ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

आध्यात्मिक जीवन – एक विशाल साम्राज्य

आध्यात्मिकता १८

जे साधक परिपूर्णतेपर्यंत किंवा त्या जवळपाससुद्धा पोहोचलेले नाहीत त्यांच्या बोलण्यातले आणि वागण्यातले अंतर, त्यांचे विपरीत वर्तन तुम्ही पाहता आणि आध्यात्मिक अनुभव वगैरे असे काही नसते किंवा त्यात काही अर्थ नसतो असे तुम्ही म्हणता; परंतु त्या साधकांचे वर्तन हे तुमच्या म्हणण्यासाठी पुरावा कसा काय ठरू शकतो? एखाद्या माणसाला जेव्हा कधी कोणत्याही प्रकारचा आध्यात्मिक अनुभव येतो किंवा साक्षात्कार होतो तेव्हा लगेचच त्या क्षणी तो माणूस एक निर्दोष किंवा दुर्बलता-विरहित असा परिपूर्ण मनुष्य बनला पाहिजे, असे तुम्ही लिहिले आहे. हे म्हणजे एक अशी अपेक्षा करण्यासारखे आहे की, ज्या अपेक्षेचे समाधान करणे अशक्य आहे आणि अशी अपेक्षा बाळगणे म्हणजे, ‘आध्यात्मिक जीवन हा एकाएकी घडून येणारा, अवर्णनीय असा चमत्कार नसून, आध्यात्मिक जीवन म्हणजे एक प्रकारचा विकास आहे.’ या तथ्याकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे. एखादा साधक हा आधीपासूनच सिद्ध-योगी आहे असे समजून त्याचे मूल्यमापन करता येऊ शकत नाही. प्रदीर्घ मार्गावरील जेमतेम पाव टक्के किंवा त्याहूनही कमी अंतर जे चालून गेले आहेत, त्यांच्याबाबतीत तर असे मूल्यमापन करताच कामा नये….

इतकेच काय पण, अगदी महान योगीसुद्धा पूर्णत्वप्राप्तीचा दावा करत नाहीत, आणि ते तसे अगदी परिपूर्णतया निर्दोष नसल्यामुळे, त्यांची ‘आध्यात्मिकता’ मिथ्या आहे किंवा तिचा या जगाला काही उपयोगच नाही, असे तुम्ही म्हणू शकत नाही. शिवाय आध्यात्मिक माणसं ही अनेक प्रकारची असतात. त्यांच्यापैकी काही जण त्यांना आलेल्या आध्यात्मिक अनुभवांवरच समाधानी असतात आणि बाह्य जीवनातील पूर्णत्व किंवा प्रगती यांच्यासाठी प्रयत्नशील नसतात. काहीजण संत असतात, तर काही जणांना संतत्वाचा ध्यास नसतो. अन्य काही जण वैश्विक चेतनेमध्ये, ‘सर्वव्यापी ईश्वरा’च्या संपर्कात किंवा त्याच्याशी सायुज्य पावून जीवन जगण्यामध्ये आणि स्वत:च्या माध्यमातून सर्व प्रकारच्या शक्तींना क्रीडा करू देण्यामध्ये समाधानी असतात, म्हणजेच ते ‘परमहंस’ स्थितीमध्ये असलेल्या व्यक्तीच्या वर्णनाप्रमाणे असतात.

…कोणत्यातरी एका काटेकोर व्याख्येमध्ये बसावावी किंवा एखाद्या ठरावीक बंदिस्त मानसिक नियमामध्ये बांधून ठेवावी अशी ‘आध्यात्मिक जीवन’ ही काही एक वस्तू नाही, तर ‘आध्यात्मिक जीवन’ हे उत्क्रांतीचे एक विशाल क्षेत्र आहे, ‘आध्यात्मिक जीवन’ म्हणजे असे एक विशाल साम्राज्य असते, की त्याच्या अधिपत्याखाली असणाऱ्या अन्य सर्व साम्राज्यांहूनही अधिक विशाल असण्याची क्षमता त्याच्या ठायी असते; ज्यामध्ये शेकडो प्रांत असतात, हजारो प्रकार असतात, स्तर असतात, रूपं असतात, मार्ग असतात, आध्यात्मिक आदर्शांमध्ये विभिन्नता असते, आध्यात्मिक उपलब्धीच्या विविध श्रेणी असतात.

– श्रीअरविंद [CWSA 31 : 656-657]

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

7 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago