ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

पुनर्जन्माच्या सिद्धांताचा खरा पाया

जीवाची उत्क्रांती किंवा जडाच्या पडद्यामधून बाहेर पडून क्रमश: आत्मशोध घेतघेत विकसित होणे, फुलून येणे हा पुनर्जन्माच्या सिद्धान्ताचा खरा आधार आहे……

पण या उत्क्रांतीचे प्रयोजन काय ? ….दिव्य ज्ञान, सामर्थ्य, प्रेम आणि शुद्धता यांच्या दिशेने होणारा सातत्यपूर्ण विकास हे ह्या उत्क्रांतीचे प्रयोजन असून ह्या गोष्टी हेच खरे तर गुण आहेत आणि हे गुण हेच त्याचे खरे बक्षीस होय.

आत्म्याच्या सर्वसमावेशक आलिंगनातील परमानंद आणि विश्वाविषयीचा जिव्हाळा यांपर्यंत जाऊन पोहोचू शकेल अशी सातत्याने वृद्धिंगत होत जाणारी क्षमता आणि प्रेमानंद हेच प्रेमाच्या कार्याचे खरेखुरे बक्षीस असते. योग्य ज्ञानाच्या कार्याचे खरेखुरे बक्षीस म्हणजे अनंत अशा प्रकाशामध्ये हळूहळू, क्रमाक्रमाने विकसित होत राहणे; योग्य शक्तीच्या कार्याचे खरेखुरे बक्षीस म्हणजे दिव्य शक्तीमध्ये स्वत: अधिकाधिकपणे तळ ठोकणे आणि शुद्धतेच्या कार्याचे खरेखुरे बक्षीस म्हणजे अहंकारापासून अधिकाधिक मोकळे होत होत, जेथे सर्व गोष्टी रूपांतरित होत, दिव्य समतेशी सममेळ पावतात त्या निष्कलंक व्यापकतेप्रत जाऊन पोहोचणे हे होय. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही बक्षिसाची अपेक्षा बाळगणे म्हणजे स्वत:ला एक प्रकारच्या मूर्खतेशी आणि पोरकट अज्ञानाशी जखडून ठेवणे होय; वर उल्लेख केलेल्या गोष्टींव्यतिरिक्त इतर गोष्टींना बक्षीस समजणे हे अपरिपक्वतेचे आणि अपूर्णतेचे लक्षण आहे.

आणि मग दु:खभोग आणि आनंद, दुर्दैव आणि समृद्धी ह्यांचे काय ? ह्याचे उत्तर असे की : हे सर्व जीवाच्या प्रशिक्षणातील अनुभव असून ते त्याला त्याच्या घडणीमध्ये साहाय्य करतात, त्या गोष्टी टेकूसारख्या असतात, ती साधने असतात, त्या परीक्षा असतात, त्या अग्निपरीक्षा असतात आणि समृद्धी ही तर दुःखभोगापेक्षाही अधिक दुष्कर अशी अग्निपरीक्षा असते. खरेतर, आपत्ती, दुःखभोग याकडे पापाची शिक्षा म्हणून पाहण्यापेक्षा, त्यांच्याकडे गुणांचे पारितोषिक म्हणून पाहिले गेले पाहिजे. कारण उमलून येण्याची धडपड करू पाहणाऱ्या जीवाच्या दृष्टीने या गोष्टी त्याचे शुद्धीकरण घडविणाऱ्या आणि अत्यंत साहाय्यक ठरतात. दुःखभोग म्हणजे जणू न्यायाधीशाने दिलेले कठोर पारितोषिक किंवा दुःखभोग म्हणजे वैतागलेल्या सत्ताधीशाचा संताप आहे असे समजणे किंवा दुःखभोग म्हणजे वाईट कृत्याचा परिणाम म्हणून वाईट फळ मिळणे असे समजणे म्हणजे या विश्व-उत्क्रांतीच्या कायद्याविषयी आणि ईश्वराच्या जीवाबरोबरच्या संभाव्य व्यवहाराविषयी अगदीच वरवरचा दृष्टिकोन बाळगणे होय.

आणि मग ही भौतिक समृद्धी, वैभव, मुलेबाळे, कला, सौंदर्य, सत्ता ह्यांचा उपभोग ह्यांचे काय? तर, आपल्या आत्म्याला हानी न पोहोचता, जर त्या गोष्टी प्राप्त करून घेतल्या आणि आपल्या भौतिक अस्तित्वावर दिव्य आनंद व कृपा यांचा वर्षाव या भूमिकेतून त्यांचा आनंद घेतला तर त्या चांगल्या आहेत. त्या आपण प्रथमत: इतरांसाठी, खरंतर सर्वांसाठी मिळविण्याचा प्रयत्न करूयात; आपल्यासाठी त्या वैश्विक परिस्थितीचा केवळ एक अंशभाग असतील किंवा पूर्णत्व अधिक जवळ आणण्याचे ते केवळ एक साधन असेल.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 267-268)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

9 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago