Tag Archive for: समर्पण

 

तुमची श्रद्धा, तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमचे समर्पण हे जेवढे अधिक परिपूर्ण असेल तेवढ्या अधिक प्रमाणात कृपा व संरक्षण तुमच्यासोबत असेल. आणि ‘दिव्य माते’चे संरक्षण आणि ‘तिची कृपा’ तुमच्यासोबत असताना, तुमच्या वाटेला जाण्याची हिंमत कोण करू धजावेल किंवा तुम्हाला कोणाची भीती बाळगण्याची गरजच काय? तिच्या कृपेचा आणि संरक्षणाचा थोडासा अंशदेखील तुम्हाला सर्व अडीअडचणी, अडथळे आणि धोके यांमधून पार करू शकतो; तर मग, तिने जर पूर्णतयाच तुम्हाला कवळून घेतले तर, कोणतीही असत्‌‍-शक्ती, मग ती कितीही बलवान का असेना, ती या जगातील असो किंवा इतर अदृश्य जगतांमधील असो, तिची बाधा न पोहोचता, सर्व संकटांपासून मुक्त होऊन, तुम्ही तुमच्या मार्गावरून पूर्ण सुरक्षितपणे वाटचाल करू शकता; कारण तो मार्ग ‘दिव्य माते’चा असतो.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 08)

(फक्त कर्मफलच नव्हे तर, संपूर्ण कर्मच ईश्वराला समर्पित केले पाहिजे. किंबहुना आपल्या माध्यमातून ती ईश्वरी शक्तीच ते कर्म करत आहे, असा अनुभव साधकाला आला पाहिजे, असे श्रीअरविंद सांगत आहेत. पण असे करत असताना प्रामाणिकपणा किती महत्त्वाचा असतो हेदेखील ते येथे स्पष्ट करत आहेत.)

साधकाने त्याच्या माध्यमातून ती दिव्य शक्ती, दिव्य उपस्थिती, दिव्य संकल्प कार्य करत आहे याची नेहमी जाणीव ठेवली पाहिजे. परंतु ही जाणीव बाळगण्याचा प्रयत्न करत असताना एक धोकासुद्धा असतो. तो असा की, छुप्या अहंकाराला किंवा एखाद्या निम्नस्तरीय शक्तीलाच तो ईश्वर समजण्याची शक्यता असते आणि त्यांच्या मागण्या हाच ‘ईश्वरी आदेश‌’ आहे, असे तो समजण्याची शक्यता असते. त्याच्यावर या कनिष्ठ प्रकृतीचा हल्ला होण्याचा धोका असतो. आणि उच्चतर शक्तीप्रत असणाऱ्या त्याच्या या तथाकथित समर्पणात विकार निर्माण होण्याची शक्यता असते. (म्हणजे ते समर्पण, समर्पण न ठरता उलट,) स्व-इच्छा आणि एवढेच नव्हे तर, त्याच्या स्वतःच्या इच्छावासना, त्याचे भावावेग यांमध्ये अधिकत्वाने आणि अनियंत्रितपणे रममाण होण्याचे निमित्त ठरू शकते.

आणि असे होऊ नये यासाठी संपूर्ण प्रामाणिकपणाची आवश्यकता असते. आणि हा प्रामाणिकपणा त्याने फक्त स्वतःच्या सचेत मनामध्येच बाणवला पाहिजे असे नाही तर, त्यापेक्षाही, गुप्त गतिविधींनी भरलेल्या स्वतःच्याच अंतस्तलीय (subliminal) भागामध्येसुद्धा बाणवण्याचा प्रयत्न करणे अधिक आवश्यक असते. कारण, तेथे म्हणजे विशेषतः त्याच्या अंतस्तलीय प्राणिक प्रकृतीमध्ये, एक नाटकं करणारा आणि निगरगट्ट असा भोंदू वसलेला असतो. साधकाने त्याच्या कर्माचे ओझे ईश्वराकडे सोपविण्यापूर्वी, योगमार्गावर त्याची बरीच वाटचाल झालेली असली पाहिजे. म्हणजे, इच्छावासनांचे निर्मूलन व्हावे या दिशेने आणि सर्व कर्म व सर्व घटना यांच्याकडे पाहण्याची एक स्थिर समत्वबुद्धी यावी यासाठी त्या साधकाची बरीच वाटचाल झालेली असली पाहिजे.

• श्रीअरविंद (CWSA 23 : 229-230)

साधक : प्रसन्नचित्ताने ईश्वराला शरण कसे जायचे, ते आम्हाला सांगाल का?

श्रीमाताजी : ती शरणागती प्रामाणिक असली पाहिजे. जर ती खरोखरच प्रामाणिक असेल तर ती आनंददायी होते. जोपर्यंत शरणागती स्वीकारण्यात आनंद वाटत नाही तोपर्यंत ती शरणागती पूर्णपणे प्रामाणिक नाही, असे निश्चित समजा; कारण जर ती शरणागती खरोखरच प्रामाणिक असेल तर, ती नेहमीच आनंददायी असते.

जर ती आनंददायी नसेल तर त्याचा अर्थ असा की, तुमच्या व्यक्तित्वातील काहीतरी तुम्हाला मागे खेचत आहे, तुमच्यामधील एखाद्या भागाला शरणागती स्वीकारणे नको आहे, त्याला त्याची स्वतःची म्हणून काही इच्छा आहे, काही आकांक्षा आहे, त्याचे स्वतःचे असे काही प्रयोजन आहे आणि तो भाग संतुष्ट नाहीये आणि म्हणून तो पूर्णपणे समर्पित होत नाहीये आणि म्हणून त्याच्या समर्पणामध्ये प्रामाणिकपणा नाहीये.

पण जर व्यक्ती समर्पणामध्ये प्रामाणिक असेल तर ती अगदी स्वाभाविकपणे परिपूर्णतया आनंदी असते. खरंतर व्यक्तीला आपोआपच अवर्णनीय असा आनंद अनुभवायला मिळतो. आणि म्हणूनच, जोपर्यंत तुम्हाला असा अवर्णनीय आनंद अनुभवायला मिळत नाहीये, तोपर्यंत तुम्ही प्रामाणिक नसल्याची ती खात्रीशीर खूण आहे असे समजा. म्हणजे तुमच्यामधील एखादा भाग, एखादा लहान किंवा मोठा भाग प्रामाणिक नाहीये असे निश्चित समजा.

• श्रीमाताजी (CWM 06 : 210–211)

 

तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर समस्या शिल्लक राहात नाही. फक्त प्रश्न असतो तो प्रामाणिक असण्याचा. तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर योगसाधनेची सुरुवातच करू नका. मानवी व्यवहारांमध्ये फसवणूक होऊ शकते, पण ईश्वराबरोबरच्या संबंधांमध्ये फसवणुकीची अजिबातच शक्यता नसते. तुम्ही जर विनम्र असाल, अंतरंगातून खुले असाल आणि तुमचे एकमेव उद्दिष्ट ईश्वराचा साक्षात्कार व त्याची प्राप्ती हेच असेल आणि तोच आपला ‘चालविता धनी’ व्हावा हे तुमचे उद्दिष्ट असेल तर तुम्ही (पूर्णयोगाच्या) या मार्गावरून सुरक्षितपणे वाटचाल करू शकाल.

– श्रीमाताजी (CWM 03 : 05)

 

योगमार्गाच्या वाटचालीस प्रारंभ करण्यासाठी पुढील तीन गोष्टी अनिवार्य असतात –

०१) संपूर्ण अस्तित्वामध्ये आणि त्याच्या सर्व गतिविधींमध्ये परिपूर्ण प्रामाणिकपणा.

०२) हातचे काहीही राखून न ठेवता केलेले संपूर्ण आत्म-समर्पण.

०३) स्वतःवर धीराने काम करत राहायचे आणि त्याच वेळी, परिपूर्ण अविचल शांती व समत्व स्थिरावेल असा विजय संपादन करायचा.

• श्रीमाताजी (CWM 14 : 41)

फक्त दिव्य सत्याचीच इच्छा बाळगणे; दिव्य मातेप्रत स्वतःला अधिकाधिक समर्पित करणे; या एका अभीप्सेव्यतिरिक्त असणाऱ्या सर्व वैयक्तिक मागण्या व वासना यांना नकार देणे; जीवनातील प्रत्येक कृती म्हणजे ईश्वराने दिलेले कार्य आहे हे जाणून, त्याच्या आड कोणताही अहंकार येऊ न देता, ते कार्य करणे आणि ते ईश्वराला समर्पित करणे म्हणजे पूर्णपणे प्रामाणिक असणे. हाच ‘दिव्य जीवना‌’चा पाया आहे.

व्यक्ती एकाएकी पूर्णपणे तशी होऊ शकत नाही. पण जर तिने सातत्याने तशी अभीप्सा बाळगली आणि ईश्वरी शक्तीने साहाय्य करावे म्हणून साध्यासरळ इच्छेने नेहमी आणि अगदी अंतःकरणपूर्वक तिचा धावा केला तर, या (दिव्य) चेतनेमध्ये व्यक्ती अधिकाधिक उन्नत होत राहते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 51)

 

प्रश्न : माताजी, प्रामाणिकपणाचा खरा अर्थ काय?

