ज्याला आपण शाश्वत धर्म असे म्हणतो तो धर्म आहे तरी काय? तो एवढ्यासाठी हिंदु धर्म आहे कारण हेच की हिंदु राष्ट्रामध्ये त्याचे जतन झाले आहे. समुद्र आणि हिमालय ह्यांनी वेढल्यामुळे अलग झालेल्या ह्या द्विपकल्पातच त्याचा उदय झाला आणि त्याचे शतकानुशतके जतन करण्याची जबाबदारी या प्राचीन पुण्यभूमीतच आर्यांकडे देण्यात आली. पण हा शाश्वत धर्म कोणत्याही एका देशापुरताच मर्यादाबद्ध करण्यात आलेला नाही, तो जगातील अमुक एखाद्या नेमक्या ठरावीक भागापुरता व सदा सर्वकाळासाठी बांधला गेलेला नाही.
ज्याला आपण हिंदुधर्म म्हणतो तो खरोखर शाश्वत धर्मच आहे. ह्याचे कारण, तो असा एक विश्वात्मक धर्म आहे की ज्याने इतर सर्वांना कवेत घेतले आहे. जर एखादा धर्म विश्वात्मक नसेल तर तो शाश्वत असूच शकणार नाही. जो धर्म संकुचित आहे, एखाद्या विशिष्ट लोकांचा अगर पंथाचा आहे, जो मर्यादित स्वरूपाचा आहे, असा धर्म मर्यादित कालापर्यंतच टिकेल; व ठरावीक हेतु अगर कार्य या पुरताच अस्तित्वात राहील.
विज्ञानाने लावलेल्या शोधांची आणि तत्त्वज्ञानाच्या भाकितांची अगोदरच अटकळ बांधून, आणि त्यांचा स्वत:मध्ये समावेश करून घेत, जडवादावर मात करू शकेल असा हा एकच धर्म आहे.
ईश्वराचे सान्निध्य मानवजातीवर ठसवू पाहणारा आणि ईश्वराप्रत पोहोचण्याचे मानवाचे जेवढे म्हणून मार्ग आहेत त्या सर्वांना आपल्या कवेत कवळू पाहणारा हा एकच धर्म आहे.
ईश्वर हा सर्व मानवजातीत, वस्तुमात्रांत आहे; ईश्वरातच आपण आपले सर्व व्यवहार करतो व ईश्वराशिवाय आपणास अस्तित्व नाही; हे सत्य सर्व धर्म जाणतात पण हिंदुधर्म हा एकच असा धर्म आहे की जो हरघडी, दरक्षणी केवळ ह्याच सत्यावर भर देतो.
हा असा एकच धर्म आहे की, जो आपल्याला केवळ सत्य समजावून देऊन त्याविषयी विश्वास बाळगण्यासाठीच सक्षम करत नाही तर, त्या सत्याची आमच्या अस्तित्वाच्या सर्व अंगांना साक्षात अनुभूती यावी यासाठीदेखील तो आम्हाला सक्षम करतो.
हा असा एकच धर्म आहे की, जो जगाला, जग काय आहे हे दाखवून देतो, जग ही वासुदेवाची लीला आहे हे तो दाखवून देतो. या लीलेचे सूक्ष्मतम कायदे, त्याचे उदात्त नियम काय आहेत हे तो दाखवतो आणि या लीलेमध्ये आपण आपली भूमिका सर्वोत्तमपणे कशी पार पाडू शकतो हेही तो दाखवतो.
हिंदुधर्म हा असा एकमेव धर्म आहे की, ज्याने जीवनाच्या अगदी लहानात लहान भागाची देखील धर्माशी फारकत होऊ दिलेली नाही. हा धर्म अमरत्व काय आहे हे जाणतो. ह्या धर्माने आमच्यामध्ये असणारी मृत्यूची वास्तविकताच पूर्णत: पुसून टाकली आहे.
– श्रीअरविंद
(CWSA 08 : 11-12)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…