ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

 

आमच्या योगमार्गात पहिली जरुरीची गोष्ट ही आहे की, आमच्या मनाची जुनी केंद्रभूत सवय आणि दृष्टी पार मोडून काढावयाची; ही सवय आणि दृष्टी बहिर्मुख असते; बाह्य विश्वव्यवस्थेत आपला स्वतःचा विकास करावा, आपली स्वतःची तृप्ती करून घ्यावी, आपले स्वतःचे हितसंबंध सांभाळावे, ह्यावरच जुन्या सवयीचे व दृष्टीचे लक्ष खिळलेले असते. म्हणून मनाचे हे जुने वळण व दृष्टी पार मोडून काढणे ही आमच्या योगात पहिली जरुरीची गोष्ट मानली जाते. मनाच्या ह्या बहिर्वर्ती सवयीची व दृष्टीची जागा – जिला फक्त ईश्वरच दिसतो आणि ईश्वरप्राप्तीसाठीच जिची धाव असते अशा – सखोल श्रद्धेने व दृष्टीने घेणे हे या योगामध्ये आवश्यक असते.

दुसरी जरुरीची गोष्ट ही असते की, आमच्या निम्नतर अस्तित्वाने या नव्या श्रद्धेला आणि महत्तर दृष्टीला आपली निष्ठा अर्पण करावी, किंवा आम्ही त्यास तसे करावयास लावावे. आमच्या सर्व प्रकृतीने पूर्ण आत्मसमर्पण करावयास हवे; नवदृष्टिहीन इंद्रियरूप मनाला भौतिक जग आणि त्यातील वस्तू यांजहून जे आंतरिक जग कितीतरी कमी सत्य वाटते, त्या आंतरिक जगासाठी आमच्या प्रकृतीच्या प्रत्येक अंगाने, आणि प्रत्येक व्यापाराने पूर्ण आत्मसमर्पण करावयास हवे. आमच्या सर्व अस्तित्वाने – आमचा आत्मा, मन, इंद्रियगण, हृदय, इच्छा, प्राण, शरीर या सर्वांनी आपल्या सर्व शक्ती इतक्या पूर्णतेने, अशा रीतीने ईश्वरचरणी समर्पित करावयास हव्यात की, ज्यायोगे आमचे समग्र अस्तित्व हे ईश्वराचे सुयोग्य साधन होईल.

हे घडवून आणणे हे काही सोपे काम नाही; कारण जगातील प्रत्येक वस्तू एका ठाम चाकोरीतून चालत असते; ही चाकोरी, ही सवय हाच तिचा कायदा असतो; कोणत्याही वस्तूला आमूलाग्र बदल नको असतो; ती अशा बदलाला विरोध करते आणि पूर्णयोग तर जी क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न करतो, त्या क्रांतीहून कोणताही बदल अधिक आमूलाग्र असू शकत नाही.

पूर्णयोगाचा अभ्यास करीत असताना प्रकृतीच्या प्रत्येक अंशाला केंद्रभूत श्रद्धेकडे, इच्छेकडे सतत ओढून आणावे लागत असते. उपनिषदांच्या भाषेत सांगावयाचे झाले तर, प्रत्येक विचाराला व ऊर्मीला ही आठवण करून द्यावी लागते की, “येथे लोक ज्याची ईश्वर म्हणून उपासना करत आहेत तो ‘ईश्वर’ नसून; तो ईश्वर ‘तेथे’ आहे.”

प्राणातील प्रत्येक तंतू, जे जीवन आजवर आपले स्वाभाविक जीवन म्हणून मानत आला आहे, त्या जीवनाचा आत्यंतिक त्याग करण्यास त्याने मान्यता द्यावी यासाठी त्याला समजावून सांगितले पाहिजे. मनाने आपले मनपण टाकून द्यायला हवे आणि त्याच्या पलीकडे असलेल्या तत्त्वाच्या प्रकाशाने प्रकाशमय व्हावयास हवे. प्राणाने आपले रूप बदलून अत्यंत व्यापक, शांत व समर्थ असे नवे रूप घ्यावयास हवे; आपले जुने, आंधळे, तळमळ करणारे, संकुचित रूप व आपल्या जुन्या क्षुद्र उर्मी आणि वासना नव्या रूपातील प्राणाला आपल्या म्हणून ओळखता येणार नाहीत इतकी नवीनता त्याच्या नव्या रूपात यावी लागते.
शरीरालादेखील परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जावे लागते; आज ते, म्हणजे मार्गातील अडथळा ठरणारी धोंड आहे किंवा ‘हे हवे’ ‘ते हवे’, असा ओरडा करणारा पशु आहे; हे आपले रूप टाकून त्याला आत्म्याचा सुबुद्ध सेवक व्हावे लागते, आत्म्याचे तेजस्वी साधन व्हावे लागते, आत्म्याचे जिवंत रूप व्हावे लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 72-73)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

9 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago