आध्यात्मिकता १२
आध्यात्मिकता आणि नैतिकता यामध्ये खूप फरक आहे, पण लोक नेहमी त्या दोन्हीमध्ये गल्लत करत असतात. दिव्य चेतनेशी एकत्व पावण्याच्या दिशेने विकसित होत राहावे आणि परिणामतः आपल्यामध्ये जे काही आहे त्याचे शुद्धीकरण व्हावे, त्याची तीव्रता वाढीस लागावी, त्याचे उदात्तीकरण व्हावे आणि त्यामध्ये परिपूर्णता यावी यासाठी आध्यात्मिक जीवन, ‘योग’जीवन असते. आध्यात्मिक जीवन हे, ‘ईश्वरा’चे आविष्करण करण्याची शक्ती आपल्याला प्रदान करते. आध्यात्मिक जीवनाद्वारे व्यक्तिमत्त्वाच्या गुणवैशिष्ट्यांचा परमोत्कर्ष साधला जातो आणि त्यातून त्या व्यक्तिमत्त्वाची महत्तम अभिव्यक्ती घडून येते; कारण हा ‘ईश्वरी’ योजनेचा एक भाग असतो.
याउलट, नैतिकता ही मानसिक रचनेच्या आधारे प्रगत होते आणि काय चांगले आहे आणि काय चांगले नाही यासंबंधीच्या काही ठरावीक सिद्धांताद्वारे ती एक आदर्श साचा तयार करते आणि त्या आदर्श साच्यामध्ये बसण्यासाठी प्रत्येकाला ते भाग पाडते. हा नैतिक आदर्श त्याच्या विविध घटकांनुसार किंवा समग्रतया वेगवेगळा असू शकतो, तो स्थळकाळानुसार वेगवेगळा असू शकतो. आणि असे असूनसुद्धा आपण एकमेवाद्वितीय आहोत, आपण निरपवाद आहोत असा दावा तो आदर्श साचा करत असतो; बाहेरच्या कोणत्याही गोष्टीला तो त्यामध्ये शिरकाव करू देत नाही, एवढेच काय पण आपल्या स्वतःमधील विभिन्नतासुद्धा तो मान्य करत नाही. सर्वांनी त्या एकमेवाद्वितीय आदर्श साच्यामध्येच बसणे आवश्यक असते, प्रत्येकजण हा असा एकसमान आणि निर्दोषरित्या सारखाच असला पाहिजे, अशी त्याची अपेक्षा असते. कारण नैतिकता ही अशा प्रकारे काटेकोर, कृत्रिम स्वरूपाची असते आणि ती तत्त्वतःसुद्धा आणि तिची कार्यप्रणालीसुद्धा आध्यात्मिक जीवनाच्या उलट असते.
आध्यात्मिक जीवन हे सर्वांमध्ये असलेले एकतत्त्व प्रकट करते आणि त्याचबरोबर ते अनंत विविधताही प्रकट करत असते; आध्यात्मिक जीवन एकत्वामधील विविधतेसाठी आणि त्या विविधतेतील पूर्णत्वासाठी कार्यरत असते.
– श्रीमाताजी [CWM 03 : 117-118]
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…