Posts

साधक : आध्यात्मिक मार्ग अनुसरण्यासाठी एखाद्या व्यक्तीची तयारी झाली आहे का, हे ओळखण्याच्या काही खुणा आहेत का? विशेषेकरून, जेव्हा त्या व्यक्तीला आध्यात्मिक गुरु लाभलेला नसतो तेव्हा?

श्रीमाताजी : हो, सर्वात महत्त्वाची खूण म्हणजे, कोणत्याही परिस्थितीमध्ये जीवाची पूर्ण समता. ही शांत, स्थिर, महान शक्तीची एक प्रकारची भावना असते; आणि हा अगदी निरपवादपणे अटळ असा पाया आहे; हा शांतपणा म्हणजे जडत्वातून आलेला शांतपणा नसतो तर, एकाग्र शक्तीमुळे येणारी ती शांतीची संवेदना असते; ती तुम्हाला कायम स्थिर राहायला मदत करते. परिस्थिती कोणती का असेना, अगदी तुमच्या आयुष्यातील सर्वात भयंकर अशी परिस्थिती असली तरी, त्यावेळी देखील ती तुम्हाला अगदी स्थिर ठेवते. ही पहिली खूण आहे.

दुसरी खूण म्हणजे तुमच्या सामान्य, साधारण अशा चेतनेमध्ये तुम्ही पूर्णत: बंदिवान झालेला आहात; प्रचंड कठीण, काहीतरी गुदमरवून टाकणारे, दुःसह, अशा कशामध्ये तरी तुम्ही बंदिवान झाला आहात असे तुम्हाला वाटते; जणू काही एखादी अभेद्य भिंत तुम्हाला पाडायची आहे, असे तुम्हाला वाटते. आणि त्या यातना असह्य होतात, त्या घुसमटवणाऱ्या असतात. त्या यातना भेदून पलीकडे जाण्याचे आंतरिक प्रयत्न चालू असतात पण त्या भेदणे तुम्हाला जमत शक्य होत नाही. ही सुद्धा सुरुवातीच्या काही खुणांपैकी एक खूण आहे. याचा अर्थ असा की, तुमची आंतरिक चेतना अशा एका बिंदूपाशी येऊन पोहोचलेली असते की, आता तिचा बाह्य साचा हा तिच्यासाठी खूपच तोकडा पडू लागतो. सामान्य जीवन, सामान्य उद्योग, सामान्य नाती, या साऱ्या साऱ्या गोष्टी इतक्या लहान, इतक्या किरकोळ वाटू लागतात की, त्या तोडून टाकण्यासाठी आवश्यक असणारी एक शक्ती तुम्हाला तुमच्या आतूनच जाणवू लागते.

अजून एक खूण आहे, ती अशी की, तुमच्यामध्ये एक आस असते, आणि जेव्हा तुम्ही एकाग्र होता, तेव्हा तुम्हाला वरून काहीतरी खाली अवतरित होत आहे, तुम्हाला काही प्रतिसाद मिळत आहे असे जाणवते. एक प्रकाश, एक शांती, एक शक्ती तुमच्यामध्ये अवतरित होत आहे असे तुम्हाला जाणवते आणि तीही अगदी त्वरित – तुम्हाला त्यासाठी खूप वेळ घालवावा लागत नाही किंवा वाट पाहावी लागत नाही – आतून एक अभीप्सा उदित होते, एक हाक येते आणि लगेचच त्याला प्रतिसाद मिळतो. यावरूनही हे लक्षात येते की, (तुमचे ईश्वराबरोबरचे) ‘नाते’ चांगल्या रीतीने प्रस्थापित झाले आहे.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 97-98)

कोणत्याही परिस्थितीत अंतरंगामध्ये अविचल राहणे म्हणजे समत्व.
*
सुदृढ मनाच्या नियमनामुळे समता प्राप्त होऊ शकते. (संसारी माणूस सर्व प्रकारच्या अडचणी पेलूशकतो.) पण ती ‘समता’ नव्हे;तर ती ‘तितिक्षा’ असते. सहन करण्याची ही शक्ती समतेची पहिली पायरी आहे किंवा समतेचे पहिले तत्त्व आहे.
*
समता म्हणजे अहंकाराचा अभाव नव्हे तर, इच्छेचा आणि आसक्तीचा अभाव म्हणजे समत्व.
*
इतर लोक काय बोलतात किंवा काय सुचवितात याकडे लक्ष देण्यात अर्थ नाही. या दोन्ही गोष्टींमुळे प्रभावित न होण्यास शिकले पाहिजे. खरे संतुलन प्राप्त करून घेण्यासाठी, एक विशिष्ट अशी समता आवश्यक असते. ईश्वराचा साक्षात्कार हीच एकमेव महत्त्वाची गोष्ट आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 130,135,133),(CWSA 31 : 314)

ज्या व्यक्तीची चेतना ईश्वरी चेतनेशी एकत्व पावलेली असते अशी व्यक्ती सर्व गोष्टींना परिपूर्ण समत्वानेच सामोरी जाते.

– श्रीमाताजी
(Conversation with a Disciple, August 9, 1969)

*

समता हा या योगाचा (पूर्णयोगाचा) अत्यंत महत्त्वाचा भाग आहे; वेदना आणि दुःखभोग असतानादेखील समता बाळगणे आवश्यक आहे आणि त्याचा अर्थ असा की, दृढपणे आणि शांतपणे चिकाटी बाळगली पाहिजे; अस्वस्थ वा त्रस्त किंवा निराश वा उद्विग्न होता कामा नये तर, ईश्वरी संकल्पावर अविचल श्रद्धा ठेवून वाटचाल केली पाहिजे.मात्र समत्वामध्ये उदासीन स्वीकाराचा समावेश होत नाही. एखाद्या वेळी साधनेतील काही प्रयत्नांबाबत तात्पुरते अपयश आले तरी व्यक्तीने समत्व राखले पाहिजे; व्यक्तीने त्रस्त किंवा निराश होता कामा नये; तसेच ते अपयश म्हणजे ‘ईश्वरी इच्छे’चा संकेत आहे असे समजून, प्रयत्न सोडता कामा नयेत. उलट, तुम्ही त्यामागचे कारण शोधून काढले पाहिजे, त्या अपयशाचा अर्थ शोधून काढला पाहिजे आणि विजयाच्या दिशेने श्रद्धापूर्वक मार्गक्रमण केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 134)

संपूर्ण समता प्रस्थापित व्हायला वेळ लागतो. आणि ही समता पुढील तीन गोष्टींवर आधारित असते. – आंतरिक समर्पणाच्या द्वारे जीवाने ‘ईश्वरा’प्रत केलेले आत्म-दान, वरून अवतरित होणारी आध्यात्मिक स्थिरता व शांती, आणि समतेला विरोध करणाऱ्या, अहंकारी आणि राजसिक अशा साऱ्या भावनांना दृढ, दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण नकार.

यासाठी पहिली आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे, हृदयामध्ये संपूर्ण समर्पण व अर्पण भाव. रजोगुणाचा, अहंकाराचा त्याग इ. गोष्टी प्रभावी होण्यासाठी आध्यात्मिक स्थिरतेमध्ये वृद्धी आणि समर्पण या अटी आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 131)

कर्म आराधना – ४५

अडीअडचणींचा नाईलाजास्तव स्वीकार करणे हा कर्मयोगाचा भाग असू शकत नाही – तर घटना साहाय्यकारी असोत वा विरोधी असोत, त्या सद्भाग्यपूर्ण असोत वा दुर्भाग्यपूर्ण असोत; सौभाग्य असो अथवा दुर्भाग्य असो, प्रयत्नांना यश मिळो वा अपयश, या साऱ्या गोष्टींना स्थिर समतेने सामोरे जाणे आवश्यक असते. आवश्यक ते ते सारे करत असताना, गडबडून न जाता, न डगमगता, राजसिक आनंदाविना किंवा दुःखाविना, व्यक्तीने सर्व गोष्टी सहन करण्यास शिकले पाहिजे; आणि अडचणी वा अपयश आले तरीही खचून जाता कामा नये. एखादी व्यक्ती जीवनाच्या ओझ्याखाली दबून न जाता, जे जे करता येणे शक्य आहे ते ते सारे करत राहू शकते.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 243]

कर्म आराधना – ३०

‘ईश्वरी शक्ती’ ग्रहण करण्याची क्षमता येण्यासाठी आणि त्या शक्तीला तुमच्या माध्यमातून बाह्यवर्ती जीवनातील गोष्टींमध्ये कार्य करू देण्यासाठी तीन अटी आवश्यक असतात –

०१) अचंचलता, समता : घडणाऱ्या कोणत्याही घटनेने विचलित न होणे, मन स्थिरचित्त आणि दृढ राखणे, घडणाऱ्या घटनांकडे हा विविध शक्तींचा खेळ आहे या दृष्टीने पाहणे आणि स्वतः मनाने समचित्त राहणे.

०२) असीम श्रद्धा : जे सर्वोत्कृष्ट आहे तेच घडेल ही श्रद्धा बाळगणे, पण त्याबरोबरच, व्यक्ती जर स्वतःला खरेखुरे साधन बनवू शकली तर, त्याचे फळ ‘कर्तव्यम् कर्म’ अशा स्वरूपाचे असेल. म्हणजे, ‘ईश्वरी प्रकाशा’चे मार्गदर्शन प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या इच्छेला, जे कर्म करण्याची आवश्यकता भासेल तसे, ते कर्म असेल.

०३) ग्रहणशीलता : ‘ईश्वरी शक्ती’चा स्वीकार करण्याची व तिचे अस्तित्व अनुभवण्याची व त्यामध्ये ‘श्रीमाताजीं’ची उपस्थिती अनुभवण्याची ताकद म्हणजे ग्रहणशीलता. तसेच व्यक्तीने स्वत:च्या दृष्टीला, इच्छेला आणि कृतीला मार्गदर्शन करण्याची मुभा त्या ‘ईश्वरी शक्ती’ला देऊन, तिला कार्य करू देणे म्हणजे ग्रहणशीलता होय. व्यक्तीला जर या शक्तीची आणि तिच्या उपस्थितीची जाणीव होऊ शकली आणि व्यक्तीने कर्मातील चेतनेला या घडणसुलभतेचे (plasticity) वळण लावले तर, अंतिम परिणामाची खात्री असते. (अर्थात ही घडणसुलभता केवळ ‘ईश्वरी शक्ती’बाबतच असली पाहिजे, त्यामध्ये कोणत्याही परक्या तत्त्वाची सरमिसळ होऊ देता कामा नये.)

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 266]

विचार शलाका – २६

व्यक्तीला जेव्हा सर्वसामान्य वातावरणात राहून, दैनंदिन जीवन जगावे लागते तेव्हा आध्यात्मिक जीवनासाठी स्वत:ला तयार करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे – सर्वांगीण समता व अलिप्तता, आणि या अज्ञानमय विश्वात सद्यस्थितीतदेखील ‘ईश्वर’ आहे आणि ‘ईश्वरी इच्छा’ सर्व गोष्टींमध्ये कार्यकारी आहे याविषयी सश्रद्ध राहून, ‘गीते’मध्ये सांगितल्यानुसार ‘समता’वृत्तीची जोपासना करणे – हा आहे. …व्यक्तीमध्ये तसेच प्रकृतीमध्ये, प्रकाश व आनंद यांच्या पदार्पणाचा आणि स्थापनेचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे आध्यात्मिक समतेमध्ये विकसित होणे, हा असतो. त्यामुळे असुखकर, असहमत वस्तुंविषयीची तुमची अडचणदेखील दूर होईल. सर्व प्रकारच्या असमाधानकारकतेचा सामना या ‘समते’च्या वृत्तीद्वारे केला पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 344)

विचार शलाका – २५

भावनिक आवेग, भावभावना आणि मानसिक उत्साह यांना मी आता पाया बनवू इच्छित नाही. विशाल आणि मजबूत अशा समतेलाच मी माझ्या योगाचे अधिष्ठान बनवू इच्छितो. समतेवर अधिष्ठित असलेल्या जिवाच्या सर्व तऱ्हेच्या कृतींमध्ये, मला पूर्ण, स्थिर आणि अविचल असे सामर्थ्य हवे आहे आणि या शक्तिसामर्थ्याच्या सागरावर मला ‘ज्ञानसूर्य’ तळपताना हवा आहे आणि त्या तेजोमय विशालतेमध्ये अनंत प्रेमाचा परमानंद आणि आनंद आणि एकत्व सुस्थापित झालेले हवे आहेत.

मला हजारो शिष्यांची आवश्यकता नाही. क्षुद्र अशा अहंकारापासून मुक्त असणारे, ‘ईश्वरा’चे साधन बनलेले असे शंभर जरी शिष्य मला लाभले, तरी ते माझ्यासाठी पुरेसे असतील. नेहमीच्या पद्धतीच्या गुरुबाजीवर माझा विश्वास नाही. मला गुरु बनायचे नाहीये. मला काय हवे आहे तर, कोणीतरी एखादा माझ्या स्पर्शाने किंवा इतर कोणाच्या तरी स्पर्शाने जागृत होईल, त्याच्या सुप्त अशा आंतरिक दिव्यत्वातून तो आविष्कृत होईल आणि दिव्य जीवन प्रत्यक्ष उतरवू पाहील. अशी माणसेच या देशाची उन्नती करतील.

– श्रीअरविंद
(Bengali Writings : 372-373)

विचार शलाका – १९

संसारी मनुष्य सर्व प्रकारच्या अडचणी, संकटे सहन करू शकतो. तो हे समर्थ मानसिक नियंत्रणाच्या साहाय्याने करतो. परंतु ती समता नाही, ती तितिक्षा होय. सहन करण्याची ही ताकद म्हणजे समतेची केवळ पहिली पायरी किंवा समतेचा केवळ तो पहिला घटक होय.

*

समता नसेल तर साधनेचा भरभक्कम पायाच रचला जाऊ शकत नाही. परिस्थिती कितीही त्रासदायक असू दे, इतरांची वागणूक भलेही तुम्हाला न पटणारी असू दे, तुम्ही त्या साऱ्या गोष्टी एका सुयोग्य धीराने आणि कोणत्याही अस्वस्थ प्रतिक्रियांविना स्वीकारायला शिकला पाहिजेत. या गोष्टी म्हणजे समतेची कसोटीच असते. जेव्हा सर्व गोष्टी सुरळीत चालू आहेत, माणसं आणि परिस्थिती सुखकारक आहे तेव्हा समत्व बाळगणे, धीर राखणे सहजसोपे आहे. परंतु जेव्हा यापेक्षा विपरित परिस्थिती असते तेव्हा धीर, शांती, समत्व ह्यांच्या पूर्णतेचा कस लागतो, अशा परिस्थितीमध्ये, त्या अधिक बळकट, अधिक परिपूर्ण केल्या जाऊ शकतात.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 135), (CWSA 29 : 129)

“हे दुर्भाग्या, तुझे कल्याण होवो, कारण तुझ्या माध्यमातूनच मला माझ्या प्राणेश्वराचे मुखदर्शन झाले.” – असे श्रीअरविंदांनी एके ठिकाणी म्हटले आहे त्यावर भाष्य करताना श्रीमाताजी म्हणतात,

जर दुर्भाग्यामुळे एखाद्याला ईश्वराच्या मुखदर्शन झाले तर, त्याला दुर्भाग्य तरी कसे म्हणावे, नाही का ? अर्थातच, त्याला दुर्भाग्य म्हणताच येणार नाही, तो तर कृपाशीर्वाद ठरेल. आणि नेमकेपणाने हेच श्रीअरविंदांना येथे म्हणावयाचे आहे.

आपण ज्या अपेक्षा करतो, आपण ज्याची आशा बाळगतो, आपल्याला जे हवे असते, तसे जेव्हा घडत नाही; आपल्या इच्छाआकांक्षांपेक्षा काहीतरी विपरितच घडते तेव्हा, आपल्यातील अज्ञानामुळे आपण त्याला दुर्भाग्य म्हणतो आणि शोक करतो.

पण जर का आपण थोडेसे जरी समजदार झालो आणि त्याच घटनांचे खोलवर परिणाम काय झाले याचे अवलोकन केले तर, आपल्या असे ध्यानात येईल की, ह्याच घटना आपल्याला त्वरेने ईश्वराकडे, आपल्या प्राणेश्वराकडे घेऊन जात आहेत.

उलटपक्षी, सहज-सुखासीन परिस्थिती मात्र आपल्याला मार्गावर अळमटळम करण्यास प्रोत्साहित करते, ती परिस्थिती, या मार्गावर आपल्या समोर सौख्याची फुले पसरते आणि ती वेचून घेण्यासाठी आपण मार्गावर मध्येच थांबून राहतो. आपल्या प्रगतीमध्ये विलंब होऊ नये यासाठी, अशा गोष्टींचा निर्धारपूर्वक अस्वीकार करण्याइतपत आपण प्रामाणिकही नसतो किंवा खूपच दुर्बल असतो. यश किंवा छोट्याछोट्या सुखोपभांना सामोरे जायचे आणि तरीही मार्गावरून ढळायचे नाही, हे जमण्यासाठी व्यक्ती मूळातच दृढ असावी लागते किंवा ती मार्गावर पुष्कळ प्रगत झालेली असावी लागते.

असे जे कोणी करू शकतात, जे असे दृढनिश्चयी असतात, ते यशाच्या मागे धावत नाहीत, ते यश मिळविण्यासाठी आटापिटा करत नाही आणि जर यश प्राप्त झालेच तरी ते यश अगदी निःसंगपणे स्वीकारतात. कारण दुःख व दुर्भाग्यामुळे यांना जे तडाखे बसलेले असतात त्याचे मूल्य त्यांना माहीत असते आणि त्याची त्यांना कदरही असते.

आपल्याला यश व अपयश, आनंद व दुःख, सुदैव व दुर्दैव ह्या गोष्टी सारख्याच समाधानी स्थिरचित्तवृत्तीने स्वीकारण्यासाठी जी सक्षम बनवते, ती परिपूर्ण समता ही, आपण आपल्या ध्येयाच्या निकट पोहोचलो आहोत याची खूण, याची साक्ष असते. आणि खराखुरा योग्य दृष्टिकोनदेखील तोच असतो.

तात्पर्य असे की, ईश्वराने त्याच्या अपार करूणेतून, ज्या ज्या गोष्टींचा आपल्यावर वर्षाव केलेला असतो त्या साऱ्याच गोष्टी या आपल्यासाठी अद्भुत वरदान ठरतात.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 58-59)