ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

मानसिक परिपूर्णत्व – २१

 

ईश्वराभिमुख झालेले प्रेम हे, ज्याला माणसं प्रेम हे नाव देतात, तशाप्रकारचे नेहमीचे प्राणिक भावना असणारे प्रेम असता कामा नये. कारण ते प्रेम हे प्रेमच नसते, तर ती केवळ एक प्राणिक इच्छा असते, एक प्रकारची स्वीकृतीची सहजबुद्धी असते, मालकीची आणि एकाधिकाराची प्रेरणा असते. हे तर दिव्य प्रेम असतच नाही; पण योगमार्गामध्ये यातील अंशभागाचीही भेसळ होता कामा नये. ईश्वरविषयक प्रेमामध्ये आत्मदान असते, ते कोणत्याही मागणीपासून मुक्त असते; ते शरणागती आणि समर्पणाने परिपूर्ण असते; ते कोणतेही हक्क गाजवत नाही; ते कोणत्याही अटी लादत नाही; ते कोणताही सौदा करत नाही; मत्सर, अभिमान वा राग यांच्या उद्रेकामध्ये ते गुंतून पडत नाही, कारण या गोष्टी त्याच्या घडणीतच नसतात. आणि त्याच्या बदल्यात दिव्य मातादेखील स्वतःला देऊ करते, पण अगदी मुक्तपणे – आणि आंतरिक वरदानामध्ये ती गोष्ट प्रतिबिंबित झालेली दिसते.

दिव्य मातेचे अस्तित्व तुमच्या मनामध्ये, तुमच्या प्राणामध्ये, तुमच्या शारीरिक जाणिवेमध्ये प्रतिबिंबित झालेले दिसते. तिची शक्ती तुमच्या अस्तित्वाच्या सर्व गतिविधी हाती घेऊन, त्यांना पूर्णत्व आणि परिपूर्तीच्या दिशेने घेऊन जात, दिव्य प्रकृतीमध्ये तुमची पुनर्निर्मिती करते. तिच्या प्रेमाने तुम्हाला कवळून घेतले आहे आणि ती स्वतः तुम्हाला तिच्या बाहुंमध्ये घेऊन, ईश्वराकडे घेऊन जात आहे असे तुम्हाला जाणवते. अगदी तुमच्या जडभौतिक अंगापर्यंत तुम्हाला याची संवेदना व्हावी आणि तिने तुमचा ताबा घ्यावा अशी अभीप्सा तुम्ही बाळगली पाहिजे. आणि इथे मात्र कोणतीही मर्यादा असत नाही, ना काळाची ना समग्रतेची ! जर तुम्ही खरोखर अशी अभीप्सा बाळगलीत आणि जर ती तुम्हाला साध्य झाली तर, इतर कोणत्याही दाव्यांना किंवा अपूर्ण राहिलेल्या इच्छावासनांना जागाच नाही. आणि जर व्यक्ती खरोखरच अशी अभीप्सा बाळगेल तर, आणि जसजशी व्यक्ती अधिकाधिक शुद्ध होत जाईल, तसतसा आवश्यक असणारा बदल तिच्या प्रकृतीमध्ये घडून येईल, तसतशी निश्चितपणे व्यक्तीला ती गोष्ट साध्य होईलच.

कोणतेही स्वार्थी हक्क आणि इच्छा यांच्यापासून मुक्त असे तुमचे प्रेम असू द्या; मग जेवढी तुमची क्षमता आहे, जेवढे तुम्ही ग्रहण करू शकता, तेवढे सर्व प्रेम प्रतिसादरूपाने तुम्हाला मिळत आहे; असे तुम्हाला आढळेल.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 338-339)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

माणूस चिंताग्रस्त का आहे?

  (माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…

17 hours ago

उच्चतर चेतना : प्रस्तावना

  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…

2 days ago

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…

3 days ago

आपल्याला काय संपादन करायचे आहे?

  असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन…

4 days ago

आपले कार्य काय?

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…

5 days ago

विचार-कणिका

  स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…

6 days ago