ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ६१

जेव्हा मन निश्चल-निरव (silent) असते तेव्हा तेथे शांती असते आणि ज्या ज्या गोष्टी दिव्य असतात त्या शांतीमध्ये अवतरू शकतात. जेथे मनाचे मनपण शिल्लक उरत नाही तेव्हा, तेथे मनाहून महत्तर असणारा आत्मा असतो.

*

मन निश्चल-निरव होणे, निर्विचार होणे, अचल होणे (still) ही काही अनिष्ट गोष्ट नाही, कारण बरेचदा जेव्हा मन अशा रितीने निरव होते तेव्हा, ऊर्ध्वस्थित व्यापक शांतीचे पूर्ण अवतरण घडून येते आणि त्या तशा व्यापक अचलतेमध्ये मनाच्या वर असणाऱ्या शांत ‘आत्म्या’चा साक्षात्कार त्याच्या विशालतेसह सर्वत्र पसरतो.

एवढेच की, शांती आणि मानसिक निश्चल-निरवता जेव्हा तेथे असते तेव्हा प्राणिक मन (vital mind) घाईने आत शिरून, ती जागा व्यापून टाकण्याची धडपड करते किंवा मग त्याच उद्देशाने, यांत्रिक मन (mechanical mind) स्वतःच्या क्षुल्लक सवयींचे विचार-चक्र पुन्हा एकदा वर काढण्याचा प्रयत्न करते.

अशा वेळी साधकाने काय केले पाहिजे? तर, या बाहेरच्यांना नकार देण्याबाबत आणि त्यांना गप्प करण्याबाबत साधकाने सतर्क असले पाहिजे, म्हणजे मग निदान ध्यानाच्या वेळी तरी मन व प्राणाची शांती आणि अविचलता टिकून राहील. तुम्ही जर एक दृढ आणि शांत संकल्प बाळगू शकलात तर हे उत्तम रितीने करता येऊ शकते.

हा संकल्प, मनाच्या पाठीमागे असणाऱ्या ‘पुरुषा‌’चा संकल्प असतो. मन जेव्हा शांतिपूर्ण अवस्थेत असते, ते जेव्हा निश्चल-निरव असते तेव्हा व्यक्तीला या (सक्रिय) ‘पुरुषा‌’ची, तसेच प्रकृतीच्या कार्यापासून अलग असलेल्या अक्रिय ‘पुरुषा’चीसुद्धा जाणीव होऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 162 & 160)

Latest posts by श्रीअरविंद (see all)
श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

मुलांचे संगोपन

(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…

14 hours ago

विजयाची खात्री

जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…

2 days ago

सकारात्मक वृत्तीचा परिणाम

  (लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…

3 days ago

स्वप्नांवर विश्वास ठेवा

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…

4 days ago

उपयुक्ततावादाचा आजार

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…

5 days ago

शिक्षण आणि संस्कृती

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…

6 days ago