ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

अमर्त्यत्वाचा शोध ०८

जडभौतिक शरीरामध्ये मनुष्यप्राणी स्वगृही व सुरक्षित असतो; देह हा त्याचे सुरक्षाकवच असते. काही लोक असे असतात ज्यांच्यामध्ये स्वतःच्या शरीराविषयी तिरस्कार भरलेला असतो व ते असा विचार करतात की, त्यांच्या मृत्युनंतर गोष्टी अधिक चांगल्या व अधिक सोप्या होतील. परंतु वास्तविकता अशी आहे की, शरीर हे तुमचे आश्रयस्थान असते, गडकोट असतो. तुम्ही जेव्हा शरीरात निवास करीत असता तेव्हा विरोधी जगताच्या शक्तींना तुमच्यावर थेट ताबा मिळविणे कठीण असते. दु:स्वप्ने म्हणजे काय? तर, दु:स्वप्ने म्हणजे तुम्ही प्राणिक जगतामध्ये (vital world) केलेले भ्रमण असते. आणि दुःस्वप्नाच्या तावडीत जेव्हा तुम्ही सापडता तेव्हा तुम्ही प्रथम काय करता? तर, तुम्ही झपाट्याने स्वत:च्या शरीरात परत येता आणि तुम्ही तुमच्या सामान्य शारीरिक चेतनेमध्ये परतून येईपर्यंत स्वतःला खडबडवून जागे करता. परंतु प्राणिक शक्तीच्या जगतात मात्र तुम्ही परके असता; तो अपरिचित समुद्र असतो व त्यात तुमच्याकडे दिशादर्शक होकायंत्र नसते, की सुकाणूही नसते. कसे जावे, कुठे जावे हे तुम्हाला काहीही कळत नसते आणि जे करायला हवे त्याच्या अगदी विरुद्ध असेच प्रत्येक पावलागणिक तुम्ही करत असता. या जगताच्या कोणत्याही प्रदेशात तुम्ही थेट प्रवेश केला तर तेथील जीव तुमच्याभोवती गोळा होतात, ते तुम्हाला घेरतात आणि तुमच्यामध्ये असलेले सर्वकाही काढून घेऊ पाहतात, जे त्यांना काढता येईल ते काढून त्याला ते स्वतःचे अन्न व भक्ष्य बनवू पाहतात. तुमच्याकडे जर शक्तिशाली प्रकाश आणि अंतरंगातून प्रस्फुरित होणारी शक्ती नसेल, तर तुम्ही तुमच्या शरीराविना तिथे कसे वावरत असता? तर, जणू काही कडाक्याच्या थंडीमध्ये आश्रय देणारे घर तुमच्यापाशी नसावे, संरक्षण करणारे उबदार कपडेही तुमच्याकडे नसावेत, इतकेच नव्हे तर तुमच्या शरीरांतर्गत असणाऱ्या नाड्या झाकून घेण्यासाठी त्वचादेखील नसावी आणि त्या त्वचेविना त्या नाड्या, धमन्या, शिरा उघड्या पडलेल्या असाव्यात, अशा तऱ्हेने तुम्ही तिथे वावरत असता.

अशीही काही माणसे असतात जी म्हणतात की, “मी या शरीरात किती दुःखी आहे.” आणि त्या दु:खापासून सुटका म्हणून ते मृत्युचा विचार करत असतात! परंतु मृत्युनंतरदेखील तुमचा बाह्य प्राणिक परिवेश अगदी तसाच कायम असतो आणि इहलोकातील जीवनामध्ये तुमच्या हालअपेष्टांना कारणीभूत असणाऱ्या शक्तींसारख्याच शक्तींचा तुम्हाला तेथेही धोका असतो. शरीराच्या विघटनामुळे, तुम्ही प्राणिक जगताच्या उघड्या अवकाशात जबरदस्तीने ढकलले जाता. आणि त्यानंतर तुमच्याकडे कोणतेही सरंक्षण नसते. आणि वेगाने सुरक्षिततेमध्ये परत येण्यासाठी भौतिक शरीरही आता तुमच्याकडे नसते.

इथे या पृथ्वीवर असताना, प्रत्यक्ष देहामध्ये असतानाच पूर्ण शक्तीचा उपयोग कसा करायचा हे तुम्ही शिकले पाहिजे आणि पूर्ण ज्ञान आत्मसात केले पाहिजे.

…अंध:कारमय जीव ज्यामुळे तुमच्यापाशी येतील किंवा तुमच्यावर सत्ता गाजवू शकतील अशा कोणत्याही गोष्टीपासून तुम्ही पूर्णपणे मुक्त असले पाहिजे; जर तुम्ही तसे मुक्त नसाल तर सावध व्हा!

कोणतीही आसक्ती नाही, इच्छा नाहीत, आवेग नाहीत, पसंतीनापसंती नाही; संपूर्ण समता, अविचल शांती आणि ईश्वरी संरक्षणाविषयी परिपूर्ण श्रद्धा : हे सारे असेल तर तुम्ही सुरक्षित असता; नसेल तर तुम्ही संकटात सापडता. आणि जोवर तुम्ही सुरक्षित नसता, तोवर कोंबडीची पिल्ले ज्याप्रमाणे आईच्या पंखाखाली आसरा घेतात, तसे करणे अधिक चांगले!

– श्रीअरविंद
(CWM 03 : 47-48)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

10 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago