पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १९
ज्ञानयोग
ज्ञानमार्ग परमश्रेष्ठ एकमेवाद्वितीय आत्म्याचा साक्षात्कार हे आपले साध्य मानतो. साधक या मार्गात बुद्धीचा उपयोग करून ‘विचारा’च्या द्वारा ‘विवेका’ कडे, वाटचाल करतो. ज्ञानमार्ग हा आपल्या नामरूपात्मक प्रकट अस्तित्वाचे वेगवेगळे घटक बारकाईने पाहून अलग करतो. ज्ञानमार्गी साधक या प्रत्येक घटकाची स्वतःशी असलेली एकरूपता नाकारतो आणि त्यांच्या पृथगात्मकतेपाशी व व्यवच्छेदकत्वापाशी येऊन पोहोचतो. त्या सगळ्याची गणना तो प्रकृतीचे घटक, नामरूपात्मक प्रकृती, मायेची निर्मिती, नामरूपात्मक जाणीव अशा एका सर्वसाधारण संज्ञेमध्ये करतो. अशा रीतीने अविकारी, अविनाशी असलेल्या, कोणत्याही घटनेने किंवा इंद्रियगोचर घटनांच्या एकत्रीकरणानेही ज्याचे वर्णन करता येणार नाही अशा, शुद्ध एकमेवाद्वितीय आत्म्याशी हा साधक आपले एकत्व योग्य प्रकारे प्रस्थापित करू शकतो. ज्ञानमार्गी साधक येथपर्यंत आल्यावर, सामान्यत: नामरूपात्मक जगाला आपल्या जाणिवेतून भ्रम म्हणून काढून टाकतो आणि सर्वश्रेष्ठ आत्म्यांत आपला वैयक्तिक आत्मा विलीन करून टाकतो, तो परत नामरूपात्मक जगात येत नाही.
परंतु ज्ञानयोगाची ही निष्पत्ती, हा काही ज्ञानयोगाचा एकमेव किंवा अपरिहार्य परिणाम नाही. कारण ज्ञानयोगाची ही पद्धत कमी व्यक्तिगत ध्येय ठेवत, व्यापक स्तरावर अनुसरली तर, ईश्वराच्या विश्वातीत अस्तित्वाप्रमाणेच, त्याच्या विश्वात्मक अस्तित्वाचाही सक्रिय विजय होण्याप्रत घेऊन जाणारी ठरते. हा जो प्रस्थानबिंदू असतो, तो असा असतो की, जेथे व्यक्तीला केवळ स्वतःच्या सर्वोच्च आत्म्याचाच साक्षात्कार झालेला असतो असे नाही तर; सर्वात्मक अस्तित्वातील आत्म्याचा देखील साक्षात्कार झालेला असतो. तसेच अंतिमतः हे नामरूपात्मक जग त्याच्या सत्य प्रकृतीपेक्षा पूर्णतः अलग असे काहीतरी नसून, हे नामरूपात्मक जग म्हणजे दिव्य चेतनेची लीला आहे, याचाही साक्षात्कार व्यक्तीला झालेला असतो. आणि या साक्षात्काराच्या अधिष्ठानावरच अधिक विस्तार करणे शक्य असते. कितीही सांसारिक असेनात का, पण ज्ञानाच्या सर्व रूपांचे दिव्य चेतनेच्या कृतीमध्ये रूपांतर करता येणे शक्य असते आणि अशा या कृतींचा, ज्ञानाचे उद्दिष्ट असलेल्या त्या एकमेवाद्वितीयाच्या आकलनासाठी आणि त्याच्या विविध रूपांच्या आणि प्रतीकांच्या माध्यमातून त्याची जी लीला चालू असते, त्याच्या आकलनासाठी उपयोग करता येणे शक्य असते.
– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 38)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…