ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

ईश्वरात राहावे, अहंभावात राहू नये

कर्म आराधना – १७

आपल्या प्रयत्नासाठी काही अटी आहेत आणि त्या अटी एका आदर्शाकडे निर्देश करतात. हा आदर्श पुढील सूत्रांत व्यक्त करता येईल.

‘ईश्वरा’त राहावे, अहंभावात राहू नये; लहानशा, अहंभावी जाणिवेत राहून नव्हे; तर ‘सर्वात्मक व सर्वातीत’ पुरुषाच्या चेतनेत राहून, विशाल पायावर ठामपणे सुस्थिर होऊन जीवन जगावे.

सर्व प्रसंगी व सर्व जिवांशी पूर्ण समत्वबुद्धीने वागावे; आपले स्वत:बरोबर आणि आपले ‘ईश्वरा’बरोबर जसे वर्तन असते त्याप्रमाणे, आपण इतरांकडे पाहावे व त्यांना जाणून घ्यावे. आपल्या स्वत:मध्ये इतर सर्वांना पाहावे व सर्वांना ‘ईश्वरा’मध्ये पाहावे; आणि ‘ईश्वर’ सर्वांमध्ये आहे, आपणही इतर सर्वांमध्ये आहोत, ही जाणीव बाळगावी.

अहंभावात राहून नव्हे; तर ‘ईश्वरा’त निमग्न राहून कर्म करावे. आणि या ठिकाणी पहिली गोष्ट ही ध्यानात ठेवावी ती अशी की, वैयक्तिक गरजा वा वैयक्तिक आदर्शाकडे लक्ष ठेवून कृतीची निवड करायची नाही; तर आपल्या ऊर्ध्वस्थित असणारे असे जे जिवंत सर्वोच्च ‘सत्य’ आहे त्याची आज्ञा असेल त्यानुसार कृतीची निवड करायची. दुसरी गोष्ट, आपल्या आध्यात्मिक चेतनेची बैठक पुरेशी तयार झाली म्हणजे मग, आपल्या स्वत:च्या स्वतंत्र इच्छेने वा विचाराने, कृती करायची नाही; तर आपल्या पलीकडे असलेल्या ईश्वरी ‘इच्छे’चे मार्गदर्शन आणि प्रेरणा यांच्या प्रभावाने जी कृती आपल्या हातून घडेल, वाढेल अशा पद्धतीने ती अधिकाधिक प्रमाणात घडू द्यायची, वाढू द्यायची. आणि शेवटी या साधनेचा श्रेष्ठ परिणाम : आपण स्वतःला उन्नत करून ‘ईश्वरी शक्ती’शी एकरूप व्हायचे; ज्ञान, शक्ती, जाणीव, कृती आणि अस्तित्वाचा आनंद या सर्व बाबतीत आपण ईश्वरी शक्तीशी एकरूप व्हावयाचे; आपली क्रियाशीलता मृत्युवश मानवी वासनेने, प्राणिक प्रेरणेने, भ्रामक मानसिक ‘स्वतंत्र’ इच्छेने प्रेरित व शासित होत नसून, ती अमृत आत्मानंद आणि अनंत आत्मज्ञान यांच्या प्रेरणेने, स्वच्छ ज्ञानाच्या प्रकाशात योजली जात आहे आणि विकसित होत आहे, ही जाणीव व भावना आपल्या ठिकाणी स्थिर करायची. कारण ही अशी कृती असते की जी, प्राकृतिक मनुष्य हा दिव्य ‘आत्म्या’च्या आणि शाश्वत ‘चैतन्या’च्या जाणीवपूर्वकपणे आधीन झाल्याने आणि दिव्य ‘आत्म्या’मध्ये आणि शाश्वत ‘चैतन्या’मध्ये विलीन झाल्याने घडून येते; हेच ‘चैतन्य’ विश्व-‘प्रकृती’ला मार्गदर्शन करत असते आणि ते कायमच तिच्या अतीत असते.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 101)

Latest posts by श्रीअरविंद (see all)
श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

मुलांचे संगोपन

(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…

15 hours ago

विजयाची खात्री

जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…

2 days ago

सकारात्मक वृत्तीचा परिणाम

  (लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…

3 days ago

स्वप्नांवर विश्वास ठेवा

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…

4 days ago

उपयुक्ततावादाचा आजार

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…

5 days ago

शिक्षण आणि संस्कृती

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…

6 days ago