ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

रामायण – राष्ट्रीय चारित्र्याची घडण (भाग ०३)

भारत – एक दर्शन २५

आपल्या जीवनाच्या पाठीमागे असणाऱ्या प्रचंड शक्तींविषयीचे भान रामायणाचा कवी आपल्या मनात जागे करतो आणि एका भव्य महाकाव्यात्मक पार्श्वभूमीवर तो त्याची काव्यकृती घडवितो, त्यामध्ये एक विशाल साम्राज्यनगरी आहे, पर्वतराजी आहेत, समुद्र आहेत, जंगले आहेत आणि माळरानं आहेत. या साऱ्या गोष्टी रामायणामध्ये इतक्या विशालरूपात चित्रित करण्यात आल्या आहेत की, त्यामुळे आख्खे जगच या काव्याची पार्श्वभूमी झाले आहे आणि काही महान व राक्षसी देहाकृतीमध्ये मूर्त झालेल्या, मानवाच्या दैवी आणि आसुरी अशा क्षमता याच जणू काही या काव्याचा विषय आहेत, असे आपल्याला वाटू लागते.

भारतीय नीतिप्रवण मन आणि सौंदर्यप्रिय मन यांनी एकमेकांना सुसंवादी एकात्मतेमध्ये मिसळून टाकले आहे आणि ते एका अनुपम अशा विशुद्ध व्यापकतेपर्यंत आणि आत्माभिव्यक्तीच्या सौंदर्यापर्यंत पोहोचलेले आहे. रामायणाने भारतीय कल्पनाशक्तीपुढे मानवी चारित्र्याचे उच्चतम व सुकुमार असे आदर्श मूर्तिमंत केले आहेत; रामायणाने सामर्थ्य आणि धैर्य, सौम्यता आणि शुद्धता, निष्ठा आणि आत्मत्याग यांना मनोरम आणि सर्वाधिक सुसंवादी रूप देऊन सुपरिचित केले, भावना आणि सौंदर्यवादी दृष्टी आकर्षित व्हावी असा रंग त्यांना दिला.

रामायणाने एकीकडे नीतिनियमांचे तिरस्करणीय कठोर तपस्याचरण काढून टाकले आहे तर दुसरीकडे त्यातील निव्वळ सर्वसामान्यपणाही काढून टाकला आहे आणि जीवनातील अगदी सर्वसामान्य गोष्टींना, वैवाहिक भावनांना, मातृप्रेमाला किंवा पिता-पुत्राच्या प्रेमभावनेला, बंधुप्रेमाला, राजपुत्राच्या आणि नेत्याच्या कर्तव्यभावनेला, अनुयायांच्या आणि प्रजाजनांच्या निष्ठेला, थोरांच्या थोरवीला, सामान्यांच्या सत्यप्रेमाला आणि त्यांच्या पात्रतेला, एक विशिष्ट प्रकारचे उच्च दिव्यत्व प्रदान केले आहे; आदर्श रंगांच्या तजेल्याने, नैतिक गोष्टींना अधिकच्या आंतरात्मिक अर्थाच्या छटेद्वारे सौंदर्य प्रदान केले आहे.

वाल्मिकींचे रामायण हे भारताच्या सांस्कृतिक मनाची जडणघडण करण्याच्या कामात एक अगदी अतुलनीय शक्तीचे साधन बनले आहे. रामायणाने या (भारतीय) मनाला राम आणि सीतेच्या रूपाने प्रिय आणि अनुकरणीय अशा व्यक्ती दिल्या आहेत; इतक्या दिव्यत्वाने आणि सत्यत्वाच्या प्रकटीकरणाद्वारे त्यांचे चित्रण अशा प्रकारे करण्यात आले आहे, की राम-सीता हे कायमस्वरुपीच भक्तीचा आणि पूजेचा विषय बनले आहेत. किंवा हनुमान, लक्ष्मण, भरत यांच्या नैतिक आदर्शांनाच जणू जिवंत मानवी रूप देण्यात आले आहे.

भारताच्या राष्ट्रीय चारित्र्यामध्ये जे जे काही सर्वोत्तम आणि मधुरतम आहे त्यातील बहुतांशी गोष्टींची घडण रामायणाने केली आहे, आणि रामायणाने सूक्ष्मतर आणि उत्कृष्ट पण दृढ अशा आत्मिक स्वरांना आणि अधिक सुकुमार मानवी स्वभावाला जागे करून, त्यांना राष्ट्रीय चारित्र्यामध्ये दृढमूल केले आहे, आणि या गोष्टी सद्गुण व आचरणाच्या कोणत्याही बाह्य औपचारिक गोष्टींपेक्षा अधिक मौल्यवान आहेत.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 350-351]

Latest posts by श्रीअरविंद (see all)
श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

मुलांचे संगोपन

(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…

13 hours ago

विजयाची खात्री

जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…

2 days ago

सकारात्मक वृत्तीचा परिणाम

  (लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…

3 days ago

स्वप्नांवर विश्वास ठेवा

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…

4 days ago

उपयुक्ततावादाचा आजार

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…

5 days ago

शिक्षण आणि संस्कृती

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…

6 days ago