ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

भारत – एक दर्शन १२

वैदिक शिकवण ही मनुष्याच्या आंतरिक जीवनासाठी उपयुक्त ठरते, हे त्या शिकवणुकीचे मोठे सामर्थ्य आहे आणि त्यामुळेच ती शिकवण नंतरच्या सर्व भारतीय तत्त्वज्ञानांचा, धर्मांचा, योगप्रणालींचा उगम ठरली.

मनुष्य भौतिक विश्वात राहतो, तो मरणाधीन असतो आणि मर्त्य अस्तित्वाच्या ‘पुष्कळशा असत्या’च्या तो अधीन असतो. या मरणाच्या अतीत होण्यासाठी, अमर्त्यांपैकी एक होण्यासाठी, त्याने असत्याकडून ‘सत्या’कडे वळले पाहिजे; त्याने ‘प्रकाशा’कडे वळले पाहिजे आणि ‘अंधकारा’च्या शक्तींशी लढून त्यावर विजय मिळविला पाहिजे. ईश्वरी ‘शक्तीं’च्या सख्यत्वाने आणि त्यांचे साहाय्य घेऊन तो या गोष्टी करतो; ईश्वरी ‘शक्तीं’च्या साहाय्यासाठी आवाहन करण्याचा हा मार्ग म्हणजे वैदिक गूढवाद्यांचे गुप्त रहस्य होते.

जगभरातील ‘रहस्यां’ना ज्याप्रमाणे आंतरिक अर्थ देण्यात आलेला असतो त्याप्रमाणेच तो येथे बाह्य यज्ञाच्या प्रतीकांना देण्यात आला आहे. ती प्रतीके मानवामध्ये देवदेवतांना आवाहन करण्याचे प्रतिनिधित्व करत असतात; ती प्रतीके मानव व देवदेवतांना जोडत असतात, त्या दोहोंमध्ये विनिमय घडवीत असतात, ती अन्योन्य साहाय्यक ठरतात आणि त्यांच्यामध्ये सख्यत्व घडवून आणतात. त्यांद्वारे माणसामध्ये देवदेवतांच्या शक्ती निर्माण होऊ लागतात; तसेच त्याच्यामध्ये दिव्य प्रकृतीची विश्वव्यापकतादेखील आकाराला येते. कारण देव हे ‘सत्या’चे रक्षक आणि संवर्धक आहेत, ते ‘अमर्त्यत्वा’च्या शक्ती आहेत, ते अनंत असणाऱ्या ‘माते’चे पुत्र आहेत; अमर्त्यत्वाकडे जाणारा मार्ग हा देवांचा ऊर्ध्वगामी मार्ग आहे, तो ‘सत्या’चा मार्ग आहे, तो एक प्रवास आहे, ‘ऋतस्य पंथः’ असे ज्याला म्हटले जाते त्या ‘सत्या’च्या धर्मामध्ये मनुष्याचे आरोहण आहे.

मनुष्य स्वतःच्या केवळ शारीरिक ‘स्व’च्या मर्यादा तोडून अमर्त्यत्वाकडे येऊन पोहोचतो असे नाही, तर तो जेव्हा त्याच्या मानसिक आणि सामान्य आंतरात्मिक प्रकृतीच्या मर्यादा तोडून, उच्चतर स्तरावर आणि ‘सत्या’च्या सर्वश्रेष्ठ अवकाशात जातो, तेव्हाच तो अमर्त्यत्वाप्रत पोहोचतो. कारण तेथेच अमर्त्यत्वाचा पाया आहे आणि तेथे त्रिविध ‘अनंता’चे स्वाभाविक निवासस्थान आहे. या संकल्पनांवरच वैदिक ऋषींनी मनोवैज्ञानिक आणि आंतरात्मिक साधनेची उभारणी केली; नंतर हीच साधना स्वतःच्या पलीकडे जात सर्वोच्च आध्यात्मिकतेकडे गेली आणि त्यातच उत्तरकालीन भारतीय ‘योगा’चा गाभा सामावलेला होता.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 202-203]

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

ईश्वरी अवतरणाचा दाब

  (अगदी बारीकसारीक आध्यात्मिक अनुभवामुळे हुरळून जाणाऱ्या नवोदित साधकांना श्रीमाताजी सांगत आहेत...) तुम्हाला ईश्वरी अवतरणाचा…

16 hours ago

चालत्या गाड्याला खीळ…

  “तुम्ही ईश्वरी शक्तीसमोर खुले व्हा म्हणजे तुम्हाला ईश्वरी शक्ती प्राप्त होईल,” असे तुम्हाला सांगण्यात…

2 days ago

प्रकृतीचे शुद्धीकरण

(एका साधकाला स्वप्नामध्ये जे दिसले आहे त्यावरून दिव्य प्रकाश स्वीकारण्यासाठी तो सक्षम आहे असे दिसते,…

3 days ago

अडचणींना कसे हाताळावे?

(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुमच्या अडचणींना हाताळण्यात आणि तुमच्यावर अपप्रवृत्तींचा जो हल्ला होत आहे…

4 days ago

उच्चतर शक्तीचे अवतरण

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) ‘शक्तीला प्रवेश करू द्या,’ असे मी जेव्हा तुम्हाला लिहिले तेव्हा त्याचा अर्थ…

5 days ago

केवळ ईश्वरी शक्तीप्रतच खुले व्हावे

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून...) ‘क्ष’ हा अवाजवी तामसिक, अक्रिय झाला आहे. तो प्रत्येक गोष्टीलाच खुला…

6 days ago