(माणसाची चिंताग्रस्तता आणि त्यावरील उपाय याविषयी श्रीमाताजी मार्गदर्शन करत आहेत. त्यातील हा पुढचा भाग…)

आता यापुढे, मनुष्याचे पतन होऊन तो पुन्हा प्राण्याच्या पातळीवर खाली घसरेल आणि त्याने संपादन केलेली चेतना तो गमावून बसेल हे शक्य नाही. आणि म्हणून, त्याच्यापाशी एकच उपाय शिल्लक राहतो. तो ज्या दयनीय परिस्थितीत जीवन जगत आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा आणि जेथे चिंतेची जागा विश्वासपूर्ण समर्पणाने घेतलेली असते व जेथे प्रकाशमान परिणतीची खात्री असते अशा एका उच्चतर स्थितीमध्ये उन्नत होण्याचा एकच मार्ग त्याच्यापाशी उरतो. चेतनेमध्ये (consciousness) परिवर्तन घडवून आणणे हाच तो मार्ग आहे.

खरे सांगायचे तर, ज्याची किल्लीच आपल्यापाशी नाही अशा गोष्टीसाठी आपण जबाबदार असणे, यासारखी दुसरी दयनीय अवस्था नाही. (तशी मनुष्याची अवस्था झाली आहे कारण चिंताग्रस्ततेचा) हा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक असणारे असे एखादे मार्गदर्शक सूत्र मनुष्याच्या हाती नाही. प्राण्यांना कोणतेही प्रश्न पडत नाहीत, ते नुसते जगत असतात. ते उपजत प्रेरणेनुसार जीवन जगत असतात. ते त्यांच्या सामूहिक चेतनेवर विसंबून असतात, या चेतनेकडे उपजत ज्ञान असते. आणि ही सामूहिक चेतना प्राण्यांच्या व्यक्तिगत चेतनेपेक्षा अधिक उन्नत असते. पण ती स्वयंचलित, सहजस्वाभाविक असते. प्राण्याला कोणता एखादा संकल्प करण्याची किंवा तो प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते. प्राणी सहजस्वाभाविकपणे वागत असतात आणि ते कोणतीही काळजी करत बसत नाहीत. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 09 : 304)

 

 

(मनुष्यप्राणी या सृष्टीमधील सर्वात दु:खी जीव असला तरी, त्याच्याकडे असलेल्या एका विशेष क्षमतेमुळे तो चिंतामुक्त होऊ शकतो, ती क्षमता कोणती ते श्रीमाताजी येथे सांगत आहेत…)

मनुष्यामध्ये उच्चतर स्तरावर आरोहण करण्याची आध्यात्मिक क्षमता आहे; त्यामुळे तो त्याच्यामध्ये असलेल्या प्राण्याच्या अचेतनेच्या जागी आध्यात्मिक अतिचेतना (super-consciousness) स्थापित करू शकतो. आणि या क्षमतेमुळे, स्वतःच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय आहे आणि त्याने केलेल्या प्रयत्नांची परिणती कशामध्ये होणार आहे हे भविष्यवेधी दृष्टीने पाहण्याची क्षमता त्याच्यामध्ये आली आहे.

एवढेच नव्हे तर, त्याच्यामध्ये उच्चतर आध्यात्मिक शक्तीवर विचक्षण, स्वच्छ दृष्टीने (clear-sighted) विश्वास ठेवण्याची क्षमतादेखील निर्माण झाली आहे. त्या आध्यात्मिक शक्तीप्रत तो स्वतःच्या समग्र अस्तित्वानिशी समर्पित होऊ शकतो. तो स्वतःच्या जीवनाची आणि भविष्याची सर्व जबाबदारी त्या शक्तीवर सोपवून सर्व प्रकारच्या काळज्या, चिंता यांपासून मुक्त होऊ शकतो. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 09 : 303-304)

 

(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट करत आहेत. हा भाग काहीसा विस्तृत असल्याने तो क्रमश: देत आहोत.)

