ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

पुनर्जन्म म्हणजे बक्षीस वा शिक्षा नव्हे

(पुनर्जन्म म्हणजे बक्षीस किंवा शिक्षा असते अशी समजूत असणारी माणसं कसा विचार करतात याविषयी श्रीअरविंद येथे सांगत आहेत.)

एखादा माणूस भला दिसतो आहे पण त्या माणसाकडे श्रीमंती, पैसे, भाग्य नसेल तर सर्वसामान्य माणसं असा समज करून घेतात की, तो गत जन्मामध्ये नीच असला पाहिजे; तो त्याच्या गुन्ह्यांची सजा ह्या जन्मामध्ये भोगत असला पाहिजे. पण केवळ अचानकपणे मातेच्या उदरात असताना त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे आणि तो भला म्हणून या जन्मात जन्माला आला आहे. आणि त्याचवेळी दुसरीकडे, जर एखाद्या दुष्ट माणसाची भरभराट होत आहे आणि जग त्याच्या पायाशी लोळण घेत आहे असे दिसले, तर (वरीलप्रमाणे विचार करणाऱ्या लोकांच्या लेखी,) तो त्याच्या गतजन्मातील चांगुलपणाचा परिणाम असतो. वास्तविक, एकेकाळी तो संतसत्पुरुष असणार पण त्याने सद्गुणांच्या मोठेपणाच्या क्षणिकतेचा अनुभव घेतला असेल आणि म्हणून तर त्याने ह्या जन्मी हा पापाचा पंथ स्वीकारला नसेल ना? (असा ते विचार करतात.) त्यांच्याकडे सगळ्या गोष्टींचे स्पष्टीकरण असते, त्यांना सगळ्या गोष्टींचे समर्थन करता येते. आपण मागच्या जन्मात केलेल्या पापांमुळे दुःख भोगतो, ह्या जन्मातील गुणांचे आपल्याला पुढील जन्मी बक्षीस मिळणार आहे आणि हे असे अनंत काळपर्यंत चालत राहणार आहे; असे त्यांचे मत असते.

तत्त्वज्ञानी लोकांना मात्र ह्यात काही राम आढळत नाही आणि ते पाप आणि पुण्य या दोन्हींपासून स्वत:ची सुटका करून घ्यायला सांगतात आणि इतकेच नव्हे तर अद्भुतरित्या चालविल्या जाणाऱ्या या विश्वापासून सुटका करून घेणे, ह्यातच आपले भले आहे असे ते सांगतात, पण ह्यात काही नवल नाही.

हे उघड आहे की, ही विचारसरणी ही जुन्याच लौकिक-पारलौकिक लालूच आणि धमकी यांचे एक वेगळे रूप आहे; चांगल्या वागणुकीसाठी स्वर्गीय सुखांच्या लयलूटीची लालूच आणि दुष्प्रवृत्त माणसासाठी नरकातील शाश्वत आगीची वा पाशवी नरकयातनांची धमकी !

या जगताचे नियमन कोणा एका बक्षीस वा शिक्षा देणाऱ्या योजकाकरवी होत असते, ही यामागील कल्पना आहे. परमेश्वर हा जणू काही न्यायाधीश आहे, पिता आहे, किंवा परमेश्वर म्हणजे जणूकाही, वर्गातील गुणी मुलांना नेहमी लॉलिपॉप देणारा व खोडकर, वात्रट मुलांना दमात घेणारा कोणी शाळाशिक्षक आहे, ह्या कल्पनेशी सादृश्य राखणारी वरील कल्पना आहे.

सामाजिक गुन्हा केला की, त्याला अवमानित करणारी शिक्षा द्यावयाची, कधीकधी तर अगदी अमानुष अशी शिक्षा द्यावयाची, या रानटी आणि अविचारी विचारप्रणालीशी साधर्म्य राखणारी ही कल्पना आहे.

देवाच्या प्रतिमेनुसार स्वत:ला घडविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, आपल्या स्वत:च्या प्रतिमेमध्ये देवाला बसविण्यावर माणसाचा नेहमी भर असतो; परंतु या सर्व कल्पना म्हणजे आपल्यातील बालबुद्धीचे, आपल्यामध्ये असणाऱ्या रानटीपणाचे वा पशुचे प्रतिबिंब असते. आपण अजून त्यापलीकडे गेलो नाही किंवा आपल्यामध्ये रूपांतर घडवून आणू शकलो नाही, ह्याचेच ह्या कल्पना निदर्शक असतात….

ज्याअर्थी ह्या कल्पना इतक्या ठाशीवपणे आढळतात त्याअर्थी त्यांचा मानवाला घडविण्यामध्ये काही एक उपयोग असणार हे निश्चित. कदाचित असेदेखील असू शकेल की, अप्रगत जीवदशेतील लोकांबरोबर परमेश्वर त्यांच्या त्यांच्या बालीशतेला धरून व्यवहार करीत असेल; आणि मृत्युनंतरच्या जीवनाविषयीच्या वा पुनर्जन्माविषयीच्या, स्वर्गनरकाच्या त्यांच्या ज्या काही रोमांचकारी कल्पना असतात त्या कल्पना त्यांना बाळगू देण्यास तो संमती देत असेल. कदाचित मृत्युनंतरच्या जीवनाविषयीच्या आणि पुनर्जन्माविषयीच्या या बक्षीस व शिक्षेच्या कल्पना आवश्यक असतील, कारण त्या आपल्या अर्ध-मानसिक पशुतेशी मिळत्याजुळत्या होत्या. पण खरंतर, एका विशिष्ट दशेनंतर ही प्रणाली तितकीशी परिणामकारक ठरत नाही. माणसं स्वर्ग व नरक या कल्पनांवर विश्वास ठेवतात पण ….मृत्युशय्येवर पश्चात्ताप होईपर्यंत किंवा गंगातीरी जाऊन स्नान करेपर्यंत किंवा बनारसमध्ये पवित्र मरण येईपर्यंत खुशाल पापं करीत राहतात; (बालीशपणापासून सुटका करून घेण्याची ही सारी बालीश साधनं आहेत.)

पण सरतेशेवटी, मन परिपक्व बनते तेव्हा मग ह्या बालीश, शाळकरी उपायांना ते तिरस्काराने दूर करते. कारण ज्याच्यामध्ये दैवी क्षमता सामावलेली असते अशा मानवाने, केवळ बक्षीस मिळते म्हणून गुणवान होणे किंवा भयामुळे पापापासून दूर राहणे हे मानवण्यासारखे नाही…. कृपणा: फलहेतव: असे गीतेमध्ये यथार्थपणे म्हटले आहे. ह्या एवढ्या विशालकाय, प्रचंड अशा जगाची व्यवस्था ह्या असल्या क्षुद्र, क्षुल्लक प्रेरणांवर बसवली असेल, हे न पटण्यासारखे आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 265-268)

Latest posts by श्रीअरविंद (see all)
श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

मुलांचे संगोपन

(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…

13 hours ago

विजयाची खात्री

जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…

2 days ago

सकारात्मक वृत्तीचा परिणाम

  (लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…

3 days ago

स्वप्नांवर विश्वास ठेवा

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…

4 days ago

उपयुक्ततावादाचा आजार

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…

5 days ago

शिक्षण आणि संस्कृती

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…

6 days ago