ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

मला अभिप्रेत असणारे रूपांतरण

साधना, योग आणि रूपांतरण – २३४

(एका साधकाने श्रीअरविंदांना असे सांगितले की, काही जणांना असे वाटते की, ‘आध्यात्मिक’ आणि ‘अतिमानसिक’ या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. त्यावर श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

तसे जर असते तर, आजवर युगानुयुगे होऊन गेलेले ऋषीमुनी, भक्त, योगी, साधक हे सारे ‘अतिमानसिक जीव’ होते असे म्हणावे लागेल आणि मग अतिमानसाविषयी मी आजवर जे काही लिहिले आहे ते अगदी उथळ, निरुपयोगी, आणि अनावश्यक ठरेल. आध्यात्मिक आणि अतिमानसिक या दोन्ही गोष्टी समानच असतील तर मग ज्या ज्या कोणाला आध्यात्मिक अनुभव आलेले असतील ते सारेजण म्हणजे अतिमानसिक जीव आहेत असे होईल. आणि मग हा आश्रम (श्रीअरविंद-आश्रम) किंवा भारतातील प्रत्येक आश्रमच अतिमानसिक जिवांनी ओसंडून वाहत आहेत, असे म्हणावे लागेल.

व्यक्तीची इच्छा असेल तर आध्यात्मिक अनुभव हे आंतरिक चेतनेमध्ये स्थिरस्थावर होऊ शकतात; आणि त्यानंतर ते तिच्यामध्ये बदल घडवून, तिचे रूपांतरण करू शकतात. सर्वत्र ‘ईश्वर’च असल्याचा साक्षात्कार व्यक्तीला होऊ शकतो, सर्वांमध्ये ‘आत्मा’ आणि ‘आत्म्या’मध्ये सर्वकाही असल्याचा अनुभव तिला येऊ शकतो. विश्वात्मक ‘शक्ती’ या साऱ्या गोष्टी घडवीत आहे; आपण ‘ब्रह्मांडगत आत्म्यामध्ये किंवा आनंदमय भक्तीमध्ये किंवा ‘आनंदा’मध्ये विलीन होत आहोत अशी व्यक्तीला प्रचिती येऊ शकते.

मात्र, व्यक्ती ‘प्रकृती’च्या बाह्य सक्रिय भागांमधील जीवन बुद्धीच्या साहाय्याने किंवा फारफार तर अंतःस्फूर्त मनाच्या (intuitive mind) साहाय्याने विचार करत, मानसिक इच्छेच्या साहाय्याने संकल्प करत, प्राणाच्या पृष्ठवर्ती स्तरावर हर्ष व शोकाचा अनुभव घेत, शरीरात राहून शारीरिक आजारपणं आणि वेदना भोगत, जीवनसंघर्ष करत, शेवटी आजार व मृत्यु असे जीवन कंठत राहू शकते आणि सहसा हे असेच चालू राहते. यामध्ये जर का काही परिवर्तन होणे शक्य असेल तर ते फारफार तर एवढेच असू शकते की, व्यक्ती ‘प्रकृती’मधून बाहेर पडून पूर्णपणे ‘आत्म्या’मध्ये विलीन होत नाही तोपर्यंत तरी, उपरोक्त सर्व गोष्टी म्हणजे ‘प्रकृती’चा अपरिहार्य भाग आहे असे मानून, ‘अंतरात्मा’ या सगळ्याकडे विचलित न होता किंवा भांबावून न जाता, परिपूर्ण समत्वाने पाहू शकतो.

परंतु हे म्हणजे मला अभिप्रेत असणारे ‘रूपांतरण’ नव्हे. मला अभिप्रेत असणारे रूपांतरण म्हणजे ज्ञानाची एक निराळीच शक्ती आहे, ती निराळीच इच्छाशक्ती आहे, भावभावना आणि सौंदर्याचे ते एक आगळेवेगळे प्रकाशमान परिमाण आहे, शारीरिक चेतनेची ती एक निराळीच घडण आहे. आणि या साऱ्या गोष्टी अतिमानसिक परिवर्तनानेच (supramental change) घडून येणे आवश्यक आहे.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 273-274)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

9 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago