ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

वासनामय जीवाला (Desire-soul) द्यावयाची शिकवण

आम्ही जो उच्चस्थानी जाण्याचा प्रयत्न करीत असतो, त्या प्रयत्नात सुरुवातीलाच वासनेचा हीन घटक प्रवेश करतो, आणि हे स्वभाविकच आहे. ह्या हव्यासमय प्राणशक्तीचा वा वासनात्म्याचा स्वीकार करायचा झालाच तर तो स्वीकार रुपांतर करण्याच्या हेतूनेच आम्ही करावयास हवा. आरंभीच त्याला ही शिकवण द्यावी लागते की, दुसऱ्या सर्व वासना त्याने दूर कराव्यात आणि ईश्वरप्राप्तीचाच एकमेव ध्यास बाळगावा.

हा महत्त्वाचा मुद्दा साधल्यावर त्याला दुसरी शिकवण अशी द्यावी लागते की, त्याने आस बाळगावी परंतु ती स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी बाळगू नये, तर विश्वात पसरलेल्या ईश्वरासाठी आणि आम्हात असलेल्या ईश्वरासाठी धरावी.

जरी या योगमार्गात आम्हाला सर्व प्रकारचे आध्यात्मिक लाभ मिळण्याची खात्री असली, तरी आपला कोणताही आध्यात्मिक लाभ हे आपण आपले उद्दिष्ट ठेवू नये; तर आमच्यामध्ये आणि इतरांमध्ये जे महान कार्य करावयाचे आहे त्यावर आपली दृष्टी खिळवून ठेवावी.

ज्या आगामी उच्च आविष्काराने, विश्वात इश्वरेच्छेची वैभवपूर्ण परिपूर्ती होणार आहे, त्यावर आपली दृष्टी खिळवून ठेवावी. ज्या सत्याची प्राप्ती आम्हाला करून घ्यावयाची आहे, जे आमच्या जीवनात आम्हाला व्यक्त करावयाचे आहे आणि जे आम्हाला सिंहासनावर कायमचे बसवावयाचे आहे, त्या सत्यावर आपली दृष्टी खिळवून ठेवावी.

वासनात्म्याला शेवटी हे शिकविणे आवश्यक आहे की, त्याने केवळ ‘योग्य उद्दिष्टासाठी’च धडपड करायची आहे असे नाही तर, ही धडपड त्याने ‘योग्य रीतीनेही’ करावयाची आहे, पण ही गोष्ट त्याला अतिशय जड जाणारी आहे. कारण योग्य रीतीने साधना करणे हे योग्य उद्दिष्टासाठी साधना करण्याहून, वासनात्म्याला अवघड आहे. त्याला शेवटी हेही शिकवणे जरूर आहे की, त्याला इच्छा बाळगायचीच असेल तर ती स्वतःच्या अहंभावी मार्गाने बाळगू नये, तर ईश्वरी मार्गाने बाळगावी.

आता त्याने स्वतंत्र विभक्तपणे इच्छा बाळगू नये. मला पसंत असेल त्याच प्रकारे परिपूर्ती व्हावी, माझे जे स्वामीत्वाचे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावे, माझी जी योग्य आणि इष्ट यासंबंधाची कल्पना आहे तीच मान्य केली जावी असा आग्रह त्याने धरू नये. आपल्या इच्छेहून महान असलेली ईश्वरी इच्छा पूर्ण करण्याचा ध्यास त्याने बाळगावा, त्याने अधिक ज्ञानपूर्ण, नि:स्वार्थी मार्गदर्शनाची वाट पाहावयास संमती द्यावी.

सामान्य वासनेला या प्रकारची शिकवण व शिस्त लागली तर तिचे दिव्य वासनेत रूपांतर होऊ शकेल; सामान्य वासना ही माणसाला त्रास देणारी, अनेक प्रकारे ठेचा खावयास लावणारी, स्वास्थ्यनाशक, तापदायक वस्तू आहे; तिला वर सांगितल्याप्रमाणे शिस्त लागली तर तिजमध्ये दिव्य रूपांतराची पात्रता येईल.

सामान्य वासना आणि सामान्य तळमळ यांचीच उच्च व दिव्य रूपेही असतात. सर्व प्रकारची तृष्णा आणि अनुरक्ती, आसक्ती यांच्या पलीकडे आत्माचा एक विशुद्ध आनंद असतो, परमसिद्धीप्राप्तीच्या वैभवात विराजमान होऊन बसलेल्या दिव्य आनंदाचा एक संकल्प असतो.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 84)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

11 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago