ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

आध्यात्मिकता ११

मानसिक विचार, नैतिक प्रयास, उत्तम चारित्र्य, जनहित, आत्म-त्याग, आत्म-परित्याग, परोपकार, मानवाची किंवा मनुष्यमात्राची सेवा या गोष्टींना पाश्चात्य लोक आध्यात्मिक अभीप्सेचे किंवा आध्यात्मिक सिद्धीचे शिखर मानतात. यासंबंधी लिहून झाल्यावर श्रीअरविंद या पत्रामध्ये पुढे लिहितात…..

(वर उल्लेख केलेल्या गोष्टी) म्हणजे पृथ्वीवरील उपलब्धींचा जर अखेरचा शब्द असता, तर अन्य कोणत्या गोष्टींची आवश्यकताच भासली नसती. आत्म्याचा किंवा स्वतःचा अगदी जवळून आणि सुस्पष्टपणे घेतलेला शोध, प्राणाच्या पाठीमागे आणि मनाच्या वर असणाऱ्या गोष्टींसाठी झटून केलेले प्रयत्न, ‘चिरंतना’विषयी किंवा ‘अनंता’विषयी असलेली ओढ, बुद्धिच्या, चारित्र्याच्या आणि मानवतेच्या गतकालीन जीवनध्येयांच्या संकुचित साच्यांमुळे मर्यादित न झालेली, चेतनेच्या आणि अस्तित्वाच्या स्वातंत्र्यासाठी आणि विशालतेसाठी असलेली भूक, ‘ईश्वरा’च्या किंवा विशुद्ध आनंदाच्या ऐक्यासाठी असलेली तृष्णा, मानसिक व प्राणिक मूल्यांशी जखडल्या न गेलेल्या आध्यात्मिक अस्तित्वाचे सौंदर्य या साऱ्या गोष्टींना येथे स्थान नसल्यामुळे आणि त्यांची येथे आवश्यकतादेखील नसल्यामुळे, त्या अनावश्यक स्वप्न म्हणून बाद कराव्या लागल्या असत्या. परंतु असे असूनही, या गोष्टींची नुसती स्वप्नंच पाहिली गेली आहेत, अथवा नुसता त्यांचा ध्यासच घेतला गेला आहे असे नाही, तर मर्त्य, मानवी देहामध्ये जन्म घेतलेले जीव तेथवर जाऊन पोहोचले आहेत, त्या गोष्टींचा पडताळा त्यांनी घेतला आहे. तेथे ‘आध्यात्मिकता’ असते.

मानवी मानसिक, नैतिक, सौंदर्यात्मक, प्राणिक साच्यांच्या पलीकडे जाण्यासाठी, ते साचे मोडणे आणि (चिरंतनाविषयीची ओढ इ. गोष्टी, ज्यांचा वर उल्लेख झाला) त्या गोष्टी ज्या चेतनेचे मूलद्रव्य आहेत, हे अनुभव ज्या चेतनेच्या दृष्टीने अगदी सहज-स्वाभाविक आहेत अशा चेतनेमध्ये प्रवेश करणे हा ‘आध्यात्मिकते’चा गाभा आहे. त्यापेक्षा निम्नतर अशी कोणतीही गोष्ट, किंवा उपरोक्त गोष्टींपेक्षा निम्नतर अशा कोणत्याही गोष्टीचा ध्यास किंवा अगदीच काही नाही तरी, त्यांचा झालेला आंशिक साक्षात्कार या गोष्टी म्हणजे ‘आध्यात्मिकता’ नव्हे. यांपैकी कोणत्यातरी एखाद्या गोष्टीचा साक्षात्कार, त्याच्या अनेक पैलूंपैकी, किमान एका पैलूचा तरी अनुभव, ज्याला आला आहे तो मनुष्य ‘आध्यात्मिक’ असतो; या गोष्टींचा ध्यास घेऊन, त्यासाठी जो प्रयत्नशील आहे, तो ‘आध्यात्मिक साधक’ असतो.

अन्य गोष्टी बौद्धिक, नैतिक दृष्टीने कितीही उदात्त असल्या, सौंदर्यदृष्ट्या अतिशय सुंदर आणि सुसंवादी असल्या, प्राणिकदृष्ट्या वैभवसंपन्न, महान आणि शक्तिशाली असल्या किंवा शारीरिकदृष्ट्या निर्दोष असल्या तरी या सर्व गोष्टी म्हणजे मार्गावरील एक मौलिक उपलब्धी आहे एवढेच म्हणता येईल, या गोष्टी म्हणजे स्वयमेव ‘आध्यात्मिकता’ नव्हे, कारण येथे अजूनही व्यक्तीने मनाची ‘सीमारेषा’ ओलांडून एका नव्या साम्राज्यात प्रवेश केलेला नसतो. [‘आध्यात्मिकता’ मालिकेमधील ‘मानवी परिपूर्णत्व आणि आध्यात्मिकता’ हा भाग येथे संपला.]

– श्रीअरविंद [CWSA 28 : 424-425]

Latest posts by श्रीअरविंद (see all)
श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

मुलांचे संगोपन

(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…

13 hours ago

विजयाची खात्री

जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…

2 days ago

सकारात्मक वृत्तीचा परिणाम

  (लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…

3 days ago

स्वप्नांवर विश्वास ठेवा

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…

4 days ago

उपयुक्ततावादाचा आजार

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…

5 days ago

शिक्षण आणि संस्कृती

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…

6 days ago