भारत – एक दर्शन २४
महाभारताप्रमाणेच रामायणाच्या कवीनेसुद्धा त्याचा काव्यविषय म्हणून एक इतिहास, प्राचीन भारतीय वंशाशी संबंधित अशी एक प्राचीन कथा किंवा आख्यान हाती घेतले होते आणि त्याने त्यामध्ये आख्यायिकांमधील आणि लोकसाहित्यामधील तपशिलांची भर घातली. एवढेच नव्हे तर, त्यांचे जे उदात्त प्रयोजन होते, जो उदात्त अर्थ होता तो अर्थ त्या काव्याला स्वतःमध्ये अधिक सुयोग्यरीतीने धारण करता यावा यासाठी त्या कवीने त्यांना महाकाव्याच्या एका भव्योदात्त स्तरावर नेले. पार्थिव जीवनामध्ये आसुरी शक्तींबरोबर ईश्वरी शक्तीचा जो लढा चालू असतो तो लढा हाच महाभारताप्रमाणेच रामायणाचाही विषय आहे, परंतु रामायणामध्ये तो महाभारतापेक्षा अधिक शुद्ध आदर्शवादी रूपामध्ये मांडला आहे, तसेच त्याला अलौकिक परिणाम देण्यात आले आहेत आणि येथे मानवी व्यक्तिमत्त्वांमधील चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी काल्पनिकरित्या अधिक फुलवून सांगण्यात आलेल्या आहेत. एका बाजूला त्यामध्ये आदर्श मानवतेचे चित्रण आहे, सद्गुणांचे, नीतिमान व्यवस्थेचे दिव्य सौंदर्य दर्शविले आहे, धर्मावर आधारित सभ्यतेचे (civilization) दर्शन येथे घडविले आहे आणि या सभ्यतेमध्ये उदात्त नैतिक आदर्श दाखविले आहेत. त्यातील सौंदर्यपूर्ण सुडौलता, सुसंवाद आणि माधुर्य यांचे अनन्य आकर्षण वाटावे इतक्या प्रभावीपणे त्यांचे सादरीकरण करण्यात आले आहे; तर दुसऱ्या बाजूला अमानुष अहंकार, स्वार्थमूलक इच्छा आणि उन्मादपूर्ण हिंसा यांच्या रानटी, अराजकतापूर्ण आणि जवळजवळ आकारहीन शक्तींचे सादरीकरण करण्यात आले आहे. मानसिक प्रकृतीच्या या दोन संकल्पना आणि शक्ती येथे जिवंत आणि मूर्तरूप धारण करतात आणि त्यांच्यात संघर्ष होतो, आणि राक्षस आणि दिव्य मानव यांच्या निर्णायक संघर्षामध्ये, राक्षसावर दिव्य मानवाचा विजय होण्यामध्ये त्याची परिणती होते.
संकल्पनेची एकेरी विशुद्धता ज्यामुळे कमी होईल, पात्रांच्या रूपरेषांमधील प्रातिनिधिक शक्ती, आणि पात्रांच्या स्वभाववैशिष्ट्यांची अर्थवत्ता ज्यामुळे क्षीण होईल अशा सर्व छटा आणि अशी सर्व जटिलता रामायणामधून वगळण्यात आलेली आहे, आणि त्याचे आवाहन आणि त्यांचे महत्त्व मानवी हृदयापर्यंत जाऊन पोहोचेल इतपतच त्या गोष्टींना येथे स्थान देण्यात आले आहे. (क्रमश: …)
– श्रीअरविंद [CWSA 20 : 349-350]
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…