श्रीमाताजी : प्रामाणिकपणाच्या असंख्य श्रेणी आहेत. विचार करायचा एक आणि बोलायचे वेगळेच, मागायची एक गोष्ट पण हवी असते निराळीच गोष्ट, हे असे नसणे म्हणजे प्रामाणिकपणा; ही झाली प्रामाणिकपणाची अगदी पहिली श्रेणी. म्हणजे असे पाहा की, एखादी व्यक्ती स्वतःमध्ये उत्कट अभीप्सा आहे, आणि तिला आध्यात्मिक जीवन हवे आहे, असे म्हणत असते आणि अगदी त्याच वेळी… अगदी निर्लज्जपणे, आध्यात्मिक जीवनाच्या पूर्णपणे विरोधी वर्तन करत असते.

(प्रामाणिकपणाची आता दुसरी श्रेणी पाहूया.) बरेचदा असे घडते एखादी व्यक्ती असे म्हणते की, “मला प्रगती करायची आहे आणि मला माझ्यातील दोष काढून टाकायचे आहेत,” आणि अगदी त्याच वेळी, ती व्यक्ती स्वत:च्या चेतनेमध्ये असणाऱ्या त्याच दोषांना खतपाणी घालत असते आणि त्यामध्ये कोणी हस्तक्षेप करून, ते काढून टाकू नयेत म्हणून, ते दोष दडवून ठेवण्यासाठी धडपडत असते.

म्हणजे व्यक्तीमधील एखाद्या भागाला असे वाटत असते की, त्याच्यातील सर्व दोष, सर्व अपूर्णता इत्यादी गोष्टी निघून गेल्या पाहिजेत. ती व्यक्ती तसा विचार करत असते, तसे म्हणतही असते आणि तशी अभीप्सादेखील ती बाळगून असते; आणि अगदी त्याच वेळी, त्या व्यक्तीमधील इतर भाग मात्र ते दोष आणि त्या अपूर्णता दडवून ठेवू इच्छित असतात. ते दोष आणि त्या अपूर्णता उघड होऊ नयेत, त्यांच्यावर मात करायला कोणी भाग पाडू नये, अशा रितीने ते अशा गोष्टी अगदी काळजीपूर्वक दडवून ठेवतात. हे अगदी सार्वत्रिक आहे.

आणि हाच मुद्दा आपण अजून विस्ताराने विचारात घेतला तर असे लक्षात येते की, ईश्वराबद्दल असणाऱ्या मध्यवर्ती अभीप्सेला विरोधी असा एखादा भाग जरी आपल्यामध्ये शिल्लक असेल तर तोपर्यंत आपण पूर्णपणे प्रामाणिक आहोत, असे म्हणता येणार नाही. म्हणजेच सांगायचे झाले तर, परिपूर्ण प्रामाणिकपणा ही एक अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. आणि बहुधा, अगदी नेहमी, स्वत:च्या प्रकृतीमधील, स्वभावातील ज्या गोष्टी व्यक्तीला आवडत नाहीत त्या गोष्टी, स्वतःपासून सुद्धा लपवून ठेवण्याची धडपड व्यक्ती करत असते; व्यक्ती त्या गोष्टींचे समर्थन करणारी स्पष्टीकरणे देत राहते.

…या सर्व गोष्टींची गणना अप्रामाणिकपणामध्ये होते. जेव्हा अस्तित्वाच्या केंद्रस्थानी दिव्य उपस्थितीची चेतना असते, दिव्य संकल्पाची चेतना असते आणि व्यक्तीचे संपूर्ण व्यक्तित्वच जेव्हा दीप्तीमान, स्वच्छ, शुद्ध व संपूर्ण पारदर्शी असते आणि ते त्या दिव्य अस्तित्वाचा सर्व तपशिलांसह आविष्कार करत असते, तेव्हा तेथे संपूर्ण प्रामाणिकपणा अस्तित्वात येतो. आणि तेव्हा तो खराखुरा प्रामाणिकपणा असतो.

व्यक्तीने जेव्हा स्वत:ला ईश्वराप्रत समर्पित केलेले असते, जेव्हा ती फक्त ईश्वराच्याच इच्छेने चालण्याची आस बाळगत असते, तेव्हा तिच्याबाबतीत काहीही घडत असले तरी, ती नेहमीच म्हणजे अगदी कोणत्याही क्षणी, स्वत:च्या समग्र अस्तित्वानिशी ईश्वराला म्हणत असते की, “सारेकाही तुझ्याच इच्छेने घडू दे,” आणि खरोखर तशीच तिची भावना असते. आणि हे असे जेव्हा अगदी उत्स्फूर्तपणे, संपूर्णपणे, समग्रपणे घडते, तेव्हा ती व्यक्ती प्रामाणिक असते.

– श्रीमाताजी (CWM 06 : 397-398)

 

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला केलेले मार्गदर्शन…)

तुमचे मन अपेक्षांनी आणि इच्छांनी अतिव्याप्त आहे. साधना करणे शक्य झाले पाहिजे असे जर तुम्हाला वाटत असेल तर, तुम्ही अपेक्षा आणि इच्छा या गोष्टी तुमच्यामधून काढून टाकल्या पाहिजेत आणि अविचलता, निरपेक्षता, साधेपणा आणि समर्पण या गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजेत. सर्वप्रथम तुम्ही याच गोष्टी संपादन केल्या पाहिजेत. बाकीच्या गोष्टी नंतर येतील; कारण (अविचलता, निरपेक्षता, साधेपणा आणि समर्पण) या गोष्टीच साधनेचा खरा पाया आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 139)

असे म्हटले जाते की, “जेव्हा व्यक्ती सर्व वासनाविकारांपासून मुक्त होते तेव्हा ती अनिवार्यपणे अनंत अशा आनंदामध्ये प्रवेश करते.” पण मला तरी हा सर्वात जवळचा मार्ग वाटत नाही. कारण हा आनंद कदाचित काहीसा कोरडा, रुक्ष असू शकतो.

या देहाद्वारेच (वासनामुक्तीची) ही समस्या जर सोडवायची असेल तर धैर्य आणि निश्चय बाळगून झोकून द्या. वासनांच्या मागे धावण्याचा लांबचा, दुष्कर, कष्टदायक आणि निराशाजनक मार्ग सोडून, जर व्यक्तीने साधेपणाने, पूर्णपणे, विनाअट, नफ्यातोट्याची कोणतीही समीकरणे न मांडता, त्या परमोच्च सत्याप्रत, परमोच्च संकल्पशक्ती‌प्रत, परमोच्च अस्तित्वा‌प्रत स्वतःला समर्पित केले; त्याच्या हाती, स्वत:च्या संपूर्ण अस्तित्वाला सर्व अंगांनिशी संपूर्णतया सोपविले, तर तो अहंकारापासून सुटका करून घेण्याचा सर्वात वेगवान आणि क्रांतिकारी मार्ग असतो. लोकं म्हणतील की, तो मार्ग आचरणात आणणे खूप अवघड आहे. परंतु तेथे किमान एक प्रकारची आत्मीयता तरी आहे, उत्कटता आहे, उत्साह आहे, प्रकाश आहे, सौंदर्य आहे, उत्कट आणि सर्जनशील जीवन आहे.

…संपूर्ण, समग्र, परिपूर्ण, नि:शेष आणि देवघेवीविना असे जे आत्मदान असते, त्यालाच मी सकारात्मक मार्ग (Positive way) असे म्हणते. स्वत:च्या स्वार्थाचा कोणताही विचार न करता, स्व-केंद्रित न होता, स्वत:शी काहीही निगडित न करता; सर्वाधिक सुंदर, तेजोमय, आनंदमय, शक्तिवान, करुणामय, अनंत असे जे आहे केवळ त्याचाच विचार करणे, त्या विचारांमध्येच निमग्न राहणे यामध्ये इतका अगाध आनंद आहे की, त्याची तुलना दुसऱ्या कशाबरोबरच होऊ शकत नाही. ही एकच गोष्ट अर्थपूर्ण आहे, प्रयत्न करून पाहण्यायोग्य आहे. इतर सर्व गोष्टी म्हणजे निव्वळ कालापव्यय असतो. वळणावळणाच्या रस्त्याने, धीम्या गतीने, कष्टपूर्वक, पायरीपायरीने वर्षानुवर्षे पर्वत चढत जाणे आणि अदृश्य पंख पसरवून, थेट शिखराकडे झेपावणे यामध्ये जो फरक आहे, तो येथे आहे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 268-269)

संपूर्ण समता प्रस्थापित होण्यासाठी वेळ लागतो. आंतरिक समर्पणाद्वारे जिवाने ईश्वराला केलेले आत्मदान, ऊर्ध्वस्थित असणाऱ्या आध्यात्मिक स्थिरतेचे व शांतीचे अवतरण आणि समतेला विरोध करणाऱ्या अहंकारी, राजसिक आणि त्यासारख्या सर्व भावनांना दृढतापूर्वक, सातत्यपूर्ण व दीर्घकाळ दिलेला नकार या तीन गोष्टींवर समता आधारित असते. त्यासाठी हृदयामध्ये संपूर्ण आत्मनिवेदन व अर्पण भाव असणे ही गोष्ट सर्वप्रथम आवश्यक असते. रजोगुणाचा, अहंकाराचा त्याग इ. गोष्टी परिणामकारक होण्यासाठी आध्यात्मिक स्थिरतेमध्ये आणि समर्पणामध्ये वृद्धी होणे ही स्थिती आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 131)