ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधना, योग आणि रूपांतरण – ४०

(ध्यानाची उद्दिष्टे काय असावीत यासंबंधीचा विचार आपण येथे समजावून घेत आहोत. त्याचा हा पूर्वार्ध…)

कधीकधी एखाद्या विशिष्ट विषयावर विचारांची एकाग्रतापूर्वक मालिका या स्वरूपात ‘ध्यान’ (meditation) करायला सांगितले जाते; तर कधीकधी एका विशिष्ट प्रतिमेवर, शब्दावर किंवा संकल्पनेवर मनाची अनन्य एकाग्रता स्थिर करण्यास सांगण्यात येते. येथे ‘ध्यान’ म्हणण्यापेक्षा स्थिर असे ‘निदिध्यासन’ (contemplation) अपेक्षित असते. उपरोक्त दोन पद्धतींव्यतिरिक्त, ध्यानाच्या अन्य पद्धतीही असतात. त्यामुळे या दोन किंवा अधिक पद्धतींमधील निवड ही आपण योगामध्ये आपल्यासमोर कोणते उद्दिष्ट ठेवतो यावर अवलंबून असते.

सद्यस्थितीत विचारी मन (thinking mind) हे आपल्या हाती असणारे असे एक साधन आहे की, ज्याच्या साहाय्याने आपण आपल्या आंतरिक अस्तित्वाचे सचेत रीतीने आत्म-व्यवस्थापन करू शकतो. परंतु बहुतांशी व्यक्तींमध्ये, विचार म्हणजे विविध संकल्पना, संवेदना आणि प्रभाव यांचा एक गोंधळलेला प्रवाह असतो….

ज्याप्रमाणे शरीराच्या कार्यप्रणालीवर व प्राणिक क्रियांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि स्वातंत्र्य प्राप्त करून घेण्यासाठी हठयोग्यांकडून स्थिर आसन व सुनियंत्रित श्वसनाच्या प्रक्रिया (प्राणायाम) उपयोगात आणल्या जातात, अगदी त्याचप्रमाणे मनाच्या कार्यप्रणालीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि स्वातंत्र्य प्राप्त करून घेण्यासाठी राजयोग्यांकडून ‘विचारांची एकाग्रता’ ही प्रक्रिया उपयोगात आणली जाते. ध्यानाद्वारे आपण आपल्या चंचल मनाला ताळ्यावर आणतो आणि त्याच्या सर्व ऊर्जांची बचत व्हावी आणि त्या ऊर्जा कोणत्यातरी ईप्सित ज्ञानाच्या प्राप्तीवर किंवा स्वयंशिस्तीवर केंद्रित करता याव्यात यासाठी आपण मनाला एखाद्या व्यायामपटूप्रमाणे प्रशिक्षण देतो. ही गोष्ट माणसं सहसा सामान्य जीवनामध्येही करत असतात परंतु ‘प्रकृती’च्या या उच्चतर कार्यप्रणालीला ‘योग’ आपल्या हाती घेतो आणि तो तिला तिच्या संपूर्ण शक्यतांपर्यंत घेऊन जातो. मन ज्योतिर्मय रीतीने एका विचारवस्तुवर केंद्रित केले असता, आपण सार्वत्रिक ‘चेतने’मधील प्रतिसादाला जाग आणू शकतो आणि त्याच्याद्वारे त्या वस्तुविषयीचे ज्ञान आपल्या मनात ओतले जाऊन, आपल्या मनाचे समाधान केले जाते; किंवा त्याच्याद्वारे, त्या वस्तुचे केंद्रवर्ती किंवा मूलभूत सत्यदेखील आपल्यापाशी उघड केले जाते, योग या तथ्याची दखल घेतो.

(ध्यानाद्वारे) आपण ईश्वरी ‘शक्ती’चा प्रतिसाददेखील जागृत करत असतो, आणि त्यामुळे आपण ज्याचे ध्यान करतो त्याच्या कार्यप्रणालीवर आपल्याला विविध मार्गांनी चढतेवाढते प्रभुत्व मिळविता येते किंवा आपण ज्याचे ध्यान करतो ती गोष्ट आपल्यामध्ये निर्माण करण्यास किंवा आपल्यामध्ये ती सक्रिय करण्यास तो ‘ईश्वरी’ शक्तीचा प्रतिसाद आपल्याला सक्षम बनवितो. (उदाहरणार्थ) अशा प्रकारे, ‘दिव्य प्रेमा’च्या संकल्पनेवर आपण मन केंद्रित केले तर आपल्याला त्याच्या तत्त्वाचे आणि त्याच्या कार्यप्रणालीचे ज्ञान होते, आपण त्याच्याशी सायुज्य पावू शकतो, ते ‘दिव्य प्रेम’ आपल्या स्वतःमध्ये विकसित करू शकतो आणि आपले हृदय व आपली इंद्रिये त्याच्या धर्माचे पालन करतील याकडे आपण लक्ष पुरवू शकतो. (क्रमश:)
– श्रीअरविंद (CWSA 13 : 445-446)

Latest posts by श्रीअरविंद (see all)
श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

मुलांचे संगोपन

(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…

15 hours ago

विजयाची खात्री

जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…

2 days ago

सकारात्मक वृत्तीचा परिणाम

  (लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…

3 days ago

स्वप्नांवर विश्वास ठेवा

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…

4 days ago

उपयुक्ततावादाचा आजार

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…

5 days ago

शिक्षण आणि संस्कृती

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…

6 days ago