ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

अध्यात्म-जीवन, धर्म-जीवन आणि सामान्य मानवी जीवन

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१९)

‘अध्यात्म-जीवन’, ‘धर्म-जीवन’ आणि ज्याचा नैतिकता हा एक अंशभाग असतो ते ‘सामान्य मानवी जीवन’ या तीन भिन्नभिन्न गोष्टी आहेत आणि आपल्याला यांपैकी नक्की कोणते जीवन हवे आहे हे व्यक्तीला माहीत असलेच पाहिजे, आणि तिने वरील तीन गोष्टींमध्ये गल्लत करता कामा नये.

सामान्य मानवी जीवन हे सर्वसामान्य मानवी चेतनेचे असे जीवन असते की जे, स्वत:च्या खऱ्या ‘जीवात्म्या’पासून तसेच ‘ईश्वरा’पासून विभक्त झालेले असते. आणि या जीवनाचे संचालन मन, प्राण, शरीर यांच्या सामान्य सवयींद्वारे, म्हणजेच अज्ञानाच्या कायद्यांद्वारे केले जात असते.

धार्मिक जीवन हीदेखील त्याच अज्ञानी मानवी चेतनेची एक अशी वाटचाल असते की जी, या पृथ्वीकडे पाठ फिरवून किंवा तसा प्रयत्न करून, ‘ईश्वरा’कडे वळू पाहत असते. या पृथ्वीचेतनेच्या बंधनातून मुक्त झाल्याने, त्या पलीकडचे सौंदर्यमय असे काही गवसले आहे असा दावा जो पंथ वा संप्रदाय करीत असतो, अशा एखाद्या पंथ वा संप्रदायाच्या सिद्धान्ताच्या किंवा नियमांच्या आधारे धार्मिक जीवनाची वाटचाल चालू असते, पण तरीही ती ज्ञानविरहितच असते. धार्मिक जीवन हा आध्यात्मिक जीवनाकडे वळण्याचा पहिलावहिला प्रयत्न असू शकतो, पण बहुधा तो कर्मकांड, सणसमारंभ, विधीविधाने, काही ठरीव संकल्पना आणि रूपे यांच्या चक्रामध्येच गोलगोल फिरत राहतो.

या उलट, आध्यात्मिक जीवन चेतनेच्या परिवर्तनाद्वारे थेटपणे वाटचाल करत असते. स्वत:च्या खऱ्या जीवात्म्यापासून आणि ‘ईश्वरा’पासून विभक्त झालेल्या, अज्ञानी अशा सामान्य चेतनेकडून एका महान चेतनेकडे ही वाटचाल होत असते. या महान चेतनेमध्ये व्यक्तीला स्वत:चे खरे अस्तित्व सापडते आणि व्यक्ती प्रथमतः ‘ईश्वरा’च्या थेट व चैतन्यमय संपर्कात येते आणि नंतर ती त्या ‘ईश्वरा’बरोबर एकत्व पावते. आध्यात्मिक साधकाच्या दृष्टीने हे चेतनेचे परिवर्तन हीच एकमेव गोष्ट असते की जी मिळविण्यासाठी तो धडपडत असतो, अन्य कोणत्याच गोष्टीची त्याला मातब्बरी वाटत नाही.

नैतिकता हा सामान्य जीवनाचा एक भाग असतो. विशिष्ट मानसिक नियमांद्वारे व्यक्तीच्या बाह्य जीवनाचे नियमन करण्याचा हा एक प्रयास असतो, प्रयत्न असतो किंवा मानसिक नियमांद्वारे विशिष्ट मानसिक आदर्शानुसार चारित्र्य घडविण्याचा तो एक प्रयास असतो. आध्यात्मिक जीवन मनाच्या पलीकडे जाते; ते सखोल अशा ‘आत्म्या’च्या चेतनेमध्ये प्रवेश करते आणि ‘आत्म्या’च्या सत्यामधून कृती करते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 419-420)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

9 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago