साधना, योग आणि रूपांतरण – १४२
मानवी प्रकृतीत आणि मानवी जीवनात संकल्पशक्ती, ज्ञानशक्ती आणि प्रेमशक्ती या तीन दिव्यशक्ती आहेत. मानवाचा आत्मा ईश्वराप्रत ज्या तीन मार्गांनी उन्नत होत जातो त्या मार्गांचा निर्देश वरील तीन शक्ती करतात. म्हणून या तीन मार्गांचा समुच्चय, तीनही मार्गांनी मनुष्याचे ईश्वराशी सायुज्य होणे, एकत्व पावणे हाच ‘पूर्णयोगाचा आधार’ असणे आवश्यक असते.
कर्म ही जीवनातील पहिली शक्ती आहे. प्रकृती ही या कर्मशक्तीपासून आणि तिच्या कार्यापासून सुरुवात करते; आणि जेव्हा ही शक्ती आणि तिची कार्यं मनुष्यामध्ये सचेत (conscious) होतात, तेव्हा त्यांना संकल्पशक्ती व संकल्पशक्तीची उपलब्धी हे स्वरूप येते. म्हणून मनुष्याने आपले कर्म ईश्वरोन्मुख केले, की त्याचे जीवन उत्तम प्रकारे आणि निश्चितपणे दिव्य होऊ लागते. कर्म ईश्वरोन्मुख करणे हे दिव्य जीवनाचे पहिले प्रवेशद्वार आहे; तो आरंभ-बिंदू आहे.
मनुष्यातील संकल्पशक्ती जेव्हा ईश्वरी संकल्पशक्तीशी मेळविली जाते आणि जिवाची समग्र कर्मं एका ‘ईश्वरा’तूनच उदित होऊ लागतात, तसेच ती ‘ईश्वरा’भिमुख झालेली असतात तेव्हा, ‘कर्मातून एकत्व’ पूर्णतया साध्य होते. परंतु, कर्माची परिपूर्ती ज्ञानामध्ये होते. भगवद्गीता सांगते त्याप्रमाणे, सर्व कर्मांची समग्रता ही, चक्राकार फिरून ज्ञानामध्ये परिसमाप्त होते. ‘सर्वं कर्माखिलं ज्ञाने परिसमाप्यते.’
आपल्या कर्मामध्ये आणि संकल्पामध्ये आपण ‘ईश्वरा’शी ऐक्य पावलो की, आपण त्या सर्वान्तर्यामी वसणाऱ्या आत्म्याशी एकत्व पावतो. ज्याच्यापासून आपली सर्व कर्म व संकल्प उदयास आलेले असतात; आणि जेथून ते स्वत: शक्ती घेत असतात आणि ज्यांच्या उर्जेची परिसमाप्ती परत त्याच्यामध्येच होत असते अशा सर्वान्तर्यामी वसणाऱ्या आत्म्याशी आपण एकत्व पावतो. या ऐक्याचा कळस म्हणजे प्रेम व भक्ती होय. ज्या ‘ईश्वरा’च्या उदरात आपण राहतो, जीवनव्यवहार करतो, हिंडतोफिरतो, त्या ‘ईश्वरा’शी असलेल्या जाणीवयुक्त ऐक्याचा आनंद हे त्या प्रेमाचे स्वरूप असते. त्या ‘ईश्वरा’मुळे आपले अस्तित्व आहे, आणि त्याच्यासाठीच केवळ आपण कर्म करायची असतात, त्याच्यासाठीच जगायचे असते हे सरतेशेवटी आपल्याला उमगते.
आपल्या शक्तींची त्रिमूर्ती ती हीच. ईश्वराप्रत पोहोचण्याचा प्रवेशमार्ग म्हणून आणि त्याच्याशी असलेल्या आपल्या संपर्काची दिशा म्हणून जेव्हा आपण कर्मापासून प्रारंभ करतो तेव्हा, आपण या तीन दैवतांच्या ऐक्यापाशीच येऊन पोहोचतो.
– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 545)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…