भारत – एक दर्शन १३
उपनिषदं म्हणजे भारतीय मनाची एक परमोच्च कृती आहे आणि तशी ती असायलाही हवी कारण भारतीय मनाच्या प्रतिभेचे उच्चतम आत्माविष्करण, त्याचे सर्वांत उन्नत काव्य, विचार आणि शब्दांची महत्तर निर्मिती ही केवळ एक सामान्य दर्जाची साहित्यिक किंवा काव्यात्मक कलाकृती असता कामा नये तर, ती साहित्यकृती म्हणजे थेट आणि सखोल स्वरूपाच्या आध्यात्मिक साक्षात्काराचा जणू महान गंगौघच असला पाहिजे. भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण मानसिकतेचा आणि आत्म्याच्या असामान्य वळणाचा तो पुरावा आहे. ती एक लक्षणीय वस्तुस्थिती आहे.
उपनिषदं ही एका बाजूने गहनगंभीर धर्मग्रंथ आहेत कारण उपनिषदं म्हणजे गहन अशा आध्यात्मिक अनुभूतींच्या नोंदी आहेत; आणि दुसरीकडे उपनिषदं म्हणजे अक्षय प्रकाश, शक्ती आणि व्यापकतेच्या साक्षात्कारी आणि अंतर्ज्ञानात्मक तत्त्वज्ञानाचे दस्तऐवजदेखील आहेत, मग ती पद्यामध्ये लिहिलेली असू देत वा लयबद्ध गद्यामध्ये लिहिलेली असू देत, उपनिषदं म्हणजे परम, अमोघ अंतःस्फूर्तीतून स्फुरलेली, शब्दरचनेच्या बाबतीत अपरिहार्यपणे निर्दोष असलेली अशी आध्यात्मिक काव्यं आहेत; लय आणि आविष्काराबाबत ती अद्भुत आहेत.
उपनिषदं म्हणजे, ज्या मनामध्ये ‘तत्त्वज्ञान, धर्म आणि काव्य’ एकजीव झालेली आहेत अशा मनाचे आविष्कार आहेत. कारण हा ‘धर्म’ कोणत्या एखाद्या संप्रदायामध्ये परिणत होत नाही किंवा तो एखाद्या धार्मिक-नैतिक आकांक्षेपुरताही सीमित राहत नाही, तर तो ‘ईश्वरा’च्या, ‘स्व’च्या अनंत शोधाप्रत उन्नत होतो, तो आपल्या आत्म्याच्या समग्र आणि सर्वोच्च वास्तवाप्रत आणि अस्तित्वाप्रत उन्नत होतो, आणि तो प्रकाशमान ज्ञानाची आणि प्रेरित व परिपूर्ण अनुभूतीच्या आनंदाची वाणी उच्चारतो. हे ‘तत्त्वज्ञान’ म्हणजे ‘सत्या’विषयीचा एखादा अमूर्त बौद्धिक तर्क नाही किंवा तार्किक बुद्धिमत्तेने केलेली कोणतीही रचना नाही, तर ते आंतरतम मनाने आणि आत्म्याने पाहिलेले, अनुभवलेले, जगलेले आणि साठवून ठेवलेले ‘सत्य’ आहे, खात्रीपूर्वक लागलेल्या शोधाचे आणि स्वामित्वाचे ते प्रसन्न उच्चारण आहे. आणि हे ‘काव्य’ म्हणजे अत्यंत दुर्मिळ अशा आध्यात्मिक आत्मदृष्टीचे सौंदर्य आणि त्याचे आश्चर्य अभिव्यक्त करण्यासाठी, आणि ‘स्व’च्या, ‘ईश्वरा’च्या आणि विश्वाच्या गहनतम, ज्योतिर्मयी सत्याची अभिव्यक्ती करण्यासाठी, मनाच्या सर्वसामान्य क्षेत्राच्या अतीत, वर उचलल्या गेलेल्या सौंदर्यात्मक मनाचे कार्य आहे.
– श्रीअरविंद [CWSA 20 : 329-330]
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…