साधना, योग आणि रूपांतरण – १४०
मी तुम्हाला ही गोष्ट यापूर्वीदेखील सांगितलेली आहे की, कोणतेही काम असो, अभ्यास असो किंवा योगामधील आंतरिक प्रगती असो, या सर्व बाबतीत, तुम्हाला जर परिपूर्णत्व हवे असेल तर त्यासाठी एकच समान गोष्ट आवश्यक असते आणि ती म्हणजे, मनाची अविचलता (quietude), ‘दिव्य शक्ती’विषयी जागरुकता, तिच्याप्रति उन्मुखता आणि तिला तुमच्यामध्ये कार्य करण्यास दिलेला वाव.
परिपूर्णत्वाचे ध्येय बाळगणे हे योग्य आहे, मात्र (ते प्राप्त व्हावे म्हणून) मन अस्वस्थ राहणे हा काही ते ध्येय प्राप्त करण्याचा मार्ग असू शकत नाही. सतत तुमच्या अपूर्णतेचा विचार करत राहणे आणि काय करू, कसे करू हा विचार सतत करत बसणे हा देखील त्याचा मार्ग नाही. अविचल, स्वस्थ राहा, स्वतःला खुले करा, आणि चेतनेच्या विकसनाला वाव द्या, ‘दिव्य शक्ती’ने तुमच्यामध्ये कार्य करावे यासाठी तिला आवाहन करा. जसजशी ही प्रक्रिया वाढत राहील आणि ती ‘दिव्य शक्ती’ तुमच्यामध्ये कार्य करू लागेल, तेव्हा तुम्हाला केवळ तुमच्या अपूर्णतेचीच जाणीव होईल असे नाही तर, त्या अपूर्णतेमधून बाहेर काढणाऱ्या प्रक्रियेची जाणीव देखील तुम्हाला होईल. तसे झाले की मग, तुम्ही फक्त त्या प्रक्रियेचे अनुसरण करायचे आहे. (अर्थात हे सारे एका झटक्यात होईल असे नव्हे, तर हे टप्प्याटप्प्याने घडून येईल.)
तुम्ही जर अति-दीर्घकाळ किंवा अस्वस्थपणे एखादे काम करून, स्वतःला शिणवलेत तर त्यामुळे तुमची मज्जातंतूगत प्रणाली विचलित होते आणि दुर्बल होते. त्याचबरोबर तुमची प्राणिक-शारीरिक प्रणालीसुद्धा दुर्बल होते आणि मग ती स्वतःला चुकीच्या शक्तींच्या कृतीच्या हाती सोपविते. स्थिर-सातत्यपूर्ण प्रगती करायची असेल तर शांतपणे कार्यरत रहाणे हा योग्य मार्ग आहे.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 143)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…