ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

योग आणि मानवी नातेसंबंध – २१

एक प्रकारच्या आत्मीयतेच्या, सहमतीच्या भावनेने एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबरोबर जोडली जाते किंवा त्यामुळे माणसं एकमेकांकडे आकर्षित होतात किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या प्रकृतीमधील एखाद्या घटकाचे व दुसऱ्या व्यक्तीच्या एखाद्या घटकाचे परस्परांमध्ये आकर्षण असते आणि त्यामुळे दोन व्यक्ती परस्परांशी जोडल्या जातात. सुरुवातीला व्यक्तीला हे फक्त जाणवते; दुसऱ्या व्यक्तीच्या प्रकृतीमधील जे काही सुखद आहे किंवा चांगले आहे ते व्यक्तीला दिसते, तिचे गुण दिसतात; आणि कधीकधी तर त्या व्यक्तीमध्ये नसलेले गुणही दिसतात; किंवा तिला जेवढे ते वाटत असतात तेवढे ते प्रत्यक्षात नसतात. परंतु नंतर मात्र अति-परिचयामुळे, प्रकृतीमधील ज्या घटकांविषयी आत्मीयता नसते असे इतर घटकदेखील जाणवू लागतात. कधीकधी कल्पनांमध्ये संघर्ष असतो किंवा परस्परविरोधी भावना असतात किंवा कधी कधी दोघांच्या अहंकारांमध्ये संघर्ष असतो. शाश्वत गाढ प्रेम किंवा घट्ट मैत्री असेल तर मात्र परस्परसंबंधांतील या अडचणींवर मात करता येते आणि दोघांमध्ये सुसंवाद किंवा सामंजस्य निर्माण होते; पण बहुधा हे असे असत नाही किंवा परस्परांमधील मतभेद इतके विकोपाला गेलेले असतात की, या सामंजस्याच्या वृत्तीला छेद बसतो किंवा कधीकधी अहंकार इतका दुखावला जातो की, त्यामुळे ती सामंजस्याची वृत्ती संकोच पावते. आणि मग अशा वेळी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे अधिकच काटेकोरपणे निरीक्षण करू लागण्याची शक्यता असते आणि दुसऱ्याचे दोष अतिरंजित करण्याची किंवा वस्तुतः दुसरी व्यक्ती दुराचारी नसली वा वाईट चारित्र्याची नसली तरीही तिच्यावर तसे दोषारोप करण्याची शक्यता असते; पूर्ण दृष्टिकोनच बदलून जाण्याची शक्यता असते, सद्भावना या दुर्भावनांमध्ये, दुरावलेपणामध्ये, कधीकधी तर शत्रुत्वामध्ये किंवा हाडवैरामध्येसुद्धा बदलण्याची शक्यता असते. मानवी जीवनात हे नेहमीच घडत असते. याच्या अगदी उलटदेखील घडते, परंतु ते मात्र इतक्या सहजासहजी घडत नाही. म्हणजे वाईट भावनांचे परिवर्तन सद्भावनांमध्ये, किंवा विरोधाचे रूपांतर सुसंवादामध्ये होणे मात्र इतक्या सहजपणाने घडत नाही. अर्थात दुसऱ्या व्यक्तीबद्दलचे वाईट मत किंवा वाईट भावना ही काही या एकाच कारणामुळे निर्माण होते असे नाही. स्वाभाविक तिरस्कार, मत्सर, परस्परांच्या आड येणारे हितसंबंध इ. अनेक कारणांमुळे हे घडून येते.

व्यक्तीने इतरांकडे शांत-स्थिर भावाने बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे; गुण वा दोष यांपैकी कशावरच अतिरिक्त भर देता कामा नये; कोणतीही वाईट भावना नको किंवा कोणता गैरसमज नको वा अन्याय नको; तर एका स्थिर मनाने आणि दृष्टीने बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 299-300)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

7 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago