ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – २०

ज्ञानयोग

 

जीवात्म्याने शांत परमात्म्यात, परमशून्यात किंवा अनिर्वचनीय केवलात विलीन व्हावे म्हणून पारंपरिक ज्ञानमार्ग निरसनाचा, नकाराचा पाढा वाचीत जातो. (‘हे शरीर म्हणजे मी नव्हे’, ‘हा प्राण म्हणजे मी नव्हे’, ‘हे हृदय म्हणजे मी नव्हे’, आणि ‘हे विचार म्हणजे मी नव्हे’ असे म्हणत, तो क्रमाक्रमाने ह्या साऱ्यांना दूर सारतो.) तर पूर्णज्ञानाचा मार्ग असे मानतो की, आपण पूर्ण आत्मपरिपूर्ती गाठावी, अशी ईश्वरी योजना आहे. आणि म्हणून, आपण एकच गोष्ट दूर करायची आहे; ती म्हणजे, आपली स्वत:ची नेणीव (unconsciousness), आपले अज्ञान आणि आपल्या अज्ञानाचे परिणाम. आपल्या अस्तित्वाचे ‘मी’ म्हणून वावरणारे खोटे रूप आपण दूर करावे, म्हणजे मग आपल्यामध्ये आपल्या खऱ्या अस्तित्वाला अभिव्यक्त होता येईल. केवळ वासनेची धाव या रूपात व्यक्त होणारा प्राणाचा खोटेपणा आणि आपल्या भौतिक अस्तित्वाचे यंत्रवत त्याच त्या फेऱ्यात फिरत राहणे, हे आपण दूर करावे. हे खोटे रूप दूर केले म्हणजे, ईश्वरीय शक्तीत वसणारा आमचा खरा प्राण व्यक्त होईल, अनंताचा आनंद प्रकट होईल. भौतिक दिखाऊपणा आणि संवेदनांची द्वंद्वे यांच्या अधीन झाल्यामुळे, आलेला इंद्रियांचा खोटेपणा दूर केला तर, आपल्यातच दडलेली अधिक महान इंद्रियशक्ती, वस्तुमात्रांमध्ये असलेल्या दिव्यत्वाप्रत खुली होऊ शकते आणि त्यांना तसाच दिव्य प्रतिसाद देऊ शकते. वासना-विकारांनी व द्वंद्वात्मक भावभावनांनी कलुषित झालेल्या आपल्या हृदयाचा खोटेपणा दूर केला की, अधिक खोलवर असणारे हृदय अखिल जीवमात्रांविषयीच्या अपार दिव्य प्रेमानिशी खुले होते; अनंत ईश्वराने आपल्याला प्रतिसाद द्यावा, अशी अपरिमित तळमळ त्याला वाटू लागते. अपूर्ण सदोष मानसिक रचना, अरेरावीचे होकार नकार, संकुचित आणि एकांगी केंद्रीकरणे ही आपल्या विचाराची खोटी संपदा दूर केली म्हणजे तिच्या मागे असलेली महान ज्ञानशक्ती ईश्वराच्या खऱ्याखुऱ्या स्वरूपास, जीवात्म्याच्या, प्रकृतीच्या, विश्वाच्या खऱ्याखुऱ्या रूपास उन्मुख होऊ शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 291-292)

Latest posts by श्रीअरविंद (see all)
श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

मुलांचे संगोपन

(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…

13 hours ago

विजयाची खात्री

जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…

2 days ago

सकारात्मक वृत्तीचा परिणाम

  (लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…

3 days ago

स्वप्नांवर विश्वास ठेवा

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…

4 days ago

उपयुक्ततावादाचा आजार

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…

5 days ago

शिक्षण आणि संस्कृती

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…

6 days ago