साधना, योग आणि रूपांतरण – १४१
(कर्मव्यवहार करत असताना, वेगवेगळ्या स्वभावाच्या, वेगवेगळ्या वृत्तीप्रवृत्तीच्या व्यक्ती आपल्या संपर्कात येतात. तेव्हा कर्मामधील सुसंवादपूर्ण वातावरणासाठी आणि पर्यायाने कार्यसिद्धीसाठी कधीकधी स्वतःच्या स्वभावालाही मुरड घालावी लागते, त्याला वळण लावावे लागते हे श्रीअरविंद येथे सांगत आहेत.)
नेहमीच दोन्हीही बाजूंनी काही ना काही दोष असतात आणि मग त्याचे पर्यवसान हे विसंवादामध्ये होत असते.
तुमच्या बाजूचा विचार करता… इतरांचे अतिशय कठोर मूल्यमापन करण्याची तुमची प्रवृत्ती आहे. तुम्ही इतरांचे दोष, उणिवा, त्यांची दुबळी बाजू पाहण्यात जेवढे तत्पर असता, तेवढ्या त्यांच्या चांगल्या बाजू पाहण्याबाबत तत्पर नसता आणि त्यांच्या दोषांवर मात्र जास्त भर देता. तुमची ही प्रवृत्ती कर्मव्यवहार करताना, इतरांबद्दल जो एक सहृदयतेचा दृष्टिकोन असणे आवश्यक असतो तो बाळगण्यापासून तुम्हाला अटकाव करते आणि त्यामुळे तुम्ही कठोर आणि छिद्रान्वेषी दृष्टीचे आहात असे मत तुमच्याविषयी तयार होते. आणि त्यामुळे, तुम्हाला विरोध करण्याची आणि तुमच्या विरोधात बंड करण्याची वृत्ती इतरांमध्ये निर्माण होते. वास्तविक तसे त्यांच्या मनातदेखील नसते पण त्यांच्या अवचेतनेच्या (subconscient) माध्यमातून तशी कृती घडून येते आणि मग सर्व प्रकारची विसंवादी स्पंदनं निर्माण होत राहतात.
इतरांमध्ये काय चांगले आहे त्यावरच नेहमी आपले लक्ष केंद्रित करून, त्याचा (कार्यासाठी) उपयोग करून घ्यायचा आणि त्यांच्या चुका, त्यांचे दोष आणि त्यांच्या उणिवा कौशल्याने हाताळायच्या हा उत्तम मार्ग असतो. यासाठी ठामपणा आणि शिस्तीच्या पालनात कसूर करण्याची गरज नसते. तसेच जेथे आवश्यक आहे तेथे कठोरपणानेही वागता आले पाहिजे. परंतु हा कठोरपणा क्वचितच असला पाहिजे आणि तो तुमचा स्थायी भाव आहे असा इतरांचा समज होता कामा नये.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 279-280)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…