ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

उपनिषदांचे अलौकिक स्वरूप

भारत – एक दर्शन १३

उपनिषदं म्हणजे भारतीय मनाची एक परमोच्च कृती आहे आणि तशी ती असायलाही हवी कारण भारतीय मनाच्या प्रतिभेचे उच्चतम आत्माविष्करण, त्याचे सर्वांत उन्नत काव्य, विचार आणि शब्दांची महत्तर निर्मिती ही केवळ एक सामान्य दर्जाची साहित्यिक किंवा काव्यात्मक कलाकृती असता कामा नये तर, ती साहित्यकृती म्हणजे थेट आणि सखोल स्वरूपाच्या आध्यात्मिक साक्षात्काराचा जणू महान गंगौघच असला पाहिजे. भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण मानसिकतेचा आणि आत्म्याच्या असामान्य वळणाचा तो पुरावा आहे. ती एक लक्षणीय वस्तुस्थिती आहे.

उपनिषदं ही एका बाजूने गहनगंभीर धर्मग्रंथ आहेत कारण उपनिषदं म्हणजे गहन अशा आध्यात्मिक अनुभूतींच्या नोंदी आहेत; आणि दुसरीकडे उपनिषदं म्हणजे अक्षय प्रकाश, शक्ती आणि व्यापकतेच्या साक्षात्कारी आणि अंतर्ज्ञानात्मक तत्त्वज्ञानाचे दस्तऐवजदेखील आहेत, मग ती पद्यामध्ये लिहिलेली असू देत वा लयबद्ध गद्यामध्ये लिहिलेली असू देत, उपनिषदं म्हणजे परम, अमोघ अंतःस्फूर्तीतून स्फुरलेली, शब्दरचनेच्या बाबतीत अपरिहार्यपणे निर्दोष असलेली अशी आध्यात्मिक काव्यं आहेत; लय आणि आविष्काराबाबत ती अद्भुत आहेत.

उपनिषदं म्हणजे, ज्या मनामध्ये ‘तत्त्वज्ञान, धर्म आणि काव्य’ एकजीव झालेली आहेत अशा मनाचे आविष्कार आहेत. कारण हा ‘धर्म’ कोणत्या एखाद्या संप्रदायामध्ये परिणत होत नाही किंवा तो एखाद्या धार्मिक-नैतिक आकांक्षेपुरताही सीमित राहत नाही, तर तो ‘ईश्वरा’च्या, ‘स्व’च्या अनंत शोधाप्रत उन्नत होतो, तो आपल्या आत्म्याच्या समग्र आणि सर्वोच्च वास्तवाप्रत आणि अस्तित्वाप्रत उन्नत होतो, आणि तो प्रकाशमान ज्ञानाची आणि प्रेरित व परिपूर्ण अनुभूतीच्या आनंदाची वाणी उच्चारतो. हे ‘तत्त्वज्ञान’ म्हणजे ‘सत्या’विषयीचा एखादा अमूर्त बौद्धिक तर्क नाही किंवा तार्किक बुद्धिमत्तेने केलेली कोणतीही रचना नाही, तर ते आंतरतम मनाने आणि आत्म्याने पाहिलेले, अनुभवलेले, जगलेले आणि साठवून ठेवलेले ‘सत्य’ आहे, खात्रीपूर्वक लागलेल्या शोधाचे आणि स्वामित्वाचे ते प्रसन्न उच्चारण आहे. आणि हे ‘काव्य’ म्हणजे अत्यंत दुर्मिळ अशा आध्यात्मिक आत्मदृष्टीचे सौंदर्य आणि त्याचे आश्चर्य अभिव्यक्त करण्यासाठी, आणि ‘स्व’च्या, ‘ईश्वरा’च्या आणि विश्वाच्या गहनतम, ज्योतिर्मयी सत्याची अभिव्यक्ती करण्यासाठी, मनाच्या सर्वसामान्य क्षेत्राच्या अतीत, वर उचलल्या गेलेल्या सौंदर्यात्मक मनाचे कार्य आहे.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 329-330]

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

10 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago