ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

Categories: समर्पण

खरे समर्पण आणि तामसिक समर्पण यातील फरक

समर्पण – ०८

(खरे समर्पण आणि तामसिक समर्पण यातील फरक श्रीअरविंद येथे स्पष्ट करत आहेत.)

साधकांकडून अभीप्सा, नकार आणि समर्पण (aspiration, rejection and surrender) या तीन गोष्टींबाबत प्रयत्नांची अपेक्षा असते. जर या गोष्टी साधकाने केल्या तर उर्वरित गोष्टी स्वतःहूनच श्रीमाताजींच्या कृपेमुळे आणि त्यांचे तुमच्यामध्ये जे कार्य चालू असते त्यायोगे येतात. या तिन्हीपैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे समर्पण. आणि या समर्पणाचे पहिले आवश्यक रूप असते ते म्हणजे खात्री, विश्वास आणि अडीअडचणींमध्ये देखील धैर्य राखणे.

अभीप्सा मावळलेली असताना, जर विश्वास आणि धैर्य अपयशी ठरले, तर त्याचा अर्थ असा की, साधक तेथे स्वतःच्या प्रयत्नांवरच निर्भर आहे – त्याचा अर्थ असा होईल की, “अरेरे, माझी अभीप्सा असफल ठरली, तेव्हा मला आता आशेला काही जागाच नाही. माझी अभीप्साच जिथे कुचकामी ठरली तर तेथे आता श्रीमाताजी तरी काय करू शकतील?” उलट, साधकाला असे वाटले पाहिजे की, “काही हरकत नाही, माझी अभीप्सा पुन्हा पूर्ववत होईल. तोपर्यंत, मला जरी श्रीमाताजींची उपस्थिती जाणवत नसली तरीही त्या माझ्या सोबतच आहेत; त्या मला घनांधकारामधूनही पार घेऊन जातील.” हा अगदी पूर्ण सुयोग्य असा दृष्टिकोन तुम्ही ठेवला पाहिजे. ज्यांनी असा दृष्टिकोन अंगीकारलेला असतो त्यांच्याबाबतीत नैराश्यदेखील काही करू शकत नाही; नैराश्य जर का आलेच तर त्यालाच अपयशी होऊन परतावे लागते.

“मी काहीच करणार नाही. श्रीमाताजींनीच सर्वकाही करावे, अगदी अभीप्सा, नकार, समर्पण या गोष्टीदेखील त्यांनीच माझ्यामध्ये घडवून आणाव्यात,” असे जेव्हा व्यक्ती म्हणते, तेव्हा ते तामसिक समर्पण असते. या दोन दृष्टिकोनांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. एक दृष्टिकोन (तामसिक समर्पणाचा) काहीही न करणाऱ्या कामचुकार माणसाचा आहे, आणि अन्य दृष्टिकोन साधकाचा आहे. असा साधक सर्वोत्तम ते सारे काही करतो, परंतु जेव्हा तो काही काळासाठी निष्क्रिय होतो आणि जेव्हा गोष्टी प्रतिकूल असतात तेव्हा असा साधक श्रीमाताजींच्या शक्तीमध्ये विश्वास राखतो आणि साऱ्या गोष्टींमागे श्रीमाताजींचीच उपस्थिती आहे असा विश्वास बाळगतो. आणि त्याच्या या विश्वासामुळे तो विरोधी शक्तीवर मात करतो आणि पुन्हा एकवार साधनेची क्रिया हाती घेतो.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 139-140)

Latest posts by श्रीअरविंद (see all)
श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

मुलांचे संगोपन

(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…

15 hours ago

विजयाची खात्री

जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…

2 days ago

सकारात्मक वृत्तीचा परिणाम

  (लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…

3 days ago

स्वप्नांवर विश्वास ठेवा

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…

4 days ago

उपयुक्ततावादाचा आजार

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…

5 days ago

शिक्षण आणि संस्कृती

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…

6 days ago