समर्पण – ०८
(खरे समर्पण आणि तामसिक समर्पण यातील फरक श्रीअरविंद येथे स्पष्ट करत आहेत.)
साधकांकडून अभीप्सा, नकार आणि समर्पण (aspiration, rejection and surrender) या तीन गोष्टींबाबत प्रयत्नांची अपेक्षा असते. जर या गोष्टी साधकाने केल्या तर उर्वरित गोष्टी स्वतःहूनच श्रीमाताजींच्या कृपेमुळे आणि त्यांचे तुमच्यामध्ये जे कार्य चालू असते त्यायोगे येतात. या तिन्हीपैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे समर्पण. आणि या समर्पणाचे पहिले आवश्यक रूप असते ते म्हणजे खात्री, विश्वास आणि अडीअडचणींमध्ये देखील धैर्य राखणे.
अभीप्सा मावळलेली असताना, जर विश्वास आणि धैर्य अपयशी ठरले, तर त्याचा अर्थ असा की, साधक तेथे स्वतःच्या प्रयत्नांवरच निर्भर आहे – त्याचा अर्थ असा होईल की, “अरेरे, माझी अभीप्सा असफल ठरली, तेव्हा मला आता आशेला काही जागाच नाही. माझी अभीप्साच जिथे कुचकामी ठरली तर तेथे आता श्रीमाताजी तरी काय करू शकतील?” उलट, साधकाला असे वाटले पाहिजे की, “काही हरकत नाही, माझी अभीप्सा पुन्हा पूर्ववत होईल. तोपर्यंत, मला जरी श्रीमाताजींची उपस्थिती जाणवत नसली तरीही त्या माझ्या सोबतच आहेत; त्या मला घनांधकारामधूनही पार घेऊन जातील.” हा अगदी पूर्ण सुयोग्य असा दृष्टिकोन तुम्ही ठेवला पाहिजे. ज्यांनी असा दृष्टिकोन अंगीकारलेला असतो त्यांच्याबाबतीत नैराश्यदेखील काही करू शकत नाही; नैराश्य जर का आलेच तर त्यालाच अपयशी होऊन परतावे लागते.
“मी काहीच करणार नाही. श्रीमाताजींनीच सर्वकाही करावे, अगदी अभीप्सा, नकार, समर्पण या गोष्टीदेखील त्यांनीच माझ्यामध्ये घडवून आणाव्यात,” असे जेव्हा व्यक्ती म्हणते, तेव्हा ते तामसिक समर्पण असते. या दोन दृष्टिकोनांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. एक दृष्टिकोन (तामसिक समर्पणाचा) काहीही न करणाऱ्या कामचुकार माणसाचा आहे, आणि अन्य दृष्टिकोन साधकाचा आहे. असा साधक सर्वोत्तम ते सारे काही करतो, परंतु जेव्हा तो काही काळासाठी निष्क्रिय होतो आणि जेव्हा गोष्टी प्रतिकूल असतात तेव्हा असा साधक श्रीमाताजींच्या शक्तीमध्ये विश्वास राखतो आणि साऱ्या गोष्टींमागे श्रीमाताजींचीच उपस्थिती आहे असा विश्वास बाळगतो. आणि त्याच्या या विश्वासामुळे तो विरोधी शक्तीवर मात करतो आणि पुन्हा एकवार साधनेची क्रिया हाती घेतो.
– श्रीअरविंद
(CWSA 32 : 139-140)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…