ईश्वर आणि आपले नाते निर्माण होण्याच्या प्रक्रियेत सुरुवातीला म्हणजे आपण कनिष्ठ पातळीवर असताना, प्रार्थना आपली तयारी करून घेत असते. त्यावेळी ती प्रार्थना, आपल्या अहंवादी आणि आत्मभ्रांत अवस्थेशी जरी मिळतीजुळती असली तरीसुद्धा, ती त्या नात्याची पूर्वतयारी करून घेत असते; आणि कालांतराने प्रार्थनेमागे असलेल्या आध्यात्मिक सत्याकडे आपले लक्ष वळवले जाऊ शकते.
तेव्हा मग, मागितलेली गोष्ट ईश्वराकडून मिळणे, न मिळणे हे महत्त्वाचे राहत नाही; महत्त्वाचे असते ते भक्ताचे ईश्वराशी असलेले नाते, ईश्वराशी घडलेला संपर्क आणि ईश्वराशी असलेला जाणीवयुक्त संबंध !
आध्यात्मिक व्यवहारात, आध्यात्मिक प्राप्तीसाठी धडपड करताना, ईश्वराशी आपले हे जाणीवयुक्त नाते ही फार मोठी शक्ती असते; सर्वस्वी स्वत:वर विश्वास ठेवून केलेला संघर्ष व प्रयत्न यांच्यापेक्षा ह्या नात्यामध्ये कितीतरी अधिक ताकद असते आणि त्यामधून आपली आध्यात्मिक वाढ होऊन आपल्याला, परिपूर्ण अशी अनुभूती येते.
अंतत: ज्या एका महान गोष्टीसाठी प्रार्थनेच्या माध्यमातून आपली तयारी करून घेतली गेली होती, ती गोष्ट गवसल्याबरोबर प्रार्थनेचे अस्तित्व संपुष्टात येते किंवा प्रार्थना शिल्लक उरलीच तर ती नात्याच्या आनंदासाठी शिल्लक उरते. (वास्तविक, भक्ताकडे जर श्रद्धा, इच्छा, अभीप्सा या गोष्टी असतील तर ज्याला आपण ‘प्रार्थना’ हे नाव देतो ती आवश्यकच असते असे मात्र नाही.)
जोवर आपण सर्वोच्च निर्हेतुक अशा भक्तिपर्यंत जाऊन पोहोचत नाही, म्हणजेच जोवर आपण इच्छाविरहित वा मागणीविरहित शुद्ध, ऋजु अशा दिव्य प्रेमापर्यंत जाऊन पोहोचत नाही, तशी भक्ति जोवर आपल्या अंत:करणात उदयास येत नाही तोवर ती प्रार्थना, जो ‘अर्थ’, जी उद्दिष्टे, प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपडत असते, रस घेत असते ती तिची उद्दिष्टे अधिकाधिक उन्नत होत जातात.
– श्रीअरविंद
(CWSA 24 :567-568)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…