साधना, योग आणि रूपांतरण – १८०
श्रीअरविंद-आश्रमामध्ये जो योगमार्ग आचरला जातो त्या पूर्णयोगाचे इतर योगांपेक्षा काहीएक भिन्न प्रयोजन आहे. कारण सर्वसामान्य अज्ञानमय विश्व-चेतनेमधून बाहेर पडून, दिव्य चेतनेमध्ये उन्नत होणे हेच केवळ या योगाचे ध्येय नाही, तर मन, प्राण आणि शरीर यांच्या अज्ञानामध्ये दिव्य चेतनेची अतिमानसिक शक्ती उतरविणे; मन, प्राण आणि शरीर यांचे रूपांतरण करणे; या इहलोकामध्ये ‘ईश्वरा’चे आविष्करण घडविणे आणि ‘जडभौतिका’मध्ये दिव्य जीवन निर्माण करणे, हे पूर्णयोगाचे ध्येय आहे. हे ध्येय अत्यंत कठीण आहे आणि हा योगमार्गही अत्यंत कठीण आहे; बऱ्याच जणांना किंबहुना, बहुतेकांना तर तो अशक्यप्रायच वाटतो.
सर्वसाधारण अज्ञानमय विश्व-चेतनेच्या साऱ्या प्रस्थापित शक्ती या ध्येयाच्या विरोधात असतात आणि त्या शक्ती त्याला नाकारतात आणि त्या शक्ती त्याला रोखण्याचा प्रयत्न करत असतात. साधकाला असे आढळून येईल की, त्याच्या स्वतःच्या मनामध्ये, प्राणामध्ये आणि शरीरामध्येच या साक्षात्कारासाठी प्रतिकूल असे सर्वाधिक हट्टी अडथळे ठासून भरलेले आहेत. तुम्ही जर हे ध्येय अगदी अंतःकरणपूर्वक स्वीकारलेत, साऱ्या अडीअडचणींना सामोरे गेलात, भूतकाळ आणि त्याचे सारे बंध तुम्ही मागे टाकून दिलेत, आणि सर्व गोष्टींचा त्याग करण्यास तयार झालात, त्या दिव्य शक्यतेसाठी प्रत्येक जोखीम घेण्यास तयार झालात, तरच तुम्हाला त्या पाठीमागील ‘सत्य’ हे अनुभूतीद्वारे सापडण्याची काही आशा करता येईल.
‘पूर्णयोगा’ची साधना, कोणत्याही ठरावीक साचेबंद मानसिक शिकवणुकीच्याद्वारे किंवा ध्यानधारणेच्या विहित प्रकारांद्वारे किंवा कोणत्याही मंत्रांद्वारे अथवा तत्सम गोष्टींद्वारे प्रगत होत नाही; तर अभीप्सेद्वारे आणि अंतर्मुख व ऊर्ध्वमुख अशा आत्म-एकाग्रतेद्वारे, ईश्वरी शक्तीच्या ‘दिव्य प्रभावा’प्रत स्वतःला खुले केल्यामुळे, आणि आपल्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘दिव्य शक्ती’प्रत व तिच्या कार्याप्रत स्वतःला उन्मुख केल्यामुळे, तसेच हृदयामध्ये असणाऱ्या ‘दिव्य अस्तित्वा’प्रत स्वतःला खुले केल्यामुळे आणि उपरोक्त सर्व गोष्टींना ज्या ज्या गोष्टी परक्या असतात त्या सर्व गोष्टींना नकार दिल्यामुळे ही साधना प्रगत होत जाते. केवळ श्रद्धा, अभीप्सा आणि समर्पण यांद्वारेच ही आत्म-उन्मुखता (self-opening) घडून येते.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 19-20)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…