ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

ईश्वरोन्मुख कर्म – दिव्य जीवनाचे एक प्रवेशद्वार

मानवी प्रकृतीत आणि मानवी जीवनात संकल्पशक्ती (कर्मशक्ती), ज्ञानशक्ती आणि प्रेमशक्ती या तीन दिव्यशक्ती आहेत; मानवाचा आत्मा ईश्वराप्रत ज्या तीन मार्गांनी चढत जातो त्या मार्गांचा निर्देश वरील तीन शक्ती करतात. म्हणून या तीन मार्गांचा समुच्चय, तीनही मार्गांनी मानवाचे ईश्वराशी सायुज्य होणे, एकत्व होणे हाच पूर्णयोगाचा पाया असला पाहिजे.

जीवनात पहिली शक्ती कर्म ही आहे. प्रकृती ही ह्या कर्मशक्तीपासून आणि तिच्या कार्यापासून सुरुवात करते; आणि जेव्हा ही शक्ती आणि तिची कार्ये मानवामध्ये जाणिवेने युक्त होतात, तेव्हा त्यांना संकल्पशक्ती व संकल्पशक्तीची उपलब्धी हे स्वरूप येते; म्हणून मानवाने आपले कर्म ईश्वरोन्मुख केले की त्याचे जीवन उत्तम प्रकारे आणि हमखास दिव्य होऊ लागते. कर्म ईश्वरोन्मुख करणे हे दिव्य जीवनाचे पहिले प्रवेशद्वार आहे.

जेव्हा मानवातील संकल्पशक्ती ही ईश्वरी संकल्पशक्तीशी एकजीव होते आणि जीवाची समग्र कर्म ही एका ईश्वरातूनच उदित होऊ लागतात, तसेच ती त्या ईश्वराप्रतच जाऊ लागतात तेव्हा, ‘कर्मातून एकत्व’ पूर्णतया साध्य होते.

परंतु, खुद्द कर्माची परिपूर्ती ज्ञानामध्ये आहे. भगवद्गीता सांगते त्याप्रमाणे, सर्व कर्मांची समग्रता ही, चक्राकार फिरून परत ज्ञानामध्ये परिसमाप्त होते.

आपण आपल्या कर्मामध्ये आणि संकल्पामध्ये एकत्व पावलो की, आपण त्या सर्वान्तर्यामी वसणाऱ्या जाणीवयुक्त जीवाशी एकजीव होतो. ज्याच्यापासून आपली सर्व कर्म व संकल्प उदयास आलेले असतात; आणि जेथून ते स्वत: शक्ती घेत असतात आणि ज्यांच्या उर्जेची परिसमाप्ती परत त्याच्यामध्येच होत असते अशा सर्वान्तर्यामी वसणाऱ्या जीवाशी आपण तादात्म्य पावतो.

या तादात्म्याचा, ऐक्याचा कळस म्हणजे प्रेम, भक्ती होय. ज्या ईश्वराच्या पोटात आपण राहतो, जीवनव्यवहार करतो, हिंडतोफिरतो, ज्याच्यामुळे आपण जिवंत असतो, आणि ज्याच्यासाठीच केवळ आपण कर्म करायची असतात, ज्याच्यासाठीच जगायचे असते हे अंततः आपल्याला उमगते, त्या ईश्वराशी असलेल्या जाणीवयुक्त ऐक्याचा आनंद हे त्या प्रेमाचे स्वरूप असते.

आपल्या शक्तींची त्रिमूर्ती ती हीच होय. ईश्वराप्रत पोहोचण्याचा प्रवेशमार्ग म्हणून आणि त्याच्याशी असलेल्या आपल्या संपर्काची दिशा म्हणून आपण कर्मापासून प्रारंभ केला तर, आपण या तीन दैवतांच्या ऐक्यापाशीच येऊन पोहोचतो.

श्रीअरविंद
(CWSA 24 : 545-546)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

9 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago