पण हे असे का घडते? तर, चांगले वागताना तुम्ही कोणताही अंतःस्थ हेतू ठेवू नये, ही शिकवण तुम्हाला देण्यासाठीच ते घडत असते. म्हणजे असे की, इतरांनी तुमच्याशी चांगले वागावे म्हणून केवळ तुम्ही त्यांच्याशी चांगले वागायचे, असे नाही तर, व्यक्तीने चांगल्यासाठीच चांगले वागले पाहिजे. नेहमीसाठी तोच धडा आहे.

व्यक्तीने जितके काही चांगले, उत्तम करता येईल तेवढे करावे, परंतु फळाची अपेक्षा बाळगू नये, परिणाम दिसावेत म्हणून काही करू नये. म्हणजे, कोणत्यातरी बक्षिसाची अपेक्षा बाळगून सत्कृत्य करायचे, जीवन सुखकर व्हावे म्हणून चांगले वागायचे, असे करू नये. कारण या अशा दृष्टिकोनामुळे सत्कार्याचे मोलच नाहीसे होऊन जाते. चांगुलपणाबद्दलच्या प्रेमापोटीच तुम्ही चांगले असले पाहिजे, न्यायाच्या प्रेमापोटीच तुम्ही न्यायी असले पाहिजे; पावित्र्याच्या, शुद्धतेच्या प्रेमापोटीच तुम्ही पवित्र व शुद्ध असले पाहिजे आणि निरपेक्षतेवर असणाऱ्या प्रेमापोटीच तुम्ही निरपेक्ष असले पाहिजे, तरच तुम्ही (योग)मार्गावर प्रगत होण्याची खात्री बाळगू शकता.

– श्रीमाताजी (CWM 03 : 264-265)

तुम्हाला योगाभ्यासातून काय अपेक्षित आहे यासंबंधी तुम्हीच तुमच्या स्वतःच्या कल्पनांची एक उभारणी केली आहे आणि तुम्हाला जे अनुभव येऊ लागले आहेत त्याचे मूल्यमापन तुम्ही त्या आधारावरच नेहमी करत आहात आणि ते अनुभव तुमच्या अपेक्षेला धरून नसल्यामुळे किंवा तुम्हाला अपेक्षित असलेल्या तोलामोलाचे ते नसल्याने, तुम्ही एका क्षणानंतर म्हणू लागता की, “ते अनुभव अगदीच किरकोळ स्वरूपाचे आहेत.” आणि या असमाधानामुळेच तुम्ही प्रत्येक पावलागणिक (नकारार्थी) प्रतिक्रिया किंवा अंगचोरपणाकडे (recoil) वळत आहात आणि त्यामुळे सातत्यपूर्ण प्रगतीला खीळ बसत आहे.

ज्या योग्यांना अनुभूती येत असते त्यांना हे माहीत असते की, भलेही सुरुवातीस आलेले अनुभव अगदी किरकोळ असतील पण त्याला खूप महत्त्व असते आणि म्हणून सुरुवातीच्या त्या छोट्या-छोट्या अनुभवांची जोपासना केली पाहिजे आणि त्यांच्या विकसनासाठी पुष्कळ धीर धरला पाहिजे.

उदाहरणार्थ, तटस्थ अविचलता (neutral quiet) ही साधकाच्या प्राणिक अधीरतेला असमाधानकारक वाटू शकते पण तीच अवचिलता ही, सर्व आकलनाच्या अतीत असणाऱ्या शांतीकडे नेणारे पहिले पाऊल असू शकते. आंतरिक आनंदाची एखादी बारीकशी झुळूक किंवा चित्तथरार हा आनंदसागरामधील पहिलावहिला तुषार असू शकतो. (मिटल्या डोळ्यांपुढे चालणारा) प्रकाशाचा किंवा रंगांचा खेळ ही अंतर्दृष्टी आणि आंतरिक अनुभूतींची दालनं खुली करणारी गुरुकिल्ली असू शकते. दिव्य शक्तीच्या अवतरणांमुळे, शरीराचे होणारे स्तंभन आणि त्यातून शरीराचे स्थिरपणाने एकाग्र होणे, म्हणजे ज्याच्या अखेरीस ईश्वराची उपस्थिती आहे, अशा कोणत्यातरी एखाद्या गोष्टीचा पहिला स्पर्श असू शकतो; हे त्या योग्यांना माहीत असते. तो योगी अधीर नसतो. तर सुरू झालेल्या प्रगतीमध्ये कोणतेही विघ्न येऊ नये याची तो काळजी घेत असतो.

निश्चितपणे, काही साधकांना साधनेच्या आरंभिक काळात निर्णायक आणि ठोस अनुभव आलेले असतात पण त्यानंतर दीर्घ परिश्रम करावेच लागतात आणि त्यामध्ये काही कालावधी अनुभवविरहित किंवा संघर्षाचे असतात.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 14-15)

नैराश्यापासून सुटका – ३०

(साधकांनी पत्राच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नांना श्रीअरविंद पत्रोत्तरे देत असत. परंतु कधीकधी या कामाचा व्याप इतका वाढत असे की, त्यांना स्वतः पत्र लिहिणे अवघड होत असे, अशा वेळी ते आपल्या निकटवर्तीयाला पत्राचा मजकूर तोंडी सांगत असत आणि त्या बरहुकूम तो, संबंधित पत्रलेखकाला पत्रोत्तर पाठवीत असे. येथेही श्रीअरविंद तोंडी मजकूर सांगत असावेत, असे दिसते.)

नाउमेद होणे ही एक अशी गोष्ट आहे की, ज्यामध्ये साधकाने कधीही अडकून पडता कामा नये, असे त्याला सांगा. प्रगती अगदी वेगवान आणि सुकरतेने होत असेल किंवा प्रगतीचा वेग मंद असेल किंवा प्रगती खुंटलेली असेल, तरीही व्यक्तीने नेहमीच स्थिरपणाने वाटचाल करत राहिले पाहिजे. व्यक्ती नेहमीच योग्य वेळी तिच्या ध्येयाप्रत जाऊन पोहोचते. अडीअडचणी आणि अंधकाराचे कालावधी टाळता येण्यासारखे नसतात; त्यांना स्थिरचित्ताने आणि धैर्याने सामोरे जात, त्यांच्या पार जायचे असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 182)

जीवन जगण्याचे शास्त्र – २५

धीटपणा, धैर्य आणि चिकाटी हे आवश्यक असे पहिले गुण आहेत. तुम्हाला याची जाणीव असली पाहिजे की, तुम्ही जे जाणले पाहिजे त्याच्या तुलनेत तुम्ही जे जाणता ते म्हणजे काहीच नाही; तुम्ही जे करणे आवश्यक आहे त्याच्या तुलनेत तुम्ही जे करू शकता ते म्हणजे काहीच नाही आणि तुम्ही जे बनले पाहिजे त्याच्या तुलनेत तुम्ही आत्ता जे आहात ते म्हणजे काहीच नाही.

तुमच्या प्रकृतीमध्ये ज्याचा अभाव आहे ते प्राप्त करून घेण्याची, तुम्हाला अजूनपर्यंत जे माहीत नाही ते जाणून घेण्याची आणि तुम्हाला अजूनपर्यंत जे करता आलेले नाही ते करता यावे असा एक दृढ, अविचल संकल्प तुमच्यामध्ये असला पाहिजे. वैयक्तिक इच्छा-वासनारहिततेमधून येणाऱ्या शांतीमध्ये आणि प्रकाशामध्ये तुम्ही सतत प्रगती करत राहिले पाहिजे. “नेहमी अधिक चांगले, प्रगतिपथावर अधिक पुढे!” असा कृतिकार्यक्रमच तुम्ही ठरवून घेऊ शकता. ईश्वराचे आविष्करण करता यावे यासाठी त्याला जाणणे हेच तुमचे एकमेव ध्येय असले पाहिजे. चिकाटी बाळगा म्हणजे मग, तुम्ही आज जे करू शकत नाही ते तुम्हाला उद्या साध्य होऊ शकेल.

– श्रीमाताजी (CWM 16 : 430)