मनुष्याकडे जीवन जगत असतानाच स्वतःचे निरीक्षण करण्याची मानसिक क्षमता असल्यामुळे तो इतर प्राण्यांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण ठरतो, हे अगदी उघड आहे. प्राणी सहजस्वाभाविकपणे, आपोआप जीवन जगत असतात. एखाद्या प्राण्याला अपघातामुळे किंवा आजारपणामुळे जरी वेदना सहन कराव्या लागल्या तरी, त्या वेदना तुलनेने कमी असतात. कारण तो प्राणी त्या दुःखाचे निरीक्षण करू शकत नाही किंवा तो स्वतःच्या चेतनेमध्ये त्या वेदनांचे प्रक्षेपण करू शकत नाही किंवा त्यामुळे पुढे काय होईल याची चिंता तो करत बसत नाही. झालेल्या अपघाताविषयी किंवा आलेल्या आजारपणाविषयी तो कोणतेही तर्कवितर्क करत नाही. क्वचित एखाद्या प्राण्याने जीवन जगत असताना समजा स्वतःचे निरीक्षण केलेच तरी, ते नक्कीच अगदी एखाद-दुसरा क्षण इतके किंवा अगदी नगण्य प्रमाणात असणार. म्हणूनच प्राण्यांना कोणतीही चिंता भेडसावत नाही आणि ते शांतपणे जीवन जगू शकतात.

पण मनुष्याच्या जन्माबरोबरच ‘उद्या काय होणार आहे,’ याची एक अखंड चिंता उदयास आली आहे. ही चिंता हे त्याच्या दुःखकष्टाचे एकमेव कारण नसले तरी ते एक मुख्य कारण आहे. स्वतःकडे वेगळे होऊन पाहता येण्याच्या या चेतनेमुळे मनुष्यामध्ये हुरहुर, दुःखदायक कल्पना, चिंता, त्रास, भविष्यातील संकटांची चाहूल या गोष्टी सुरू झाल्या आहेत. आणि त्याचा परिणाम म्हणून बहुतांशी माणसं, – म्हणजे कमी सचेत, सजग (conscious) असणारी माणसंच नव्हेत तर अतिशय सचेत, सजग असणारी माणसंदेखील – कायमच चिंताग्रस्त होऊन जीवन जगत असतात.

मनुष्य एकीकडे इतका सचेत आहे की, तो या सगळ्यापासून अलिप्त राहू शकत नाही आणि दुसरीकडे, उद्या काय घडून येणार आहे हे त्याला निश्चितपणे ज्ञात होईल, एवढाही तो सचेत नाही. खरोखर, पृथ्वीवरच्या सर्व प्राणिमात्रांमध्ये मनुष्य हा सर्वात दुःखीकष्टी प्राणी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मनुष्याला त्याच्या अशा असण्याची सवय झाली आहे; कारण त्याची ही जी अवस्था आहे ती त्याला त्याच्या पूर्वजांकडूनच वारसारूपाने मिळालेली आहे. खरोखरच ही अत्यंत दयनीय अवस्था आहे. (परंतु मनुष्याला आणखी एक क्षमता प्रदान करण्यात आलेली आहे, त्याचा विचार आपण उद्याच्या भागात करू.) (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 09 : 303)

 

मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा या सृष्टीच्या निर्मितीमधील शेवटचा टप्पा नाही किंवा मानवी शक्यतेचा देखील तो शेवटचा टप्पा नाही. मानवी मन आज बौद्धिक, वैचारिक मनाच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचले आहे. परंतु या मनाच्या पलीकडे जात मनुष्य हा, उच्च मन (Higher Mind), प्रकाशित मन (Illumined Mind), अंतःस्फूर्त मन (Intuitive Mind), अधिमानस (Overmind) येथपर्यंत जाऊन पोहोचू शकतो,’ असे श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांनी आपल्याला सांगितले आहे. या प्रत्येक स्तरावरील बारकावे त्यांनी उलगडून दाखविले आहेत.

श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या भगीरथ प्रयत्नामुळे अतिमानस-चेतनेचे (Supremental Consciousness) आविष्करण घडून आले. पण व्यापक जनसमूहाला त्याचा लाभ व्हायचा असेल तर, व्यापक जनसमूहाने उच्चतर चेतनेच्या (Higher Consciousness) पातळ्यांवर चढून जाणे आवश्यक आहे.

उच्चतर चेतनेचे मानवी चेतनेवर जे कार्य चालते त्यातील काही पैलूंना आपण उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘उच्चतर चेतना’ या मालिकेमध्ये स्पर्श करणार आहोत.

संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक

नमस्कार वाचकहो,

अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचे विचारधन सातत्याने, सर्वदूर प्रसृत करण्याचे प्रयत्न करत असतो. असाच आपला आणखी एक उपक्रम म्हणजे मराठी विकिपीडियामध्ये श्रीअरविंद व श्रीमाताजी यांच्याविषयीच्या नोंदी.

