साधना, योग आणि रूपांतरण – १४१
(कर्मव्यवहार करत असताना, वेगवेगळ्या स्वभावाच्या, वेगवेगळ्या वृत्तीप्रवृत्तीच्या व्यक्ती आपल्या संपर्कात येतात. तेव्हा कर्मामधील सुसंवादपूर्ण वातावरणासाठी आणि पर्यायाने कार्यसिद्धीसाठी कधीकधी स्वतःच्या स्वभावालाही मुरड घालावी लागते, त्याला वळण लावावे लागते हे श्रीअरविंद येथे सांगत आहेत.)
नेहमीच दोन्हीही बाजूंनी काही ना काही दोष असतात आणि मग त्याचे पर्यवसान हे विसंवादामध्ये होत असते.
तुमच्या बाजूचा विचार करता… इतरांचे अतिशय कठोर मूल्यमापन करण्याची तुमची प्रवृत्ती आहे. तुम्ही इतरांचे दोष, उणिवा, त्यांची दुबळी बाजू पाहण्यात जेवढे तत्पर असता, तेवढ्या त्यांच्या चांगल्या बाजू पाहण्याबाबत तत्पर नसता आणि त्यांच्या दोषांवर मात्र जास्त भर देता. तुमची ही प्रवृत्ती कर्मव्यवहार करताना, इतरांबद्दल जो एक सहृदयतेचा दृष्टिकोन असणे आवश्यक असतो तो बाळगण्यापासून तुम्हाला अटकाव करते आणि त्यामुळे तुम्ही कठोर आणि छिद्रान्वेषी दृष्टीचे आहात असे मत तुमच्याविषयी तयार होते. आणि त्यामुळे, तुम्हाला विरोध करण्याची आणि तुमच्या विरोधात बंड करण्याची वृत्ती इतरांमध्ये निर्माण होते. वास्तविक तसे त्यांच्या मनातदेखील नसते पण त्यांच्या अवचेतनेच्या (subconscient) माध्यमातून तशी कृती घडून येते आणि मग सर्व प्रकारची विसंवादी स्पंदनं निर्माण होत राहतात.
इतरांमध्ये काय चांगले आहे त्यावरच नेहमी आपले लक्ष केंद्रित करून, त्याचा (कार्यासाठी) उपयोग करून घ्यायचा आणि त्यांच्या चुका, त्यांचे दोष आणि त्यांच्या उणिवा कौशल्याने हाताळायच्या हा उत्तम मार्ग असतो. यासाठी ठामपणा आणि शिस्तीच्या पालनात कसूर करण्याची गरज नसते. तसेच जेथे आवश्यक आहे तेथे कठोरपणानेही वागता आले पाहिजे. परंतु हा कठोरपणा क्वचितच असला पाहिजे आणि तो तुमचा स्थायी भाव आहे असा इतरांचा समज होता कामा नये.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 279-280)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…