ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

धर्म ह्या शब्दाला नैतिक व व्यावहारिक, नैसर्गिक व तत्त्वज्ञानात्मक आणि धार्मिक व आध्यात्मिक असे अर्थ आहेत; तसेच, हा शब्द वरील अर्थांपैकी केवळ एकाच अर्थाने, जसे की केवळ नैतिक अर्थाने, केवळ तात्विक अर्थाने किंवा केवळ धार्मिक अर्थानेदेखील वापरला जाऊ शकतो.

उदा. नैतिक दृष्टीने पाहिले असता, ‘सद्वर्तनाचा, नीतिमान वर्तनाचा नियम’ असा धर्म या शब्दाचा अर्थ होतो; किंवा अधिक बाह्य व व्यावहारिक दृष्टीने पाहिले असता, ‘सामाजिक आणि राजकीय न्याय’ किंवा ‘फक्त सामाजिक नियमांचे पालन’ असा धर्म या शब्दाचा अर्थ होतो.

धर्माच्या भारतीय संकल्पनेत केवळ चांगले, योग्य, नैतिक, न्याय्य या बाबींचाच समावेश होतो असे नाही. दिव्य तत्त्वाच्या अंगाने विचार करता, माणसाचे इतर जीवांशी, निसर्गाशी, ईश्वराशी जे सर्व नातेसंबंध असतात, त्या साऱ्यांचे नियमन करणारा धर्म असतो. दिव्य तत्त्वाची अभिव्यक्ती विविध रूपांद्वारे, आंतरिक व बाह्य जीवनाच्या रूपांद्वारे, कृतीच्या कायद्यांच्या माध्यमातून होत असते. जगातील या सर्व प्रकारच्या नातेसंबंधांची सुव्यवस्था लावण्याचे कामदेखील धर्म करीत असतो.

धर्म हा शब्द दोन्ही अर्थाने घेता येतो – एक म्हणजे आपण ज्याला धरून राहतो तो धर्म आणि दुसरा अर्थ आपल्या आंतरिक व बाह्य कृतींची जो धारणा करतो तो धर्म !

धर्म शब्दाचा मूळ अर्थ, आमच्या प्रकृतीचा मूलभूत, पायाभूत नियम; आमच्या सर्व क्रियांचा गुप्त आधार व आलंबन असणारा आमच्या प्रकृतीचा पायाभूत नियम असा आहे. या अर्थाने प्रत्येक भूतमात्राला, प्रत्येक जीवप्रकाराला, जीवजातीला, व्यक्तीला, समूहाला त्याचा त्याचा धर्म असतो.

धर्माचा दुसरा अर्थ, आमच्यात जी दिव्य प्रकृती विकसित व व्यक्त व्हावयाची असते ती, ज्या आंतरिक व्यापारांनी आम्हामध्ये विकसित होते, त्या व्यापारांचा नियम असा आहे.

धर्म म्हणजे असा कायदा होय की, ज्यायोगे आमचे बाह्य विचार, कृती व आमचे परस्परांशी असलेले सर्व संबंध यांचे नियमन केले जाते. ह्या नियमनामुळे दिव्य आदर्शाच्या दिशेने आमचा स्वत:चा विकास आणि आमच्या मानववंशाचा विकास होण्यास साहाय्य होते.

धर्म न बदलणारा असतो, शाश्वत असतो असे सामान्यत: म्हणण्यात येते. धर्माचे मूलतत्त्व, धर्माचा आदर्श ही शाश्वत आणि अपरिवर्तनीय वस्तु आहे हे खरे आहे; पण धर्माचे विशिष्ट विचार व आचार नित्य बदलणारे, नित्य विकास पावणारे असतात. कारण, अद्यापि मानवाला आदर्श धर्म सापडलेला नाही किंवा मानव अद्यापि आदर्श धर्माला धरून वागत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा आदर्श धर्माच्या प्राप्तीसाठी मानव कमीअधिक पूर्णतेने तळमळत आहे, धडपडत आहे. अशा आदर्श धर्माचे त्याला अधिकाधिक ज्ञान होत आहे व तो अशा धर्माचे आचरण अधिकाधिक प्रमाणात पसंत करू लागला आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 19 : 171-172)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

8 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago