ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

मानसिक परिपूर्णत्व – १६

 

(येथे श्रीअरविंद एका साधकाला पत्राच्या माध्यमातून उत्त्तर देत आहेत.)

मी बलवान अशा केंद्रवर्ती आणि शक्यतो परिपूर्ण श्रद्धेविषयी तुमच्याशी बोललो; कारण तुम्ही फक्त परिपूर्ण अशा प्रतिसादाचीच तमा बाळगता असे दिसते. म्हणजे इतर साऱ्या गोष्टी तुम्हाला समाधान देणाऱ्या नाहीत; साक्षात्कार, ईश्वरी अस्तित्व यांचेच तुम्हाला मोल आहे. मात्र ते तुम्हाला तुमच्या प्रार्थनेमधून गवसत नव्हते. परंतु निव्वळ प्रार्थनेद्वारे या गोष्टी लगेचच प्राप्त होतील, असे सहसा घडत नाही. जर का केंद्रामध्ये ज्वलंत श्रद्धा असेल किंवा अस्तित्वाच्या सर्व भागांमध्ये परिपूर्ण श्रद्धा असेल तरच तसे घडून येते. परंतु ह्याचा अर्थ असा मुळीच होत नाही की, ज्यांची श्रद्धा तितकी खंबीर नाही, किंवा ज्यांचे समर्पण परिपूर्ण नाही ते तिथवर पोहोचूच शकत नाहीत. परंतु मग बहुतेक वेळा, त्यांना आधी छोट्या छोट्या पायऱ्या पार कराव्या लागतात; आणि जोवर प्रयत्नसातत्याद्वारे किंवा तपस्येद्वारे पुरेसे खुलेपण प्राप्त होत नाही तोवर, त्यांच्या प्रकृतीच्या समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते. अगदी डळमळणारी श्रद्धा आणि संथ, आंशिक समर्पण ह्यांचीसुद्धा स्वत:ची म्हणून काहीएक शक्ती असते, त्यांचे स्वत:चे असे काही परिणाम असतात. तसे नसते तर, अगदी मोजक्याच लोकांना साधना करणे शक्य झाले असते. केंद्रवर्ती श्रद्धा म्हणजे वर किंवा मागे असलेल्या आत्म्याच्या केंद्रवर्ती अस्तित्वावर श्रद्धा असे मला म्हणावयाचे आहे. ही अशी श्रद्धा असते की, जेव्हा मन शंका घेते, प्राण खचून जातो, आणि शरीर ढासळू पाहते तेव्हाही ही श्रद्धा टिकून असते. आणि जेव्हा हा हल्ला संपतो, तेव्हा ही श्रद्धा पुन्हा उसळून येते आणि पुन्हा एकदा मार्गावर वाटचाल करण्यास व्यक्तीला प्रवृत्त करते. ती बळकट आणि तेजस्वी असू शकते, ती फिकी, दिसायला दुबळी अशी असू शकते; पण तरीदेखील ती प्रत्येक वेळी सतत टिकून राहिली तर, मग ती खरीखुरी श्रद्धा होय. निराशा आणि अंधकाराचे झटके ही साधनामार्गावरील एक परंपराच आहे. पौर्वात्य आणि पाश्चात्त्य योगमार्गांमध्ये तो जणू काही एक नियमच असल्यासारखे दिसते. मला ते स्वतःलादेखील ज्ञात आहे. पण माझ्या अनुभवातून मला असे उमगले की, ह्या अनावश्यक परंपरा आहेत आणि व्यक्तीने जर ठरविले तर, व्यक्तीची त्यापासून सुटका होऊ शकते. म्हणूनच जेव्हा केव्हा या गोष्टी तुमच्यामध्ये किंवा इतरांमध्ये आलेल्या मला आढळतात, तेव्हा मी त्यांना श्रद्धेच्या शिकवणीपुढे उचलून घेऊ पाहतो. आणि तरीसुद्धा जर निराशा आणि अंधकाराचे झटके आलेच तर, व्यक्तीने शक्य तितक्या त्वरेने त्यातून बाहेर पडावे आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात पुन्हा यावे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 95-96)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

8 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago