अमृतवर्षा ०६

 

सद्यकालीन विश्वात सामान्य मानवी जीवन मनाच्या आज्ञेनुसार वागते; त्यामुळे मनावर ताबा मिळविणे, संयम मिळविणे ही सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट आहे; म्हणून आपले मन विकसित करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आपण पुढील साधनामार्गाचे क्रमश: अनुसरण करू.

सहसा एका पाठीमागून एक येणाऱ्या अशा चार प्रक्रिया आहेत, परंतु अखेरीस त्या एका वेळीही घडून येऊ शकतात. स्वत:च्या विचारांचे निरीक्षण करणे ही पहिली प्रक्रिया, त्या विचारांवर बारकाईने लक्ष ठेवून राहणे ही दुसरी, विचार नियंत्रित करणे ही तिसरी आणि विचारांवर प्रभुत्व मिळविणे ही चौथी प्रक्रिया आहे. निरीक्षण, पाळत, नियंत्रण व प्रभुत्व या त्या चार प्रक्रिया आहेत. अनिष्ट मनापासून सुटका करून घेण्यासाठी हे सारे करायचे असते.

– श्रीमाताजी [CWM 03 : 183]

अमृतवर्षा ०५

 

साधक : आम्हाला सदासर्वकाळ भौतिक परिस्थितीमध्ये अडकवून ठेवणाऱ्या शारीरिक चेतनेमधून आम्ही बाहेर कसे पडावे?

श्रीमाताजी : त्यासाठी अनेक मार्ग आहेत. बौद्धिक, भावनिक, कलात्मक आणि आध्यात्मिक मार्ग आहेत. आणि साधारणपणे, ज्याला जो मार्ग सर्वाधिक सोपा वाटतो तो मार्ग त्याने अवलंबणे कधीही चांगले. कारण सर्वात अवघड असे जे आहे त्यापासून सुरुवात करायची म्हटले तर हाती काहीच लागणार नाही. आणि इथेच आपण श्रीअरविंदांनी ‘The Synthesis of Yoga’ या ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग किंवा कर्ममार्ग यांच्यापाशी परत येऊन पोहोचतो. यातील कर्ममार्ग हा प्रामुख्याने तुम्हाला भौतिक जीवनाशी जोडून ठेवतो आणि त्यामध्येच मुक्तीचा शोध घेण्यास प्रवृत्त करतो. कदाचित हा सर्वात परिणामकारक पण सर्वात अवघड असा मार्ग आहे.

बहुतांशी मुमुक्षू लोकांना ध्यानाचा, एकाग्रतेचा मार्ग, या भौतिक जीवनापासून दूर राहण्याचा, भौतिक क्रियाकलापांचा परित्याग करण्याचा मार्ग हा कर्ममार्गापेक्षा निश्चितपणे सोपा वाटतो. पण, ते भौतिक चेतनेला, ती जशी आहे तशीच सोडून देतात, तिच्यामध्ये कोणतेही परिवर्तन घडवून न आणता, तशीच सोडून देतात; या मार्गामध्ये, व्यक्ती जोवर एखाद्या साधु वा संन्याशाप्रमाणे सक्रिय जीवन बाजूला सारत नाही आणि सदासर्वदा ध्यानामध्ये निमग्न राहत नाही तोवर तिला काहीच साध्य होत नाही. म्हणजेच, व्यक्तित्वाचा एक संपूर्ण भाग कधीच रूपांतरित होत नाही, तो तसाच शिल्लक राहतो. रूपांतरण करणे हा त्यांच्याकडे मार्गच नसतो, तर शरीराला नकार देऊन, त्या शरीरातून शक्य तितक्या त्वरेने बाहेर पडणे हाच केवळ एक मार्ग त्यांच्याकडे असतो. पूर्वी योगसाधनेमध्ये हेच अभिप्रेत असे आणि साहजिकच ते अधिक सोपे होते. पण आपल्याला जे हवे आहे ते हे नाही.

आपल्याला शारीरिक, भौतिक चेतनेचे रूपांतरण हवे आहे, त्याला नकार देणे येथे अभिप्रेत नाही. आणि येथेच श्रीअरविंदांनी अगदी थेट आणि अगदी परिपूर्ण असा ‘ईश्वरा’प्रत नेणारा समर्पणाचा मार्ग सुचविलेला आहे. क्रमश: अधिकाधिक समग्र होत जाणारे आणि भौतिक क्रियाकलापांचा व भौतिक चेतनेचादेखील समावेश करून घेणारे समर्पण. आणि व्यक्ती ते करण्यामध्ये यशस्वी झाली तर शरीर किंवा जडभौतिक हे मार्गातील धोंड न ठरता, साहाय्यक बनते.

 

– श्रीमाताजी [CWM 08 : 299-300]

नमस्कार वाचकहो,

आज २९ मार्च २०२४. एकशे दहा वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे २९ मार्च १९१४ रोजी श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांची प्रथम भेट झाली होती. या घटनेच्या पावन स्मृतीप्रीत्यर्थ, या भेटीचा अन्वयार्थ उलगडवून दाखवणारी एक podcast मालिका आजपासून सुरू करत आहोत.

auro marathi या youtube channel वर ही मालिका दररोज सायंकाळी ७ वाजता प्रसृत होईल.

https://www.youtube.com/@auromarathi682/videos

संपादक,

‘अभीप्सा’ मराठी मासिक.

अमृतवर्षा ०४

 

आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व क्रियांचे रूपांतरण हवे आहे. पूर्वी जेव्हा रूपांतरणाविषयी बोलले जात असे तेव्हा तेथे केवळ आंतरिक चेतनेचे रूपांतरणच अभिप्रेत असे. ही सखोल चेतना स्वत:मध्ये शोधण्याचा व्यक्ती प्रयत्न करत असे; हे करत असताना, आंतरिक गतिविधींवरच लक्ष केंद्रित करायचे असल्याने, शरीराला आणि त्याच्या क्रियाकलापांना, ती व्यक्ती एक लोढणं समजत असे; आणि निरुपयोगी गोष्ट म्हणून त्यास ती धुडकावून देत असे.

परंतु, हे पुरेसे नसल्याचे श्रीअरविंदांनी स्पष्ट केले. जडभौतिक जगताने देखील या रूपांतरणामध्ये सहभागी व्हावे आणि त्यानेही या गहनतर ‘सत्या’ची अभिव्यक्ती करावी, अशी त्या ‘सत्या’कडून मागणी होत आहे, हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

परंतु लोकांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना असे वाटले की, अंतरंगामध्ये काय घडत आहे याची अजिबात काळजी न करतादेखील शरीर आणि त्याच्या क्रिया यांचे रूपांतरण घडविणे शक्य आहे, – अर्थात हे खरे नाही.

हे शारीरिक रूपांतरणाचे कार्य हाती घेण्यापूर्वी, – हे कार्य म्हणजे, जे सर्वात अवघड असे कार्य आहे ते हाती घेण्यापूर्वी – तुमची आंतरिक चेतना ही ‘सत्या’मध्ये दृढपणे, सघनपणे प्रस्थापित झालेली असली पाहिजे; म्हणजे मग हे रूपांतरण म्हणजे त्या ‘सत्या’चा चरम आविष्कार असेल – किमान आत्ताच्या घडीपुरता तरी ‘चरम’.

या रूपांतरणाचा प्रारंभबिंदू असतो ग्रहणशीलता! रूपांतरण प्राप्त करून घेण्यासाठीची ही अत्यावश्यक अट आहे. त्यानंतर चेतनेमध्ये परिवर्तन घडून येते.

चेतनेचे हे परिवर्तन आणि त्याची पूर्वतयारी यांची तुलना नेहमी अंड्यातील कोंबडीच्या पिलाच्या घडणीशी केली जाते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अंडे जसेच्या तसे असते, त्यामध्ये काहीही बदल दिसत नाही आणि जेव्हा ते पिल्लू आत पूर्ण विकसित झालेले असते, पूर्णतया जिवंत झालेले असते, तेव्हा ते त्याच्या छोट्याशा चोचीने त्या कवचाला टोचे मारते आणि त्यातून बाहेर पडते.

चेतनेच्या परिवर्तनाच्या क्षणीसुद्धा असेच काहीसे घडून येते. दीर्घ काळपर्यंत काहीच घडत नाही असेच तुम्हाला वाटत असते; तुमची चेतना नेहमीप्रमाणेच आहे, त्यात काहीच बदल नाही असेच तुम्हाला वाटत असते. तुमच्यापाशी जर का तीव्र अभीप्सा असेल तर तुम्हाला कधीकधी विरोधदेखील जाणवतो; जणूकाही तुम्ही एखाद्या भिंतीवर धक्के देत असता पण ती काही ढासळत नाही. पण जेव्हा तुमची अंतरंगातून तयारी झालेली असते तेव्हा एक शेवटचा प्रयत्न – तुमच्या अस्तित्वाच्या कवचाला धक्के देण्याचा एक प्रयत्न पुरेसा ठरतो आणि मग सर्वकाही खुले होते आणि तुम्ही एका आगळ्यावेगळ्या चेतनेमध्ये उन्नत झालेले असता.

 

– श्रीमाताजी [CWM 04 : 18-19]

अमृतवर्षा ०३

 

जिथे कोणी येणार जाणार नाही अशा एका अगदी शांत कोपऱ्यामध्ये बसले पाहिजे, जिथे तुम्ही अगदी सुयोग्य अशा स्थितीत असाल आणि अगदी नि:श्चल बसलेले असाल आणि मग अशा स्थितीत तुम्ही ध्यान करू शकाल – असे समजण्याची सार्वत्रिक चूक करू नका. यात काही तथ्य नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये यशस्वीरित्या ध्यान करता येणे ही खरी आवश्यक गोष्ट आहे. आणि ‘डोकं रिकामं करणे’ याला मी ‘ध्यान’ म्हणत नाही तर ‘ईश्वराच्या निदिध्यासनामध्ये स्वत:चे लक्ष एकाग्र करणे’ याला मी ‘ध्यान’ म्हणते. आणि असे निदिध्यासन तुम्ही करू शकलात तर, तुम्ही जे काही कराल त्याची गुणवत्ता बदलून जाईल – त्याचे रंगरूप बदलणार नाही, कारण बाह्यत: ती गोष्ट तशीच दिसेल पण त्याची गुणवत्ता बदललेली असेल.

 

जीवनाची गुणवत्ताच बदलून जाईल आणि तुम्ही जे काही होतात त्यापेक्षा तुम्ही काहीसे निराळेच झाले आहात असे तुम्हाला जाणवेल; एक प्रकारची शांती, एक प्रकारचा दृढ विश्वास, आंतरिक स्थिरता, कधीच हार न मानणारी, अढळ अशी अपरिवर्तनीय शक्ती तुम्हाला जाणवेल.

 

अशा स्थितीमध्ये तुम्हाला कोणी बाधा पोहोचविणे अवघड असते. विविध शक्ती त्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. हे जगत अनेक विरोधी शक्तींनी भरलेले आहे; त्या शक्ती सर्व काही बिघडवून टाकू पाहत असतात… पण त्यामध्ये त्या काही अंशीच यशस्वी होतात; फक्त त्या शक्ती तुम्हाला नवीन प्रगती करण्यास भाग पाडण्यासाठी आवश्यक असते तेवढ्याच प्रमाणात यशस्वी होतात.

 

जीवनाकडून तुमच्यावर जेव्हा कधी आघात होतो तेव्हा तुम्ही लगेचच स्वत:ला सांगितले पाहिजे, “अरेच्चा, याचा अर्थ आता मला सुधारणा केली पाहिजे.” आणि मग तेव्हा तोच आघात हा आशीर्वाद ठरतो. अशावेळी तोंड पाडून बसण्यापेक्षा, तुम्ही मान वर करून आनंदाने म्हणता, ”मी काय शिकले पाहिजे? ते मला जाणून घ्यायचे आहे. मी माझ्यामध्ये काय सुधारणा केली पाहिजे? ते मला जाणून घ्यायचे आहे.” तर, तुम्ही असे केले पाहिजे.

 

– श्रीमाताजी [CWM 04 : 121-122]

अमृतवर्षा ०२

 

चेतनेचा प्रवाह दुतर्फा असतो. प्रथम आरोहण असते; तुम्ही जडभौतिक चेतनेमधून बाहेर पडून, उच्चतर चेतनेच्या श्रेणीमध्ये स्वत:चे उन्नयन करता. निम्नतर श्रेणीमधून उच्चतर श्रेणीमध्ये होणारे हे आरोहण, उच्चतराने निम्नतर श्रेणीमध्ये अवतरित व्हावे अशी त्याला साद घालत असते. जेव्हा तुम्ही पृथ्वीच्या वर उठता, उन्नत होता तेव्हा, तुम्ही या पृथ्वीच्या वर असणारे असे काहीतरी खाली उतरवता – कोणतातरी प्रकाश, किंवा रूपांतरकारी अशी कोणतीतरी शक्ती, किंवा जुन्या प्रकृतीचे रूपांतरण घडवून आणण्याकडे जिचा कल असतो अशा शक्तीचे तुम्ही अवतरण घडवता.

आणि मग, ज्या गोष्टी वेगवेगळ्या होत्या, एकमेकींशी असंलग्न होत्या, एकमेकींपासून विलग होत्या; जसे की, तुमच्यामधील उच्चतर आणि निम्नतर स्तर, तुमच्या व्यक्तित्वाचे आंतरिक आणि बाह्य स्तर या गोष्टी आता एकत्रित येऊ लागतात, हळूहळू त्या एकमेकांमध्ये मिसळू लागतात आणि कालांतराने एका सुसंवादामध्ये एक सत्य बनून, एकरूप होतात. ज्याला ‘चमत्कार, चमत्कार’ असे म्हणतात ते असे घडून येतात.

विश्व हे चेतनेच्या अगणित स्तरांचे बनलेले आहे आणि त्या प्रत्येक स्तराचे, त्या प्रतलाचे स्वत:चे असे काही खास नियम असतात, कायदे असतात; एका स्तराचे कायदे दुसऱ्या स्तराला लागू पडत नाहीत. ‘चमत्कार’ म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, अचानकपणे घडून आलेले अवतरण असते; एका वेगळ्या स्तरावरील चेतनेचे आणि तिच्या शक्तींचे उसळून येणे असते. बहुधा या प्राणिक शक्ती असतात आणि त्यांचे या जडभौतिक स्तरावर अवतरण होते. जडभौतिक यंत्रणेवर उच्चतर स्तरावरील यंत्रणेकडून वर्षाव होतो. जणू काही एका वीजकल्लोळाद्वारे आपल्या सामान्य चेतनेचे ढग भेदले जातात आणि त्यामध्ये उच्चतर शक्तींचा, गतिविधींचा, प्रवाहांचा वर्षाव होतो.

त्या परिणामाला आपण ‘चमत्कार’ म्हणतो. कारण आपल्याला अचानक झालेला बदल दिसतो; आपल्या सामान्य कक्षेमधील निसर्गकायद्यामध्ये आकस्मिक हस्तक्षेप झालेला आपल्याला दिसतो पण आपल्याला त्याचा क्रम, ती व्यवस्था, त्याचे कारण काय हे काहीच कळत नाही, दिसू शकत नाही कारण त्या चमत्काराचा स्रोत हा एका वेगळ्या स्तरावर असतो.

आपल्या जडभौतिक जगामध्ये त्यापलीकडील जगतांचा असा हस्तक्षेप होणे ही फार काही असामान्य घटना नाही, किंबहुना अशा घटना या नित्याच्या असू शकतात;  आपल्याला त्या घटना पाहण्याची दृष्टी असेल आणि त्यांचे निरीक्षण कसे करावे याची जाण जर आपल्याला असेल तर असे पुष्कळ चमत्कार आपल्याला पदोपदी दिसू शकतील. विशेषत: उच्चतर स्तरावरील वैभवाचे, पृथ्वी-चेतनेमध्ये अवतरण घडवून आणण्यासाठी जे प्रयत्नशील असतात त्यांच्याबाबतीत तर ती नित्याची बाब असू शकते.

 

– श्रीमाताजी [CWM 03 : 30-31]

अमृतवर्षा ०१

साधक : खरेखुरे स्वातंत्र्य अस्तित्वातच नाही का? प्रत्येकच गोष्ट ही पूर्णपणे पूर्वनिर्धारित असते का, अगदी स्वातंत्र्य सुद्धा पूर्वनिर्धारित असते का ? प्रारब्धवाद हेच सर्वोच्च रहस्य आहे का?

श्रीमाताजी : स्वाधीनता आणि प्रारब्ध (Freedom and fatality) स्वातंत्र्य आणि निश्चयवाद (liberty and determinism) या गोष्टी म्हणजे चेतनेच्या भिन्नभिन्न पातळ्यांवर प्राप्त होणारी सत्य आहेत. त्या दोहोंना समान पातळीवर आणून, परस्परांविरोधात उभे करण्यास मनाला भाग पाडणारे जर कोणी असेल तर ते अज्ञानच असते.

चेतना ही काही एकच एक एकसंध अशी वास्तविकता नसते, तर ती खूप जटिल असते; एखादे सरळसोट प्रतल असल्यासारखी ती नसते; तर ती बहुआयामी असते. एका बाजूला सर्वोच्च उंचीवर ‘अव्यक्त परात्पर’ असते तर सर्वात खाली ‘जडद्रव्य’ असते आणि या दोहोंच्या दरम्यान, म्हणजेच सर्वोच्च उंची आणि निम्नतम खोली यांच्या दरम्यान चेतनेच्या स्तरांच्या अगणित छटा असतात.

जडभौतिकाच्या प्रतलावर आणि सामान्य चेतनेच्या स्तरावर तुमचे हातपाय बांधलेले असतात. तेथे तुम्ही प्रकृतीच्या यंत्रणेचे गुलाम असता; तुम्ही कर्मबंधांनी बद्ध झालेले असता, आणि तेथे जे जे काही घडते ते, जे आधी घडून गेले आहे त्याचा काटेकोर परिणाम असतो. तेथे स्वतंत्र कृतीचा व कर्माचा आभास असतो पण वास्तविक, इतर जण जे काही करत असतात त्याच गोष्टी तुम्ही करत असता, या जगतामध्ये प्रकृतीच्या लौकिक व्यापारांचे तुम्ही केवळ प्रतिध्वनी असता, प्रकृतीच्या वैश्विक यंत्राच्या रहाटगाडग्यावर तुम्ही असहाय्यपणे फिरत राहता.

पण हे असेच असायला पाहिजे असे मात्र नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमचे स्थान बदलू शकता; तुम्ही खाली असण्याऐवजी, या अजस्त्र यंत्रणेखाली चिरडून जाण्याऐवजी, किंवा कळसूत्री बाहुलीप्रमाणे हालचाली करत राहण्याऐवजी, तुम्ही वर उठू शकता आणि वरून पाहू शकता; आणि तुमच्या चेतनेमध्ये परिवर्तन घडवून त्यायोगे, वरकरणी अपरिहार्य भासणारी परिस्थिती आणि बंधवत वाटणारी स्थिती यामध्ये बदल घडवून आणणाऱ्या सुकाणूचा तुम्ही ताबा घेऊ शकता.

एकदा का तुम्ही त्या रहाटगाडग्याच्या वर उठलात आणि वर भरभक्कमपणे उभे राहिलात तर तुमच्या असे लक्षात येते की, तुम्ही मुक्त आहात. तुम्ही सर्व प्रकारच्या सक्तींपासून मुक्त आहात. तुम्ही आता केवळ एक अगतिक साधन राहत नाही; इतकेच नव्हे, तर तुम्ही आता एक सक्रिय असे माध्यम बनता. आता तुम्ही तुमच्या कर्मफलांनी बद्ध राहत नाही; तर, तुम्ही त्या कर्मफलांमध्ये बदलसुद्धा घडवून आणू शकता.

एकदा का तुम्ही या साऱ्याकडे शक्तींची लीला या दृष्टीने पाहू लागलात; एकदा का तुम्ही या शक्तींचा उगम जेथे आहे त्या चेतनेच्या स्तरावर जाऊन पोहोचलात, आणि त्या गतिमान अशा शक्ति-उगमाशी तद्रूप झालात की मग, तुम्ही केवळ एखाद्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे हालचाल करणारे राहात नाही तर तिची सूत्रे हालविणाऱ्यांपैकी एक बनता.

कर्माच्या चक्रातून बाहेर पडून दिव्य गतिविधींमध्ये प्रवेश होणे हेच खरंतर योगसाधनेचे उद्दिष्ट असते. योगसाधनेच्या साहाय्याने तुम्ही प्रकृतीच्या यांत्रिक चक्रामधून बाहेर पडता. प्रकृतीच्या यांत्रिक चक्रामध्ये तुम्ही केवळ एक अज्ञानी गुलाम असता; असहाय्य, अगतिक असे साधन असता, अशा यांत्रिक चक्रामधून योगसाधनेच्या आधारे तुम्ही बाहेर पडता आणि एका निराळ्या स्तरावर चढून जाता; तेथे तुम्ही ‘उच्चतर नियती’च्या कार्याचे जागरूक सहभागीदार आणि क्रियाशील माध्यम बनता.

– श्रीमाताजी [CWM 03 : 29-30]

श्रीअरविंद बडोद्यामध्ये प्राध्यापक होते तेव्हा श्री. के. एम. तथा कन्हैयालाल मुन्शी हे त्यांचे विद्यार्थी होते. तेव्हा विद्यार्थीदशेत असताना, मुन्शी यांनी श्रीअरविंदांना प्रश्न विचारला होता, “राष्ट्रवादाची भावना कशी विकसित करता येईल?”

 

श्रीअरविंदांनी भिंतीवरील भारताच्या नकाशाकडे निर्देश करत म्हटले, “या नकाशाकडे पाहा. यामध्ये भारतमातेचे रूप पाहण्याचा प्रयत्न करा. शहरं, पवर्तराजी, नद्या, जंगले या साऱ्यांनी मिळून तिचा देह तयार होतो. या देशामध्ये राहणारी माणसं म्हणजे या देहातील जिवंत पेशी आहेत. आपले साहित्य म्हणजे तिची स्मृती व वाणी आहे. तिच्या संस्कृतीचा गाभा हा तिचा आत्मा आहे. मुलांच्या आनंदामध्ये आणि स्वातंत्र्यामध्ये तिची मुक्ती आहे. भारत ही एक ‘सचेतन माता’ आहे असा भाव ठेवून तिच्याकडे पाहा, तिचे ध्यान करा आणि नवविधा भक्तीच्या योगाने तिचे पूजन करा….

 

पुढील काळात याच कन्हैयालाल मुन्शी यांनी राष्ट्रभावनेतून ‘भारतीय विद्या भवन’ची स्थापना केली.

 

‘भारत  – एक दर्शन’ ही मालिका येथे समाप्त होत आहे.

 

(Mother’s Chronicles, Book Five by Sujata Nahar)

हा असा काळ आहे की जेव्हा, अखिल विश्वाप्रमाणेच भारतासाठीसुद्धा, त्याची भावी नियती आणि त्याच्या पावलांचे वळण हे शतकासाठी म्हणून आत्ता दमदारपणाने निर्धारित केले जात आहे, आणि हे निर्धारण म्हणजे काही कोणत्या एखाद्या सामान्य शतकासाठीचे निर्धारण नव्हे तर, हे शतक स्वतःच मुळात असे एक महान निर्णायक वळण आहे की, ज्या शतकामध्ये मानवसृष्टीच्या आंतरिक आणि बाह्य इतिहासाच्या दृष्टीने प्रचंड उलथापालथी व्हायच्या आहेत.

 

आपण आत्ता ज्या कृती करू त्यानुसार, आपल्या त्या कर्माची मधुर फळे आपल्याला प्रदान केली जाणार आहेत आणि आत्ताच्या या निर्णायक क्षणी देण्यात आलेली अशा प्रकारची प्रत्येक हाक ही आपल्या नागरिकांच्या आत्म्याला देण्यात आलेली एक संधी असणार आहे. तसेच ती एक निवड असणार आहे आणि त्याचबरोबर, ती एक कसोटीदेखील असणार आहे.

 

आपण अशी आशा करूया की, ती हाक प्रत्येकाच्या अस्तित्वाच्या सर्वोच्च उंचीपर्यंत जाऊन पोहोचावी आणि त्याच्या पारड्यात ‘नियतीच्या स्वामी’चे अगदी उघडपणाने झुकते माप पडावे.

 

– श्रीअरविंद [CWSA 01 : 413]

 

*

 

भारताचे भविष्य अगदी सुस्पष्ट आहे. भारत हा जगत्गुरू आहे. जगाची भावी संरचना ही भारतावर अवलंबून असणार आहे. भारत हा एक जिवंत आत्मा आहे. भारत हा जगामध्ये आध्यात्मिक ज्ञानाचे मूर्त रूप साकार करत आहे.

 

भारत सरकारने भारताचा हा अर्थ लक्षात घेतला पाहिजे आणि त्यानुसार त्यांच्या कृति-कार्यक्रमाची आखणी केली पाहिजे.

 

– श्रीमाताजी [CWM 13 : 353]

भारत – एक दर्शन ३१

भारत हा एकच असा देश आहे की, जेथे आंतरात्मिक कायद्याचे अधिपत्य चालू शकते आणि ते तसे चाललेच पाहिजे. आणि त्यासाठी सुयोग्य काळ आता येथे आला आहे.

…ज्या भारताकडे एकमेवाद्वितीय असा आध्यात्मिक वारसा आहे, त्या भारतासाठी – आंतरात्मिक कायद्याचे अधिपत्य प्रस्थापित होणे – ही एकमेव शक्य अशी मुक्ती असेल.

*

भारत हा आधुनिक मानवजातीच्या सर्व समस्यांचे प्रतिनिधित्व करणारा देश झाला आहे. भारत हाच पुनरुत्थानाची भूमी ठरेल – तो अधिक उन्नत आणि अधिक सत्य अशा जीवनाच्या पुनरुत्थानाची भूमी बनेल.

– श्रीमाताजी [CWM 13 : 370, 368]