साधना, योग आणि रूपांतरण – १५५
पूर्णयोगांतर्गत भक्ती
माणसं ज्याला ‘प्रेम’ समजतात त्या प्रेमामध्ये सहसा प्राणिक भावना मिसळलेल्या असतात. ‘ईश्वरा’भिमुख झालेले प्रेम हे तशा प्रकारचे प्रेम असता कामा नये. कारण ते प्रेम हे प्रेमच नसते; तर ती केवळ एक प्राणिक कामना, वासना असते; एक प्रकारची स्वीकृतीची सहजवृत्ती असते; ती मालकीची आणि एकाधिकाराची प्रेरणा असते. असे प्रेम हे दिव्य प्रेम तर नसतेच; पण एवढेच नव्हे तर, योगमार्गामध्ये त्याच्या अंशभागाचीही भेसळ होऊ देता कामा नये.
‘ईश्वरा’बद्दल वाटणाऱ्या प्रेमामध्ये आत्मदान असते, ते कोणत्याही मागणीपासून मुक्त असते; ते शरणागती आणि समर्पणाने परिपूर्ण असते; ते कोणतेही हक्क गाजवत नाही; ते कोणत्याही अटी लादत नाही; ते कोणताही सौदा करत नाही; मत्सर, अभिमान वा राग यांच्या उद्रेकामध्ये ते गुंतून पडत नाही, कारण या गोष्टी त्याच्या घडणीतच नसतात. परिणामतः ‘दिव्य माता’ देखील (अशा प्रेमाखातर) स्वतःलाच देऊ करते, अगदी मुक्तहस्ते! आणि आंतरिक वरदानामध्ये ती गोष्ट प्रतिबिंबित होत असते. ‘दिव्य माते’ चे अस्तित्व तुमच्या मनामध्ये, तुमच्या प्राणामध्ये, तुमच्या शारीरिक चेतनेमध्ये प्रतिबिंबित झालेले दिसते. तिची शक्ती तुमच्या अस्तित्वाच्या सर्व गतिविधी हाती घेऊन, त्यांना पूर्णत्व आणि परिपूर्तीच्या दिशेने घेऊन जात, दिव्य प्रकृतीमध्ये तुमची पुनर्घडण करते. (तेव्हा) तिच्या प्रेमाने तुम्हाला कवळून घेतले आहे आणि ती स्वतः तुम्हाला तिच्या बाहुंमध्ये घेऊन, ‘ईश्वरा’कडे घेऊन जात आहे असे तुम्हाला जाणवते. अगदी तुमच्या जडभौतिक अंगांमध्येसुद्धा तुम्हाला याची जाणीव व्हावी आणि तिने त्यांना आपलेसे करावे अशी अभीप्सा तुम्ही बाळगली पाहिजे. आणि इथे मात्र कोणतीही मर्यादा असत नाही, ना काळाची ना समग्रतेची!
जर व्यक्तीने खरोखर अशी अभीप्सा बाळगली आणि जर ती तिला साध्य झाली तर, इतर कोणत्याही मागण्यांना किंवा अपूर्ण राहिलेल्या इच्छावासनांना जागाच असता कामा नये. आणि व्यक्तीने खरोखरच जर अशी अभीप्सा बाळगली तर, आणि व्यक्ती जसजशी अधिकाधिक शुद्ध, पवित्र होत जाईल, तसतशी निश्चितपणे व्यक्तीला ती गोष्ट अधिकाधिक साध्य होईलच. आणि आवश्यक असणारा बदल तिच्या प्रकृतीमध्ये घडून येईलच. कोणतेही स्वार्थी हक्क आणि इच्छा यांच्यापासून मुक्त असे तुमचे प्रेम असू द्या; मग जेवढी तुमची क्षमता आहे, जेवढे तुम्ही ग्रहण करू शकता, तेवढे सर्व प्रेम प्रतिसादरूपाने तुम्हाला मिळत आहे; असे तुम्हाला आढळेल.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 338-339)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…