‘मराठी विकिपीडिया’ हा इंटरनेटवरील एक मुक्त ज्ञानकोश आहे, हे आपल्याला माहिती असेलच. यामध्ये ज्ञानकोशाच्या चौकटीमध्ये राहून, श्रीअरविंद व श्रीमाताजी आणि त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांचे साहित्य, त्यांचा शिष्यवर्ग, त्यांची कामगिरी यासंबंधीची जी जी माहिती देता येणे शक्य आहे, ती माहिती आपण मराठी विकिपीडियामध्ये समाविष्ट करत असतो. हा उपक्रम सुमारे दोन वर्षे चालू आहे आणि त्यामध्ये यथावकाश उर्वरित माहितीचीही भर पडत राहील. आपल्या सर्वांनाही त्या माहितीचा लाभ घेता यावा, या दृष्टीने आजची ही पोस्ट प्रसृत करत आहोत.

‘मराठी विकिपीडिया’मध्ये तीन साचे तयार करून, त्या अंतर्गत ही सर्व माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. त्याच्या लिंक्स येथे देत आहोत.
• पूर्णयोग – https://mr.wikipedia.org/s/6lf2
• श्रीअरविंद तत्त्वज्ञान व पूर्णयोग यासंबंधी साहित्य – https://mr.wikipedia.org/s/6wpr
• श्रीअरविंद व श्रीमाताजी यांचे कार्य – https://mr.wikipedia.org/s/7csk

आजवर यामध्ये सुमारे १५० नोंदी पूर्ण झाल्या आहेत. या सगळ्या पानांच्या लिंक्स तुम्हाला वरील लिंकवर गेल्यावर मिळतील. तुम्हाला आवडेल ती माहिती तुम्ही मुक्तपणे वाचू शकाल अशी सोय यामुळे झालेली आहे. श्रीअरविंद आणि श्रीमाताजी तसेच त्यांचा शिष्यवर्ग यांची बरीच पुस्तके मोफत ऑनलाईन वाचनासाठी उपलब्ध आहेत, त्या पुस्तकांच्या लिंक्ससुद्धा तुम्हाला त्या त्या संबंधित पानावर पाहायला मिळतील. जिज्ञासू मंडळींनी या सर्व माहितीचा जरूर लाभ घ्यावा, ही विनंती. धन्यवाद.

डॉ. केतकी मोडक
संपादक, अभीप्सा मराठी मासिक

 

असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही?

आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन करायचे आहे, कारण आजवर आपण केवळ द्वेष आणि स्व-संतुष्टताच संपादन केली आहे.

आपल्याला ‘ज्ञान‌’ संपादन करायचे आहे, कारण आजवर आपण फक्त त्रुटी, बोध आणि आकलन या गोष्टीच संपादन केल्या आहेत.

आपल्याला ‘परमानंद‌’ संपादन करायचा आहे, कारण आजवर आपण फक्त सुख व दुःख आणि तटस्थता याच गोष्टी मिळविल्या आहेत.

आपल्याला ‘शक्ती‌’ संपादन करायची आहे, कारण आजवर आपण फक्त दुर्बलता, श्रम आणि पराभूत विजय (विजय मिळालेला असूनसुद्धा पराभूत स्थिती) संपादन केले आहेत.

आपल्याला ‘जीवन‌’ संपादन करायचे आहे, कारण आजवर आपण फक्त जन्म, वाढ आणि मृत्यू एवढेच साध्य केले आहे.

आपल्याला ‘ऐक्य‌’ संपादन करायचे आहे, कारण आजवर आपण फक्त सहयोग आणि युद्ध एवढेच साध्य केले आहे.

एका शब्दात सांगायचे झाले तर, आपल्याला ‘दिव्यत्व‌’ संपादन करायचे आहे, दिव्य प्रतिमेमध्ये आपल्या स्वतःला घडवायचे आहे.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 200-201)

(आज ही मालिका समाप्त होत आहे.)

 

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन साक्षात्कार आणि आजवर स्वप्नातही कधी पाहिले नव्हते असे प्रभुत्व संपादन करणे हे आपले काम आहे. काळ, आत्मा आणि जग हे आपल्याला प्रदान करण्यात आलेले क्षेत्र आहे; दृष्टी, आशा आणि सर्जनशील कल्पनाशक्ती या गोष्टी आपल्याला काय करायचे आहे याची आठवण करून देणाऱ्या आहेत; तर इच्छा, विचार आणि परिश्रम ही आपली सर्वार्थाने कार्यक्षम अशी साधनं आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 200)

 

स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती फिरत राहणे हीदेखील त्याची आणखी एक गती आहे.

*

आधी अंतरंगामध्ये असणाऱ्या आत्म्या‌विषयी सचेत व्हा, मग विचार करा आणि तदनंतर कृती करा. सर्वंकष चैतन्यमय विचार हा ज्याची पूर्वतयारी चालू आहे असे एक जग असते आणि सर्व खऱ्या कृती म्हणजे आविष्कृत झालेला विचार असतो. एक सत्य-कल्पना (Idea) दिव्य आत्म-चेतनेमध्ये क्रीडा करू लागली आणि त्यातून हे जडभौतिक जग अस्तित्वात आले.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 200)

 

मी आज जे करू शकत नाहीये तो, मी भविष्यात जे करणार आहे त्याचा संकेत आहे. अशक्यतेची जाणीव होणे ही सर्व शक्यतांची सुरुवात असते. हे कालबद्ध विश्व म्हणजे एक विरोधाभास होता आणि एक अशक्यता होती; म्हणूनच त्या शाश्वता‌ने स्वतःच्या अस्तित्वामधून हे विश्व निर्माण केले.

*

अशक्यता म्हणजे आजवर प्रत्यक्षात न उतरलेल्या महत्तर शक्यतांची केवळ गोळाबेरीज आहे. प्रगतीचा पुढचा टप्पा आणि अद्यापि पूर्णत्वास न गेलेला प्रवास या गोष्टी अशक्यतेमुळे झाकल्या गेलेल्या असतात.

*

मानवतेने प्रगत व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर सर्व पूर्वकल्पना बाजूला करा. तसे केल्याने, आजवर दुर्लक्षित राहिलेला विचार जागृत होतो आणि तो सर्जनशील बनतो. अन्यथा तो त्याच त्याच यांत्रिक चक्रात पुनरावृत्त होत राहतो आणि तीच त्याची योग्य कृती आहे असे समजण्याची चूक करतो.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 200)

 

 

जीवनाचे खरे उद्दिष्ट काय हे जर व्यक्तीला जाणून घ्यायचे असेल तर, त्या व्यक्तीने अहंकारी असता कामा नये, तिने आपल्या परम उगमापासून विभक्त होऊन, स्व-मग्न होता कामा नये; तिने अहंभावाचे समूळ उच्चाटन केलेच पाहिजे आणि याचीच खरी आवश्यकता असते. तेव्हाच व्यक्तीला जीवनाचे खरे उद्दिष्ट काय आहे हे ज्ञात होऊ शकते. तिथपर्यंत पोहोचण्याचा हा एकमेव मार्ग आहे. एखाद्या निरूपयोगी वस्त्राप्रमाणे, व्यक्तीचा अहंभाव गळून पडला पाहिजे आणि यासाठी जे प्रयत्न करावे लागतात ते किती सार्थ आहेत हे त्यांच्या परिणामावरून लक्षात येते.

आणि मग व्यक्ती या मार्गावर एकाकी नसते. (मी या मार्गावर एकाकी, एकटी नाही असा) विश्वास जर व्यक्तीमध्ये असेल तर, तिला साहाय्य मिळत राहते. तुम्ही एक क्षणभर जरी ईश्वरी कृपे‌च्या संपर्कात आलात तर ती कृपा, तुम्हाला तिच्यासोबत घेऊन जाते, त्या मार्गावरून तुमची वाटचाल द्रुतगतीने घडवून आणते. त्वरा केली पाहिजे याची तुम्हाला आठवणसुद्धा राहत नाही इतक्या सहजस्वाभाविक रितीने ती ते सारे घडवून आणते. तुमचा क्षणभर जरी त्या ईश्वरी कृपे‌शी संपर्क आला असेल तर, ती गोष्ट विस्मरणात जाऊ नये यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. मग तेव्हा एखाद्या बालकाच्या निर्व्याज साधेपणाने, निष्पापपणाने म्हणजे ज्यामध्ये कोणतीही जटिलता नसते अशा निष्पापपणाने तुम्ही त्या ईश्वरी कृपे‌स आत्मदान करा आणि ईश्वरी कृपे‌नेच सारे काही करावे यासाठी तिच्याप्रत खुले व्हा.

प्रतिकार करणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका, विरोधी गोष्टींवर विश्वास ठेवू नका. तुमच्यामध्ये एक सच्चा, खराखुरा विश्वास असला पाहिजे. ज्यामुळे तुम्ही कोणताही हिशोब न करता, कोणतीही सौदेबाजी (bargaining) न करता, स्वतःचे आत्मदान करण्यास प्रवूत्त होता असा विश्वास तुमच्या ठायी असला पाहिजे. विश्वास ठेवा. मग त्या विश्वासापोटी तुम्ही ईश्वराला असे म्हणता की, “मी ही गोष्ट तुझ्यावर सोपवितो आहे. माझ्यासाठी तेवढे करशील ना?” आणि हाच सर्वोत्तम मार्ग असतो.

– श्रीमाताजी (CWM 09 : 426-427)