सहानुभूतीपूर्वक आणि निःपक्षपातीपणे इतरांच्या वर्तनाचे निरीक्षण करणे, ते न्याहाळणे यामध्ये काही अपाय नसतो – मात्र उगाचच टिका करत राहणे, दोष शोधणे आणि इतरांची निंदानालस्ती करणे (बहुतांशी वेळा चुकीच्या पद्धतीने) यामुळे त्या व्यक्तीसाठी आणि इतरांसाठी देखील वाईट वातावरण तयार होते. आणि हा कठोरपणा आणि एवढी ठाशीव निंदानालस्ती कशासाठी? प्रत्येक व्यक्तीमध्ये तिचे स्वतःचे दोष नसतात का? मग असे असताना, दुसऱ्यांचे दोष पाहायचे आणि त्यांची निंदानालस्ती करायची यासाठी इतका उतावीळपणा कशासाठी बरे? कधीकधी एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याची पारख करावी लागते पण ती घाईघाईने किंवा छिद्रान्वेषी वृत्तीने करता कामा नये.
*
स्वतःच्या तशाच चुका कुशलतेने टाळायचे सोडून, लोकांनी काय करता कामा नये किंवा काय केले पाहिजे, हे सांगण्यामध्ये आणि त्यांच्या कामावर कठोर टिका करण्यामध्ये, माणसं नेहमीच अधिक तत्पर असतात. खरोखरच व्यक्तीला बरेचदा आपल्या स्वतःमध्ये असलेले दोष दिसत नाहीत, पण इतरांमधील दोष मात्र अगदी सहजतेने दिसतात. हे आणि ज्यांचा तुम्ही उल्लेख केलात ते दोष मानवी प्रकृतीमध्ये सर्वत्र आढळून येतात आणि त्यांच्यापासून क्वचितच कोणाची सुटका होते. मानवी मन हे खरंतर स्वतःविषयी जागरूक नसते आणि म्हणूनच व्यक्तीने नेहमीच आपल्या स्वतःमध्ये काय आहे ते पाहणे, त्याचे निरीक्षण करणे आणि अधिकाधिक जागृत होणे, हे योगामध्ये आवश्यक असते.
*
प्रत्येकामध्ये असणाऱ्या क्षुद्र अहंकाराला, दुसऱ्यामधील (खरे किंवा खोटे) दोष शोधणे आणि ते दोष खरे आहेत की खोटे आहेत याची पर्वा न करता, त्याविषयी बोलत राहणे आवडते. वास्तविक, अहंकाराला त्यांच्याबाबतीत निर्णय देण्याचा अधिकारच नसतो कारण अहंकारापाशी योग्य दृष्टिकोन किंवा योग्य वृत्ती नसते. स्थिर, निःस्वार्थी, निःपक्षपाती असणारा आणि सर्वांविषयी करुणा व प्रेम बाळगणारा ‘आत्मा’ च प्रत्येक व्यक्तीमधील सामर्थ्य व दुर्बलता योग्य प्रकारे पाहू शकतो, जोखू शकतो.
– श्रीअरविंद
(CWSA 31 : 351-352)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…